Author: bittambatami.com

मुंबईत टॅक्सी चालकाकडून तरुणीची हत्या

किरीट सोमय्यांनी केला ‘लव्ह जिहाद’चा आरोप मुंबई : प्रेयसीचं दुसऱ्या व्यक्तीबरोबर अफेअर असल्याच्या संशयावरून एका टॅक्सी ड्रायव्हरने घरकाम करणाऱ्या तरुणीची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत नाल्यात फेकून दिले. याप्रकरणी आरोपी नजिम खान याला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय पूनम क्षीरसागर हिचा मृतदेह २५ एप्रिल रोजी रायगड जिल्ह्यातील उरण येथे सापडला. ती मानखुर्द येथे राहत होती. तसंच, नागपाड्यात ती घरकामासाठी जात होती. १८ एप्रिल रोजी सकाळी ती तिच्या कामासाठी घरातून निघाली, परंतु सायंकाळी घरी परतलीच नाही. नेहमीच्या वेळेत घरी न परतल्याने तिच्या कुटुंबाने तिच्या मालकांना फोन करून याबाबत विचारले असता ती सायंकाळीच निघून गेली असल्याचं कळलं. तिचा काहीच शोध लागत नसल्याने पालकांनी मानखूर्द पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. २५ एप्रिल रोजी उरणच्या एका निर्जन ठिकाणी एक कुजलेला मृतदेह पोलिसांना सापडला. पोत्यात बांधून ठेवलेला हा मृतदेह पूर्णपणे कुजला होता. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आणि ओळख पटवण्यासाठी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान, मानखुर्द पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंद झाल्याने मानखुर्द पोलिसांनी पूनमच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून मृतदेह ओळखण्यास सांगितले. मृतदेहाच्या हातातील ब्रेसलेट आणि तिच्या कपड्यांवरून तिची ओळख पटवण्यात आली. शवविच्छेदनात पूनमचा गळा दाबून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तपासादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना आढळून आले की नागपाडा येथील निजाम खान हा पूनमला मानखुर्द येथून दररोज नागपाडा येथे सोडत असे. निजामने पोलिसांना सांगितले की, “१८ एप्रिल रोजी तिची शिफ्ट संपल्यानंतर मी आणि पूनम खडवली येथे गेलो. तिथे ती बुडाली. त्यामुळे मी तिला सरकारी रुग्णालयात नेले. परंतु तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. पूनमचा मृत्यू झाल्यामुळे मी घाबरलो. त्यामुळे तिचा मृतदेह उरणच्या खाडीत फेकून दिला.” याप्रकरणी उरण पोलिसांनी निजाम खानला ताब्यात घेतलं असून त्याची अधिक चौकशी केली. चौकशीअंती त्यानेच तिचा खून केला असल्याचं कबूल केलं. पूनमचे दुसऱ्याबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून त्याने तिची हत्या केली. किरीट सोमय्यांकडून लव्ह जिहादचा दावा सोमवारी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पूनमच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि ‘लव्ह जिहाद’मुळे तिची हत्या झाल्याचा दावा केला. “मी पूनम क्षीरसागर हिच्या मानखुर्द येथील निवासस्थानी तिच्या कुटुंबासोबत आहे. तिला निजाम खानने पळवून नेले होते. त्याने तिला फसवले आणि नंतर तिची हत्या केली. ही आणखी एक लव्ह जिहादची घटना आहे आणि तिचे कुटुंब न्याय मागत आहे”, असं किरीट सोमय्या म्हणाले. या घटनेबाबत मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याशी बोललो असून जो कोणी जबाबदार असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. वारिस पठाण यांनी दावा फेटाळला दरम्यान, AIMIM नेते वारिस पठाण यांनी किरीट सोमय्या यांचा दावा फेटाळून लावला आहे. “गुन्हा कोणी केला असेल त्याला कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. पण भाजपा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे”, असं ते म्हणाले.

पनवेल महापालिकेची बहुउद्देशीय इमारत प्रगतीपथावर

पनवेल : पनवेल महापालिकेच्या मुख्यालयाची भव्यदिव्य इमारत उभारली जात आहे. नुकताच मुख्यालयाच्या कामाचा आढावा आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी घेतला. या वेळी महापालिकेच्या मुख्यालयाचे काम वेगाने करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. मुख्यालय इमारतीमधील दोन स्वागतकक्ष व पार्किंग येथील दोन पिलर्समधील अंतर जास्त असल्यामुळे या ठिकाणी ग्रीड स्लॅब, वाईडेड स्लॅब, पोस्ट स्टे्रस पद्धतीचे स्लॅब टाकण्यात येत आहेत. इमारतीचे काम ४० टक्के पूर्ण झाले असून एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण होण्याचा विश्‍वास प्रकल्प अभियंता यांनी दिला. याबाबत कंत्राटदाराला सूचना करण्यात आल्या असून त्याबाबत दैनंदिन नियोजन करण्यात आले आहे. या कामाच्या दैनंदिन तांत्रिक बाबींकरिता स्वतंत्र अभियंत्याची नियुक्ती पनवेल महापालिकेने केली आहे. इमारतीचे काम प्रगतिपथावर असल्याचे पाहून आयुक्तांनी समाधान व्यक्त केले आहे. भविष्यात स्थापत्य कलेचे अद्वितीय उदाहरण म्हणून गणली जाणारी महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत पनवेलकरांची अस्मिता ठरणार आहे. त्यामुळे वेगाने कामे पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी उपायुक्त डॉ. वैभव विधाते, कार्यकारी अभियंता संजय काटकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. चार लाख चौरस फुटात बांधकाम तळघरासहीत सहा मजली बांधण्यात येणाऱ्या या इमारतीच्या सध्या तिसऱ्या माळ्याचे काम सुरू आहे. चार लाख आठ हजार ६३ चौरस फूट क्षेत्रामध्ये ही इमारत बांधली जात आहे. इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिल यांच्या प्लॅटिनम रेटिंगची ही ग्रीन इमारत होणार आहे. त्या दृष्टीने या इमारतीची संकल्पना वास्तूविशारद हितेन सेठी यांच्याकडून करून घेण्यात आली आहे. त्याच पद्धतीने या इमारतीच्या बांधकामाचे साहित्य वापरले जात आहे. इमारतीमध्ये २२४ आसन क्षमता असलेले मुख्य सभागृह, एक बहुद्देशीय सभागृह, दोन समिती सभागृहे, टेरेसवर आर्ट गॅलरी उभारण्यात येणार आहे. कोट पालिका मुख्यालयाच्या कामाचा दर्जा सर्वोत्तम राहावा, याकरिता वेळोवेळी व्हीजेटीआय या नामांकित सरकारी महाविद्यालयाच्या विशेष तज्ज्ञांकडून त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण केले जात आहे. या कामाचे स्टील व सिमेंट हे आंतरराष्ट्रीयस्तरावर नावाजलेल्या व दर्जेदार पुरवठा करणाऱ्या कंपनीकडूनच घेणे बंधनकारक केले आहे. – संजय काटकर, प्रकल्प अभियंता, पनवेल महापालिका

‘जनतेच्या प्रगतीचा मोदी पॅटर्न,बाकी सगळे पॅटर्न भंगारात’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डागली विरोधकांवर तोफ लातूर : काँग्रेसने देशात भ्रष्टाचाराचा पॅटर्न सेट केला होता पण गेली दहा वर्ष देशात देशसेवेचा, राष्ट्रभक्तीचा आणि प्रगतीचा मोदी पॅटर्न चालत आहे. बाकी सगळे पॅटर्न भंगारात गेलेत अशी तोफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर डागली. महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी लातूर येथील गरुडा चौक येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लातूरची जनता आतुर दिसत आहे. आग ओकणाऱ्या सूर्याची पर्वा न करता इथे मोठा जनसागर लोटला आहे. काँग्रेसचा पारंपरिक गड दहा वर्षांपूर्वीच लातूरकरांनी उद्धवस्त करून टाकला. महायुतीचा प्रगतीचा नवा पॅटर्न मतदारांनी सेट केला आहे. आता लातूर जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे प्रचंड मताधिक्यांनी विजयी होतील. मेरे शरीर का हर कण मेरे समय का हर क्षण देश को समर्पित है, असे पंतप्रधान आपल्याला सांगतात. ते खरे असून त्याचा आपण दहा वर्षे अनुभव घेतला आहे. २०-२० तास काम करणारे आपले नेतृत्व आहे. त्यांची ऊर्जा ईश्वरी कृपा असून त्यांच्याकडून ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, असे मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेसवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्याकडे व्हिजन आहे. त्यांच्याकडे मतांचे राजकारण आहे. आपल्याकडे देशाच्या विकासाचा रोड मॅप आहे. त्यांच्याकडे रोडवर फिरून देखील लॉन्च न होणारा युवराज आहे. आपल्याकडे समृद्धीची धोरणे आहेत. त्यांच्याकडे न उगवणारे बेरनं आहे, असा टोला लगावला. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी टू जी स्कॅम, स्पेस घोटाळा, कोळसा घोटाळा, नॅशनल हॅराल्ड स्कॅम अशी घोटाळ्यांची मालिका ऐकत होतो. आता केंद्र सरकारच्या योजनांचा बोलबाला ऐकतो आहोत. त्यामुळे खरी गरिबी हटविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे काम सुरु आहे. लातूरला दुष्काळमुक्त करण्यासाठी अनेक सिंचनाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पाण्यासाठी आता जनतेला वणवण फिरावे लागणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. विरोधक संविधान धोक्यात आल्याचे बोलत आहेत. पण पंतप्रधानांनी संविधान कोणीही बदलू शकत नाही, असे सांगितले आहे. जय श्रीराम म्हटल्यावर रावणाच्या सैन्यातील राक्षसांना राग यायचा. तसाच राग आता विरोधकांना येत आहे. तेच लोक आता मुह मे राम बगल मे चुरी घेऊन फिरत आहेत. मतदार त्यांना थारा देणार नाहीत. जो राम का नहीं वो किसी काम नही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अस्थिर सरकारांमुळे देशाचे प्रचंड नुकसान आपल्या देशाने ३० वर्षे अस्थिर सरकारे बघितली आहेत. त्यांच्या काळात झालेली देशाची अधोगती आणि त्यांनी केलेला भ्रष्टाचार बघितला आहे. अस्थिर सरकारांमुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले. परंतु, गेल्या १० वर्षांत या देशाने स्थिर सरकार बघितले आहे. देशाला स्थिर सरकारची गरज आहे. स्थिर सरकार देण्याची ताकद फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनगटात आहे. त्यांचा उद्देश जनतेची आणि देशाची सेवा करण्याचा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले अभिवादन

नवी मुंबई : आधुनिक काळातील महान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहा. आयुक्त जयंत जावडेकर, लेखाधिकारी मारोती राठोड, प्रशासकीय अधिकारी उत्तम खरात आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आपली गावे स्वयंपूर्ण झाली पाहिजेत हा ध्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपला. त्या दृष्टीने ग्रामविकासाचे मर्म सांगणारी ‘ग्रामगीता’ लिहून समृध्दीचा मार्ग सांगितला. अंधश्रध्दा निर्मूलनासाठीही त्यांनी भजन, कीर्तनाचा प्रभावी वापर केला. आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेविषयी समाज प्रबोधन केले. अशा थोर राष्ट्रसंतांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

दुर्वेश पाटीलचे ३२ धावात ५ बळी

कांगा क्रिकेट लीग मुंबई : दुर्वेश  पाटीलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कुर्ला स्पोर्ट्स क्लबने यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशनचा (वायएमसीए) सात विकेट्सनी दणदणीत पराभव करत मुंबई क्रिकेट संघटनेच्या डॉ.एच .डी कांगा क्रिकेट स्पर्धेच्या…

मतदान जनजागृतीसाठी उल्हासनगर महानगरपालिकेचा

पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून अभिनव उपक्रम स्लग- मतदान ओळखपत्र असणाऱ्यांना पुस्तकांवर २० टक्के सवलत उल्हासनगर : यंदाचा १ मे हा महाराष्ट्र दिन उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या १ मेला उल्हासनगर येथील ‘सिंधू भवन’ येथे ‘चला पुस्तकांशी दोस्ती करुया’ या संकल्पनेवर आधारीत भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. हे पुस्तक प्रदर्शन १ ते ३ मे २०२४ रोजी असे तीन दिवस सकाळी १० ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत चालू राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त श्री. अजीज शेख यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपायुक्त किशोर गवस आणि सुभाष जाधव तसेच अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर उपस्थिथ राहणार आहेत. यंदाचे वर्ष हे निवडणुकाचे वर्ष असल्यामुळे मतदारांमध्ये मतदानाच्या संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी नाविन्यपूर्ण अशा या उपक्रमाचे आयोजन या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने करण्यात आले आहे. त्यापैकीच एक म्हणजे या पुस्तक प्रदर्शनास भेट देणाऱ्या वाचकांना १० टक्के सवलत् मिळणारच आहे पण ज्या वाचकांकडे मतदान ओळखपत्र असेल अशा वाचकांना अतिरिक्त १० टक्के म्हणजे एकूण वीस टक्के सवलत पुस्तक खरेदीवर मिळणार आहे, अशी माहिती उल्हासनगर महानगर पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त श्री. अजीज शेख यांनी दिली. इतकेच नाही तर ज्या वाचकांकडे मतदान ओळखपत्र नसेल त्यांना मतदान ओळखपत्र मिळवण्यासाठी जी प्रक्रिया आहे त्याची माहिती देण्यासाठी विशेष कक्ष या पुस्तक प्रदर्शनात असणार आहे. या कक्षात मतदान ओळखपत्राची प्रक्रीया सुरु केल्यास त्या वाचकाला देखील अतिरिक्त दहा टक्के  सवलतीचा लाभ पुस्तक खरेदीवर घेता येणार आहे. त्यासोबतच या पुस्तक प्रदर्शनात मतदार जनजागृतीसाठी एक प्रतिज्ञा वाचकांकडून लिहून घेतली जाणार आहे आणि त्यापैकी एका भाग्यवान विजेत्याला दर दिवशी विशेष पारितोषिक दिले जाणार आहेत. मतदार जनजागृती करीत असतानाच उल्हासनगर महानगरपालिकेतील बालकांचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ही विशेष उपक्रम या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित केला जाणार आहेत असेही आयुक्त शेख यांनी सांगितले. या पुस्तक प्रदर्शनात उल्हासनगर महानगरपालिकेच्या अखत्यारितील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रमात विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा तर सत्कार करण्यात येणारच आहे पण त्या विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या या नैपुण्याला विशेष प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या पालकांचा, त्यांच्या शिक्षकांचा आणि शाळेच्या मुख्याध्यापकांचाही विशेष सत्कार यानिमित्ताने करण्यात येणार आहे. यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळू शकेल अशी यामागील कल्पना आहे त्यासोबत उल्हासनगरमधील रहिवासी असणारे अभिषेक ताले हे नुकतीच प्रतिष्ठेची आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचाही विशेष सत्कार यावेळी आयोजित करण्यात आला आहे. या पुस्तक प्रदर्शनात येणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण व्हावा हा त्यामागील उद्देश. या तीन दिवसीय पुस्तक प्रदर्शनास आपण भेट देऊन पुस्तकांशी दोस्ती करण्याचे आवाहन आयुक्त शेख यांनी केले आहे.

भिवंडीतील तृतीयपंथीय व देहविक्रय करणाऱ्या महिलांनी मतदान करावे-दिपाली मासिरकर

अशोक गायकवाड भिवंडी : २३ भिवंडी लोकसभा मतदारसंघातील तृतीयपंथीय, देह विक्री करणाऱ्या महिला यांची मतदानातील टक्केवारी वाढावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या पथकाने भिवंडीतील अस्मिता फाउंडेशनच्या कार्यालयात उपस्थित तृतीयपंथीय तसेच देहविक्रय करणाऱ्या महिलांची भेट घेऊन सर्वांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या संचालक दिपाली मासिरकर यांनी केले आहे. तृतीयपंथीय मतदार, देहविक्रय करणाऱ्या महिलांमध्ये मतदान जनजागृती होणे आवश्यक आहे, यासंदर्भात निवडणूक आयोग प्रचार व प्रसार करीत आहे. याचाच एक भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाच्या संचालक दिपाली मासिरकर, वरिष्ठ सल्लागार साधना राऊत, आणि कक्ष अधिकारी उदिता कांडपाल, मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र यांच्या कार्यालयातील कार्यक्रम अधिकारी पल्लवी जाधव यांनी भिवंडीतील लाहोटी कंपाऊंड येथील अस्मिता फाउंडेशनच्या कार्यालयात तृतीयपंथीय मतदार, तसेच देह विक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित तृतीयपंथीय, देह विक्री करणाऱ्या महिला मतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मतदान करण्यासाठी आवाहन केले. यावेळी १३७ भिवंडी पूर्व मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमित सानप,१३६ भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे, तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अस्मिता मोहिते, नायब तहसीलदार स्मितल यादव, मनपा उपायुक्त प्रणाली घोंगे, उपायुक्त अजय एडके, भिवंडी महानगरपालिका निवडणूक प्रमुख नितीन पाटील तसेच दोन्ही मतदारसंघाचे स्वीप पथकाचे अधिकारी सदस्य उपस्थित होते.

उल्हासनगर पोलीस लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅक्शन मोडमध्ये

राईड-स्कीमच्या प्रात्यक्षिकांचा थरार उल्हासनगर : लोकसभा निवडणुकांच्या वेळी राजकीय पक्ष्यांमध्ये बॅनर फाडण्यावरून तसेच अनेक कारणांवरून वाद होत असतात.अशाप्रसंगी पोलिसांची तत्परता आणि रिस्पॉन्स टाइम तपासण्यासाठी उल्हासनगरातील पोलीस हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी राईड-स्कीमच्या प्रत्यक्षिकांचा थरार सादर करून आम्ही सज्ज असल्याचा मॅसेज दिला. कल्याण लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही 20 रोजी होणार असून आज महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.येत्या काही दिवसात विविध राजकीय पक्षाचे उमेदवार त्यांचे उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरवात झाल्यावर बॅनर्स-पोस्टर्स-कट आऊट्स झळकणार आहेत.अशावेळी बॅनर फाडण्यावरून तसेच अनेक कारणांवरून वाद आणि दंगे होत असतात.त्यामुळे पोलिसांची तत्परता आणि रिस्पॉन्स टाइम तपासण्यासाठी पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे,सहायक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे,विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी राईड स्कीम प्रत्यक्षिकांच्या थराराचे आयोजन 17 सेक्शन वरील महामार्गावर केले होते. या राइड स्कीम मध्ये एस.आर.पी.एफ ची तुकडी,झोन फोर स्ट्राइकिंग,मध्यवर्ती पोलीस आणि विठ्ठलवाडी पोलीस सहभागी झाले होते.यावेळी दंगल नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतात याबाबत ट्रेनिंग देण्यात आले.

‘रामसेतू’ मोहिमेसाठी जलतरणपटू सज्ज

ठाणे : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून ठाण्यातील तरुण जलतरणपटू ३ आणि ४ मे रोजी ‘रामसेतू’ तलाईमन्नार (श्रीलंका) आणि धनुष्कोडी (भारत) हे २१ किलोमीटरचे अंतर रिले पद्धतीने पोहून पार करणार आहेत. अयोध्येतील भगवान रामाला त्यांच्या कर्मस्थानी मानवंदना देण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोहीम ठाण्यातील पहिली आंतरराष्ट्रीय जलतरण मोहीम आहे. यामध्ये अर्णव पाटील, अभीर साळसकर, स्वरा हंजनकर, वंशिका अय्यर, रुद्र शिराळी, शार्दुल सोनटक्के, अथर्व पवार, अपूर्व पवार, साविओला मस्कारेन्हस, स्वरा सावंत, लौकिक पेडणेकर, मीत गुप्ते असे १२ तरुण जलतरणपटू ‘पाल्क स्ट्रेट’ ओलांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी संपूर्ण टीमने घंटाळी मंदिरात घंटाळी देवी आणि प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घेतले. प्रभू रामचंद्रांना पवमान अभिषेक करून घंटाळी मंदिराचे पुजारी ओंकार चिक्षे गुरुजी यांनी मंत्रोच्चारासह आशीर्वाद दिले. यावेळी जलतरणपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी विनय सहस्रबुद्धे, मृणाल पेंडसे, विकास घांग्रेकर, अश्विनी बापट, वरदराज बापट, अमोल फडके, क्षमा पातकर, मंगेश ओक, रामचंद्र चिवकुल याचबरोबर मुख्य प्रशिक्षक नरेंद्र पवार, प्रशिक्षक भारती सावंत, तसेच माजी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आरती प्रधान व अनेक मान्यवर उपस्थित होते.

कळव्यात वाहतुकोंडीमुळे वाहनांच्या रांगा

कळवा : मुंब्रा बायपास रस्त्यावर ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे ठाणे-नाशिक महामार्ग ठप्प झाला होता. त्याचवेळी सकाळी साडेआठच्या सुमारास ठाणे-बेलापूर रस्त्यावरील विटावा रेल्वे सबवेखालून जाताना एक कंटेनर…