मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने ग्रामीण महाराष्ट्रातील रखडलेल्या  १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथिगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

 या निवडणुकीत जिल्हा परिषदांच्या ७३१ जागा आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागा भरल्या जाणार आहेत. महिलांबरोबरच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांसाठी मोठ्या प्रमाणावर आरक्षण लागू करण्यात आले आहे. ही निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या जिल्ह्यांमध्ये घेतली जात आहे.

निवडणूक होणाऱ्या १२ जिल्ह्यांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर यांचा समावेश आहे. या निवडणुकीची अधिकृत सूचना १६ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होणार असून, त्याच दिवसापासून १६ ते २१ जानेवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. २२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी होईल, तर २७ जानेवारी ही उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम मुदत असेल. याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे.

मतदान ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतदारांना एक जिल्हा परिषदेसाठी आणि एक पंचायत समितीसाठी असे दोन मते द्यावी लागतील . ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजता जाहीर प्रचार समाप्त होईल आणि त्यानंतर प्रचार तसेच जाहिरातींवर बंदी राहील.

निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे २५,४८२ मतदान केंद्रे उभारण्यात येणार असून, पुरेशा प्रमाणात ईव्हीएम उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये ५१,५३७ कंट्रोल युनिट्स आणि १,१०,३२९ बॅलेट युनिट्सचा समावेश आहे. मतदार यादी १ जुलै २०२५ या आधारे तयार करण्यात आली असून, दुबार नावे असलेल्या मतदारांसाठी ” हे चिन्ह वापरण्यात आले आहे. मतदारांना माहिती मिळवण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप तसेच आयोगाची अधिकृत वेबसाइट उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *