मुंबई : वरळी हिट अॅड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने सात दिवसांची म्हणजेच येत्या १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अधिक तपास करायचा असून अपघात ज्या गाडीने झाला त्या
गाडीची नंबर प्लेटही गहाळ झाली असून तिचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी केल्याचा पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. आरोपीला कोणी मदत केली याच तपस करायचा असून आरोपीच्या जास्तीत जास्त कस्टडीची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली होती.
गुन्हा केल्यानंतर कारच्या नंबरप्लेटची विल्हेवाट कुठे लावली याची माहिती आरोपी देत नाही. तसेच त्याला पळून जाण्यासाठी कुणी मदत केली याचीही माहिती आरोपी देत नाही असा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला. गुन्ह्यातील कार ही कोणाची आहे ,ती त्याला कुणी वापरायल दिली याच तपास होणे गरजचे आहे असं पोलिसांनी सांगितलं.
ओळख लपवण्यासाठी केस कापले आणि दाढी काढली
अपघात झाल्यानंतर आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी गाडीतच केस आणि दाढी कापल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. आरोपीच्या वडिलांनी अपघाताचा मुख्य पुरावा असलेली गाडी लपवण्याचा प्रयत्न केल्याचं तपासातून स्पष्ट झालं आहे.
आरोपी कुठल्याही थराला जावू शकतात. न्यायालयात सहानभूती मिळवण्यासाठी आरोपीकडून प्रयत्न सुरू आहे. वरळी अपघातात एका महिलेची हत्या झाली आहे. त्यामुळे पोलिसांना तपास करण्यासाठी आरोपीची जास्तीत जास्त कस्टडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
कुठल्याही पुराव्याला धक्का नाही, मिहीरच्या वकिलांचा दावा
सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर मिहीर शाहाच्या वकिलांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले की, यातील एका आरोपीला मंगळवारी हजर केले आहे. आरोपीकडून तपासाला सहकार्य केलं जात आहे. तपासात 95 टक्के माहिती आणि पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. आम्ही कुठल्याही पुराव्यांना धक्का लावलेला नाही. आरोपीचे रक्ताचे नमुनेही घेतलेले आहे.
मिहीर शाहाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवून वरळीमधील अॅट्रिया मॉलजवळ कावेरी नाखवा या महिलेचा जीव घेतला होता. त्यानंतर तो फरार झाला. आता पोलिसांनी दोन दिवसांनंतर त्याला शहापूरमधून अटक केली.
दरम्यान, वरळी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून आरोपीचा फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली.
