मुंबई : यंदाचा १ ऑगस्ट लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे १०४ वे वर्ष! २०१५ ला शासनादेश प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल ९ वर्षांनंतर शासनाने स्वराज्यभूमी नामफलकाचे उद्घाटन केले. देशाच्या थोर राष्ट्रपुरुषांबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाची काय मानसिकता आहे याचे उत्तम दर्शन जनतेला घडले आहे. तुंबड्या लावत फिरणाऱ्या या सरकारला त्याग आणि बलिदानाचे महत्वच समजेनासे झाले आहे. पत्रकारांच्या लेखणीची धार कधी नाही एवढी बोथट झाली आहे. लक्ष्मीपुढे सरस्वतीला दयनीय अवस्थेत बसलेली पाहून खंत वाटते. मृगजळाच्या पाठीशी पळणाऱ्या राजकारणी आणि पत्रकारांमळे महाराष्ट्राची नैतिकता ढासळत चालली आहे. लवकरच हे दु:स्वप्न संपेल अशी आशा आहे.. शतकानुशतके लोकमान्य टिळक लोकांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवत राहतील. आज विस्मृतीत गेलेले गीतारहस्य. ओरायन हे दोन अजरामर ग्रंथ पुन्हा एकदा देशाला खडबडून जागं करतील याची आम्हाला खात्री आहे.
महाराष्ट्र जरी आज ल़ोकमान्य टिळकांना विसरला असला तरी देश लोकमान्य टिळकांना विसरला नाही. स्वातंत्र्याची ती धग आजही ऊराशी बाळगुन असलेले माजी केंद्रीय मंत्री आशीष कुमार चौबे पुण्यतिथीच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांच्या समाधी स्थानी दर्शनासाठी स्वराज्यभूमी ( गिरगाव चौपाटी ) येथे येत आहेत. त्यांच्याबरोबर लोकमान्य टिळकांवर अनेक नाटकं सादर करीत देशभर जन जागृती करणारे नीरज कुमारही येत आहेत. महाराष्ट्र राज्याचे मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही आमंत्रण दिले आहे. अद्याप त्यांनी आमंत्रण स्वीकारल्याचे आम्हाला कळवले नाही.
पाहुण्यांचा आणि ध्वजारोहण करणाऱ्यांचा आम्ही लोकमान्य टिळकांची पगडी देऊन सन्मान करणार आहोत. ध्वजारोहण सकाळी ठीक दहा वाजता होणार आहे. सर्वांनी दहा पुर्वी हजर रहावे.
प्रकाश सिलम
अध्यक्ष,
लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समिती
