Category: मुंबई

Mumbai news

ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ फत्ते!

रेल्वे संरक्षण दलामुळे हरवलेल्या ४१४ मुलांची झाली घरवापसी मुंबई: मध्य रेल्वेवर सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) हरवलेल्या मुलांची घरवापसी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आरपीएफने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते मोहिमे’ अंतर्गत एकूण ४१४ मुलांनं त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवले आहे. या मुलांमध्ये ३०६ मुले आणि १०८ मुलींचा समावेश आहे. देशभरातील अनेक मुला- मुलींना शहराचे असलेले आकर्षण, कौटुंबिक कलह तसेच चांगल्या आयुष्याच्या शोधात कुटुंबीयांना न सांगता मुंबईत येतात. मुंबईतील अनेक रेल्वेस्थानकांवर ही मुले आरपीएफ कर्मचाऱ्यांना सापडतात. प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी या मुलांच्या अडचणी समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. यंदा ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत ४१४ मुलांची सुटका करून त्यांची घरवापसी केली. या मुलांना सुरक्षित घरी पाठविण्यासाठी रेल्वे प्रशासन, आरपीएफ, जीआरपी आणि चाइल्डलाइन केंद्र समन्वयक एकत्रितपणे काम करत असून हरवलेल्या मुलांचे संगोपन, त्यांच्या आई-वडिलांचा शोध, त्यांचे समुपदेशन, त्यांचे जेवण सर्व गोष्टींची काळजी संस्थेकडून आणि प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. ००००

डोंबिवलीत फडके रोडवरील वाहन कोंडीने प्रवासी त्रस्त

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील बापूसाहेब फडके रस्त्यावर दररोज संध्याकाळी रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, चारचाकी वाहने उभी असतात. अनेक वाहन चालक फडके रोडवर वाहने उभी करून खरेदीसाठी बाजीप्रभू चौक, नेहरू रोड भागात खरेदीसाठी जातात. फडके रोड हा एक दिशा मार्ग असताना उलट दिशेने या रस्त्यावरून वाहने धावतात. त्यामुळे दिवसेंदिवस दररोज संध्याकाळच्या वेळेत या रस्त्यावर वाहन कोंडी होते. बापूसाहेब फडके रस्त्यावर जवाहिर, गृहपयोगी वस्तू, वस्त्रप्रावरणे अशी विविध प्रकारची दुकाने आहेत. हाॅटेल्स या रस्त्यावर आहेत. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत खरेदीसाठी येणारे नागरिक आपली वाहने दुकानासमोर उभी करून ठेवतात. या जागेत अगोदरच दुकान मालकांची वाहने उभी असतात. हाॅटेल्ससमोर घरपोच खाद्यपदार्थ पुरवठादार वितरकांची दुचाकी वाहने घोळक्याने उभी असतात. फडके रोड गणपती मंदिर, टिळक रस्त्याने येऊन डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुला आहे. या एक दिशा मार्गावर रेल्वे स्थानकाकडून येणारी रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहने घुसखोरी करतात. या रस्त्यावर कोंडी करतात. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर फडके रोडवर नवी मुंबई, ठाणे परिसरातील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घेऊन येणारी वाहने येतात. केडीएमटीच्या बस याच रस्त्यावरून धावतात. या रस्त्याच्या दुतर्फा फळ, भाजीविक्रेते बसलेले असतात. पदपथांवर दुकानदारांनी आपल्या वस्तू ठेऊन पदपथ अडविलेले असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना फडके रस्त्यावरून चालताना वाट काढत जावे लागते. संध्याकाळच्या वेळेत नोकरदार वर्ग घरी परतत असतो. त्यांनाही या कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. रेल्वे स्थानकाकडून, के. बी. वीरा शाळेकडून येणारे बहुतांशी वाहन चालक फडके रोडवरील एक दिशा मार्गिकेचे उल्लंघन करून वाहने चालवितात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते. नेहरू रस्ता, के. बी. वीरा शाळा आणि बाजीप्रभू चौकाकडून गणेश मंदिराकडे जाणारी उलट दिशेची वाहने रोखण्यासाठी वाहतूक विभागाने फडके रस्त्यावर अंबिका हाॅटेल भागात संध्याकाळच्या वेळेत एक वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी नागरिक, व्यापारी करत आहेत. केडीएमटीच्या बस संध्याकाळी टिळक रस्त्याने फडके रस्त्यावरून बाजीप्रभू चौक भागात जातात. मदन ठाकरे चौकात या बसना वळण घेताना रस्त्यावरील दुचाकी, फेरीवाल्यांचा अडथळा येतो. अनेक वेळा बस या चौकात अडकून पडतात. वाहतूक विभागाची टोईंग व्हॅन नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची प्रवाशांची मागणी आहे. वाहतूक विभागातील अधिकाऱ्याने सांगितले, डोंबिवली शहरात वाहन कोंडी होणार नाही अशा पद्धतीने नियोजन केले आहे. रस्त्यावर नियमबाह्य उभी केलेली वाहने टोईंग व्हॅनच्या माध्यमातून उचलली जातात. फडके रोडवरील वाहनांनावर नियमित कारवाई केली जाते. कोट डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर नियमित कारवाई सुरू आहे. पादचाऱ्यांना रस्ते, पदपथ मोकळे राहतील यादृष्टीने फेरीवाले नियंत्रण पथक कारवाई करते. फडके रोडवर पालिका आणि वाहतूक विभागाची संयुक्त मोहीम राबविण्याचा विचार आहे. – हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.

शहापूरमध्ये बिबट्याचा वावर असलेल्या संवेदनशील गावांमध्ये सौरकुंपण,

शहापूर वनविभागाचा पथदर्शी प्रकल्प कल्याण : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात बिबट्याचा वावर वाढू लागला आहे. बिबट्याचा अधिकप्रमाणात वावर असलेल्या एकांतांंमधील घरांमधील कुटुंबीय, पशुधन यांना बिबट्यापासून धोका आहे. अशा संवेदनशील एकांतात असलेल्या शेतशिवार, माळरानांवरील घरांभोवती सौरकुंपण लावण्याचा पथदर्शी प्रकल्पाचा प्रस्ताव शहापूर वनविभागाने तयार केला आहे. शासन मंजुरीच्या आवश्यक त्या पूर्तता झाल्यावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी, माळेशज, कसारा घाट परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. जंगलात लाकूडफाटा, वनोपज गोळा करणे, शेतकरी, गायी, शेळ्यांच्या गोरक्षकांवर यापूर्वी बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्या आणि मानवी वस्तीमधील हा संघर्ष वाढत चालला आहे. भक्ष्य शोधण्यासाठी अनेक वेळा रात्रीच्या वेळेत बिबटे गाव हद्दीतील गोठ्यांमध्ये येऊन पशुधन, भटक्या श्वानांवर हल्ले करतात. हे प्रकार वेळीच रोखण्यासाठी मनुष्य, पशुधन हानी रोखण्यासाठी शहापूर वन विभागाने शहापूर तालुक्यातील बिबट्यांचा वावर, चलत मार्ग असलेल्या काही गावांंमधील एकांतात असलेली घरे निश्चित केली आहेत. बिबट्याचा वावरामुळे या घरांचा परिसर संवेदनशील म्हणून जाहीर केला आहे. अशा एकांत वस्तीत बिबट्याने शिरकाव केला तर त्याला वेळीच सुरक्षितपणे, कोणत्याही प्रकारचा त्रास न होता अटकाव व्हावा या उद्देशातून वन विभागाने संवेदनशील घरांंभोवती सौरकुंपण उभारण्याचा निर्णय घेतला आहे. वन विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. सौरकुंपण प्रस्ताव सौरकुंपण प्रस्तावाप्रमाणे एक एकर शेती परिसरात घर, गुरांचा गोठा असेल तर त्याला संरक्षित करण्यासाठी ३० हजार रुपये खर्च येतो. या निधीतील ७५ टक्के रक्कम शासकीय अनुदानातून शेतकऱ्याला दिली जाईल. उर्वरित २५ टक्के रक्कम शेतकऱ्याने स्वता उभारून हा प्रकल्प आकाराला आणायचा आहे. या प्रकल्पासाठी देखभाल दुरुस्तीसाठी नियमितचा खर्चही असणार नाही. बिबट्याचा वावर असलेल्या एकांतामधील घर, गोठ्याला कुंपण घातले जाईल. त्या कुंपणाच्या आतील भागात सौरपट्ट्या बसविल्या जातील. सौरपट्यांमधून तयार होणारी सौर वीज विजेरीमधून (बॅटरी) कुंपणात सोडण्यात येईल. अचानक दिवसा, रात्री अन्य वन्यजीव किंवा बिबट्या एकांतामधील घर परिसरात भक्ष्यासाठी आला. त्याचा स्पर्श सौरकुंपणाला झाला की वन्यजीव किंवा बिबट्याला शाॅक बसेल आणि त्याचवेळी सौर यंत्रणेवर चालणारा भोंगा वाजण्यास सुरुवात होईल. शाॅक बसल्याने बिबट्या पळून जाईल आणि भोंग्यामुळे शेतकरी जागा होईल. या प्रकल्पामुळे बिबट्या पण सुरक्षित आणि शेतकऱ्याचे कुटुंब, पशुधन एकांतात असले तरी सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे, असे वनाधिकाऱ्याने सांगितले. या पथदर्शी प्रकल्पामुळे बिबट्या किंवा वन्यजीवांस कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही. त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होणार नाही याची विशेष काळजी या प्रकल्पात घेण्यात आली आहे. अलीकडे एकांतामधील घर परिसरात लोखंडी जाळीचे कुंपण करण्यासाठी दोन ते अडीच लाख खर्च येतो. त्याच जागी सौरउर्जेच्या माध्यमातून सौर कुंंपण उभारण्याचा प्रयत्न केला तर शासकीय आर्थिक साहाय्याने तीस हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे बिबट्या, मानवातील संघर्ष थांबविण्यासाठी राबविण्यात येणारा शहापूर वनविभागाचा हा प्रस्ताव आदर्शवत ठरण्याची शक्यता आहे.  

डोंबिवलीत कोपरमधील बेकायदा बांधकामावर कारवाई

डोंबिवली : येथील पश्चिमेतील कोपर गाव हद्दीतील चरू बामा म्हात्रे शाळेच्या पाठीमागील बाजूस दोन महिन्यांपासून काही बांधकामधारक कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता, रस्ता अडवून एका बेकायदा बांधकामाची उभारणी करत होते. यासंदर्भात तक्रारदाराने आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्यापर्यंत तक्रारी केल्या होत्या. आयुक्तांच्या आदेशावरून बुधवारपासून ही बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी सुरू केली. डोंबिवली पश्चिमेत चरू बामा म्हात्रे शाळेच्या पाठीमागे अधिकृत कृष्णा संकुलाच्या बाजुला तीन महिन्यांपासून बांधकामधारकांनी कल्याण डोंबिवली पालिका नगररचना विभागाच्या बांधकाम परवानग्या न घेता, एका बेकायदा इमारतीची उभारणी सुरू केली होती. या बेकायदा इमारतीच्या तक्रारी तक्रारदार विनोद जोशी यांनी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधुत तावडे, ह प्रभाग साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्याकडे केल्या होत्या. आयुक्त डॉ. जाखड यांनी विहित कार्यवाही करून हे बेकायदा बांधकाम तोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. साहाय्यक आयुक्त सावंत यांनी या बांधकामाच्या विकासकांना तातडीने बांधकाम थांबविण्याची नोटीस दिली होती. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आणि अधिकारी वर्ग निवडणूक कामात व्यस्त झाल्याने या बेकायदा बांधकामांवर कारवाई करणे पालिका अधिकाऱ्यांना शक्य झाले नव्हते. पालिकेचा स्थगिती आदेश असताना बांधकामधारकांनी इमारतीचे काम सुरूच ठेवले असल्याची माहिती तक्रारदार जोशी यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिली होती. निवडणूक संपताच तक्रारदार जोशी यांनी पुन्हा अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त तावडे यांची भेट घेऊन कोपर येथील बेकायदा इमारतीवर कारवाईची मागणी केली. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी तातडीने कोपरचे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. आयुक्त, उपायुक्त तावडे यांच्या आदेशावरून साहाय्यक आयुक्त सावंत यांनी बुधवारपासून तळ अधिक एक मजल्याची नव्याने उभी राहत असलेली बेकायदा इमारत तोडण्याचे काम सुरू केले. अतिक्रमण, फेरीवाला नियंत्रण पथकाचे कामगार, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही सुरू करण्यात आली. बुधवारी या बेकायदा इमारतीचा काही भाग तोडल्यानंतर गुरुवारीही इमारतीचा उर्वरित भाग तोडण्याची मोहीम साहाय्यक आयुक्त सावंत यांनी सुरू ठेवली आहे. या इमारतीवर थातुरमातूर कारवाई न करता, ही इमारत भुईसपाट करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार जोशी यांनी केली आहे. कोट कोपर येथील चरू बामा म्हात्रे शाळेमागील नव्याने उभी राहत असलेली एक बेकायदा इमारत तोडण्याचे काम बुधवारपासून सुरू केले आहे. या बांधकामाला यापूर्वीच स्थगितीचे आदेश दिले होते. आयुक्त डॉ. जाखड, उपायुक्त तावडे यांच्या आदेशावरून ही इमारत भुईसपाट करण्याचे काम सुरू आहे. – राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.

कल्याण डोंबिवली पालिकेची नागरी सुविधा केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर देयकांचा भरणा करता यावा म्हणून पालिका प्रशासनाने १ डिसेंबरपासून पालिकेची दहा प्रभाग हद्दीतील नागरी सुविधा केंद्रे शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेसारखी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका हद्दीतील बहुतांशी करदाता हा नोकरदार, व्यावसायिक आहे. त्यांना कामाच्या दिवशी पालिकेत येऊन मालमत्ता कर भरता येत नाही. त्यामुळे नोकरदार, उद्योजक, व्यावसायिक करदात्यांचा विचार करून प्रशासनाने सुट्टीच्या दिवशीही सुविधा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके मालमत्ता करधारकांना पालिकेकडून वितरित करण्यात आली आहेत. मालमत्ता कराची चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीची कराची रक्कम ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी पालिकेत भरल्यास चार टक्के आणि ऑनलाईन भरणा केल्यास दोन टक्के सवलत देण्याचे पालिकेने यापूर्वीच जाहीर केले आहे. ज्या मालमत्ता करधारकांनी अद्याप मालमत्ता कराचा भरणा केलेले नाही. त्यांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. कर भरण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांवर पालिकेकडून कठोर कारवाईचे पाऊल उचलले जाणार आहे. मालमत्ता कराच्या थकित रकमेवर दोन टक्के रकमेची दंडात्मक कारवाई करणे, इमारत, चाळी, आस्थापनेला असलेल्या नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. एवढ्या कारवाया करूनही थकबाकीदार मालमत्ता कर भरणा करत नसेल तर त्यांची मालमत्ता जप्त केली जाईल. विहित प्रक्रिया पार पाडून त्या मालमत्तेचा लिलाव केला जाईल, असे प्रशासनाने जाहीर केले आहे. या दंडात्मक कारवाया टाळण्यासाठी नागरिकांनी मुदतपूर्व मालमत्ता कराचा भरणा करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. मालमत्ता कराच्या देयकावरील क्युआर कोड स्कॅन करून, पालिकेच्या संकेतस्थळाच्या माध्यमातूनही नागरिक मालमत्ता कर भरणा करू शकतात. या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

येत्या रविवारी 6 वी साकीब रिजवी मेमोरियल कॅन्सर जनजागृती मॅरेथॉन  

मुंबई : येत्या रविवारी 1 डिसेंबर 2024 रोजी रिजवी ग्रुपच्या हेल्प युवरसेल्फ फाऊंडेशन द्वारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्य (एम एम आर डी ए) ग्राउंड, बीकेसी येथे 6 वी साकीब…

मुरबाडचा ऐतिहासिक भाऊ गणपत वाचनालय मृत्यू शय्येवर

जीव चंदने मुरबाड :  शहरातील ब्रिटिश कालीन भाऊ गणपत वाचनालय गेली अनेक वर्षे नव्याने उभारणीच्या प्रतीक्षेत असून मुरबाड नगरपंचायत प्रशासनाचे स्थापने पासूनच याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे. भारतीय स्वातंत्र्य…

‘अमर ज्योतीने’ शहिदांना आदरांजली

विरार : श्रमजीवी संघटनेचे मुख्यालय असलेल्या उसगाव डोंगरीत मंगळवारी सायंकाळी अभिनव पद्धतीने संविधानचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी शहीद स्मारकाचे तसेच संविधानात अंतर्भूत असलेले ‘राज्य’ अत्यंत सोप्या पद्धतीने समजून घेता यावे, यासाठी विवेक पंडित यांच्या संकल्पनेतून बैलगाडीच्या माध्यमातून उभारलेले स्मारकाचेही उद्‍घाटन करण्यात आले. त्यानंतर वीरपत्नी स्मिता साळसकर यांच्या हस्ते अविरत तेवत राहणाऱ्या “अमर ज्योतीचे” प्रज्वलन करत शहीद जवानांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली. भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उसगाव येथे श्रमजीवी संघटना आयोजित संविधान अमृत महोत्सव सोहळा झाला. यावेळी २६/११ हल्ल्यात वीरमरण असलेले विजय साळसकर यांच्या वीरपत्नी स्मिता साळसकर यांनी उपस्थितांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. सोबत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, वसई विरार महापालिका आयुक्त डॉ. अनिल पवार आणि आमदार स्नेहा दुबे पंडित यांनीही संवाद साधला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्या आणि देशाचे रक्षण करताना सीमेवर हुतात्मा झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहणारी अखंड तेवणारी अमरज्योत वीर पत्नी स्मिता साळगावकर यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. २६/११ मुंबईवर झालेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलिस, जवान आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. अमर ज्योतीसाठी योगदान देणाऱ्या कैलास बिश्नोई यांचा या वेळी सन्मान जिल्हाधिकारी आणि विवेक पंडित यांनी केला. तसेच वसईच्या एकाधिकारशाहीला टक्कर देत विजयश्री मिळवलेल्या श्रमजीवी कन्या आणि भाजपच्या नवनिर्वाचित आमदार ॲड. स्नेहा दुबे पंडित यांचाही जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष श्रामभाऊ वारणा, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी, पोलिस उपायुक्त जयंत भजबले, शरद पाटील व श्रमजीवी संघटनेचे इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 नोव्हेंबर महिन्यात प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई

 लाख 60 हजार दंड तसेच 62 किलो प्लास्टिक जप्त नवी मुंबई : ‘प्लास्टिकमुक्त नवी मुंबई’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकांपर्यंत पोहचून एकल वापर प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येत असून दुस-या बाजुला प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई करुन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार दिवाळीच्या आधीपासूनच प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली असून नोव्हेंबर महिन्यात 25 दुकाने / आस्थापना यांच्यावर कारवाई करीत 1 लाख 60 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच 62 किलो 100 ग्रॅम एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आलेले आहे. यामध्ये बेलापूर विभागात 18 दुकाने / आस्थापना यांच्यावर कारवाई करत 1 लाख 25 हजार दंडात्मक रक्कम वसूल केली आहे, तसेच 42 किलो एकल वापर प्लास्टिक जप्त केले आहे. अशाचप्रकारे नेरुळमध्ये एका दुकानावर कारवाई करत 5 हजार दंडात्मक रक्कम वसूली व 1.5 किलो एकल वापर प्लास्टिक जप्त केले आहे. वाशी विभागातही 1 दुकानदाराकडून 1 किलो एकल वापर प्लास्टिक जप्ती तसेच 5 हजार दंडात्मक रक्कम वसूली करण्यात आली आहे. कोपरखैरणे विभागातही 1 दुकानदाराकडून 500 ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्ती तसेच 5 हजार दंड वसूली करण्यात आली आहे. याशिवाय परिमंडळ 1 मधील भरारी पथकाने 15 किलो प्लास्टिक जप्ती व 5 हजार दंड वसूली आणि परिमंडळ 2 मधील भरारी पथकाने 3 दुकानदारांवर कारवाई करुन 2 किलो 100 ग्रॅम प्लास्टिक साठा जप्ती तसेच 15 हजार दंडात्मक रक्कम वसूल केली आहे. अशाप्रकारे नोव्हेंबर महिन्यात नमुंमपा क्षेत्रात 1 लाख 60 हजार दंडात्मक रक्कम वसूली व 62 किलो 100 ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्लास्टिकमुळे निर्सगाला व मानवी जीवनाला होणारी हानी लक्षात घेऊन नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिकला दैनंदिन वापरातून पूर्णपणे हद्दपार करावे व स्वच्छ सुंदर पर्यावरणशील शहर हा नवी मुंबईचा नावलौकिक वृध्दींगत करत रहावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

आजपासुन बोरीवलीत रंगणार राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा २०२४-२५

मुंबई : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर त्याचबरोबर मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना आणि बिमानगर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा उद्या पासुन २८, २९ नोव्हेंबर २०२४ रोजी बिमानगर एज्युकेशन सोसायटी शाळा, एलआयसी कॉलनी, शांती आश्रम बस डेपो समोर, बोरीवली (पश्चिम), मुंबई ४००१०३ येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, लातूर, अमरावती, नागपूर या ८ विभागातील १९२ खेळाडू, १६ मार्गदर्शक, व्यवस्थापक, ३० पंच व अधिकारी, २५ स्वयंसेवक असा एकूण २६३ जणांचा सहभाग असणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धेची पूर्व तयारी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या मार्फत मा. जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर आणि मा. उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, मुंबई विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन प्रथमच मुंबई उपनगर जिल्ह्यात करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागातून या स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंचे कौशल्य, कसब पाहण्याची संधी मुंबईतील क्रीडा प्रेमींना मिळणार आहे. या स्पर्धेतील खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी मोठ्या संख्येने खेळाडू, पालक, प्रशिक्षक आणि क्रीडा प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना यांनी केले आहे. 0000