Author: bittambatami.com

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी वाहिली अजितदादांना श्रद्धांजली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी वाहिली अजितदादांना श्रद्धांजली मुंबई : मुंबई महिला विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नुकतीच प्रदेश कार्यालयात आज श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अजित दादांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच भरून निघणार नाही. दादा आमच्या मध्ये नाही असे आम्हाला जराही वाटत नाही. कारण की त्यांचा प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक सारीक लक्ष असायचे. दादांकडे कोणतेही काम घेऊन जा आम्हाला विसरायला व्हायचं पण दादा कधीच ते विसरायचं नाही आणि ते काम मार्गी लागलेला असायचा अशी एक आठवण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई महिला अध्यक्ष आरतीताई साळवी यांनी सांगितलं. या श्रद्धांजली महाराष्ट्र,मुंबई,जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष,वॉर्ड अध्यक्षा,व मुंबई कमिटी, जिल्हा कमिटी,तालुका कमिटी ,वार्डाची कमिटी ,पदाधिकारी सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

 दिवा शहरात महापालिकेचा गलथान कारभार; नगरसेवक ऍड. आदेश भगत यांचे आयुक्तांना निवेदन.

दिवा शहरात महापालिकेचा गलथान कारभार; नगरसेवक ऍड. आदेश भगत यांचे आयुक्तांना निवेदन. दिवा : दिवा शहरातील वाढती अस्वच्छता आणि रस्त्यांवर ठिकठिकाणी साचलेला कचरा यासाठी केवळ ठाणे महानगर पालिका जबाबदार असून यापुढे पालिका प्रशासनाचा असला गलथान कारभार सहन केला जाणार नाही असा इशारा देत प्रभाग क्रमांक २७ चे नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी पालिका आयुक्तांना लेखी पत्र दिले आहे. दिवा शहरात मागील काही वर्षात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी व शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या पाठपुराव्यामुळे सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची विक्रमी कामे झाली आहेत. दिवा शहरातील विशेषतः प्रभाग क्रमांक २७ मधील बहुतांशी प्रमुख रस्ते तसेच अनेक अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. परंतु पालिकेतर्फे सदर रस्त्यांची एक दिवसा आड, दोन दिवसा आड, कळस म्हणजे काही रस्त्यांवर तर तीन ते चार दिवसा आड साफसफाई केली जाते. परिणामी सर्व ठिकाणी प्रचंड अस्वच्छता असते, ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसतो. यासंदर्भात नागरिकांनी तक्रार करून सुद्धा त्याकडे महानगर पालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी आल्याचे नगरसेवक ऍड.आदेश भगत यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. करदात्या दिवेकरांवर हा एक प्रकारचा अन्याय आहे, यापुढे पालिकेचा असला गलथान कारभार सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.  लवकरच शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांची भेट घेतली जाणार असल्याचे नगरसेवक ऍड. आदेश भगत यांनी सांगितले आहे.

 कुर्ला-ट्रॉम्बे मार्गालगतची ३१५४ झोपडपट्यांची पाडकाम मोहीम रद्द करा

कुर्ला-ट्रॉम्बे मार्गालगतची ३१५४ झोपडपट्यांची पाडकाम मोहीम रद्द करा वर्षा गायकवाड यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे मागणी नवी दिल्ली : रेल्वे प्रशासनाने कुर्ला-ट्रॉम्बे मार्गालगतच्या ३१५४ झोपड्यांचे पाडकाम करण्याची नोटीस २७ जानेवारी २०२६ रोजी दिली असून या नोटीसीमुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. १० फेब्रुवारी २०२६ ते १२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान हे पाडकाम करण्यात येणार आहे. ही पाडकाम मोहीम रद्द करावी तसेच बाधित कुटुंबांसाठी कायमस्वरूपी पुनर्वसन योजना सुरू करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्र पाठवून केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठवलेल्या पत्रात खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणतात की, ही वस्ती दोन दशकांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे आणि हजारो गरीब व गरजू कुटुंबांना ते घर आहे. यापूर्वी या झोपड्या पाडण्याचे प्रयत्न न्यायालय आणि स्थानिक प्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे पुढे ढकलण्यात आले होते. तथापि, ही नवीन सूचना जारी केल्यामुळे रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीती आणि अशांतता पसरली आहे. केवळ सहा दिवसांची सूचना देऊन ३००० हून अधिक झोपड्या पाडणे हे ना व्यवहार्य आहे ना माणुसकीचे आहे. अशा कृतीमुळे हजारो कुटुंबे रातोरात बेघर होतील आणि त्यांची आधीच नाजूक असलेली परिस्थिती आणखी बिकट होईल. हे गरिब कष्टकरी रहिवासी अत्यंत चिंतेत आहेत आणि वस्ती मधील वातावरण तणावपूर्ण आहे. या प्रश्नी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित अधिकाऱ्यांना गरीब आणि उपेक्षित नागरिकांच्या दयनीय परिस्थितीचा विचार करून, मानवी आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारण्याचे निर्देश द्यावेत, असे खासदार वर्षा गायकवाड यांनी या पत्रात म्हटले आहे.

  पाणी बिल थकबाकी वसुलीसाठी ठाणे महापालिकेची मोहीम तीव्र

पाणी बिल थकबाकी वसुलीसाठी ठाणे महापालिकेची मोहीम तीव्र १५ दिवसांत ९.८८ कोटींची वसुली ठाणे: ठाणे महानगरपालिका हद्दीत पाणी बिल थकबाकीदारांवर महापालिकेने कडक कारवाई सुरू केली असून गेल्या १५ दिवसांत (२० जानेवारी ते ५ फेब्रुवारी) प्रभाग समितीनिहाय मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान तब्बल ९ कोटी ८८ लाख १४ हजार ३४५ रुपयांची वसुली करण्यात आली आहे.  या कारवाईत पाणीपुरवठा विभागाने थकबाकीदारांवर नळसंयोजन खंडीत करणे, नोटिसा देणे, पंप जप्त करणे आणि पंप रूम सील करणे अशा कठोर उपाययोजना राबविण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही मोहिम राबविण्यात येत असून ती सुरूच राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने नमूद केले. या कारवाईत दिवा येथे ३१३ नळसंयोजन खंडीत करण्यात आली, २१ पंप जप्त तर ३४ पंप रुम सील करण्यात आले असून ३२४ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कळवा प्रभागसमितीत ७० नळसंयोजने खंडीत करण्यात आली. लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती १३४ नळसंयोजने खंडीत करुन एकूण ६०० जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मुंब्रा प्रभाग समितीत २३६ नळसंयोजने खंडीत, १८१ पंप जप्त करुन ४१ पंप सील करण्यात आले असून ३७३६ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नौपाडा कोपरी प्रभाग समिती हद्दीत २४५ नळसंयोजने खंडीत करुन ३७० जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. उथळसर प्रभाग समिती हद्दीत ७१ नळसंयोजने खंडीत करण्यात आली. वर्तकनगर प्रभागसमितीत ४ नळसंयोजने खंडीत करुन २६ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर वागळे प्रभाग समितीमध्ये १ नळसंयोजन खंडीत करण्यात आले आहे.  एकूण १०७४ नळसंयोजन खंडीत करण्यात आली. तर २०२ पंप जप्त, ७५ पंप रुम सील करण्यात आले असून एकूण ५०५६ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. प्रभाग समितीनिहाय करण्यात आलेली  वसुली माजिवडा मानपाडा  प्रभाग समिती : रु. २,१६,३२,८४२ नौपाडा कोपरी प्रभाग समिती :  रु. १,५७,५१,०१२ कळवा प्रभाग  समिती : रु १,२२,२७,२९२ वर्तकनगर प्रभाग  समिती रु.: १, १४,०७,८९३ उथळसर प्रभाग समिती रु. १,०९,८९,४९८ दिवा प्रभाग समिती : रु ७५,५४,३७५ लोकमान्य/सावरकर नगर प्रभाग समिती : रु ६९,७७,७३५ मुंब्रा प्रभाग समिती :  रु. ४८,६०,५७५ वागळे प्रभाग समिती :  रु. ५६,२३,५६४ याशिवाय नागरी सुविधा केंद्र व इतर माध्यमांतून रु. १७,८९,५५९ इतकी वसुली करण्यात आली. थकबाकीदारांविरुद्ध ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

 महाराष्ट्रासह कोकणाच्या विकासासाठी ठोस पाऊल

महाराष्ट्रासह कोकणाच्या विकासासाठी ठोस पाऊल मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश काजू उद्योग विकासाबाबत शासन निर्णय जाहीर मुंबई : राज्यातील काजू लागवड, उत्पादन व प्रक्रिया उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय मंत्री नितेश राणे यांनी माननीय मुख्यमंत्री यांना सादर केलेल्या पत्राच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून यासंदर्भात आज शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्यात कोकणासह कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर व नाशिक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर काजू लागवड केली जाते. सुमारे दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर काजू लागवड असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला या उद्योगाचा मोठा आधार आहे. मात्र उत्पादनवाढ, प्रक्रिया उद्योगांचे आधुनिकीकरण, बाजारपेठ विस्तार व निर्यात वाढ यासाठी स्वतंत्र धोरणात्मक हस्तक्षेपाची आवश्यकता व्यक्त होत होती. ही बाब लक्षात घेऊन मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर करत काजू मंडळाच्या कार्यक्षेत्रात लागवड वाढ, उत्पादकता वृद्धी, संशोधन, प्रक्रिया उद्योगांना चालना, ब्रँडिंग व मार्केटिंग सक्षमीकरण यांचा समावेश करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे, काजू बोर्डचे संचालक परशुराम पाटील यांनीही सदर विषयावर मंत्री नितेश राणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून राज्यातील काजू उद्योगास भेडसावणाऱ्या अडचणी, शेतकऱ्यांच्या मागण्या तसेच संभाव्य उपाययोजना याबाबत सविस्तर मांडणी केली होती. त्यांच्या सक्रिय पुढाकारामुळे हा विषय शासन पातळीवर प्रभावीपणे मांडला गेला. मंत्री आणि काजू बोर्ड प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शासनाने सकारात्मक निर्णय घेत संबंधित विषयास मान्यता दिली आहे. या शासन निर्णयामुळे राज्यातील काजू उत्पादक शेतकरी, प्रक्रिया उद्योजक आणि निर्यात क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती वाढीस लागेल. तसेच महाराष्ट्राचा काजू उद्योग राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक होण्यास मदत होणार आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, “या निर्णयामुळे महाराष्ट्रासह, कोकणाच्या विकासात निश्चितच भर पडणार आहे. काजू हा कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकरी व उद्योजकांना बळकटी देणे हे आमचे प्राधान्य आहे.” तसेच कोकणच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयाबद्दल काजू उत्पादक शेतकरी व उद्योग क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

  महापौर हर्षाली चौधरी यांच्या प्रयत्नाने अटाळी येथे रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात

महापौर हर्षाली चौधरी यांच्या प्रयत्नाने अटाळी येथे रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात पदभार स्वीकारून दोनच दिवसातच रस्त्याचे काम झाले सुरू कल्याण : महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधीतून (मूलभूत सोयी-सुविधा अंतर्गत) कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पॅनल क्रमांक ३ मध्ये वाल्मीकी शाळा ते अटाळी गावापर्यंत नवीन डांबरीकरण रस्ता तयार करण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुकर होणार आहे. दीर्घकाळापासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडी, खड्डे आणि पावसाळ्यात चिखल यांचा त्रास सहन करावा लागत होता. नव्याने करण्यात येणाऱ्या डांबरीकरणामुळे या सर्व समस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच वडवली येथील उल्हास नदीवरील रस्त्याचे कामही पूर्णत्वाकडे जात असल्याने परिसराच्या विकासाला गती मिळाली आहे. महापौर पद मिळताच अ प्रभाक्षेत्रातील सोयी सुविधांना पालिकेतील अधिकाऱ्यांनी सुरुवात केली असून महापौर पदाची ताकद काय असते हे हर्षाली चौधरी यांनी दाखवून दिले आहे. या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा श्रीकांत शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच कल्याण पश्चिममचे आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे आणि माजी नगरसेवक शिवसेना उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला गती देण्यात आली आहे. महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी-थविल यांच्या अथक प्रयत्नातून व विशेष पाठपुराव्यामुळे निधी मंजूर होऊन हे काम प्रत्यक्षात साकारत आहे. महापौर पद मिळताच अ प्रभाग क्षेत्रातील कामांना चांगली गती मिळाली असल्याने पॅनल क्रमांक ३ मधील नागरिकांना दिलासा मिळणार असून, शिवसेनेने दिलेल्या विकासाच्या वचनपूर्तीचा आणखी एक टप्पा पूर्ण होत असल्याची भावना स्थानिक स्तरावर व्यक्त होत आहे.

अजित पवार यांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा करणार नाही – एकनाथ शिंदे

अजित पवार यांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा करणार नाही – एकनाथ शिंदे ठाणे, ‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने साऱ्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळेच यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. कार्यकर्ते, पक्षनेते, पदाधिकारी आणि नागरिकांनाही पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नये, तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ‘अजित पवार यांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र आजही सावरलेला नाही. व्यक्तिश: मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. अजित पवार यांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. पवार कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी आहोत. अशा या दुःखद परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे, सोहळे-समारंभ करणे मला उचित वाटत नाही. त्यामुळेच परिस्थितीचा गांभीर्य आपण जपू या असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, होर्डिंग्स लावू नयेत, तसेच कोणताही समारंभ, कार्यक्रम आयोजित करू नयेत’, अशी विनंती शिंदे यांनी केली आहे.

