Author: bittambatami.com

ठाणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करावे- केंद्रीय निवडणूक निरीक्षक

ठाणे : देशात लोकसभा निवडणुकांचा उत्सव सुरू असून पाचव्या टप्यातील मतदान प्रक्रिया येत्या 20 मे रोजी होत आहेत. ठाणे जिल्ह्यातील 23-भिवंडी, 24- कल्याण आणि 25 – ठाणे या लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करायचे असून ही निवडणूक प्रक्रिया ही शांततेत व नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी आपल्यावर सोपविण्यात आलेले काम हे गांभीर्यपूर्वक करावे, असे निर्देश भिवंडी, कल्याण, ठाणे या मतदारसंघात दाखल झालेल्या सर्व निवडणूक निरीक्षकांनी तीनही लोकसभा क्षेत्रातील निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी तसेच पोलीस यंत्रणांना काल झालेल्या बैठकीत दिले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी श्री. अशोक  शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन भवनातील समिती सभागृहात आयोजित बैठकीत निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने काल निवडणूक निरीक्षकांनी आढावा घेतला. या बैठकीस 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठीचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) जे.श्यामला राव (आयएएस), खर्च निरीक्षक श्री.चंद्र प्रकाश मीना (आयआरएस) , 24 कल्याण लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) मनोज जैन (आयएएस), खर्च निरीक्षक श्री. नकुल अग्रवाल (आयआरएस) आणि पोलीस निरीक्षक कु. इलाक्किया करुणागरन (आयपीएस) , आणि 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री.राजनवीर सिंग कपूर (आयएएस), खर्च निरीक्षक श्री.चित्तरंजन धंगडा माझी  (आयआरएस) आणि पोलीस निरीक्षक के. जयरामन (आयपीएस) उपस्थित होते.‍ तसेच तीनही लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी श्री. शिनगारे यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघांची माहिती उपस्थित निरीक्षकांना दिली. तसेच  भिवंडी, कल्याण, ठाणे या मतदारसंघातील निवडणुकांसाठी राबविण्यात येणारी मतदान प्रक्रिया व त्यासाठी लागणारी यंत्रणा यांची माहिती सर्व निरीक्षकांना दिली. नि:पक्षपातीपणे, शांततेत व भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करुन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपापसात उत्तम समन्वय साधावा. त्यासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचा बारकाईने अभ्यास करावा, असे निर्देश ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री. राव यांनी यावेळी दिले. 23 भिवंडी, 24 कल्याण, 25 ठाणे या लोकसभा मतदारसंघात संवेदनशील असलेल्या मतदार केंद्रांवर लक्ष केंद्रीत करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही, याची आचारसंहिता कक्षाने गांभीर्याने काळजी घ्यावी. मतदारसंघात पुरेशा प्रमाणात व्हिडिओ रेकॉर्डिंग टीम असतील व ते संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवतील, यासाठी सूक्ष्म निरीक्षकांनी दक्ष राहावे. व्हिडिओ सर्व्हेलन्स टीमने स्टार कॅम्पेनअरचे संपूर्ण भाषण रेकॉर्ड करून ठेवावे. तसेच रॅली, प्रचारामध्ये विहीत परवानगी घेतलेली वाहनेच असतील. विनापरवाने वाहने आढळल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही श्री. राव यांनी यावेळी दिले. पेड न्यूजचे प्रकार घडू नयेत यासाठी दररोजची वर्तमानपत्रे, टिव्ही चॅनेल, सोशल मीडिया, आकाशवाणी केंद्र याद्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवावे,असेही त्यांनी नमूद केले. तसेच आतापर्यत पेडन्यूजचे प्रकार घडले आहेत का याबद्दलची माहिती त्यांनी जाणून घेतली. लोकसभा निवडणूक 2024 साठी निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकांकडून होणाऱ्या मोठ्या व्यवहारांसाठी देण्यात आलेल्या क्यू-आर कोडच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत केलेल्या कारवाईची माहिती घेतली. तसेच सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींची माहिती घेवून कशा पध्दतीने कारवाई केली जात आहे, याबाबतही निरीक्षकांनी जाणून घेतले. रेल्वेच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कॅशची ने-आण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नमूद करीत ठाणे रेल्वे स्टेशनवर पोलीस विभागाच्या माध्यमातून आरपीएफची नेमणूक करण्याच्या सूचना खर्च निरीक्षक श्री. नकुल अग्रवाल यांनी या बैठकीत दिल्या. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष यांना त्या दिवशी सकाळपासून कोणकोणत्या गोष्टी करावयाच्या आहेत उदा. मतदान सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत भरण्यात येणारे फॉर्म, त्यासाठीची प्रक्रिया, मॉक पोलिंग आदी कामाची चेकलिस्ट करुन ती सर्व मतदान केंद्रावर देता येईल का ते पाहावे. जेणेकरुन मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना काम करणे सोपे जाईल. तसेच मनुष्यबळ व साहित्याची वाहतूक करण्यासाठी सूक्ष्म आराखडा तयार करण्याच्या सूचनाही सर्वसाधारण निरीक्षक श्री. जैन यांनी यावेळी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिल्या. 20 मे 2024 ही मतदानाची तारीख आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेता मतदान केंद्रावर पाणी, सरबत आदींची सोय होईल हे पाहावे. तसेच पाऊस पडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, यासाठी ज्या ठिकाणी मंडप टाकून मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे त्या ठिकाणी पावसाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात सुविधा मिळतील, यासाठीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याच्या सूचना श्री. जैन यांनी यावेळी दिल्या. मतदान प्रक्रिया हे टीमवर्क आहे. शेवटच्या टप्प्यातील ठाणे जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया ही यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री.के.जयरामन, कु.करुणागरन, श्री.मीना यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. बैठकीच्या शेवटी एकत्रित मीडिया कक्ष व माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी उपस्थित केंद्रीय निवडणूक निरीक्षक आणि उपस्थित नोडल अधिकाऱ्यांचे आभार मानले.

