कल्याण : कल्याण पूर्वेतील मलंगरोड-चिंचपाडा ते उल्हासनगर या १०० फुटी रस्त्याच्या मध्यभागी चिंचपाडा भागात माधव अपार्टमेंट नावाची बेकायदा अतिधोकादायक इमारत उभी होती. या इमारतीमुळे कल्याण डोंबिवली पालिकेला या महत्वपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करणे शक्य होत नव्हते. ही इमारत रहिवासमुक्त केल्यानंतर आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून पालिकेच्या ड प्रभागातील तोडकाम पथकाने ही इमारत सोमवारी भुईसपाट केली.
मागील सहा वर्षापूर्वी पालिकेने विकास आराखड्यातील कल्याण पूर्वेतील मलंगरोड ते चिंचपाडा, उल्हासनगर रस्त्याचे काम पूर्ण केले. विकास आराखड्यातील या रस्त्याच्या परिसरात भविष्यात नवीन गृहसंकुले विकसित होतील, त्यावेळी आपल्या इमारतीमधील सदनिकांचा भाव चढा होईल, असे गणित करून या रस्त्यामध्ये पालिकेतील एका निवृत्त वाद्ग्रस्त लाचखोर अभियंत्याने भूमाफियांना हाताशी धरून तीन माळ्याच्या बेकायदा इमारतीचे बांधकाम केले होते. त्यामुळे प्रभागातील साहाय्यक आयुक्त ही बेकायदा इमारत तोडण्यास गेले की संबंधित निवृत्त वाद्ग्रस्त अभियंता अधिकाऱ्यांना दटावणी करून तेथून माघारी येण्यासाठी आग्रही राहायचा. माधव इमारतीला वाचविण्यासाठी मलंगरोड ते उल्हासनगर १०० फुटी रस्ता माधव इमारतीजवळ वळण घेऊन तयार करण्याचा विचार या अभियंत्याच्या इशाऱ्यावरून करण्यात आला होता. त्याला लगतच्या जमीन मालकांनी विरोध केला होता. त्यामुळे माधव इमारत तोडण्याशिवाय पालिकेसमोर पयार्य नव्हता.
ही अतिधोकादायक बेकायदा इमारत रहिवास मुक्त केल्यानंतर आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून उपायुक्त अवधूत तावडे, ड प्रभागाचे साहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्या तोडकाम पथकाने जेसीबी, पाडकाम पथक आणि पोलीस बंदोबस्तात ही इमारत जमीनदोस्त केली. या इमारतीमुळे या भागात गटार, मल, जलनिस्सारण वाहिन्या, तसेच अमृत योजनेच्या वाहिन्या टाकण्याची कामे पालिकेला पूर्ण करता येत नव्हती. ही कामे पूर्ण करण्याचा मार्ग माधव इमारत तोडल्याने पालिकेला सुरू करता येणार आहेत. ही इमारत २८ वर्षापूर्वीची होती. ती धोकादायक झाली होती.
मलंगगड रोड, चिंचपाडा ते उल्हासनगर १०० फुटी रस्त्यावरील माधव इमारतीजवळ काम पूर्ण झाले की काटई-नेवाळी नाका येथून येणारी वाहने मलंगरोड रस्त्याने चिंचपाडा येथून १०० फुटी रस्त्याने थेट उल्हासनगर येथे जाऊ शकणार आहेत.या रस्त्यामुळे कल्याण – पुणे जोड रस्त्यावरील वाहनांचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. काटई, नेवाळी, नवी मुंबईकडून येणारी वाहने मलंगगड-उल्हासनगर १०० फुटी रस्त्याने कल्याण शहराबाहेरून जाणार आहेत. त्यामुळे कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी, काटेमानिवली ते विठ्ठलवाडी भागातील वाहन कोंडी कमी होणार आहे, असे या भागातील रहिवासी आनंद गायकवाड यांनी सांगितले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *