नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप सारखं खोटारडे संघटन दुसरे कुठेच नाही. त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दिली आहे की, आम्ही जातीय जणगणना करू शकत नाही, करणार नाही आणि होणारही नाही. आता झारखंड, हरियाणा, महाराष्ट्रातील निवडणुका आल्या तसाच ओबीसी समाजाला जवळ करण्यासाठी आम्ही जातीय जणगणना करण्यास तयार आहोत, याचा राजकारणासाठी वापर होऊ नये असे बोलत आहेत. मात्र,माझे मोहन भागवत यांना चॅलेंज आहे की तुम्ही कोर्टात दिलेली याचिका मागे घेतली का? याचा खुलासा अगोदर करा. असे थेट आव्हान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी करत भाजप आणि संघावर निशाणा साधला आहे.
गोंड गोवारी समाजाच्या नागपूरच्या संविधान चौकावर सुरू असलेल्या इशारा आंदोलनाच्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर पोहोचले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्या आदिवासी वर्गवारीतून आरक्षणाच्या मागणी संदर्भात सध्याची प्रशासनिक स्थिती काय हे जाणून घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्रातील आदिवासींना एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आमच्या दोन बैठका झाल्या आहे. आठ दहा दिवसात तिसरी बैठक होईल. अमरावतीपासून ते कोल्हापूर, विदर्भ ते कोकण या परिसरातील आदिवासी सगळे एकत्र येऊन आम्ही एकत्र राहून निवडणूक लढविणार, अशी घोषणा आम्ही करणार. आदिवासींना बाजूला करून सुरू असलेला राजकारण यावेळी होणार नाही. परिणामी सर्व स्थरातील आदिवासी एकत्र येऊन सामाजिक लढाई उभी करणार असल्याची माहिती ही प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
आम्ही सांगितलेलं चूक असेल तर चूक आहे म्हणा- प्रकाश आंबेडकर
राज्यभरात एसटी बस कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा मोठा फटका प्रवाश्यांना बसतो आहे. तर आपल्या प्रलंबित मागण्यासाठी एसटी बस कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मागच्यावेळी काय मागायला पाहिजे हा तोडगा आम्ही त्यांच्यापुढे मांडला होता. पण एसटी कामगारांना तो तोडगा मान्य नाही.
उद्धव ठाकरे यांच्या कालावधीमध्ये शिवशाही बसेस चालविल्या त्यावेळीं डिझेल 56 रुपयांच्यावर झालं तर एसटी महामंडळ भरेल, असा करारनामा झाला होता. त्या विरोधात तुम्ही आवाज उठवा, आज डिझेल 90 रूपये आहे. मालक 56 भरतो त्याचं बजेट सांगा. एसटी महामंडळात चाललेलं भ्रष्टाचार हे बाहेर काढत नसतील त्यामुळे त्यांच्याच नोकऱ्यावर गदा येणार. हे तेव्हा ही मी सांगितले होते. आजही माझी त्यांना ऑफर आहे, आम्ही सांगितलेलं चूक असेल तर चूक आहे म्हणा. मात्र बरोबर असेल तर आंदोलनातून तुम्ही आरोप करा, हे तुम्ही करत आहे की नाही, ते हा एग्रीमेंट शिवशाही मालकाबरोबर आहे किंवा नाही हे सांगा. असे आवाहन ही प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
