अदानी समूहासोबतच्या बैठकीनंतर कामगारांमध्ये संताप
कल्याण : गेल्या वीस वर्षापासून मोहने येथील एनआरसी कारखाना बंद असून कामगारांना अद्याप त्यांची हक्काची देणी मिळालेली नाहीत. एनसीएलटी कोर्ट मुंबई आणि दिल्ली येथे कामगार न्यायालयात कामगारांच्या न्याय हक्कासाठी आयटक आणि महाराष्ट्र जनरल कामगार युनियन कामगारांच्या बाजूने लढा देत आहेत. हा लढा अंतिम टप्प्यात आला आहे.
कामगार युनियन च्या माध्यमातून कामगारांची देणी देण्यासंदर्भात कामगारांच्या प्रतिनिधींची नुकतीच मुंबई येथे एन.आर.सी युनिट अदानी व्यवस्थापना सोबत पार पडलेल्या बैठकीत आयटक आणि महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे प्रतिनिधी म्हणून एस. शुक्ला उपस्थित होते. या बैठकीमध्ये कामगार विरोधी करार पाहून शुक्ला यांनी या कराराला विरोध केला.
या नवीन करारानुसार  कामगारांवर अन्याय होत असल्याचे स्पष्ट करत शुक्ला यांनी कराराला कडाडून विरोध केला. प्रतिनिधी म्हणून एस शुक्ला उपस्थित असल्याने घडलेला प्रकार समोर आला असून या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या बैठकीमुळे कंपनी व्यवस्थापन आणि काही संघटनांमध्ये संगनमत झाल्याची चर्चा कामगारांमध्ये जोर धरू लागली आहे. तसेच हा करार संगनमताने झालेला असून कामगार विरोधी असल्याचे कामगारांचे मत कामगारांनी व्यक्त केले.
आयटक आणि एनआयसी मजदूर संघ यांनी केलेला करार हा सर्वसामान्य कामगारांच्या हिताला बाधा आणणारा असून, यामध्ये कामगारांच्या हक्कांबाबत कोणतीही ठोस भूमिका आणि कामगारांचे हित नसल्याचा आरोप संतप्त कामगारांनी केला आहे. इतकी वर्ष वाट पाहून जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर हा करार आम्हाला मान्य नसल्याचे कामगारांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात एन.आर.सी. परिसरातील कामगार चळवळ अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *