राजेंद्र साळसकर
मुंबई – असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करण्याचे काम आता महाराष्ट्र इंटकने युद्ध पातळीवर हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र इंटकच्या कोअर कमिटीची बैठक मंगळवारी परळच्या मजदूर मंझिल मध्ये पार पडली.या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉक्टर कैलास कदम होते
महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते सभेत असंघटित कामगारांना संघटित करण्याचा ठराव पारीत करतांना म्हणाले की, गेल्या दहा-पंधरा वर्षापेक्षा अधिक काळापासून अनेक उद्योगात असंघटित कामगारांची संख्या वाढत चालली आहे.त्यांच्या कडून कायम कामगारांचे काम करुन घेण्यात येते,परंतु वेतन मात्र किमान वेतना पेक्षा कमी,आरोग्य सोयी आणि सामाजिक हक्कापासून तर वर्षोनुवर्षे त्यांना वंचित ठेवण्यात येत आहे.यामध्ये बांधकाम कामगार, अंगणवाडी, आशा कर्मचारी,उसतोऊ कामगार, स्थानक वर्कर्स इत्यादी असंघटित क्षेत्रातील कामगारांचा समावेश होतो.
अध्यक्ष डॉ.कैलास कदम यांनी सांगितले,इंटकचा कामगार हितकारक कार्यक्रम कामगार-कामगारांपर्यंत राबविण्यासाठी प्रचार आणि प्रसारावर जोर द्यावा लागेल. त्यासाठी जिल्हा-जिल्हा स्तरावर दौरे आयोजित करुन, सभासद संख्या वाढीवर आपण प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्र इंटकचे येत्या ३ मे रोजी इंटक स्थापनादिनी भव्य अधिवेशन घेण्याचाही सभेत निर्णय घेण्यात आला.या निमित्ताने एक माहितीपूर्ण स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यावेळी कार्याध्यक्ष निवृत्ती देसाई,कोषाध्यक्ष दिवाकर दळवी,उपाध्यक्ष देवराव सिंग’,जी.बी. गावडे,दादाराव डोंगरे, मुकेश तिगोटे,बजरंग चव्हाण आदींनी अनेक संघटनात्मक बाबींवर विस्तृत चर्चेत भाग घेतला.महाराष्ट्र इंटकच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची मदत घेण्यात येऊन महाराष्ट्र इंटक अधिक मजबुत करण्याचा निर्धार या प्रसंगी करण्यात आला.
00000