Month: June 2024

राष्ट्रपतींकडून मोदींना शपथविधीचे आमंत्रण!

 ९ जूनचा मुहुर्त ठरला ! नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा मुहुर्त अखेर ठरला. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना येत्या रविवारी ९…

राजीनामा अमान्य

फडणवीस पुन्हा इन अॅक्शन नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला लाजीरवाण्या अपयशास सामोर जावे लागले. २०१९ साली २३ जागा जिंकणार्या भाजपाची अवघ्या ९ जागांवर पडझड झाली. या नामुष्कीजनक पराभवाची जबाबदारी…

‘जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू’

बारामतीच्या निकालानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया मुंबई : आमदारांशी चर्चा केल्यानंतर काही नोंदी घेतल्या असून त्यातून काही निर्णय घेऊन आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत असे सांगतानाच जनता जनार्दन सर्वस्व असते. जनतेने दिलेला कौल विनम्रपणे आम्ही स्वीकारलेला आहे. जनतेचा आमच्याबद्दलचा जो काही विश्वास कमी झालेला आहे तो विश्वास पुन्हा संपादन करण्याकरीता आम्ही जीवाचे रान करू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गुरुवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस कोअर कमिटीची बैठक आणि त्यानंतर सायंकाळी ट्रायडेंट हॉटेलमध्ये आमदारांची बैठक पार पडली. त्यानंतर रात्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते. या दोन्ही बैठकीत लोकसभेत कशाप्रकारे निकाल लागले याबद्दल चर्चा करण्यात आली. या बैठकीला काही आमदार त्यांच्या खाजगी अडचणीमुळे तर मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे ऑपरेशन झाल्याने येऊ शकले नाहीत अशी माहितीही अजित पवार यांनी दिली. आमचे आमदार विरोधकांच्या संपर्कात आहेत अशा ज्या बातम्या येत आहेत त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही सर्व आमदार आमच्यासोबत आहेत हे चित्र आजच्या बैठकीत पहायला मिळाले असेही अजित पवार यांनी विरोधकांनी उठवलेल्या वावडयांवर बोलताना स्पष्ट केले. बारामतीचा जो कौल लागला आहे त्यामुळे मी स्वतः आश्चर्यचकित झालो आहेच शिवाय मी अनेक वर्षे तिथे काम करतोय. कोणत्याही निवडणूका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकरांनी मला दिलेला होता. यावेळेला काय घडलंय माहीत नाही असेही अजित पवार म्हणाले. यापुढे आम्ही जनतेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीमधील प्रमुखांशी चर्चा करुन लोकसभेच्या ४८ जागांसंदर्भात निर्णय होत असताना ज्या त्रुटी राहिल्या. कुठे आम्ही कमी पडलो यावर चर्चा झाली. या निवडणुकीत मुस्लिम समाज आमच्यापासून दूर गेला होता. संविधानाबद्दल जो मुद्दा विरोधकांनी मांडला आणि यंदा ‘अब की बार चारशे पार’ हे संविधान बदलण्यासाठी आहे असा प्रचार केला. त्या प्रचाराला मागासवर्गीयांनी साथ दिली. शिवाय आरक्षणाचा मुद्दा मराठवाडयातील जागा बघितल्या त्यात संभाजीनगरची जागा सोडली तर त्या परिसरात महायुतीची एकही जागा येऊ शकली नाही. या काही गोष्टी निवडणूकीत आम्हाला पहायला मिळाल्या आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले. आमदारांशी चर्चा केल्यानंतर काही नोंदी आम्ही केल्या आहेत त्यातून निर्णय घ्यावे लागणार आहे. त्यादृष्टीने आमची पुढची वाटचाल करणार आहोत. या तीन – चार गोष्टींचा फटका आम्हाला निश्चित बसला. हे मान्य करावे लागणार आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा आज ‘पाऊसवेळा’ कार्यक्रम

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे शनिवार दिनांक ८ जून रोजी संध्याकाळी ५.३० वाजता `पाऊसवेळा’ हा कार्यक्रम डॉ. सुधा जोशी यांच्या सहकार्याने केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला असून रसिकांसाठी खुला आहे. पावसाआधीचा पाऊस ते परतीचा पाऊस, शैशवातला पाऊस ते प्रौढपणीचा पाऊस, पहाटेपासून मध्यरात्रीपर्य॔तचा पाऊस, आतला नि बाहेरचा पाऊस…..अनुभवा ही यामागची संकल्पना आहे. मराठीतील नव्या जुन्या साहित्यिकांच्या शब्दातून झरणाऱ्या पावसाची अनंत रूपे यावेळी रसिकांना अनुभवता येतील. या कार्यक्रमाची संहिता आणि निवेदन डॅा. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे आहे तर अभिवाचन गिरीश दातार आणि श्रीमती गौरी देशपांडे करतील. त्यांना धनश्री गणात्रा संगीतसाथ देतील.

सेक्टर ४ घणसोली येथील बेघर निवारा केंद्र कार्यान्वित 

नवी मुंबई : महानगरपालिकेमार्फ दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत १५ मार्च, २०२४ पासून प्लॉट क्रमांक २४०, सेक्टर ४, घणसोली येथे बेघर निवारा केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. या बेघर निवारा केंद्राची क्षमता १०३ लाभार्थी इतकी असून याठिकाणी बेघर व्यक्तींसाठी चहा, नाष्टा, दोन वेळचे जेवण, ॲक्वागार्ड मशीनचे पिण्याकरिता पाणी, गादी, उशी, चादर, सामान ठेवण्यासाठी लॉकर तसेच मनोरंजनाकरिता टि.व्ही. संच इत्यादी साहित्य विनामूल्य उपलब्ध्‍ करुन देण्यात आले आहे. या केंद्रामध्ये पुरूष, महिला, दिव्यांग व्यक्ती व वृद्ध यांच्याकरिता राहण्याची स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध आहे. या बेघर निवारा केंद्राची संपूर्ण माहिती पोलीस आयुक्त, नवी मुंबई आणि महानगरपालिकेच्या आठही विभागांचे विभाग अधिकारी यांना देण्यात आलेली आहे. तरी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोणीही बेघर रस्त्यावर राहू नये यादृष्टीने रस्त्यावर बेघर व्यक्ती, (वृद्ध, महिला, मुले व दिव्यांग व्यक्ती) आढळून आल्यास त्याची माहिती नमुंमपा समाज विकास विभागातील राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाचे व्यवस्थापक श्री. तुषार पवार यांस 9881636168 अथवा आस्था सामाजिक विकास सेवा संस्थेचे व्यवस्थापक श्री. राहुल वाढे यांस 8669393309 या क्रमांकावर संपर्क साधून दयावी असे जाहिर आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

कासा बाजारपेठ अडकली कोंडीत

कासा : मनोर-वाडा रस्त्यावरील पुलाची दुरुस्ती आणि ठाणे-घोडबंदर येथील रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद असल्याने अनेक वाहने सध्या भिवंडी-वाडा-विक्रमगड, तलवाडा, कासा-चारोटी मार्गे वळवण्यात आली आहे. त्यात कासा बाजारपेठेमध्ये रस्ता अरुंद आहे. त्यामुळे डहाणू-नाशिक राज्य मार्गावर कासा बाजारपेठ ते चारोटी नाका या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे कासामधील रहिवासी त्रस्त झाले आहेत. कासा बाजारपेठेत अनेक ठिकाणी विक्रेते रस्त्याकिनारी बसलेले असतात. त्याचबरोबर रिक्षा थांबे, बस थांब्यांमुळे प्रवाशांची गर्दी असते. दुकानदार, व्यापाऱ्यांच्या मालवाहू ट्रक रस्त्याजवळच उभ्या असतात. कासा उपजिल्हा रुग्णालय, कासा पोलिस ठाणे, कृषी दुकाने, तलाठी कार्यालय हे रस्त्यालगतच असल्याने परिसर नेहमी गजबजलेला असतो. काही दिवसांत शाळा, महाविद्यालय सुरू होणार आहे. यात भिसे विद्यालयातील जवळपास दोन हजार विद्यार्थी याच रस्त्याचा वापर करतात. कासा मुख्य बाजारपेठ ही कासा-चारोटी नाका या रस्त्यावर येत असल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे वनविभागाने रस्त्यावरील अतिक्रमणाकडे लक्ष द्यावे; तसेच बांधकाम विभाग, पोलिस प्रशासन, ग्रामपंचायतींनीही या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. कासा-चारोटी मार्गावर वनविभागाने आपल्या जागेतील अतिक्रमणाकडे लक्ष द्यावे. बांधकाम विभाग, पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासनाने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करावीत. कारण काही दिवसांत शाळा, महाविद्यालये सुरू होतील. शेतकरी शेतीविषयक सामान खरेदी करण्यासाठी बाहेर पडतील. त्यामुळे या रस्त्यावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यात वाहतूक कोंडी होऊन अपघात घडू शकतात.

अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते कॅरम स्पर्धा

कौस्तुभ, मिहीर, सार्थक, ध्रुव उपांत्यपूर्व फेरीत मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित अमृत महोत्सवी गोविंदराव माहिते चषक १९ वर्षाखालील मुलामुलींच्या कॅरम स्पर्धेत डीपीवायए हायस्कूलचा राष्ट्रीय दर्जाचा ज्युनियर कॅरमपटू कौस्तुभ जागुष्टे व एल.एन कॉलेजचा मिहीर शेख तसेच पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर, डॉ. अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूलचा धुव भालेराव आदींनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. राष्ट्रीय दर्जाचे ज्युनियर कॅरमपटू पोद्दार कॉलेजची रुची माचीवले व मराठा हायस्कूलची सिमरन शिंदे, तसेच रत्नागिरीची स्वरा मोहिरे यांना निसटत्या पराभवास सामोरे जावे लागले. गौरवमूर्ती गोविंदराव मोहिते व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी खेळाडूंना शुभेच्छा देऊन स्पर्धेला प्रारंभ केला. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील ४८ खेळाडूंमध्ये चुरशीच्या लढती परेल येथील आरएमएमएस सभागृहामध्ये सुरु आहेत. तिसऱ्या फेरीत सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखत कौस्तुभ जागुष्टेने माजी विजेत्या समीर खानचे आव्हान १७-३ असे तर मिहीर शेखने नेहाल उस्मानीचे आव्हान १४-४ असे संपुष्टात आणले. प्रारंभ छान करूनही पृथ्वी बडेकरला ध्रुव भालेरावने १२-७ असे नमविले. अन्य सामन्यात सार्थक केरकरने रुची माचीवलेचा १५-१० असा, भव्या सोळंकीने अथर्व म्हात्रेचा १६-६ असा, बलाढ्य सिमरन शिंदेला हरविणाऱ्या मयुरेश पवारने अमेय जंगमचा २३-० असा, प्रसन्ना गोळेने निधी सावंतचा १७-१० असा तर जोनाथन बोनालने तन्वी परबचा २०-० असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. पंचाचे कामकाज सचिन शिंदे, चंद्रकांत करंगुटकर व अविनाश महाडिक आदी करीत आहेत. विजेत्या-उपविजेत्यांना स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या हस्ते शनिवारी गौरविण्यात येणार आहे.

शिवाजी महाराजाचे आदर्श समोर ठेवून कल्याणासाठी काम करा – छायादेवी शिसोदे

ठाणे : शिवाजी महाराजाचे आदर्श समोर ठेवून ग्रामस्थांच्या कल्याणासाठी काम करा, असे मत ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी व्यक्त केले. ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे येथील आवारात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम सकाळी ९ वाजता संपन्न झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक छायादेवी शिसोदे यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शिवराज्याभिषेकाची मानाची गुढी उभारुन सगळ्यानी वंदन केले. राष्ट्रगीत व राज्यगीत गात उत्साही वातावरण निर्माण झाले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल गौरवपर भाषण केले. शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेत आपण सर्वांनी ग्रामस्थांच्या कल्याणासाठी काम करावे. संकटावर मात करत काम करण्याची प्रेरणा आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून सातत्याने घ्यायला हवी. मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते व सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या सदिच्छा दिल्या. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.पु. व स्व) प्रदिप कुलकर्णी, लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, कार्यकारी अभियंता संदिप चव्हाण, शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे, महिला व बालविकास विभाग प्रमुख संजय बागुल, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, स्वच्छा व पाणी पुरवठा विभाग प्रमुख अतुल पारसकर इतर सर्व विभाग प्रमुख तसेच अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सुत्रसंचालन अनिल सुर्यवंशी यांनी केले.

जिल्ह्यातील अर्भक व बालमृत्युदर दर कमी करणार –  डॉ. गंगाधर परगे

अनिल ठाणेकर ठाणे : अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कार्यरत झाली आहे.‌ जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अतिसार नियंत्रण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना जिल्ह्यातील अर्भक व बालमृत्युदर दर कमी करणार असल्याचे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी व्यक्त केले. आरोग्य विभागामार्फत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा आज, ६ जून ते २१ जून या कालावधी दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत असून अर्भक व बालमृत्युदर दर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. देशात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून, ५ ते ७ टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. या बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे.‌ जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.अतिसाराच्या उपचारासाठी सर्व आरोग्य संस्थांमध्ये बाह्य रुग्ण विभागात व आंतररुग्ण विभागात ओआरएस व झिंक कॉर्नर स्थापन करण्यात येणार असून या कॉर्नरमध्ये ओआरएस पाकिटे व झिंक गोळ्या उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. कार्यक्रम जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली पार पाडणार असून जिल्हास्तरीय पर्यवेक्षण देखील त्यांच्याकडून केले जाणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली. दरवर्षी शासनातर्फे एकाचवेळी हा कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यात येतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उन्हाळा व पावसाळा या हंगामामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणाऱ्या अतिसाराच्या संभाव्य घटना टाळल्या जातात. या पंधरावड्या मध्ये आशा स्वयंसेविका कार्यक्षेत्रातील सर्व घरांना भेटी देणार असून ५ वर्षांखालील सर्व मुलांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. अतिसार लागण झालेल्या सर्व मुलांना ओआरएस पाकीट व झिंक गोळ्यांचे वाटप आरोग्य विभागाकडून करण्यात येणार असून पाच वर्षांखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंध व व्यवस्थापनासाठी क्षेत्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण व समुपदेशन केले जाणार आहे. हा कार्यक्रम राबवताना अति जोखमीचे क्षेत्र व दुर्बल घटकांवर आरोग्य विभाग विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. विशेष झोपडपट्ट्या, पूरग्रस्त भाग, आरोग्य सेविका कार्यरत नसलेली उपकेंद्रे, भटक्या जमाती, विटभट्टी कामगार, स्थलांतरित मंजूर, बेघर मुले आशा ठिकाणी विशेष लक्ष दिले जाणार असून मागील २ वर्षात अतिसाराची साथ असलेले क्षेत्र व दूषित पाणीपुरवठा क्षेत्र याकडेही प्राधान्याने लक्ष केंद्रित केले जाणार आहे.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आरोग्य सेविकेमार्फत ग्राम आरोग्य पोषण दिवशी ५ वर्षांखालील बालकांच्या माताना अतिसाराचा प्रतिबंध कसा करावा तसेच ओआरएस व झिंकचे महत्व, स्तनपान चालू ठेवणे बाबत, स्वच्छतेविषयी माहिती, शौचालयांचा वापर इत्यादिबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये हात धुण्याचे प्रात्यक्षिक देखील दाखवले जाणार आहे. चौकट जिल्हयात एकूण ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, २ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र तर १९० उपकेंद्रांमध्ये ० ते ५ वयोगटातील लोकसंख्या सुमारे ५२ हजार १७३ असून एकूण १ हजार ३०५ आशा स्वयंसेविकेंच्या माध्यमातून घरोघरी जावून सर्वेक्षण करून सेवा दिली जाणार आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठामपा प्रयत्नशील – प्रशांत रोडे

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरण पूरक असावा यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे. त्याबाबत पर्यावरण क्षेत्रातील संस्था व तज्ज्ञ आणि पारंपरिक मूर्तिकार संघटना यांच्याशी संवाद साधण्यात येत असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या दालनात यासंदर्भात गुरूवारी बैठक झाली. या बैठकीस, स्वंयसेवी संस्थेतर्फे रोहित जोशी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी मंगेश पंडित, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपमुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सव २०२४ साजरा करण्यासाठीची पूर्वतयारी आणि नागरीकांचा सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रमांवर चर्चा झाली. महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दुष्परिणामांविषयी माहिती देणारे कार्यक्रम आणि शाडू मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आणि सजावटीचे साहित्य यांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक गणपती मुर्तीसाठी जनजागृतीकरता, महिती पत्रके, फलक व ध्वनीफित याद्वारे करण्यात येईल. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. पर्यावरण पूरक मूर्ती बनवून, प्लास्टिक आणि इतर हानिकारक साहित्याचा वापर टाळून आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचे रक्षण करूया, असेही आवाहन महापालिकेने केले आहे. या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी कृपया ठाणे महानगरपालिका मुख्यालय, पर्यावरण विभाग येथे संपर्क साधावा.