आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
अनिल ठाणेकर

 

 

ठाणे : गोपाळकाला (दहीहंडी) उत्सवाला शासन स्तरावर ’राष्ट्रीय सण“ म्हणून जाहिर करून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन विनंती केली होती. त्याअनुषंगाने आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश येऊन शासनाने परिपत्रक काढून मुंबई व एम.एम.आर. क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा सोडून शासकिय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दहिहंडीच्या दिवशी २७ ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
देशातील महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिक परंपरा जपणारे राज्य म्हणून ओळखले जाते. त्यासाठी राज्यामध्ये वेगवेगळे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात त्यापैकी गोकुळाष्टमी म्हणजेच दहिकाला उत्सव प्राचीन काळापासून सुरू असलेला लोकप्रिय सण आहे. गोपाळकाला ह्या सणाबद्दल तरूण-तरूणींमध्ये आकर्षण असून या उत्सवात बाळ-गोपाळांपासून ते थोरा-मोठ्यापर्यंत तसेच महिलांही मोठ्या हिरहिरीने सहभागी होतात. प्रामुख्याने मुंबई, ठाणे या शहरांबरोबरच महाराष्ट्रातील इतर छोट्या-छोट्या शहरामध्येही या उत्सवाला स्पर्धेचे रूप प्राप्त झाल्याने मोठ्या उत्साहात सण साजरा होऊ लागल्याने, महाराष्ट्राबरोबरच देश-विदेशातही हा उत्सव लोकप्रिय होऊ लागला आहे. त्यासाठी स्पेन सारख्या देशामधून स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धक येत असतात. उत्सव साजरा करण्यासाठी खास करून तरूणांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते. यादृष्टीने गोपाळकाल्याच्या दिवशी जिल्हाधिकार्यांना असलेल्या अधिकारानुसार फक्त मुंबई व ठाणे विभागाला सुट्टी जाहिर केली जाते परंतू, हा निर्णय शासन स्तरावर घेतला जात नव्हता. त्यामुळे खर्‍या अर्थाने मोठ्या प्रमाणावर तरूण-तरूणींचा सहभाग असलेला हा उत्सव ’राष्ट्रीय सण“ म्हणून जाहिर करून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देणे गरजेचे असल्याने आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन दहिहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यासंदर्भात परिपत्रक काढून मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनी गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी दहिहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहिर केल्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांनी मा. मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. त्याचबरोबर मुंबई व एम.एम.आर. क्षेत्रातील ८ ते १० लाख गोविंदा दहिहंडीच्या दिवशी रस्त्यावर येत असून त्यापैकी बहुतांश गोविंदा हे खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी असतात. त्यामुळे खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील सार्वजनिक सुट्टी देण्याबाबत प्रधान सचिव इक्बालसिंह चहल यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *