डोंबिवली : कल्याण डोंबिवली परिसरात सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी आल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. डोंबिवली येथे आज उद्धव ठाकरे यांची सभा असून त्या आधीच पावसाने हजेरी लावल्याने शिवसैनिकांना सभा कशी पार पडणार याची चिंता लागली आहे. दुपारी 3 वाजल्या शहरात सोसाट्याचा वारा सुटल्याने शहरात धुळीचे वादळ उठले होते. त्यात अचानक पावसाच्या सरी आल्याने नागरिकांची धांदल उडाली.

सोमवारी दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिक काहीसे सुखावले आहेत. उन्हाच्या तीव्र झळा, अंगाची होणारी काहिली यामुळे कल्याण डोंबिवली मधील नागरिक हैराण झालेले होते. सोमवारी दुपारी 2 नंतर शहरात सोसाट्याचा वारा सुटला. यामुळे रस्त्यावरील धूळ हवेत उडून सगळीकडे धुळच धूळ दिसत होती.

सव्वा 3 च्या सुमारास पावसाच्या सरी सुरू झाल्या. पावसाचा जोर जास्त नसला तरी आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे नागरिक काहीसे सुखावले. पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून काही भागाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

लग्नसराईचा हंगाम सुरू असून दुपारी ही हल्ली बाजारात गर्दी दिसून येते. अचानक आलेल्या पावसाने दुकानदार, विक्रेते यासोबतच खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची एकच धांदल उडाली. नागरिकांजवळ छत्र्या नसल्याने पावसापासून बचाव म्हणून लगेच आजूबाजूच्या दुकानाचा आसरा नागरिकांनी घेतला.

राज्यामध्ये या आठवड्यामध्ये दुपारी तापमानात वाढ होणार असून, सायंकाळी मात्र पावसाची हजेरी लागणार आहे.असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. कल्याण,डोंबिवली सह ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.

वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने रस्त्यावरील वाहन देखील वाहनचालकांना दिसून येत नव्हती. तर मुसळधार पावसाने प्रचंड अंधार दाटून आला आहे. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी महावितरण कडून ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *