अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं?- राज ठाकरे
मुंबई : अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं ? असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना पवारांच्या अपघाताच्या प्रकरणी ते उभा करीत असलेल्या लढ्याला पाठींबा दिला. अजितदादांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी व्यापक बळ मिळावे, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रोहीत पवार यांनी भेट घेतली. या भेटीत त्यांनी तपशील सादर केल्यानंतर राज यांनीही एफआयआरवरून सरकारला धारेवर धरले. हा विषय कोणत्याही राजकारणाच्या पलीकडचा असून महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. रोहित पवारांनी हा प्रश्न सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनात मांडावा आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करावा, असं मी त्यांना सांगितलं असल्याचे ते म्हणाले.
राज यांनी सांगितले की, सुनेत्रा वहिनी सध्या तिथे उपमुख्यमंत्री म्हणून बसल्या आहेत, त्यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. अजित पवार त्यांचे पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दल हा एफआयआर आहे, त्यामुळे सुनेत्रा वहिनींनी या विषयावर बोललं पाहिजे, अशी भावना राज यांनी व्यक्त केली.