डोंबिवलीत उबाठा गटाला पुन्हा एकदा झटका!

उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश! ठाणे : कल्याण लोकसभेत उबाठा गटाला पुन्हा एकदा झटका बसला आहे. उबाठा गटाचे कल्याण ग्रामीणमधील उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आठवडाभरात उबाठा गटाला कल्याण डोंबिवलीत दुसरा मोठा झटका बसला आहे. यापूर्वी उबाठा गटाचे शहरप्रमुख विवेक खामकर, महिला जिल्हा संघटक कविता गावंड यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे हे उबाठा गटात सक्रिय होते. त्यांच्यासह केशव पाटील, शाखाप्रमुख परेश पाटील, उमेश सुर्वे, अशोक पाटील, विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आपल्याला विश्वासात घेतले गेले नाही, आणि आपला भ्रमनिरास झाल्याची खंत यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या १० वर्षात कल्याण लोकसभेत विकासाची गंगा आणली असून आपण आता विकासापासून अलिप्त राहू शकत नसल्याचे ते म्हणाले. शिवसेनेत ४० वर्ष काम करूनही मला मातोश्रीवर कुणी ओळखत नाही. बाळासाहेब हयात होते, तोपर्यंत आमची श्रद्धा होती, पण आता आमची मातोश्री ठाणेच आहे, अशी भावना यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली. तर या सर्वांना उबाठा गटात मिळालेली वागणूक या सर्वाला कारणीभूत असून दुसरीकडे राज्य सरकार आणि शिवसेना यांचे काम उत्तम सुरू आहे. विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे एका विश्वासाने लोक शिवसेनेत येत असल्याची प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवलीचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक योगेश म्हात्रे, बंडू पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

माथेरान मध्ये लवकरच आकर्षक श्री विठ्ठल रखुमाई मंदिर साकारणार

माथेरान : माथेरान मधील पंचवटी नगर भागातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या नूतनिकरणाचे काम मार्गी लावण्यासाठी कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या येथील राकेश कोकळे यांच्या प्रयत्नामुळे आकर्षक असे श्री. विठ्ठल रखुमाई मंदीराचे काम मार्गी लागणार आहे. मावळ मतदार संघाचे संसदरत्न खासदार तथा लोकसभा निवडणुकीत हट्रिक करण्यासाठी सज्ज असलेले उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांनी दि.३ रोजी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माथेरानला धावती भेट दिली होती त्यावेळी त्यांनी आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांसह दुसऱ्या दिवशी राकेश कोकळे यांच्या विनंतीला मान देऊन  पंचवटी नगरातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरास आवर्जून भेट दिली. याचवेळी या दोन्ही मान्यवरांनी स्व. संतोष पवार यांच्या मातोश्री सुशीला धोंडू पवार यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या निवासस्थानी जाऊन पवार कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, पंचवटी मित्र मंडळ अध्यक्ष गणेश बिरामणे,संजय घरत,किरण पेमारे आदी उपस्थित होते.

मुंबईतला पहिला रोपवे मुलुंड ते एसजीएनपी होणार

पर्यटनमंत्र्यांनी विभागाला तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सूचना SGNP ला धक्का न लावता रोपवे बांधला जाईल आणि नवीन पर्यटन स्थळ विकसित केले जाईल – कोटेचा मुंबई: लवकरच, मुंबईला एक नवीन पर्यटन स्थळ मिळणार असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जुन्या तीन मूर्ती मंदिरासाठी रोपवे (केबल कार) बांधण्यात येणार आहे. तसेच त्याच्या निसर्गरम्य सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी एक पर्यटन केंद्र विकसित केले जाणार आहे. मुलुंडचे आमदार आणि मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी तशी मागणी केली असून, सरकारने पर्यटन विभागाला त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितला आहे. कोटेचा यांनी पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना लिहिलेल्या पत्रात मी प्रतिनिधित्व करीत असलेल्या मुलुंड विधानसभा क्षेत्रालगत च्या संजय गांधी राष्ट्रीय उद्याना जवळच्या तीन मूर्ती मंदिरकरिता रोप वे ची सुविधा व पर्यटन क्षेत्र निर्माण करण्यासाठी निधीची तरतूद करण्याबाबत मागणी केली आहे. पत्रामध्ये कोटीचा यांनी असे म्हटले आहे की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतील संरक्षित क्षेत्र असून त्याची व्याप्ती साधारण 87 कीमी परिघात आहे. याच राष्ट्रीय उ‌द्यानाची पूर्वेकडील सीमा माझ्या मुलुंड मतदारसंघाला लागून आहे. मुलुंड मधील नागरीकांना आपल्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत त्यामुळे मी मुलुंडकर नागरिकांच्या वतीने ही मागणी आपणांकडे करीत आहे. संजय गांधी उ‌द्यानाच्या च्या हद्दीत सुंदर असे डोंगर असून या डोंगर माथ्यावर फार जुने तीन मूर्ती मंदीर आहे या मंदिरात भाविकांना सहज रित्या येता यावे म्हणून तिथे रोप वे व्यवस्था तसेच पर्यटकांना viewing gallery केल्यास भाविकांची व पर्यटकां ची संख्या वाढेल. या सुविधा मुळे शासनास महसूल ही मिळेल. माझ्या ह्या मागणीचा सकारात्मक विचार करून या करीता निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली आहे. कोटेचा यांच्या पत्रानंतर महाजन यांनी पर्यटन विभागाला लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्यास करण्याचे आदेश दिले. एप्रिलमध्ये पर्यटन विभागाने प्रस्ताव तयार करण्यासाठी संचालक, पर्यटन विभागाकडून सविस्तर अहवाल मागवला होता.…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात शिष्यवृत्ती धारकांचे सादरीकरण

