Author: bittambatami.com

लोकशाहीच्या बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा –किशन जावळे

लोकशाहीच्या बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा –किशन जावळे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरीबद्दल तहसीलदार धनंजय जाधव यांचा सन्मान अशोक गायकवाड रायगड- कर्जत: लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. नवमतदारांनी युवक-युवती तसेच दिव्यांग व्यक्तींना मतदार नोंदणी व मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात १६ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, जे.एस.एम. कॉलेजच्या प्राचार्य सोनाली पाटील, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व दिव्यांग आयकॉन साईनाथ पवार, युथ आयकॉन तपस्वी गोंधळी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (१८९ कर्जत) म्हणून तहसीलदार डॉ.धनंजय जाधव यांचा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. लोकशाही प्रक्रियेत मतदार यादीचे महत्त्व अधोरेखित करत जिल्हाधिकारी जावळे यांनी सर्वसमावेशक मतदार नोंदणीसाठी प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. युवक, महिला व दिव्यांग नागरिकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी सातत्याने जनजागृती करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तहसीलदार विक्रम पाटील यांनी केले.

माजी सैनिक डॉ. भाऊराव तायडे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

माजी सैनिक डॉ. भाऊराव तायडे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण पालघर : माजी सैनिक डॉ. भाऊराव पुंडलिक तायडे (रा. पालघर) यांनी मालमत्ता कर माफी व मालमत्ता नोंदीतील त्रुटींच्या विरोधात जिल्हाधिकारी…

 पालघरमधील आदिवासी सुरांचा देश पातळीवर सन्मान

पालघरमधील आदिवासी सुरांचा देश पातळीवर सन्मान भिकल्या धिंडा यांना पद्मश्री जाहीर योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील आदिवासी मातीतील सुरांची आज देश पातळीवर दखल घेतली गेली. केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीत पालघर जिल्ह्यातील आदिवासी कलाकार भिकल्या धिंडा यांचे नाव जाहीर झाले आहे. तारपा वाद्याच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती जगभर पोहोचवणाऱ्या भिकल्या धिंडा यांचा सन्मान झाल्याने संपूर्ण आदिवासी समाजालाच हा आपला सन्मान वाटत आहे. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारामध्ये पालघर जिल्ह्याचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे. ९२ वर्षीय भिकल्या धिंडा यांच्या वाद्यातून निर्माण होणारे स्वर हे केवळ संगीत नसून, वारली आदिवासी संस्कृतीची ओळख नाळ आणि आत्मा आहेत. चार पिढ्या धिंडा कुटुंबांने तारपा वाजण्याची परंपरा कायम ठेवली आहे. ऐंशी वर्षे तारपा वाजनात भिकल्या धिंडा यांना वयाच्या दहाव्या वर्षापासून तारपा वाजवण्याचा छंद लागला. त्यांच्या घरात तारपा वाजवणारी ही चौथी पिढी आहे, असे ते सांगतात. गुराढोरा सोबतच रानावनात भटकताना तारपा वाजवण्याचा छंद मला लागला. तो छंद आदिवासी संस्कृती जोपासण्यासाठी मी आजही जपतो, केवळ मीच तारपा वाजवून थांबत नाही, तर अनेक तरुणांनाही तारपा वाद्य वाजवायला शिकवले आहे. आजच्या मोबाईलच्या युगात तरुण आपल्या संस्कृतीकडे लक्ष देत नाहीत, हे खरे असले, तरी मी मात्र तरुणांना आदिवासी संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतोय, असे ते विनयाने सांगतात. दहा फूट लांबीचा तारपा वाजवणे हे वैशिष्टय भिकल्या धिंडा हे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा गावचे रहिवासी आहेत. ते वारली आदिवासी संस्कृतीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य असले, तरी त्यांनी आपली संस्कृती प्राणपणाने जोपासली आहे. दीडशे वर्षाची तारपा वादाची परंपरा जपत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे. साधारणपणे तारपा हे वाद्य बांबू आणि सुक्या भोपळ्यापासून बनवले जाते; मात्र भिकल्या धिंडा यांची याबाबतही एक विशेष ओळख आहे. ते दहा फूट लांबीचा अवाढव्य तारपा अत्यंत सहजतेने वाजवतात .इतक्या मोठ्या तारपासाठी लागणारी फुफ्फुसाची ताकद, श्वासावरचे नियंत्रण आणि कलेवरील त्यांचे प्रभुत्व पाहून सर्वच जण थक्क होतात. हातात काठी आणि सोबतीला तारपा वाद्य घेऊन भिकल्या धिंडा हे वयाच्या दहाव्या वर्षापासून तास न तास सराव करायचे. सुमारे ऐंशी वर्ष ते तारपा वाजवत असून त्यांची सुरावरील पकड आजही तितकीच घट्ट आहे. शरीर थकले, तरी उत्साह कायम तारपा हेच आपले दैवत आहे, असे ते मोठ्या अभिमानाने सांगतात. आदिवासी संस्कृतीमध्ये तारपा नृत्याला आणि वाद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आत्तापर्यंत त्यांना शेकडो स्थानिक आणि राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे; मात्र पद्मश्री हा या सर्व सन्मानात मोठा सन्मान असून आता ही कला केवळ आपल्या पुरती मर्यादित न ठेवता पुढच्या पिढीने ती जपली पाहिजे असे भावनिक आवाहन पद्मश्री सन्मान जाहीर झाल्यानंतर त्यांनी केले. वयोमानानुसार शरीर थकले असले, तरी तारपा फुंकताना त्यांच्यात येणारा उत्साह आजही थक्क करणारा आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारात आपले नाव आल्याचे त्यांना दिल्लीवरून कळवले, तेव्हा त्यांना हा आदिवासी संस्कृतीचा सन्मान आहे आपण निमित्त मात्र आहोत अशी विनयाची भावना ते व्यक्त करतात. कुटुंबात २२ माणसे आहेत. आठ गुंठे जमीन आहे. दुसरा व्यवसाय नाही. नोकरी नाही, तरी त्यांची जगण्याची धडपड अजून थांबलेली नाही. त्याबाबत ते कुणालाही दोष देत नाहीत. लहानशा झोपडीत आजही ते राहतात. पुरस्कारातून बांधले घर महाराष्ट्र सरकारने तसेच केंद्र सरकारने दिलेल्या पुरस्काराच्या काही रकमेतून त्यांनी हे घर बांधले आहे. त्यांना आत्तापर्यंत शेकडो पुरस्कार मिळाले असले, तरी एकतारा गुरुकुल तर्फे देण्यात आलेली तारपा शिरोमणी पदवी, सांस्कृतिक सेनानी सन्मान, राष्ट्रीय संगीत नृत्य आणि नाटक अकादमीकडून दिला गेलेला संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार, पालघर भूषण पुरस्कार, पालघर जिल्हा परिषदेचे ब्रँड पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. पद्मश्री पुरस्काराने या सन्मानांचाच आणखी सन्मान झाला आहे. कोट ‘आदिवासी कलेची केंद्र सरकारने दखल घेतली. पद्मश्री जाहीर झाला. कलेनेच मला मोठे केले. माझी जागतिक पातळीवर दखल घेतली गेली. ही कला, संस्कृती टिकली पाहिजे. भिकल्या धिंडा, पद्मश्री सन्मान प्राप्त कलाकार

 ‘मेक इन इंडिया’मुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला मिळत आहे बळ

‘मेक इन इंडिया’मुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला मिळत आहे बळ मुंबई-हमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सातत्याने प्रगतीपथावर असून संपूर्ण मार्गावर ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन मास्ट्स बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. ही प्रगती भारताच्या…

मुरबाड नगरीत भव्य अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन

मुरबाड नगरीत भव्य अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन राजीव चंदने मुरबाड : गुरूप्रतिपदेच्या पर्वकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात  मुरबाड तालुका भागवत वारकरी समाजसेवा मंडळाच्या विद्यमाने भव्य  अखंड हरिनाम सप्ताह सोमवार, २ फेब्रुवारी ते सोमवार, ९ फेब्रुवारी या कालखंडात आयोजित करण्यात आला आहे. इ.स. १९९८ साली गुरुवर्य वैकुंठवासी श्रीराम दादा जोशी यांनी अनुष्ठानपूर्वक सामुदायिक श्रीज्ञानेश्वरी पारायणाची मुहूर्तमेढ मुरबाडच्या मातीत रोवली. यावर्षी पारायण सोहळ्याचे एकोणतीसावे वर्ष आहे. आचार्य अशोकभाई खरे , निलेश जोशी आणि योगी फुलनाथ महाराज यांच्या पावन उपस्थितीत पारायण सोहळ्याचा प्रारंभ होईल.पारायण नेतृत्व श्रीमहंत प्रमोद महाराज जगताप आणि पारायणाचार्य,एकनाथ महाराज कोष्टी करणार आहेत.सदर उत्सवात पुणे येथील वेदमूर्ती शमंदारशास्त्री खळदकर यांची दररोज सायंकाळी चार ते सहा या वेळेत श्रीरामरक्षा या विषयावर प्रवचने होणार आहेत.रोज रात्री आठ ते दहा या वेळेत सर्वश्री विक्रांत महाराज पोंडेकर,जयेश महाराज भाग्यवंत,सुभाष महाराज गेठे,माधवदास महाराज राठी,भगीरथ महाराज काळे,ओंकार महाराज दुडे,आचार्य डॉ.रामकृष्णमहाराज लहवितकर यांची कीर्तने होणार आहेत.दिनांक आठ फेब्रुवारीला भव्य पालखी सोहळा आणि दिव्य असा दीपोत्सव संपन्न होईल. सोमवार दिनांक नऊ रोजी वैष्णवभूषण श्रीमहंत प्रमोद महाराज जगताप यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे.या महोत्सवात हजारो भाविकांना अन्नदान करण्यात येणार आहे.या  धर्मकार्यात भाविकांनी सर्वतोपरी सहकार्य करावे तसेच सोहळ्यात उपस्थित राहून भक्तिसुखाचा आनंद लुटावा असे आवाहन उपरोक्त मंडळाने केले आहे.

 मतदानाअगोदरच बिनविरोध निवडीचा महायुतीचा राणे पॅटर्न…!

मतदानाअगोदरच बिनविरोध निवडीचा महायुतीचा राणे पॅटर्न…! जिल्हा परिषद आणि ६ पंचायत समिती उमेदवार बिनविरोध ऊबाठा सेनेला धक्का! सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे मतदान होण्यापूर्वीच महायुतीला मोठे यश मिळाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्याची मुदत असली तरी त्यापूर्वीच ५ जिल्हा परिषद गण आणि ६ पंचायत समिती गटातील महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सर्वात आश्चर्याची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व मतदार संघात उभाटाच आपले अर्ज उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. या घटनेमुळे पक्षाच्या अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या उभा ठाक सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. अलीकडे झालेल्या जिल्ह्यातील चार नगरपरिषदांच्या निवडणुका भाजप आणि दोन्ही शिवसेना पक्षाने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकत अतिशय चुरशीने लढवल्या होत्या. याही निवडणुकीत हेच चित्र पुन्हा पाहायला मिळेल असे वाटत असताना भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेत महायुतीतील तिन्ही घटक पक्षांना एकत्र आणत जागा वाटपाचा ‘फॉर्म्युला’ तयार केला आणि तो तिन्ही पक्षांच्या गळी उतरवला. हा ‘फॉर्म्युला ‘जाहीर होताच त्यावरून महायुतीच्या तिन्ही घटक पक्षात वाद आणि कुरबुरी सुरू झाली आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंडखोरीही झाली. बंडखोरी  थोपवण्याचे काम सुरू असून तिन्ही घटक पक्षांचे नेते दररोज बैठका घेऊन ही बंडखोरी थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याला उद्यापर्यंत निश्चित यश येईल अशी खात्री नेतेमंडळींना वाटत आहे. एका बाजूला हे काम सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचे आव्हान मोडीत काढण्याच्या दृष्टीने महायुतीतील नेते कामाला लागले असून जिल्ह्यात ठिकठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना फोडून आपल्या पक्षात घेण्याचे सत्र महायुतीतील भाजपा आणि शिंदे सेनेने सुरू ठेवले आहे. प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत महाविकास आघाडीला खिंडार पाडण्याचे आणि निवडणूक एकतर्फी कशी होईल त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान महायुतीतील बंडखोरी हे शिंदे सेनेपेक्षा भाजपा समोर मोठे आव्हान आहे.जिल्ह्यात राणे म्हणतील ठरवतील ते घडतं ही परंपरा असतांना बंडखोरीनं अचानकपणे डोकं कसं वर काढलं? त्यातही कुडाळ – मालवण तसंच जिल्ह्यात काही ठराविक भागातच बंडखोरी कशी उफाळून आली? त्यांचा बोलविता धनी भाजपामध्ये कोणी आहे का? याचा शोध राणेंच्या गोटात सुरू आहे.खासदार राणे,पालकमंत्री नितेश राणे आणि शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे हे तर जिल्ह्यात तळ ठोकून आहेत गेले काही दिवस पक्षांतर्गत बंड थोपवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत.उद्या या बंडखोरांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही तर ही बंडखोरी कशी मोडून काढायची याचाही ‘फॉर्म्युला ‘ तयार असल्याचे बोलले जात आहे. हे ठरले बिनविरोध जि. प. गट: प्रमोद कामत (बांदा-भाजपा), प्राची इस्वलकर(खारेपाटण-भाजपा), रुहीता तांबे (जानवली,शिंदेसेना), सुयोगी घाडी (पडेल-भाजपा), अवनी तेली (बापर्डे-भाजपा) पंचायत समिती गण: संजय राणे (बिडवाडी), सोनू उर्फ राजेश सावंत (वरवडे), अंकुश ठुकरूल (पडेल),गणेश राणे (ना डण), संजय लाड (बापर्डे), साधना नकाशे (कोकिसरे)–सर्व भाजपा.

कलाश्रमचा अमृत महोत्सवी ‘अभियान सन्मान’ सोहळा

कलाश्रमचा अमृत महोत्सवी ‘अभियान सन्मान’ सोहळा अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने सहदेव सदैव कराओके अभिनव स्पर्धा कलाश्रमच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात  सव्वाशे कलाकार एकत्र येणार मुंबई –‘कलाश्रम’ ही स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला अभियान सन्मान हा उपक्रम राबवला जातो. गेल्या आठ…

गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर विधानसभा अधिवेशनामध्ये आवाज उठविला जाईल -सचिन अहिर

गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर विधानसभा अधिवेशनामध्ये आवाज उठविला जाईल -सचिन अहिर राजेंद्र साळसकर मुंबई-एक काळ असा होता,स्वातंत्र्य मिळालेल्या भारतात सुई देखील बनत नव्हती, पण सत्तेवर आलेल्या प्रत्येक नेतृत्वाने आपापल्या परीने योगदा‌न दिले आणि देशाला राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले‌.पण अलीकडे सत्तेवर आलेल्या सरकारने हा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न चालविला आहे.इतिहास आमच्याच काळात २०१४ नंतर घडलाय, अशी खोटी हाकाठी पिटण्यास सुरुवात केली आहे.परंतु इतिहासामधील सत्य कदापि पुसता येणार नाही.हे सांगण्यासाठी आता नव्या पिढीने पुढे आले पाहिजे,असे प्रतिपादन राष्ट्रीय मिल मजूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी येथे ध्वजरोहन प्रसंगी बोलताना केलेआहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ‌ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे यार्षीही मजदूर मंझील समोरील प्रांगणात,देशाचा ७७ वा प्रजासत्ताकदिन समारोह आयोजित करण्यात आला होता.अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.याप्रसंगी सरचिटणीस गोविंदराव मोहिते आणि सर्व पदाधिकारी, तसेच कामगार,आंबेकर प्रतिष्ठान कॅटरिंग कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शूर वीरांना अभिवादन करून अध्यक्ष आमदार सचिन अहिर म्हणाले,आज राज्यसरकार परदेशातून गुंतवणूक आणली,असे मोठ्या तोऱ्यात म्हणत असले तरी,राज्यात कारखाने बंद पडत आहेत, बेरोजगारी आणि उपासमारीचा प्रश्न चिंताग्रस्त होऊन बसला आहे,ही गोष्ट सोयीस्करपणे विसरली गेली आहे!गेल्या पाच वर्षापासून मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातील बंद एसटीसी गिरण्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारने डोळेझाक केली आहे. या प्रश्नावर लोकसभेत आवाज उठवण्यासाठी खासदारांना लवकरच निवेदन देण्याचे सत्र सुरू करण्यात येईल,अशी आपल्या भाषणात सचिन आहिर यांनी ग्वाही दिली आहे गिरणी कामगार घराच्या रखडलेल्या प्रश्नावर सचिन अहिर म्हणाले, कामगारांना जाचक ठरणारे १७ वे कलम राज्यसरकारने रद्द केले, हे १४ कामगार संघटना एकत्र येऊन  उभारण्यात आलेल्या लढ्याचे यश आहे! परंतु सरकारने जे सकारात्मक आश्वासन दिले आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी,यासाठी लवकरच होणाऱ्या विधानसभा अधिवेशनामध्ये निश्चितपणे आवाज उठविला जाईल. ध्वजारोहण सोहळा सेवा दलाचे प्रमुख लालचंद पांडे यांच्या संयोजनाखाली पार पडला. उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांचे याकामी महत्व पूर्ण सहकार्य लाभले.

प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा रमेश औताडे मुंबई : क्रांती सम्राट डॉ बाबासाहेब गोपले प्रवेशद्वार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर  मानखुर्द येथे जय लहुजी रिक्षा स्टँड यांच्या  वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी समाजभूषण सुदाम आवाडे यांनी  ध्वजारोहण केले. श्रावण नाटकर सर , नितीन हिवाळे , संदेश सुतार, दत्तात्रय आवाडे , गोपीनाथ पांजगे , भिमा गायकवाड , अँड दिलीप दुनघव , सुरेश उफाडे , दत्ता दुनघव , देविदास उफाडे , सोमनाथ शिंदे   , दादाराव पारवे आधी मान्यवर व जय लहुजी रिक्षा युनियनचे सर्व सदस्य व नगरातील समाज बांधव उपस्थित होते.

ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा दिवा : देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन महेंद्र दळवी होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे मुंब्रा पोलिस ठाण्याचे ए. पी.आय वसंत खतेले, ए. पी.आय. अमोल कोळेकर आणि ए. पी.आय राजेंद्र तोरडमल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या श्रीमती ज्योत्स्ना सोनी, किरण सावंत सर, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, समूहगायन, नृत्य, कवितावाचन व प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीमय व प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये, शिस्त, एकता व बंधुता याविषयी मार्गदर्शन केले. तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, शिस्त व देशसेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी चेअरमन महेंद्र दळवी यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्ये व सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व सांगून शाळा नेहमीच सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्या श्रीमती ज्योत्स्ना सोनी यांनी सर्व मान्यवरांचे, पालकांचे व उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे व शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडल्याचे त्यांनी सांगितले.