उत्पन्न वाढीसाठी बसेसचा वक्तशीरपणा वाढवा-प्रताप सरनाईक

उत्पन्न वाढीसाठी बसेसचा वक्तशीरपणा वाढवा-प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर मुंबई, “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील,” असा ठाम संदेश देत परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला वक्तशीरपणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. किफायतशीर दर, सुरक्षित प्रवास आणि शासनाच्या विविध सवलतींमुळे प्रवाशांचा ओघ वाढत असताना सेवेत वक्तशीरपणा नसेल तर ही वाढ टिकणार नाही. “प्रवाशांना ताटकळत ठेवणे म्हणजे त्यांना पर्याय शोधायला भाग पाडणे,” असे ते म्हणाले.देनंदिन प्रवासात बसेस उशिरा सुटणे, रस्त्यात बंद पडणे किंवा अचानक फेऱ्या रद्द होणे — या तक्रारींचा पाऊस प्रशासनावर पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.आगार पातळीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करून प्रत्येक फेरी नियोजित वेळी सुटेल याची खात्री करावी, असे आदेश त्यांनी दिले.“प्रत्येक वेळेवर सुटणारी बस म्हणजे वाढत्या उत्पन्नाकडे जाणारे एक पाऊल,” असे सांगत त्यांनी वक्तशीरपणाचा थेट संबंध महसुलाशी जोडला. वारंवार होणाऱ्या उशिरामुळे हक्काचा प्रवासी खाजगी पर्यायांकडे वळतो, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.एसटीचा वाढता दैनंदिन खर्च लक्षात घेता, उत्पन्नवाढीसोबतच काटकसरीचे धोरण काटेकोरपणे राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर नियोजनबद्ध देखभाल, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापनातील शिस्त यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. “वक्तशीरपणा हीच एसटीची नवी ओळख ठरली पाहिजे,” या शब्दांत मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला सज्ज होण्याचे आवाहन केले.प्रवाशांचा विश्वास जपणारी, वेळेवर धावणारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होणारी एसटी — हाच पुढील वाटचालीचा मंत्र असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता खो-खो परिवारातर्फे पुण्यात शोकसभा

अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता खो-खो परिवारातर्फे पुण्यात शोकसभा मुंबई, दि. ६ फेब्रुवारी – महाराष्ट्राचे क्रीडा नेतृत्व, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ जानेवारीला विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने क्रीडा प्रेमी, कर्तृत्ववान, विकासाभिमुख व सर्वसामान्यांचा हक्काचा आधार असलेला नेता गमावला आहे. अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्याकरिता खो-खो परिवारातर्फे रविवार, ८ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता नु. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, आप्पा बळवंत चौकाजवळ, बाजीराव रोड, पुणे येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेस खो-खो परिवारातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पंच, पुरस्कार्थी, क्रीडा संघटक, खो-खो प्रेमी व सर्व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी केले आहे.

श्री माँ विद्यालयात आंतरशालेय चित्रकला व पोस्टर पेंटींग्ज स्पर्धा संपन्न

श्री माँ विद्यालयात आंतरशालेय चित्रकला व पोस्टर पेंटींग्ज स्पर्धा संपन्न ठाणे : श्री माँ विद्यालय, ऑफ घोडबंदर रोड, पातलीपाडा, ठाणे (पश्चिम) येथील श्री माँ स्टेडिअमच्या भव्य प्रांगणात एकविसावी आंतरशालेय चित्रकला व पोस्टर पेंटींग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ठाणे परीसरातील बहुसंख्य विद्यालयांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली होती. या स्पर्धेत नामांकित शाळांनी चित्रकलेतील निपुण विद्यार्थी स्पर्धेसाठी पाठविले होते. चित्रकला स्पर्धेत विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी रंगी-बेरंगी चित्र चितारुन आपले कौशल्य प्रकट केले. तसेच सुंदर पोस्टर पेंटिंग सादर केलेत. या स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाना १०००, ८५०, ७०० रोख रक्कमेची बक्षीसे आणि ३०० रु. ची प्रोत्साहनात्मक १० बक्षीसे देण्यात आलीत. या स्पर्धेसाठी २२ शाळांमधील जवळ जवळ १४०० मुलांचा सहभाग होता. या कार्यक्रामात श्री माँ ग्रुफ ऑफ इन्स्टिट्यूशनचे चेअरमन श्री बालगोपाल, श्रीमती चित्रा अय्यर, प्रिन्सीपॉल श्रीमती मिनी नायर, श्रीमती मेघना वांगे, श्रीमती रमा अनंतरामन तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.