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गायन, वादन आणि  नृत्य, यांच्या प्रगत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या जातात; आणि या  विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या अवलोकनासाठी दरवर्षी त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचा कार्यक्रम शनिवार दिनांक ११ मे आणि रविवार दिनांक १२ मे रोजी सकाळी १० वाजता आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. यात सहभागी होणाऱ्या गायकांना केंद्राचे शिष्यवृत्तीधारक निनाद कुणकवळेकर तबल्याची साथ करणार असून हार्मोनियमची साथ ओमकार अग्निहोत्री यांची असेल. शनिवार दिनांक ११ मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमात समृद्धी शिंदे – भरतनाट्यम नृत्य ( गुरु – स्नेहल फाटक- कळमकर), कनिष्का पोवळे – गायन (गुरु – प्रतिमा टिळक), सिद्धी शितूत – गायन (गुरु- वरदा गोडबोले), आसावरी गोंधळी – गायन (गुरु – पं. अरुण कशाळकर) हे आपली कला सादर करतील तर रविवार दिनांक १२ मे रोजी सकाळी १० वाजता सावनी पारेकर ( गुरु – पल्लवी जोशी), अदिश्री पोटे (गुरु – पल्लवी पोटे), प्राजक्ता शेंद्रे (गुरु – पल्लवी जोशी), सावनी गोगटे (गुरु पं. शुभदा पराडकर) यांच्या गायनाचे सादरीकरण होईल. सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी मोठ्या संख्येने हजर राहून सर्व युवा कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

मद्यविक्रीचा बंदीचा आदेश मतदान काळ आणि मतदारसंघापुरता मर्यादित

उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती मुंबई : मद्यविक्रीचा बंदीचा आदेश मतदान काळ आणि मतदारसंघापुरता मर्यादित असल्याचे उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. तसेच, याबाबत रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात सुधारणा केली आहे. रायगड जिल्ह्यात रायगड आणि मावळ हे दोनच लोकसभा मतदारसंघ असून दोन्हींसाठी अनक्रमे ७ व १३ मे रोजी मतदान होणार आहे. ही बाब लक्षात घेता कायद्याने दोन्ही मतदारसंघात केवळ मतदानाच्या ४८ तासांच्या आधी आणि मतदान संपेपर्यंत मद्यविक्रीला बदी घालता येऊ शकते. दोन्ही मतदारसंघात वेगवेगळ्या दिवशी मतदान होणार असल्याने जिल्हाधिकारी संपूर्ण जिल्ह्यासाठी ही अट लागू करू शकत नाहीत, असेही न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या याचिकेवर निर्णय देताना खंडपीठाने उपरोक्त आदेश दिले. मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत आणि उरण या विधानसभा मतदारसंघाचा, तर रायगड लोकसभा मतदारसंघात पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. परंतु, लोकप्रतिनिधी कायद्याच्या संबंधित कलमाला बगल देऊन रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात मतदान काळात मद्यविक्रीवर बंदी घालणारा आदेश काढला आहे. औरंगाबाद खंडपीठाने यासंदर्भात दिलेल्या आदेशाचा दाखला याचिकाकर्त्यांनी आदेशात सुधारणा करण्याची मागणी करताना दिला होता. दुसरीकडे, लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १४२ नुसार जिल्हाधिकाऱ्यांना मद्यविक्रीवर बंदी घालण्याचे अधिकार असून त्यात हस्तक्षेप करता येऊ शकत नाही, असा दावा सरकारी वकिलांनी याचिकाकर्त्यांच्या याचिकेला विरोध करताना केला. तथापि, कायद्यानुसार बंदीचा आदेश हा केवळ मतदान क्षेत्रापुरता मर्यादित असून त्यापलीकडे तो लागू केला जाऊ शकत नाही. त्यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांना मद्यविक्री बंदीचे आदेश लागू करण्याचा अधिकार असला तरी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या अधिकाराला मर्यादा आहेत, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देताना नमूद केले. शिवाय, मद्यविक्री बंदीचा आदेश हा केवळ मतदान काळापुरता मर्यादित असून त्यानंतर तो लागू होऊ शकत नाही, या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. तसेच, रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी लागू केलेल्या मद्यविक्रीच्या आदेशात सुधारणा केली. न्यायालयाच्या सुधारित आदेशानुसार, रायगड लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश हा ४ मे रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ७ मे रोजी मतदान पूर्ण होईपर्यंत लागू असेल. त्यानंतर, ४ जून रोजी हा आदेश पुन्हा लागू होईल आणि तो निकाल जाहीर होईपर्यंत कायम राहील. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मद्यविक्री बंदीचा आदेश ११ मे रोजी सायंकाळी ५ वाजता लागू होऊन १३ मे रोजी मतदान पूर्ण होईपर्यंत कायम राहील. त्यानंतर, ४ जून रोजी हा आदेश पुन्हा लागू होईल आणि तो निकाल जाहीरपर्यंत कायम राहील.

पनवेल ते मडगाव, सावंतवाडी विशेष रेल्वेगाड्या धावणार

मुंबई : उन्हाळी हंगामात, सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०११५८ मडगाव ते पनवेल विशेष रेल्वेगाडी ६ मे रोजी सकाळी ६ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी पनवेल येथे सायंकाळी ६.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५७ पनवेल – मडगाव विशेष रेल्वेगाडी पनवेल येथून ८ मे रोजी पहाटे ४ वाजता निघेल. ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. या गाडीला करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलावडे, अडावली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा येथे थांबा आहे. या रेल्वेगाडीला २० एलएचबी डबे असून त्यातील १० शयनयान, ८ सामान्य आणि दोन एसएलआर डबे असतील. गाडी क्रमांक ०११५९ पनवेल – सावंतवाडी रोड विशेष रेल्वेगाडी ६ मे रोजी रात्री ८ वाजता पनवेल येथून निघेल. दुसऱ्या दिवशी ती गाडी सावंतवाडी रोडला सकाळी ६ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११६० सावंतवाडी रोड – पनवेल विशेष गाडी ७ मे रोजी दुपारी ४ वाजता सावंतवाडी रोडवरून निघेल. दुसऱ्या दिवशी ही गाडी रात्री ३ वाजता पनवेलला पोहोचेल. या रेल्वेगाडीला रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबा असेल. या गाडीला २० एलएचबी डबे असून यामधील १० शयनयान, ८ सामान्य आणि दोन एसएलआर डबे असतील, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. शिमगा म्हणजेच होळीच्या आधीपासून कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची गर्दी वाढू लागते. त्यामुळे या कालावधीत विशेष गाड्या सोडल्या जातात. त्यानुसार यंदाही मार्चपासूनच कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या मार्गावर ६ जूनपर्यंत विशेष गाड्या धावतील. कोकण रेल्वे मार्गावर ब्लॉक दरम्यान, विशेष गाड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार असला तरी प्रवासाचा कालावधी वाढणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी, मंगळवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळावर परिणाम होणार आहे. ब्लॉकमुळे रेल्वेगाड्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.

कपिल पाटील यांचा वकिलांबरोबर संवाद

बारावे व गौरीपाड्यातील नागरिकांची भेट कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी कल्याणमधील वकिलांबरोबर शनिवारी संवाद साधला. तसेच बारावे व गौरीपाड्यातील स्थानिक महिलांसह नागरिकांची भेट घेऊन चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात कल्याणबरोबरच देशभरात केलेल्या निवडक कार्याची माहिती देऊन, विकसित भारत घडविण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचे आवाहन केले. कल्याण शहरातील बारावे व गौरीपाडा परिसराचा कपिल पाटील यांनी काल दौरा केला. तत्पूर्वी कल्याणमधील अॅडव्होकेट्स वेल्फेअर फोरमच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वकिलांबरोबर संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात झालेल्या विकासकार्याबरोबरच कायदा क्षेत्राविषयी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. तसेच सलग तिसऱ्यांदा मोदींना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. या वेळी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार, शहराध्यक्ष वरुण पाटील, कल्याण बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रकाश जगताप, सतीश अत्रे, शिल्पा राम, अर्चना सबनीस, भाजपाच्या पदाधिकारी वैशाली पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. गौरीपाडा येथील जय हनुमान मंदिरात कपिल पाटील यांनी दर्शन घेतले. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून स्मार्ट सिटी योजनेतून राबविलेल्या सिटी पार्क व पार्किंग प्लाझासह विविध कामांची माहिती दिली. या वेळी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक अर्जुन म्हात्रे, भगवान म्हात्रे, रघुनाथ म्हात्रे, लक्ष्मण म्हात्रे आदींची उपस्थिती होती. गौरीपाड्यापाठोपाठ बारावे येथील भगवान शिवमंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर या भागातील स्थानिक नागरिकांबरोबर संवाद साधला. चौकट कपिल पाटील यांच्याकडून चणे-शेंगदाण्याचा आस्वाद लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिमच्या दौऱ्यावर आलेल्या महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी शनिवारी सायंकाळी बाजारपेठेत फिरताना गरमागरम चणे-शेंगदाण्याचा आस्वाद घेतला.

गद्दारांना गाढण्यासाठी सांगवीमध्ये धडाडणार महाविकास आघाडीच्या तोफा

८ मे रोजी महाविकास आघाडीची महासभा ठाकरे आणि शरदचंद्र पवार अशा दोन दिगजांच्या होणाऱ्या घणाघातामुळे महायुतीमध्ये अस्वस्थता राज भंडारी पनवेल : एका जगविख्यात विचारवंताने एक अजरामर वाक्य लिहून ठेवले आहे.”तुम्ही एखाद्याची मालमत्ता चोरू शकता पण त्याचे मालमत्ता कमावण्याचे हुनर तुम्हाला कदापिही चोरता येत नाही”. हे वाक्य महायुतीमधील महाचोरांना चपखल बसते. असाच घणाघात ८ मे रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर ऐकायला मिळणार आहे. ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची महासभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष चोरून,बाळासाहेब ठाकरेंचे नाव चोरून आणि पारंपारिक निशाणीवर दावा सांगून गद्दारी केलेल्यांना त्यांची योग्य जागा दाखविण्यासाठी महाविकास आघाडीने संजोग वाघेरे पाटील यांच्या स्वरूपामध्ये एक प्रामाणिक, सजग आणि जनमानसातील प्रश्नांची जाण असणारे उमदे उमेदवार दिले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक ८ मे रोजी सायंकाळी सहा वाजता महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, सी पी आय (एम),आर पी आय (ए), स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पार्टी, स्वराज इंडिया असे महाविकास आघाडी मधील घटक पक्षांचे नेते या महासभेमध्ये आपले विचार मांडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा विधान परिषद सदस्य आमदार जयंत भाई पाटील, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह, आर पी आय ( ए) चे दीपक भाऊ निकाळजे या वक्त्यांचे  विचारवैभव उपस्थित श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांना जनमानसातून मिळणारा पाठिंबा राज्यभरात चर्चेचा विषय ठरतो आहे. वयाची ८० उलटून देखील असाध्य व्याधींना नामोहरम करत संघर्ष योद्धा आधारवड शरद पवार साहेब अक्षरशः पायाला भिंगरी लावून महाविकास आघाडीचा प्रचार करत आहेत. भाई जयंत पाटील यांचे आक्रमक भाषण नेहमीच विरोधकांच्या उरात धडकी भरवत असते. पृथ्वीराज चव्हाण यांचे अनुभवी प्रगल्भ आणि मुद्देसूद भाषणाला विरोधकांच्या कडून एक टक्का देखील प्रत्युत्तर होत नाही. संजय सिंह आणि दीपक भाऊ निकाळजे यांची सडेतोड भाषणे महायुतीच्या पायाखालची वाळू सरकवत आहे. त्यामुळे नागरिकांना देखील आठ मे रोजी महाविकास आघाडीच्या धडाडणाऱ्या तोफांचे आवाज ऐकण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने तमाम नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पावसाळापूर्व कामे  वेळेत पूर्ण करण्याचे नमुंमपा आयुक्त शिंदे यांचे आढावा बैठकीत निर्देश

नवी मुंबई :नवी मुंबई शहरातील सर्व प्राधिकरणांमध्ये परस्पर समन्वय रहावा व पावसाळी कालावधीत कोणतीही अडचण उद्भवल्यास त्याचे तत्परतेने निराकरण व्हावे यादृष्टीने महापालिका आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.कैलास शिंदे यांनी यापूर्वी सर्व प्राधिकरणांच्या संयुक्त बैठकीत सूचित केल्याप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत केल्या जाणा-या पावसाळापूर्व कामांचा विभागनिहाय व सुविधानिहाय आढावा विशेष बैठकीत घेतला. यामध्ये त्यांनी महापालिका क्षेत्रातील सुरु असलेल्या कामांची सद्यस्थिती शहर अभियंता तसेच आठही विभागांचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून विभागवार जाणून घेतली. सुरु असलेली कामे 15 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पावसाळा कालावधी लवकर सुरु होणार असून पावसाचे दिवस कमी असतील मात्र तीव्रता अधिक असेल हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने तयारीत रहावे असे आयुक्तांनी सूचित केले. बेलापूर ते दिघा अशा आठही विभागात सुरु असलेल्या रस्ते, चौक आदी कामांची सदयस्थिती जाणून घेतानाच होल्डिंग पाँड व त्यावरील फ्लॅप गेट बसविण्याची कामेही तातडीने पूर्ण करुन घ्यावीत असे आयुक्तांनी निर्देश दिले. गटारांची सफाई करताना काढला जाणारा गाळ हा दोन ते तीन दिवसांतच उचलण्याची कार्यवाही काटेकोरपणे केली जावी असेही आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले. काही ठिकाणी बंद गटारांवरील झाकणे तुटली असल्यास ती तत्परतेने बदलावीत तसेच झाकणांच्या अधिकच्या चाव्या बनवून घ्याव्यात असेही सूचित करण्यात आले. मोठे नाले सफाईची कामे सुरु झाली असून त्या कामांना वेग दयावा आणि ती लवकरात लवकर विहित वेळेत पूर्ण होतील याकडे कटाक्षाने लक्ष दयावे असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. या नाल्यांच्या प्रवाह क्षेत्रात कोणताही अडथळा राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्याचे सूचित करतानाच काही ठिकाणी नाल्यांच्या प्रवाह क्षेत्रात झोपडया असल्यास त्या हटविण्याची कार्यवाही करावी असेही निेर्देश देण्यात आले. आठही विभागांचे सहा.आयुक्त तसेच स्वच्छता अधिकारी यांनी या बाबीकडे काळजीपूर्वक लक्ष दयावे असे आयुक्तांनी सूचित केले. विभागवार सुरु असलेल्या पावसाळापूर्व कामांची सदयस्थिती काम निहाय लेखी स्वरुपात घेण्यात यावी तसेच 15 मे आणि 30 मे लाही त्या त्या वेळची स्थिती लेखी स्वरुपात आठही कार्यकारी अभियंत्यांकडून संकलित करावी व एकत्रित स्वरुपात सादर करावी असे निर्देश आयुक्तांनी शहर अभियंता यांना दिले. मोठया उधाण भरतीची वेळीच अतिवृष्टी झाल्यास शहरात काही ठिकाणी पाणी साचते अशा संभाव्य ठिकाणी पाणी उपसा पंपांची व जनरेटरची पुरेशा संख्येने व्यवस्था करुन ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणी झोपडया असल्यास त्या स्थलांतरित कराव्यात असेही सूचित करण्यात आले. या कालावधीत पिण्याचे पाणी शुध्द राहील याची विशेष दक्षता घेण्यात यावी तसेच पाणीपुरवठा व मलनि:स्सारण व्यवस्था सुस्थितीत कार्यान्वित राहील याचीही काळजी घेण्याचे आयुक्तांनी सूचित केले. सोसायटयांच्या कुंपण भिंती पडून दूर्घटना होऊ नये याची पूर्वदक्षता घेऊन तशा प्रकारच्या धोकादायक कुंपण भिंती आढळल्यास त्या दुरुस्त करुन घेण्याच्या सूचना विभाग कार्यालयामार्फत सोसायटींना दयाव्यात असेही सूचित करण्यात आले. सायन-पनवेल हायवेवरील सबवे तसेच रेल्वे स्टेशन नजिकचे सबवे यांची स्वच्छता करुन घ्यावी व त्या ठिकाणी विदयुत व्यवस्था व सीसीटीव्ही व्यवस्था राहील याकडे लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. पावसाळा कालावधीत रस्त्यावरील दिवाबत्ती तसेच सिग्नल यंत्रणा सुस्थितीत राहील याची काळजी घेण्याच्या विदयुत विभागास सूचना देण्यात आल्या. शहरात बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी अपघात प्रतिबंधक सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत याची खात्री करुन घ्यावी तसेच महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींची यादी घोषित करावी असेही आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले. अतिधोकादायक इमारतींच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक लावण्यात आलेले आहेत याची खात्री करुन घ्यावी तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये यादृष्टीने सदर इमारती रिक्त करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. पावसाळी कालावधीत साथीचे रोग उद्भवू नयेत यादृष्टीने प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात तसेच आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करुन ठेवण्यात यावा अशा सूचना देण्यासोबतच नमुंमपा रुग्णालयांमध्ये साथरोग वॉर्ड कार्यान्वित करण्याचेही निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले. उदयान विभागामार्फत होणाऱ्या वृक्षछाटणीमध्ये धोकादायक व अडथळा आणणाऱ्याच फांदयांची छाटणी केली जावी तसेच छाटणीनंतर होणारा हरित कचरा उचलून नेण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाशी समन्वय राखून विनाविलंब कार्यवाही करावी असेही सूचित करण्यात आले. अग्निशमन दलाने उपलब्ध यंत्रसामग्रीची तपासणी करून घ्यावी तसेच मदतकार्याची सज्जता करून ठेवावी अशा सूचना देण्यात आल्या. पावसाळी कालावधीत मदतकार्य करण्यासाठी तत्पर असणारे विभाग कार्यालये व अग्निशमन केंद्र येथील आपत्कालीन नियंत्रण कक्ष 24×7 कार्यरत राहतील याचे नियोजन करावे व त्याठिकाणी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री उपलब्ध करुन ठेवावी असे निर्देश देण्यात आले. तसेच आठही विभाग कार्यालय स्तरावर आपत्ती काळात अडचणीच्या प्रसंगी नागरिकांनी स्थलांतरित करावे लागल्यास तात्पुरत्या निवा-याच्या जागा निश्चित करुन ठेवून तेथे अन्नपदार्थांसह गरजेच्या वस्तू उपलब्ध राहतील याचे आत्तापासूनच नियोजन करुन ठेवावे अशाही सूचना देण्यात आल्या. पावसाळापूर्व नालेसफाई व गटारे सफाई या कामांना गती दयावी तसेच सुविधा कामांसाठी झालेले खोदकाम 15 मे पर्यंत पूर्ववत करुन घ्यावे असे सूचित करतानाच नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व विभागांनी आपापली जबाबदारी सुयोग्य रितीने पार पाडावी व सुसज्ज राहावे असे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी विविध विभागांनी करावयाच्या कामांचा बाबनिहाय आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. शिरिष आरदवाड, शहर अभियंता श्री. संजय देसाई, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त्‍ श्री. चंद्रकांत तायडे व इतर विभागप्रमुख तसेच आठही विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.