सामान्य माणसाला संघाने ‘ताकद’ दिली – उपेंन्द्र कुलकर्णी
अनिल ठाणेकर
ठाणे : आत्मविस्मृत समाजाचे मत परिवर्तन करण्याचे काम त्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले. एक प्रकारे वाहक बनुन संघाने सामान्य माणसाला ताकद दिली. त्यामुळेच संघाचे विचार आज समाज स्विकारत आहे. असे प्रतिपादन करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा विभाग प्रमुख उपेंन्द्र कुलकर्णी यांनी ठाणेकरांचे वैचारिक प्रबोधन केले.
ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती क्रिंडा संकुल मैदानात आमदार संजय केळकर यांनी आयोजित केलेल्या ४० व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील “संघ शताब्दी वर्ष” हे चौथे पुष्प रविवारी उपेंन्द्र कुलकर्णी यांनी गुंफले. व्याख्यानमालेच्या या सत्राच्या अध्यक्षपदी श्रीराम पटवर्धन होते. तर, कार्यक्रमाचे निवेदन ज्येष्ठ पत्रकार पु. ल. देशपांडे कला अकादमीचे सदस्य मकरंद मुळे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष साजरे होत असताना अनेक उपक्रम साजरे होत असल्याचे सांगून उपेंन्द्र कुलकर्णी यांनी, १८८९ साली डॉक्टर हेडगेवार यांचा जन्म, १९२५ मध्ये संघाची स्थापना ते आजपर्यतच्या काळातील क्रांतीकारी घटना आणि राष्ट्रीय चळवळीशी जोडलेल्या घटनांचा उहापोह करून विपरीत स्थितीत संघ स्वयंसेवक कसे राहिले, या आठवणी दृगोचित केल्या. स्वयंसेवकांनी कशा प्रकारे सामाजिक कार्यात योगदान दिले, याच्या आठवणी जागवताना संघाच्या प्रार्थनेतील दाखले देत संघाच्या पंचपरिवर्तनाचे कार्य त्यांनी विस्ताराने विषद केले.डॉ. हेडगेवार यांच्या आधी हिंदुत्त्वाचा विचार अनेकांनी मांडला होता. पण, डॉक्टरांनी आपल्या विचाराला कृतीचे सातत्य असलेल्या संघ शाखांची मजबूत जोड दिली. हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचा मिलाफ त्यांनी घडवून आणला आणि हिंदुंना आत्मभान दिले. या देशातील हिंदू संघटित आणि सशक्त होऊ शकतो, हे सिद्ध करून दाखविणारे डॉ. हेडगेवार हे द्रष्टे नेते होते. हे संघटन टिकवायचे असेल तर समाजाच्या विविध क्षेत्रात त्याचा विस्तार झाला पाहिजे आणि त्याला विधायक कार्याची जोड दिली पाहिजे. या विचारातून मग संघ परिवारात अनेक प्रभावशाली संघटना सक्षमपणे उभ्या झाल्या. जनकल्याण समितीने तर, समाजामध्ये आपल्यापेक्षा पाचपटीने काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांना प्रोत्साहित करीत जनसंघटन वाढवून समाजाला तप्तर करण्याचे काम समितीने केले आहे. जोपर्यंत सामान्य माणुस जोडला जात नाही, तोपर्यत समाज जागृत होणार नाही, हे हेरून संघाने सामान्य माणसाला ताकद दिली. असे कुलकर्णी म्हणाले.
समाजाच्या साथीने होणार हिंदु संमेलने
आजकाल हिंदू कुटुंबातील संवाद हरवत चालला असून घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. तेव्हा, विसंवादावर मात करण्यासाठी कुंटुंब प्रबोधना करण्याकरीता यातुन सावरलेल्या दांपत्यांनी पुढे ५ कुटुंबांच्या प्रबोधनाची जबाबदारी घ्यायची आहे. हे संघाचे विचार आज समाज स्विकारत आहे, तेव्हा पुढील काळात हिंदूंचे व्यापक संघटन करण्यासाठी समाजाच्या साथीने हिंदुंची संमेलन करणार असल्याचे उपेंन्द्र कुलकर्णी यांनी सांगितले. या संमेलनासाठी समितीही स्थानिक समाजाचीच असणार असुन तेच संमेलने भरवणार आहेत, असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *