मुंबई : राज्यातील २८८ नगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणूकीत विदर्भातील निकालांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या होम ग्राउंडवर म्हणजेच चंद्रपुरात भाजपला धूळ चारली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ११ पैकी तब्बल ८ जागांवर काँग्रेसने एकतर्फी विजय मिळवला आहे. याउलट, सत्ताधारी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेला अवघ्या १-१ जागेवर समाधान मानावे लागले आहे. एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे. भाजपाचे ज्येष्ट नेते सुधीर मुनगंटीवारांसाठी हा धक्का मानला जात आहे तर वडेट्टीवारांच्या या विजयामुळे चंद्रपुरात काँग्रेसची पकड अधिक मजबूत झाली आहे. या निकालानंतर पक्ष नेतृत्वाने आत्मचिंतन करावे अशी टिप्पणीही मुनगंटीवार यांनी केली आहे.
मुनगंटीवार यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर थेट नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना मंत्रिमंडळ विस्तारात एकही मंत्रिपद न मिळाल्याने जनतेमध्ये नाराजी असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मुनगंटीवारांच्या या विधानामुळे भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे.
“या पराभवाचे आम्हाला चिंतन करावे लागेल. काँग्रेसने वडेट्टीवार यांना महाराष्ट्राचा नेता केलं. दुसरीकडे, चंद्रपूर, भंडारा, गोंदियाला एकही मंत्रिपद दिलं नाही, मला तर दिलच नाही पण कोणालाही मंत्रिपद दिलं नाही. ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे,” असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.
