शिपाई, फेरीवाला हटाव पथकात काम करणाऱ्या

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागातील अनेक सफाई कामगार प्रभागांमध्ये फेरीवाला हटाव पथक, अधिकाऱ्यांचे शिपाई, टपाल वाहक म्हणून काम करतात. रस्त्यावर झाडू मारण्यापेक्षा कार्यालयात ऐषआरामात काम करण्यास मिळत असल्याने हे कामगार वर्षानुवर्ष लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने प्रभाग कार्यालये, पालिका मुख्यालयांमध्ये कार्यरत आहेत. अशा सर्व सफाई कामगारांनी तातडीने आपल्या मूळ नियुक्तीच्या घनकचरा विभागात हजर व्हावे, असे आदेश घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी सोमवारी दिले.

कल्याण डोंबिवली शहरे कचरा मुक्त करण्याचे अभियान यशस्वी होत आहे. या कामासाठी घनकचरा विभागाला सफाई कामगारांची नितांत आवश्यकता आहे. आता कार्यरत असलेले बहुतांशी सफाई कामगार हे ५० वयाच्या पुढील आहेत. त्यांची क्रयशक्ती कमी झाली आहे. सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले ३५ ते ५० वयोगटातील अनेक सफाई कामगार वर्षानुवर्ष नगरसेवक, आमदार, राजकीय नेते यांच्या आशीर्वादाने कल्याण डोंबिवली पालिकेच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांचे दालन, यापूर्वी महापौर, सभापती यांच्या दालनात शिपाई, प्रभागात फेरीवाला हटाव पथकात वर्णी लावून घेण्यात यशस्वी झाले आहेत.

रस्त्यावर काम करण्यासाठी घनकचरा विभागाला सफाई कामगारांची आवश्यकता असताना, ६० हून अधिक सफाई कामगार प्रभागांमध्ये फेरीवाला हटाव पथक, साहाय्यक आयुक्तांचा शिपाई, टपाली, आवक जावक लिपिक म्हणून काम करत आहेत. सफाईचे मूळ काम सोडून त्यांना प्रशासकीय कामात सहभागी होण्याची मुभा दिली कोणी, असे प्रश्न करत काही माजी नगरसेवक, काही जागृत नागरिकांनी यासंदर्भात पालिका आयुक्त, घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.

या तक्रारींची गंभीर दखल घेऊन उपायुक्त अतुल पाटील यांनी पालिकेच्या दहा प्रभागांमध्ये जे सफाई कामगार अन्य कामे करत आहेत. त्यांनी तातडीने आपल्या मूळ नियुक्तीच्या घनकचरा विभागात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. सफाई कामगारांची बदली अन्य कोणत्याही विभागात करू नये, असे आयुक्तांचे स्पष्ट आदेश आहेत. सफाई कामगारांचे नियंत्रक म्हणून उपायुक्त घनकचरा हे नियंत्रक अधिकाऱी आहेत. असे असताना प्रभागातील साहाय्यक आयुक्त घनकचरा विभागाची परवानगी न घेता सफाई कामगारांना आपल्या अधिकारात अन्य विभागात बदली करत आहेत, असे उपायुक्त पाटील यांच्या निदर्शनास आले आहे. अशा नियमबाह्य नियुक्त सफाई कामगारांनी तातडीने सफाई कामगार म्हणून घनकचरा विभागात तातडीने हजर व्हावे, असे आदेश उपायुक्त पाटील यांनी दिले आहेत.

काही दिवसापूर्वी ह प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील सफाई कामगार दिलीप उर्फ बुवा भंडारी यांनी ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांच्या बरोबर रेल्वे स्थानक भागात मंडप टाकण्यावरून हुज्जत घातल्याने अंगचोर सफाई कामगारांचे प्रकरण उघडकीला आले आहे.

घनकचरा विभागातील सफाई कामगारांनी प्रभागात विनामंजुरी इतर विभागात सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने पदस्थापना घेतल्या असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित साहाय्यक आयुक्तांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित केली जाईल. सफाई कामगारांनी आपल्या मूळ घनकचरा आस्थापनेत तातडीने हजर व्हावे. -अतुल पाटील, उपायुक्त, घनकचरा विभाग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *