ओरिसात रेशन दुकानात २४ तास धान्य ए टी एम
मुंबई / रमेश औताडे
ओरिसाची राजधानी भुवनेश्वर मध्ये देशातील पहिले धान्य एटीएम (धान्य वितरण मशीन) लाँच करण्यात आले. तर महाराष्ट्रातील दुकानातून घोषित केलेला आनंदाचा शिधा गायब होत आहे. अशी भ्रष्टाचारी
अवस्था असताना, देशातील ८० कोटी जनतेला रेशन व्यवस्था परिपूर्ण असल्याची केंद्रीय शिधावाटप यंत्रणा जाहिरात करत आहे. असा आरोप करत रेशन हक्क समिती ने खंत व्यक्त केली आहे.
अनेक शिधावाटप दुकानात सर्व्हर डाऊन मुळे रांगेतील ग्राहक मोकळ्या हाताने घरी जातात. सर्व्हर आला तर वीज जाते, वीज आली तर थम मशीन बंद पडते, अशी तांत्रिक अडचण असताना सडके किडके धान्य, दुकानदार वेळेवर येत नाही, शिधा घेतल्यानंतर पावती देत नाही असे प्रकार अनेक दुकानात पाहायला मिळत आहेत.
मागील श्री रामनवमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आनंदाचा शिधा अनेक दुकानात मिळाला नाही. आता गणेशोत्सव काळात आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली आहे. नुसत्या घोषणा करण्यापेक्षा शिधा वाटप दुकानात किमान कॅमेरे तरी लावा जेणे करून मनमानी उजेडात येईल. ओरिसामध्ये आठवड्याचे सात दिवस २४ तास शिधा देणारी ए टी एम मशीन व महाराष्ट्रात मात्र आंधळ दळतंय अन् कुत्रे पीठ खातंय अशी अवस्था आहे.
