अशोक गायकवाड

 

रायगड : आपल्या राष्ट्र ध्वजातील तिरंगा रंग केशरी, पांढरा आणि हिरवा हे रंग त्याग, धैर्य, प्रेम, शांतता आणि विश्वासाचे प्रतीक आहेत. घरोघरी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून देशप्रेमाचा जागर होणार आहे. हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात लोकसहभागातून प्रभावीपणे राबविले जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
जिल्हा प्रशासन आणि अलिबाग नगरपालिका यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे गुरुवार,(दि. ८ ऑगस्ट) रोजी घरोघरी तिरंगा ( हर घर तिरंगा) अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हाधिकारी जावळे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हाधिकारी डॉ.रविंद्र शेळके, उपमुख्यमंत्री कार्यकारी अधिकारी भालेराव, अलिबाग उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, तहसिलदार विक्रम पाटील, गट विकास अधिकारी उत्तम धाईगडे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. शाममराव कदम, देशमुख, अलिबाग नगरपालिका मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यात यावर्षीही अडीच कोटी घरावर तिरंगा फडकवला जाणार आहे. देशप्रेमाची भावना त्याद्वारे जागवली जाणार आहे. विविध दुकाने, आस्थापना यांच्यावरही तिरंगा फडकवला जाणार आहे. मोठया उत्साहात आणि जल्लोषात हे अभियान साजरे करण्यात येत आहे. घरोघरी तिरंगा अभियान आपल्याला सातत्याने त्यागाची आणि बालिदानाची आपल्याला सतत जाणीव करून देईल. रॅली, पदयात्रा, तिरंगा सेल्फी, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार अशा माध्यमातून हे अभियान साजरे करायचे आहे. सर्वांच्या सहकार्यातून हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास जावळे यांनी व्यक्त केला. तिरंगा पदयात्रेस जिल्हाधिकारी जावळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. तसेच त्याठिकाणी असलेल्या घरोघरी तिरंगा अभियानाच्या सेल्फी पॉईंटवर सेल्फीही घेतली. यावेळी जावळे यांनी उपस्थितांना तिरंगा प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमास विविध मान्यवरांसह शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *