Category: मुंबई

Mumbai news

वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५४वी बैठक संपन्न

राज्याच्या वतीने मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती मुंबई : वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५४वी बैठक ९ सप्टेंबरला सुषमा स्वराज भवन, चाणक्यपुरी, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला महाराष्ट्र राज्याच्या वतीने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, गोवा आणि मेघालयचे मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि तेलंगणाचे उपमुख्यमंत्री, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे वित्त मंत्री (विधानमंडळासह) आणि केंद्र सरकार आणि राज्यांचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते. आरोग्य आणि टर्म इन्शुरन्स सेवांवरील जीएसटी, नुकसानभरपाई उपकर (कंपेंसेशन सेस), संशोधन आणि विकासासाठी अनुदानावरील जीएसटी इत्यादीसारख्या सामान्य जनतेच्या आणि समाजाच्या हिताशी संबंधित प्रमुख मुद्यांवर परिषदेत चर्चा करण्यात आली. यामध्ये जीवन व आरोग्य विमा सेवांवरील कराचा दर व जीएसटी उपकर (कंम्पेनसेशन सेस) बाबतचे भविष्य यांचा अभ्यास करण्यासाठी मंत्री गट तयार करण्याची शिफारस करण्यात आली. तर सरकारी संस्था, विद्यापीठे, महाविद्यालय तसेच सरकारी किंवा खाजगी अनुदाना आधारे संशोधन व विकास काम करणाऱ्या संस्थांना मिळणाऱ्या अनुदानात कर मुक्ततेबाबत प्राधान्याने विचार करण्याची जीएसटी परिषदेने शिफारस केली. यासह ५३ व्या जीएसटी परिषदेत घेतलेले लोकाभिमुख निर्णय जसे की, व्याज व दंड माफीची योजना, व इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याबाबतच्या मर्यादा कालावधीत वाढ यासारखे निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती या बैठकीत निश्चित करण्यात आली.

दलित पँथरच्या अध्यक्षपदी डॉ. स्वप्रिल ढसाळ

रमेश औताडे मुंबई : दलित पँथर या संघटनेची पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी १९७२ साली स्थापन केली होती. त्यांच्या दुर्दैवी दुःखद निधनानंतर त्यांच्या पत्नी मल्लिका यांच्याकडे संघटनेची जबाबदारी होती. त्यांनी आता त्यांच्या आजारपणामुळे संघटनेची अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांचे पुतणे डॉ. स्वप्नील ढसाळ यांच्याकडे त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. नवनिर्वाचित युवा अध्यक्ष डॉक्टर स्वप्रिल ढसाळ हे नामदेव ढसाळ यांचे पुतणे आहेतच पण नामदेवची ध्येयधोरण ही त्यांना माहित आहेत आणि आमची नवी फळी नव्या जोमाने पुन्हा मैदानात उत्तरत आहे . रोजगार योजना, महीला अत्याचार, उद्योग, जेष्ठ नागरिक, तरुण, शेतकरी असे सर्व घटक आज दुर्लक्षित आहेत. त्यांच्याकडे संघटना नव्या जोमाने सामोरे जाऊन लढा देणार आहे असे डॉ. स्वप्रिल ढसाळ  यांनी सांगितले.

अतिक्रमण विभागामार्फत ऐरोली विभागात तोडक कारवाई

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली विभागात पाडकामाची कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत सागरनाथ रामा मढवी, घर नं – 30 ,मच्छी मार्केटच्या मागे, दिवा गाव ,सेक्टर – 9 , ऐरोली येथील आरसीसी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. सदर अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. मा.उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र.1591/2023 च्या आदेशानुसार आज रोजी दुसऱ्या मजल्याचे बांधकाम अंशत: निष्कासीत करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सदर ठिकाणी पोकलेन, जेसीबी सारखी मशनरी जावु शकत नसल्याने या मोहिमेसाठी 10 हॅमर, 7 ब्रेकर, व 16 मजूर यांचा वापर करण्यात आलेला असून मोहिमेकरीता जी विभाग ऐरोली येथील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. 0000  

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती

 माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची माहिती मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री व या समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते मधुकर मुसळे, प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत उपस्थित होते. या समितीमध्ये  तीन सहसंयोजक, विविध स्तरांवरच्या समित्यांचे प्रमुख तसेच विशेष आमंत्रित आणि पदसिद्ध सदस्यांचा समावेश आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्याच्या निर्धाराने पक्ष कार्यकर्ते सज्ज झाले असल्याचेही  दानवे यांनी नमूद  केले. यावेळी दानवे म्हणाले की, बूथ पर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे ही व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचे नियोजन, संचलन करण्यासाठी प्रदेश, जिल्हा, तालुका स्तरावर अधिवेशने झाली आहेत. विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती अंतर्गत विविध स्तरांवर समित्या गठित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे, अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, श्रीकांत भारतीय यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विविध समित्यांचे प्रमुख खालीलप्रमाणे –  जाहीरनामा समिती – वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार विशेष संपर्क – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सामाजिक संपर्क – राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, महिला संपर्क – राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर,  कृषी क्षेत्र संपर्क – अशोक चव्हाण, लाभार्थी संपर्क – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, युवा संपर्क – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, प्रचार यंत्रणा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सहकार क्षेत्र संपर्क – विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर, मीडिया- अतुल भातखळकर, ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, अनुसूचित जाती संपर्क – माजी आमदार भाई गिरकर, अनुसूचित जमाती संपर्क – आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, सोशल मीडिया – निरंजन डावखरे, निवडणूक आयोग संपर्क- माजी किरीट सोमय्या.महायुती निवडणूक अभियान समन्वयक म्हणून  ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन काम पाहणार आहेत. विशेष आमंत्रित म्हणून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मंत्री गणेश नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे ही  दानवे यांनी नमूद केले. पदसिद्ध सदस्य म्हणून प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर, विक्रांत पाटील, माधवी नाईक, विजय चौधरी आणि संजय केनेकर काम पाहणार आहेत.

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर ध्वनी अवरोधक

मुंबई : मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी या मार्गावर ध्वनी अवरोधक बसवण्यात आले आहेत. या मार्गावरील ५०८ किमी अंतरापैकी आतापर्यंत ८७.५ किमी परिसरात १ लाख ७५ हजार ध्वनी अवरोधक बसविण्यात आले आहेत. बुलेट ट्रेन खाडी भाग, डोंगराळ प्रदेश, नागरी वस्तीमधून जाणार आहे. विशेषतः बुलेट ट्रेन नागरी भागातून जात असताना प्रचंड ध्वनिप्रदूषण होण्याची शक्यता आहे. बुलेट ट्रेन आणि रुळाच्या घर्षणामुळे होणाऱ्या कर्कश आवाजाने मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन मार्गाच्या दोन्ही बाजूला ध्वनी अवरोधक बसविण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे गुजरातमध्ये सर्वाधिक वेगात काम झाले आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत १ लाख ७५ हजारांहून अधिक ध्वनी अवरोधक बसवण्यात आले आहेत. एक किमी अंतरावर व्हायाडक्टच्या दोन्ही बाजूला २ हजार ध्वनी अवरोधक बसविण्यात आले आहेत. ध्वनी अवरोधक सुरत, आनंद आणि अहमदाबाद येथील कारखान्यात तयार करण्यात आले आहेत. रेल्वे पातळीपासून २ मीटर उंच आणि १ मीटर रुंद काँक्रीटच्या पॅनेल स्वरुपात ते आहेत. प्रत्येक ध्वनी अवरोधक अंदाजे ८३०-८४० किलो वजनाचा आहे. ध्वनी अवरोधकामुळे ध्वनिप्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे, असे नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशन लिमिटेडकडून (एनएचएसआरसीएल) सांगण्यात आले.

2 हजार दिव्यांग मानधनापासून वंचित – स्वप्नील पाटील

उल्हासनगर : 10-पहिल्यांदाच उल्हासनगर महानगरपालिकेत कार्यरत 2200 कर्मचारी आणि 1800 सेवनिवृत्तांचा पगार हा 31 ऑगस्ट रोजीच करण्यात आला आहे.त्यामुळे ऐन गणेशोत्सवात कर्मचाऱ्यात आनंदाचे वातावरण आहे.  असे असताना शहरातील 2199 दिव्यांगांना त्यांच्या मासिक मानधनापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.स्वप्निल पाटील यांनी केला आहे. 2 सप्टेंबर रोजी आयुक्त पदाचा पदभार स्विकारणारे विकास ढाकणे यांनी गणेशोत्सवात कर्मचाऱ्यांना गावी जावे लागते, त्यांनी घेतलेल्या विविध वस्तूंचे आणि लोणचे हप्ते भरावे लागतात. या दूरदृष्टीचा विचार करून 1 सप्टेंबर रोजीच कर्मचारी आणि सेवानिवृत्त यांचा पगार करण्याचे निर्देश मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे,मुख्यलेखापरिक्षक शरद देशमुख यांना दिले होते. मात्र 1 सप्टेंबर रोजी सुट्टी असल्याने किरण भिलारे,शरद देशमुख यांनी 31 ऑगस्ट रोजीच कर्मचाऱ्यांच्या व सेवनिवृत्तांच्या खात्यात पगार जमा केला.आयुक्त विकास ढाकणे यांच्यामुळे पहिल्यांदाच दुसऱ्या महिन्याची तारीख येण्यापूर्वीच पगार झाल्याने सर्वच कमालीचे सुखावून गेले. दिव्यांगांना 2018 पासून एक हजार रुपये मानधन देण्यास सुरुवात झाली.2022 मध्ये दिड हजार रुपये मानधन करण्यात आले.अशातच तत्कालीन आयुक्त डॉ.अझिझ शेख यांनी दिव्यांगांच्या दिड हजार रुपये मानधनात सातशे रुपयांची वाढ करून मानधन 2200 रुपये केले.मात्र कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना गणेशोत्सवात मानधन देण्याबाबत लेटलतीफपणा का करण्यात येत आहे?असा सवाल अ‍ॅड.स्वप्निल पाटील यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे यांच्याशी विचारणा केली असता,दिव्यांग कल्याणकारी विभागाकडून बिल आले नसल्याचे सांगितले.दिव्यांग विभागप्रमुख राजेश घनघाव यांच्याशी संपर्क साधला असता,दर महिन्याला वेळेत दिव्यांगांच्या खात्यात मानधन जमा होते.पण दिव्यांग विभागातील लिपिकाची निवडणुकीच्या कामासाठी तहसील कार्यालयात बदली झाल्याने मानधनाचे बिल काढता आले नाही. लिपिकाला पालिकेत पाठवण्याची विनंती करण्यात आली असून ते येताच मानधनाचे बिल तात्काळ काढून मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती राजेश घनघाव यांनी दिली.  

भिवंडीत गणेशोत्सवानिमित्त ६८० पोलिस तैनात

 गर्दीच्या ठिकाणी साध्या गणवेशातही पोलिस सज्ज भिवंडी, ता. १० (बातमीदार) : गणेशोत्सवासंदर्भात पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे. शहरात ८० पोलिस अधिकाऱ्यांसह ६०० पोलिस तैनात ठेवले आहेत. याशिवाय सर्व प्रमुख चौक आणि बाजारपेठांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संशयास्पद व्यक्तींवर नजर ठेवण्यात येत आहे. शहरातील सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी साध्या गणवेशातील पुरुष व महिला पोलिसही तैनात आहेत. भिवंडीचे पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकरी यांनी अतिसंवेदनशील शहरात गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे नमूद केले आहे. १५ हजार गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना शहरात १५ हजार ८२६ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. यात १५९ सार्वजनिक गणपती मूर्ती आणि १५ हजार ६६७ घरगुती विघ्नहर्ता मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. त्यांच्या विसर्जनासाठी महापालिकेने व्यवस्था केली आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन केले. पाच दिवस गौरी गणपती आणि अनंत चतुर्दशीच्या गणपतींचे विसर्जन नदीनाका, वरळदेवी तलाव, भादवड, कशेळी, काल्हेरसह ३२ ठिकाणी केले जाणार आहे. 0000

कंत्राटी डॉक्टरांवर क्षयरोग रुग्णालयाचा भार

 वैद्यकीय अधिकारी, अतिदक्षता तज्ज्ञांची कंत्राटी भरती मुंबई, ता. १० : मुंबई महापालिकेच्या विविध विभागात कंत्राटी पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. आता आपत्कालीन सेवेत मोडणाऱ्या रुग्णालयातही कंत्राटी पद्धतीचा शिरकाव होणार आहे. पालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी अतिदक्षता तज्ज्ञ आठ पदे भरण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे, मात्र ही भरती कायमस्वरूपी नसून कंत्राटी पद्धतीने होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयाची जबाबदारी आता कंत्राटी डॉक्टरांच्या हाती असणार आहे. भविष्यात काही घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची असणार, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. नायर, सायर, केईएम, कूपर ही मुंबई महापालिकेची प्रमुख रुग्णालये असून १६ सर्वसाधारण रुग्णालये आहेत. स्वस्त व योग्य उपचार पद्धती यामुळे देशभरातील रुग्ण मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मोठ्या विश्वासाने धाव घेतात, मात्र गेल्या काही वर्षांत मुंबई महापालिकेच्या विविध विभागात कंत्राटी पद्धतीचा शिरकाव झाला आहे. पालिका रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांना योग्य उपचार देत लवकरात लवकर ठणठणीत करून घरी पाठवणे रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचे कर्तव्य आहे, मात्र पालिका रुग्णालयात आता कंत्राटी पद्धतीचा बोलबाला असणार आहे.

 गणेशोत्सव काळात राजकीय फलकबाजी

 न्यायालयाच्या आदेशांचा विसर मुंबई : सध्या राज्यासह मुंबईत गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जात असून सर्वत्र चैत्यन्याचे वातावरण आहे. लक्षवेधी सजावट आणि डोळे दिपवून टाकणाऱ्या आकर्षक रोषणाईने शहर उजाळून निघाले आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही नाक्यानाक्यावर, चौकाचौकात आणि गल्लीबोळात नेत्यांच्या शुभेच्छा फलकांनी शहराचे विद्रुपीकरण झालेले आहे. बेकायदेशीररित्या फलकबाजी करून शहराचे विद्रुपीकरण करण्यावर उच्च न्यायालयाने वारंवार खडसावूनही शहर नेतेमंडळींच्या फलकांनी भरून गेले आहे. ठिकठिकाणी फलकबाजी करून नियमांचे व आदेशाचे उल्लंघन झालेले पाहायला मिळत आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करून मतदारांना आकर्षित करण्याची संधी राजकीय मंडळी साधत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप व प्रवेशद्वार, महत्वाचे चौक, नाका, कमानी आणि रस्त्याच्या दुतर्फा फलकबाजी करण्यात आली आहे. त्याला कोणताही पक्ष, गट-तट अपवाद नाही. राजकीय मंडळी, पदाधिकारी, आमदार व नगरसेवक होण्यास इच्छुक नेत्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे छोटे – मोठे फलक ठिकठिकाणी लावून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय मंडळींसह विविध कंपन्या व उत्पादने आणि इतर विविध गोष्टींच्या जाहिरातबाजीचे फलक विविध ठिकाणी लागले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. थाटामाटात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची आर्थिक बाजू भक्कम असणे अत्यंत आवश्यक असते. वर्गणी, देणगी आणि राजकीय मंडळींकडून व विविध कंपन्यांच्या जाहिरातीच्या माध्यमातून मंडळांकडे देणगी जमा होत असते. त्यामुळे शुभेच्छांचे फलक गल्ली-बोळात दिसतात. कंपन्यांपेक्षा नेत्यांच्या जाहिराती मोठ-मोठ्या कंपन्या सणांच्या काळात रस्त्यावर कमानी उभारून जाहिराती करतात. त्यासाठी मंडळांना देणगी देतात. यंदाही कंपन्यांच्या त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती दिसत आहेत. मात्र, त्यापेक्षा यंदा नेत्यांच्या कमानींची संख्या अधिक दिसत आहे.

ऑक्टोबरमध्ये एसटीच्या डिझेल बस दाखल होणार

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या हजारो बस नादुरूस्त असून, या बसमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. नादुरूस्त बस अनेकदा रस्त्यात बंद पडून प्रवाशांचा खोळंबा होतो. त्यामुळे आता एसटीच्या ताफ्यात अशोक लेलँडच्या साध्या डिझेलवर धावणाऱ्या बस दाखल…