दुचाकींसह वाहनांचा खुळखुळा, मनपाकडे दुरुस्तीची तातडीने मागणी
हरिभाऊ लाखे
नाशिक : सततच्या पावसामुळे शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनधारक त्रस्त झाले आहेत. नाशिकरोड येथील जेल रोड परिसर आणि सिडको, अंबड लिंक रोड भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यांच्या या दुरवस्थेमुळे अपघात वाढले असून दुचाकीस्वारांचे आरोग्य आणि वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या रस्त्यांची तातडीने डागडुजी करावी, अशी उद्विग्न मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
जेल रोड परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महापालिका आयुक्तांनी काही दिवसांपूर्वीच जेल रोड – नाशिकरोड परिसराची पाहणी करून कंत्राटदारांना कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही परिस्थिती जैसे थे असून दुरवस्था कायम आहे. बिटको चौक ते नांदूर नाका या प्रमुख मार्गावर दररोज २५ ते ३० हजार विद्यार्थी, कामगार आणि नागरिक ये-जा करतात. हा मार्ग पुणे आणि छत्रपती संभाजीनगर महामार्गांना जोडलेला असल्याने येथे अवजड वाहनांचीही मोठी वर्दळ असते. या मार्गावरील खड्ड्यांमुळे दुचाकींचा पार खुळखुळा झाला आहे.
दुसरीकडे सिडको परिसरातील जुने सिडको, बडदेनगर ते पाटीलनगर, शिवशक्ती चौक, गोविंदनगर, अश्विननगर, पाथर्डी फाटा, कर्मयोगीनगर, सदाशिवनगर, अंबड लिंक रोड आणि प्रभाग क्रमांक २६ मधील रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले आहेत. पावसाळ्यात किमान कोल्डमिक्स किंवा योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून तात्पुरते खड्डे बुजवावेत आणि पावसाळ्यानंतर रस्त्यांची दर्जेदार कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करताना माजी गटनेते अशोक सातभाई यांनी म्हटले आहे की, कुंभमेळ्याच्या नावाखाली सर्व शहर बकाल करून टाकले आहे. नवीन नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने काम कोणाकडून करून घ्यावे हेच समजत नाही, ज्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीला मनपा प्रशासनही तितकेच जबाबदार आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधींनी या समस्येची दखल घेतली आहे. प्रभाग २४ च्या नगरसेविका पल्लवी गणोरे यांनी मनपा बांधकाम विभागाला खड्ड्यांची माहिती दिली असून लवकरच खड्डे बुजवले जातील, असे आश्वासन दिले आहे.
तसेच प्रभाग २६ चे नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार आणि पादचारी जखमी होत असल्याच्या घटनेची दखल घेत, मनपा अधिकाऱ्यांसोबत लवकरच प्रत्यक्ष पाहणी दौरा करणार असल्याचे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *