रत्नागिरी : (अशोक गायकवाड )—समाज कल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे हे ३६ वर्षाच्या सेवापूर्ती नंतर नियतवयोमानानुसार निवृत्त झाले. यानिमित्तानं आयोजित सन्मान सोहळा अत्यंत भावनिक वातावरणात काल संपन्न झाला. या कार्यक्रमास विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांनी घाटे यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवाकार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. घाटे यांनी आपल्या सेवाकाळात समाज कल्याण विभागामध्ये प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि संवेदनशीलतेने कार्य करत वंचित घटक, विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती आणि गरजू नागरिकांच्या कल्याणासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या असून, विभागामध्ये सकारात्मक कार्यसंस्कृती निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्या शांत, संयमी आणि सर्वसमावेशक स्वभावामुळे अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये त्यांच्याविषयी विशेष आदराची भावना होती. अनेक कर्मचाऱ्यांना त्यांनी योग्य मार्गदर्शन व प्रेरणा दिली असल्याचे वक्त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले. कार्यक्रमात घाटे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समता दूत आशिष कांबळे यांनी केले. प्रस्तावना समता दूत रूपाली बाईत, तर आभार प्रदर्शन आशिष कांबळे यांनी मानले.
००००००००००००००
