ऐनवेळी जुन्याच प्रश्नपत्रिका वाटल्याने खळबळ
हरिभाऊ लाखे
नाशिक : नीट परीक्षेचा विषय देशभर गाजत असताना आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेतील सावळागोंधळ समोर आला आहे. संगणकीय आज्ञावलीतून पाठवलेली प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांत ‘डाऊनलोड’ झाली नाही. त्यामुळे घाईघाईत सर्व केंद्रांना इ मेलद्वारे प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्या. त्यात अनेक ठिकाणी जुन्या म्हणजे २०२४ च्या प्रश्नपत्रिका गेल्यामुळे गोंधळात अधिक भर पडली. या घटनाक्रमाने हजारो परीक्षार्थींना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
बुधवारपासून मुक्त विद्यापीठाच्या मुख्य (उन्हाळी) परीक्षेला महाराष्ट्रातील एकूण ५५८ परीक्षा केंद्रांवर सुरुवात झाली. या परीक्षा पारदर्शक, सुरक्षित व गैरप्रकार मुक्त वातावरणात होण्यासाठी विद्यापीठाने एआय आधारीत सीसी टीव्ही देखरेख प्रणालीचा प्रायोगिक तत्वावर अवलंब केला होता. परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका ‘डाऊनलोडिंग’ कक्ष व ‘उत्तरपत्रिका सिलिंग’ कक्ष येथेही हे आधुनिक कॅमेरे बसविण्यात आले होते. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यापीठाच्या नियोजनाचा पुरता फज्जा उडाला. ५३ शिक्षणक्रम व ७७ अभ्यासक्रमांची ही परीक्षा आहे. मुक्त विद्यापीठ संगणकीय आज्ञावलीतून प्रश्नपत्रिका केंद्रांना पोहोचवली जाते.
बुधवारी सकाळी साडेदहा वाजेता होणाऱ्या परीक्षांची प्रश्नपत्रिका तांत्रिक दोषामुळे केंद्रांवर डाऊनलोडच झाली नाही. त्यामुळे ऐनवेळी सर्व परीक्षा केंद्रांना इ मेलद्वारे प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्या. परीक्षा केंद्रांनी त्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरित करण्यासाठी घाईघाईत झेरॉक्स काढल्या. वितरित झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्या २०२४ च्या असल्याचे लक्षात आले. त्यामुळे केंद्रांवर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पुन्हा सुधारीत प्रश्नपत्रिका पाठवून तासाभराच्या विलंबाने काही ठिकाणी प्रत्यक्षात परीक्षेला सुरूवात होऊ शकली. विदर्भासह राज्यातील अनेक भागात पारा उंचावलेला आहे. प्रचंड उकाड्यात विद्यार्थ्यांना वर्गात ताटकळत बसावे लागले. त्यांच्या मनस्थितीवर परिणाम झाला.
कोट
राज्य शासनाने परीक्षेच्या कामात हयगय, हलगर्जीपणा किंवा बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा अशाने विद्यार्थ्यांचा परीक्षा घेणाऱ्या संस्था, विद्यापीठावर विश्वासच राहणार नाही.- प्रा. डॉ. संजय खडक्कार (माजी विद्वत परिषद सदस्य, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ)
कोट
सर्व्हरचा प्रश्न होता. तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. परंतु, हा प्रश्न १५ मिनिटांत सोडविला गेला. ज्या केंद्रांवर जुन्या प्रश्नपत्रिका गेल्या, त्या लगेच मागे घेण्यात आल्या. त्या ठिकाणी त्वरित दुसरी प्रश्नपत्रिका पाठवून परीक्षेसाठी एक तासाचा कालावधी वाढवून देण्यात आला. – प्रा. संजीव सोनवणे (कुलगुरू, यशवंतराव
