Author: bittambatami.com

लोकशाही दिनातील अर्ज लवकरात लवकर मार्गी लावावेत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

लोकशाही दिनातील अर्ज लवकरात लवकर मार्गी लावावेत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश अशोक गायकवाड रत्नागिरी : लोकशाही दिनातील प्रलंबित अर्ज लवकरात लवकर मार्गी लावावेत तसेच कार्यालयात येणाऱ्या दिव्यांग, ज्येष्ठ, नागरिक…

 सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सतर्क:१०२ नागरिकांची माहिती संकलित….!

आखाती देशात युद्धजन्य परिस्थिती..! सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सतर्क:१०२ नागरिकांची माहिती संकलित….! सिंधुदुर्ग : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी महसूल व पोलिस विभागाला दिले आहेत. त्यानुसार तालुका व जिल्हास्तरावर माहिती संकलनाचे काम युद्धपातळीवर सुरू असून संकलित माहिती राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेली आहे. जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत एकूण १०२ नागरिकांची माहिती प्राप्त झाली आहे. त्यापैकी ११ नागरिकांना तातडीच्या मदतीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्या नावांची यादी राज्य शासनाला पाठविण्यात आलेली आहे. नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे (०२३६२) २२८८४७ / १०७७ तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे (०२३६२) २२८६१४ या क्रमांकांवर नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. संबंधितांनी अधिक माहितीसाठी या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आखाती देशांतील परिस्थितीवर जिल्हा प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून असून केंद्र व राज्य शासनाशी सातत्याने समन्वय साधला जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्क ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  धोडमिसे यांनी केले आहे.

रंगकर्मी रविंद्र देवधर यांना बलराज साहनी पुरस्कार प्रदान

रंगकर्मी रविंद्र देवधर यांना बलराज साहनी पुरस्कार प्रदान कल्याण: बलराज साहनी साहिर लुधियानवी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा बलराज साहनी पुरस्कार या वर्षी ज्येष्ठ रंगकर्मी रविंद्र देवधर यांना ३ मार्च रोजी एका विशेष कार्यक्रमात साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. वेगळा समाजप्रबोधनपर मार्ग निवडणारे अभिनेते व दिग्दर्शक म्हणून रविंद्र देवधर हे नाट्य वर्तुळात सुपरिचित आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अकथित पण महत्त्वपूर्ण पानं उलगडणाऱ्या, देवधर यांची संकल्पना व मुख्य भूमिका असलेल्या ‘मी भारतीय’ या दीर्घांकाचे २४९ प्रयोग त्यांनी केले आहेत. माजी एअर मार्शल भूषण गोखले, ऑस्करपर्यंत मजल मारलेले ज्येष्ठ कलाकार अरुण नलावडे यांसारख्या अनेक नामांकितांनी प्रत्येक भारतीयाने अनुभवायला हवा” असा नाट्यानुभव या शब्दांत ‘मी भारतीय’ला गौरवलेलं आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद – मध्यवर्ती शाखेचा ‘नाट्यकला मंदिर पुरस्कार’, अखिल भारतीय नाट्य परिषद – पुणे शाखेचा ‘भालबा केळकर पुरस्कार’, देवधर मंडळाचा ‘चतुरस्त्र व्यक्तिमत्व’ पुरस्कार यांशिवाय विविध प्रवाहबाह्य नाट्यकृतींसाठी पटकावलेली राज्य नाट्य स्पर्धेची अनेक पारितोषिकं देवधर यांच्या नावावर यापूर्वी जमा आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानानिमित्त जिल्ह्यात १११ शिबिर

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानानिमित्त जिल्ह्यात १११ शिबिर जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती अशोक गायकवाड अलिबाग: महाराष्ट्र शासन यांच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान – टप्पा क्र. १ अंतर्गत जिल्ह्यात एकूण १११ शिबिरे आयोजित करण्यात आली. १८ फेब्रुवारीला घेतलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील प्रत्येक मंडळामध्ये ही शिबिरे पार पडणार आहेत. या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांच्या महसूल विषयक प्रलंबित प्रकरणांचे तात्काळ निराकरण करणे हा होता. प्रलंबित फेरफार निकाली काढणे, सातबारा अभिलेख दुरुस्ती, अभिलेख हेल्प डेस्क, लोकसेवा हक्क कायद्यानुसार सेवा, अकृषक परवानगी मार्गदर्शन, भूसंपादन प्रकरणांतील कमी-जास्त पत्रके तयार करणे तसेच गाव दप्तर अद्ययावत करणे या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील. तुकडेबंदी, फेरफार मंजुरी आणि सातबारा दुरुस्ती यासंदर्भातील प्रकरणांना विशेष प्राधान्य देण्यात आले. १५ दिवसांच्या नोटीस कालावधीमुळे प्रलंबित राहिलेली प्रकरणे मार्गी लावण्यावर भर देण्यात येईल. तसेच लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत महसूल विभागाच्या सुमारे ९५ सेवांचे एकत्रीकरण करून उत्पन्न दाखला, विविध प्रमाणपत्रे यासाठी मदत कक्ष स्थापन करण्यात येतील. हे अभियान मार्च ते मे या तीन महिन्यांत दर महिन्याला दोन दिवस मार्च मध्ये ७,१४ आणि २५ —एप्रिलमध्ये १०,१४ व १७, तर मेमध्ये १, ८ व १५ असे प्रत्येक तालुक्यातील एका मंडळात राबविण्यात येतील. तक्रार निवारणासाठी स्वतंत्र पोर्टल कार्यान्वित असून प्रत्येक तालुक्यासाठी संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी जिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके व तहसीलदार (महसूल) चंद्रसेन पवार आदी अधिकारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख बनत असून आदिवासी बांधव व शेतकऱ्यांना योजनांचा लाभ सुलभपणे मिळण्यास गती मिळाली आहे.

सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आनंद मेळावा आणि मराठी भाषा गौरव दिन साजरा

सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आनंद मेळावा आणि मराठी भाषा गौरव दिन साजरा नवी मुंबई, सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने समागसेवक मारुती विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या आनंद मेळाव्यात ६० सभासदांचा वाढदिवस साजरा करून ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला.  याप्रसंगी संघाचे ज्येष्ठ सभासद ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण (वय ९१) व ज्ञानेश्वर भोगले (वय ७५) यांचा कुटुंबासमवेत शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. संघाचे सचिव जगदीश एकावडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संघाच्या कार्याचा आढावा घेतला. तर संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी सांगितले की, संघाच्या सभासदांसाठी लवकरच आरोग्य शिबिर घेण्यात येईल. त्याचप्रमाणे आपल्या सभासदांसाठी  महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे दिले जाणारे स्मार्ट  कार्ड देण्यासाठी लवकरच एक कार्यक्रम आयोजित केला जाईल. संघाचे माजी अध्यक्ष मारुती कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मराठी भाषेचे महत्व सांगितले.  संघाच्या उपाध्यक्ष सीमा बोराडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन केले. संघाचे सहसचिव राजेंद्र कदम यांनी वाढदिवस असणाऱ्या मानकऱ्यांच्या नावांचे वाचन केले. संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे यांनी नवीन सभासदांचे स्वागत केले. तर संघाचे सहखजिनदार  नाना शिंदे यांनी देणगीदारांचे  आभार मानले.  संघाचे ज्येष्ठ सभासद पत्की आणि संघाच्या माजी उपाध्यक्षा डॉ.  विजया गोसावी व इतर  सभासदांनी सामुहिकरित्या सुरेल आवाजात वाढदिवसाचे गीत म्हटले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य केल्याबद्दल अध्यक्षांनी सर्वांचे आभार मानून ९१ वर्षाचे ज्येष्ठ सभासद देणगीदार ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या स्नॅक वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

‘वी नीड यू’ सोसायटीचे २०२५चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर

‘वी नीड यू’ सोसायटीचे २०२५चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर अनिल ठाणेकर ठाणे: ‘वी नीड यू’ सोसायटीतर्फे समाजात ‘व्रतस्थ वृत्तीने कार्य करणार्‍या व्यक्तींच्या कामास प्रोत्साहन देण्यासाठी व ठाणे शहर आणि जिल्ह्यालगतच्या परिसरात सुरू असलेल्या सामाजिक व शैक्षणिक कामाच्या मागे उभे राहण्यासाठी गेली ८ वर्षे समाजव्रती, शिक्षणव्रती आणि कार्यव्रती हे पुरस्कार दिले जातात. सन २०२५चे हे तिन्ही पुरस्कार संस्थेच्या१५ फेब्रुवारी झालेल्या विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार समाजव्रती पुरस्कार स्टालिन दयानंद यांना, शिक्षणव्रती पुरस्कार सुनिता भोसले यांना तसेच कार्यव्रती पुरस्कार बाळासाहेब आठरे यांना घोषित झाले आहेत. भांडूप, मुंबई येथे ‘वनशक्ती’ या पर्यावरणवादी संस्थेत धडाडीने काम करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते दयानंद स्टालिन यांना या वर्षीचा समाजव्रती पुरस्कार मिळाला आहे. मुंबई विद्यापीठातून बी.एससी. आणि एम. बी. ए.चे शिक्षण घेणाऱ्या मुंबई शहर, कोकण किनारपट्टी आणि देशातील अनेक भागात झपाट्याने लुप्त होत असलेली जैवविविधता टिकवण्यासाठी गेली पंचवीस वर्षे व्रतस्थपणे काम केले आहे. २००९मधे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कांजुरमार्गमधील १४० हेक्टर पाणथळ जमिनीवर कचरा डेपो करण्याची परवानगी केंद्राकडे मागितली. स्टालिन यांनी या मागणीला विरोध केला आणि न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने एक केंद्रीय अभ्यासगटाद्वारे अभ्यास करून घेत कचरा डेपो करण्यास परवानगी नाकारली. ही एकच जमीन नव्हे तर मुंबईतील पाणथळ जमिनीवर बिल्डर लॉबीचे अतिक्रमण रोखण्यासाठीही ते सातत्याने कार्यरत असतात. त्यांच्या या कामाने अस्वस्थ झालेल्या काही बिल्डरनी त्यांच्यावर गुंडांकरवी हल्लेही केले आहेत. २०१०मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या खाणींच्या प्रकल्पालाही प्रखरपणे विरोध केला आणि अखेर प्रकल्प रोखण्यात यश मिळवले. खारफुटी वन किंवा कांदळवन टिकवून त्यात वृद्धी करण्यासाठी ते कार्यरत आहेत. केवळ पाचवीपर्यंत शिक्षण घेऊन वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी मानवी हक्क अभियान या संस्थेच्या माध्यमातून समाजकार्यात प्रवेश करणाऱ्या आणि पुढे समाज कार्याबरोबरच समाज शिक्षण, कायदा शिक्षण घेता घेता थेट पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या तसेच शिक्षणाचा गंध नसलेल्या फासेपारधी आणि अन्य भटक्या तसेच आदिवासी समाजात शिक्षणाचे मोल पोहोचवण्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या, आणि तब्बल १५०हून अधिक विद्यार्थी दत्तक घेतलेल्या सुनिता भोसले यांना या वर्षीचा शिक्षणव्रती पुरस्कार मिळाला आहे. २०१२ साली त्यांनी क्रांती संस्था स्थापन करून या सर्व मुलांची शैक्षणिक प्रगती तपासणे, त्यांचं वह्या, पुस्तके, कपडे आदी गरजा पाहणे, त्यांच्या शालेय शुल्काची व्यवस्था पाहणे, अशी अनेक कामे केलेली आहेत. इतकेच नव्हे तर बालमजुरी रोखणे, बालविवाह रोखणे, त्यासाठी पालकांत जागृती करत राहणे, त्यासाठी बालक पालक संवाद घडवून आणणे, हे काम सुनिता सातत्याने करत आहेत. ‘विंचवाचे तेल’ या आत्मकथनातून त्यांनी फासेपारधी समाजावर होणाऱ्या अन्यायाचा धांडोळा घेतानाच समाजांतर्गत, विशेषतः स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायावर अत्यंत प्रखर प्रकाशझोत टाकलेला आहे. आगामी काळात वंचित, पारधी, भटके आणि आदिवासी समूहातील मुलांसाठी आश्रमशाळा अगर वसतिगृह निर्माण करण्याची त्यांची योजना आहे. तालुका कृषी अधिकारी म्हणून करणाऱ्या बाळासाहेब आठरे यांनी शासकीय सेवेच्या मर्यादा ओलांडून केलेल्या लोकाभिमुख कामाचा गौरव त्यांना कार्यव्रती पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे. पाणलोट क्षेत्र विकास, महिला स्वयंसहायता गट बळकटीकरण, आदिवासी विकास संदर्भातील योजना, शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बीज उपलब्ध व्हावे म्हणून शुद्ध बीजोत्पादन कार्यक्रम, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार विकास योजना अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रम, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, सेंद्रिय शेती उत्पादन कार्यक्रम आदि अनेक कार्यक्रम राबवले आहेत. तसे करताना शेतकऱ्यांची अनोखी शेतीशाळा व घोंगडी बैठक राबवून शेतकरी हितासाठी काम केले आहे. पथनाट्य लेखन, गीतलेखन करून त्यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने व सामाजिक कार्यात सहभाग दिलेला आहे. ठाणे जिल्ह्यातील पालघर या आदिवासी जिल्ह्यातही त्यांनी सामाजिक आणि ग्रामविकास संस्थांबरोबर काम केले आहे. हे पुरस्कार रविवार ८ मार्च सायंकाळी ५.३० वाजता नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका, ठाणे येथे होणार असून ज्येष्ठ सामाजिक तसेच स्त्रीवादी कार्यकर्त्या शारदा साठे यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. शिरूर जिल्हा पुणे येथे जीवन विकास मंदिर शाळेचे अध्यक्ष आणि युवक क्रांती दलाचे उपाध्यक्ष रविंद्र धनक यांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे. वी नीड यू सोसायटी ही संस्था १९८६पासून ठाणे व नवी मुंबई परिसरात काम करत आहे. या कामाचा परीघ शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार व प्रबोधन असा आहे. यासाठी बालवाडी, प्राथमिक शिक्षणात उमंग वर्ग, कॉम्प्युटर आधारित गणित शिक्षण, ब्युटीशीयन व शिवण प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. लोकशिक्षण होण्यासाठी नियमित व्याख्याने, चर्चासत्रे व शिबिरे आदी प्रबोधन कार्यक्रम केले जातात. ठाणे शहर आणि परिसरातील सुजाण नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन वी नीड यू सोसायटीचे अध्यक्ष अतुल गोरे यांनी तसेच सर्व विश्‍वस्त मंडळाने केले आहे.

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय परिसंवाद संपन्न

भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय परिसंवाद संपन्न नवी मुंबई : भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी ७५ वर्षानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली आणि मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र व आंबेडकर चेअर (सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय राज्यघटनेची ७५ वर्षे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विकासदृष्टी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद यशस्वी रितीने संपन्न झाला. कार्यक्रमाचा शुभारंभ नवी मुंबईच्या महापौर सौ. सुजाता सुरज पाटील यांच्या हस्ते झाला. स्वागतपर भाषण प्रा. मनीषा कर्णे यांनी  तर प्रास्ताविक डॉ. कैलास गायकवाड यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी  जे. एस. सहारिया यांनी भारतीय राज्यघटनेतील मूल्ये व त्यांचे सामाजिक महत्त्व यावर मार्गदर्शन केले. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी परिषदेस शुभेच्छा दिल्या. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाजविकास विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत विविध तांत्रिक सत्रांमध्ये १६ संशोधनपर निबंध सादर करण्यात आले. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, हैदराबाद आदी राज्यांतील संशोधकांनी यामध्ये सहभाग घेतला. साऊथॅम्प्टन युनिव्हर्सिटी, लंडन येथील संशोधकानेही आपला संशोधन निबंध या परिषदेत सादर केला. समारोप सत्रात थायलंड येथील डॉ. श्रीरंजन आवटे यांनी संविधानिक मूल्ये समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित करत सामाजिक न्यायाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले. अधिवेशनाच्या विशेष सत्रात दीपक करंजीकर यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर : दूरदर्शी अर्थतज्ज्ञ” या विषयावर व्याख्यान दिले. परिषदेत संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता, आरक्षण धोरण, लोकशाही व विकास या विषयांवर सखोल चर्चा झाली. सत्रांचे मॉडरेशन मुंबई विद्यापीठाच्या डॉ. प्रिया वैद्य व डॉ. सोनाली वाखर्डे यांनी केले. कार्यक्रमाचा तपशीलवार आढावा सादर करण्यात आला तसेच सहभागी अभ्यासकांना प्रमाणपत्रे व समिती सदस्यांना स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राशी बग्गा यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन सौ. संध्या आंबाडे व  दशरथ गंभीरे यांनी केले. हा आंतरराष्ट्रीय परिसंवाद भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेणारा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विकासदृष्टीचा पुनर्विचार करणारा ठरला.

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित परत आणणार- देवेंद्र फडणवीस

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित परत आणणार- देवेंद्र फडणवीस मुंबई: युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशांची हवाई वाहतूक सेवा बंद झाल्यानंतर परदेशात अडकलेल्या भारतीयांबाबत राज्य शासन सतर्क असून त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य संजय केनेकर, ॲड. निरंजन डावखरे, सत्यजित तांबे, ॲड. अनिल परब, शशिकांत शिंदे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन करत असलेल्या उपाययोजनासंदर्भात प्रश्न विचारला होता. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हवाई वाहतूक सेवा बंद झाल्यानंतर पर्यटक, व्यावसायिक तसेच ट्रान्झिटमध्ये असलेल्या नागरिकांचे संदेश आल्यानंतर तत्काळ केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला. त्याचबरोबर संबंधित देशांतील भारतीय दूतावासांना सक्रिय करण्यात आले असून नागरिकांना दूतावासाशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर समन्वयाची जबाबदारी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नागरिकांसाठी विशेष व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला असून त्यावरून येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंत्री महाजन यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अडकलेल्या अनेक नागरिकांशी संवाद साधला आहे. मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गावंडे यांनाही जबाबदारी देण्यात आली असून त्यांनी दूतावासांसोबत बैठक घेऊन आवश्यक एसओपी नागरिकांपर्यंत पोहोचविल्या आहेत. या सूचनांची माहिती ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावरूनही प्रसारित करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून परत आणण्याची प्रक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्य शासनाने महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र केंद्र सरकारने सध्या असुरक्षित हवाई वाहतुकीमुळे  ही प्रक्रिया केंद्राच्या अखत्यारितच ठेवण्याचा सल्ला दिला आहे. विविध राज्यांनी स्वतंत्र प्रयत्न केल्यास गोंधळ निर्माण होऊ शकतो, असेही केंद्राचे मत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सध्या एअर इंडियाची काही विमाने संबंधित ठिकाणी जाऊ लागली असून टप्प्याटप्प्याने नागरिकांना परत आणले जात आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत परिस्थितीत सुधारणा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. कुवैतमध्ये ट्रान्झिट प्रवाशांना दिलासा कुवैत येथे ट्रान्झिटमध्ये असलेल्या काही प्रवाशांना व्हिसा नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र भारतीय दूतावासाच्या प्रयत्नांमुळे त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असून त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुबईत अन्नव्यवस्था मिहीर कोटेचा यांनी दुबई येथे ओळखीच्या व्यक्तींच्या माध्यमातून अडकलेल्या नागरिकांसाठी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था सुरू केली आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना या उपक्रमाचा लाभ होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत परदेशातील भारतीयांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून परत आणण्याचा अनुभव केंद्र सरकारला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे, सर्व नागरिकांना सुरक्षित परत आणले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. तेलसाठा पुरेसा, शेतमाल निर्यातीचा मुद्दा तपासणार तेलसाठ्याबाबत सध्या देशाकडे सुमारे दोन महिन्यांचा साठा उपलब्ध असल्याने तातडीने दरवाढीची भीती नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र युद्धामुळे परदेशात अडकलेल्या शेतमाल निर्यातीचा प्रश्न गांभीर्याने घेतला जाईल आणि आवश्यक त्या पातळीवर हस्तक्षेप करण्याचा विचार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना पूर्ण सुरक्षिततेने परत आणू, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाच्या माध्यमातून व्यक्त केला.

खुशखबर! आता फक्त ४५ हजारांत बसवा सोलर

खुशखबर! आता फक्त ४५ हजारांत बसवा सोलर महावितरणच्या निर्णयामुळे ग्राहकांचे १५ हजार वाचणार! हरिभाऊ लाखे नाशिक – महिना शंभर युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट योजनेसाठी महावितरणने मागविलेल्या निविदेत एक किलोवॉट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाची किंमत सुमारे ४५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. सध्या सौरऊर्जा पुरवठादार आकारत असलेल्या साठ हजार रुपये या दराच्या तुलनेत नवा दर १५ हजार रुपये कमी असल्याने योजनेच्या लाभार्थी पाच लाख छोट्या ग्राहकांची खूप मोठी बचत होणार आहे. तसेच साठ हजारच्या ऐवजी ४५ हजार रुपयात एक किलोवॉटचा छतावरील सौरऊर्जा बसविता येत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आगामी काळात असे प्रकल्प बसविणाऱ्या सर्व गरजू ग्राहकांना लाभ होणार आहे. राज्य सरकार गरीब ग्राहकांसाठी स्मार्ट योजना राबवत असून त्यासाठी महावितरणला अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्मार्ट योजनेच्या निविदेला मान्यता देण्यात आल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. राज्य सरकारच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलार (स्मार्ट) योजनेच्या शासननिर्णयात प्रति किलोवॉट ५० हजार रुपये खर्च गृहित धरला आहे. सध्या व्यवहारात सोलर पुरवठादार व्यावसायिक ग्राहकांकडून प्रती किलोवॉट सुमारे ६० हजार रुपये आकारतात. पण महावितरणने मंजूर केलेल्या निविदेत प्रती किलोवॉट ४५,४५० रुपये इतकी रक्कम स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेत ग्राहकाने भरायच्या हिश्श्याच्या रकमेत आता मोठी कपात होईल. केंद्र सरकारचे अनुदान कसे? केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली. यामध्ये घरगुती वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी एक किलोवॉटला ३० हजार रुपये, दोन किलोवॉटला ६० हजार रुपये व तीन किलोवॉटला ७८ हजार रुपये थेट अनुदान मिळते. ऊर्वरित खर्च ग्राहकाने करायचा असतो. एक किलोवॉटच्या प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. ग्राहकाच्या गरजेपेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीज देयक शून्य येते व ग्राहकाला अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते. राज्य सरकारने या योजनेत राज्यातर्फे आणखी अनुदान देऊन दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाच लाख ग्राहकांसाठी स्मार्ट योजना आणली आहे. प्रत्येकी एक किलोवॉटचे सौरऊर्जा प्रकल्प या योजनेत बसविण्यात येतील. गरजुंना लाभ घेणे सुकर… महावितरणने स्मार्ट योजनेसाठी मागवलेल्या निविदेत एक किलोवॉटच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी ४५,४५० रुपये इतका कमी दर निश्चित झाल्यामुळे आता अन्य गरजू वीज ग्राहकांनाही लाभ होणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सरकारी अनुदानाशिवाय ऊर्वरित रक्कम ग्राहकाला भरावी लागते. या रकमेत मोठी घट झाल्यामुळे छोट्या गरजू वीज ग्राहकांना योजनेचा लाभ घेणे अधिक सोपे होईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सौरऊर्जा प्रकल्प बसविणाऱ्या सूचिबद्ध पुरवठादारांची यादी महावितरणने आपल्या संकेतस्थळावर आणि स्मार्ट योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध केली आहे.

 केडीएमसीच्या नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबरपासून पगार थकला

केडीएमसीच्या नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबरपासून पगार थकला आरोग्य कर्मचाऱ्यांचा केडीएमसी बाहेर ठिय्या कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आरोग्य केंद्रांवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबर महिन्यापासून पगार थकला असून, जुलै महिन्यापासून वाढीव पगार थकबाकी तसेच नोव्हेंबर २०२५ पासून मार्च २०२६ पर्यंतचा थकबाकी पगार मिळावा या मागणीसाठी या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केडीएमसी मुख्यालया बाहेर ठिय्या मांडला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एनएचयुएम अंतर्गत कर्मचाऱ्यांचे मागील एक वर्षापासून सुरळीत पगार होत नाही. तसेच नोव्हेंबर २०२५ पासून मार्च २०२६ पर्यंतचा पगार जमा झालेला नाही.  तसेच जुलै २०२५ पासूनचा वाढीव पगार मिळालेला नाही. इतर महानगरपालिका एनएचएम कर्मचार्यांना १५ हजार वाढीव पागार देते. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिका कोणताही वाढीव पगार देत नाही. तसेच नागरी आरोग्य केंद्रातील एएनएम, जीएनएम यांचे रिक्षा बिल, सपोर्ट ग्रुप, आरोग्य वर्धिनी ही बिले थकीत आहेत. या सर्व समस्यांमुळे एनयुएचएम  स्टाफलं आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून लवकरात लवकर निवारण करण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.