Category: रायगड

raigad news and updates

विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक मतदानाच्या वेळेत वाढ

रायगड : विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक मतदानाच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे.मतदानाची वेळ सकाळी ७.०० वाजेपासून सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत अशी असेल.अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा…

विदयार्थ्यांकडुन ॲडमिशन, इमारत निधी, डोनेशनच्या माध्यमातून कोटींची लुटमार

अशोक गायकवाड कर्जत : कर्जतधील सरकारी, निमसरकारी, खाजगी शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कॉलेज यांचेकडे इमारत निधी व ॲडमिशन शुल्कवाढीचा हिशोब प्रत्येक पालकाने माहितीच्या अधिकाराने घ्यावा, असे मत ॲड. कैलास मोरे, राज्य प्रवक्ता सम्यक विदयार्थी आंदोलन यांनी व्यक्त केले आहे. १० वी व १२ वी चे निकाल लागले त्यानंतर पुढील प्रवेश प्रकीया सुरू आहे. कर्जतमधील अनेक शाळा / कॉलेज इमारत निधी तसेच प्रवेश शुल्काच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या भरमसाठ फी वसुली करीत आहेत. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ तसेच फी घेणेसंदर्भातील इतर कायदयानुसार, शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार अशा शाळा/कॉलेजनी विदयार्थ्यांकडुन नियमानुसार प्रवेश शुल्क आकारले पाहिजेत. परंतु अनेक शाळा/कॉलेज कायदयाचे व नियमांचे पालन न करता विदयार्थ्यांकडून भरमसाठ इमारत निधी तसेच इतर शुल्काच्या नावाखाली पैसे वसुल करीत आहेत. सदरची बाब विदयार्थ्यावर अन्यायकारक आहे.माझेकडे अनेक विद्यार्थी १० व १२ वीचे पुढील अॅडमिशन प्रकीयेसाठी आले असता अनेक विद्यार्थ्यांची फी मी कमी केली आहे. परंतु हे करत असताना एक प्रश्न उपस्थित झाला आहे की, शाळा/कॉलेज च्या मनमानी कारभाराविरुद्ध शासन/प्रशासन कुणाचेच लक्ष नाही? शिक्षण हा मानवाच्या जीवनातला महत्त्वाचा भाग आहे. त्याच शिक्षणाचं बाजारीकरण झाले आहे. आणि यावर कोणीही ब्र शब्द काढायला तयार नाही. तसेच ही लुटमार सर्व सामान्य उघड्या डोळ्याने पाहत आहे. ही खुप खेदाची गोष्ट आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या पैशातून ह्या संस्था/संचालक पैशाने गबर झाले आहेत. त्यांचा हिशोब घेणेचा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. प्रत्येक पालकाने आपल्या परिसरातील ज्या अनुदानित/ विनाअनुदानित खाजगी शाळा/ कॉलेज असतील त्या प्रत्येक शाळा/कॉलेज मध्ये माहितीच्या अधिकारात खालील माहिती विचारा. १. मागील ५ वर्षात इमारत निधी व अॅडमिशन शुल्क अशी किती रक्कम संस्थेकडे जमा झाली व खर्च झाली? २. इमारत निधी व प्रवेश शुल्क ठरवताना आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता केली का? ३. इमारत निधी व प्रवेश शुल्क निश्चित करताना शासनाची परवाणगी घेतली का? ४. दरवर्षी इमारती निधीच्या नावाखाली घेतलेल्या पैशातून किती इमारती बांधल्या? ५. संस्थेला आलेल्या डोनेशनची माहिती ? ६. मागील ….वर्षात दरवर्षी खरेदी केलेल्या जमिन मालमत्तांची तपशीलवार माहिती ? ७. गेल्या ५ वर्षाचा संस्थेचा ऑडीट. ८. संस्थेची घटना व माहिती.ही माहिती सर्व पालकांनी तसेच सर्व सामान्य नागरीकांनी आपल्या परिसरातील शाळा/कॉलेजकडे मागावी तरचं शिक्षणाच्याबाजारीकरणाला आळा बसेल अन्यथा सर्वसामान्यांची लुटमार होतंच राहील.असा इशारा ॲड. कैलास मोरे यांनी दिला आहे.

राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ धोरणावर हरकती पाठवा – डॉ.प्रशांत नारनवरे

अशोक गायकवाड रायगड : राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ धोरणाचा प्रारुप मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. याबाबत हरकती पाठविण्यात याव्यात असे आवाहन डॉ.प्रशांत नारनवरे,आयुक्त,महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे. महिला व बालविकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी तज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश समिती गठीत करण्यात आली होती. या गठीत समितीने महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ मसुदा तयार केलेला आहे. सदर प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा २०२२ हा इंग्रजी व मराठी भाषेमध्ये महाराष्ट्र शासनाचे https://womenchild.maharashtra.gov.in व https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी सदर प्रस्तावित बाल धोरण हे मुळामध्ये इंग्रजी भाषेमध्ये तयार करण्यात आलेला असून त्यांचे मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे. या बाल धोरण व कृती आराखडा यामध्ये आवश्यक बाबी,सूचना, सुधारणा तसेच मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या मसुद्यामध्ये शब्द रचना, व्याकरण या संदर्भाने हरकती व सूचना नागरिकांकडून मागविण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा-२०२२ च्या संदर्भाने नागरिकांच्या हरकती व सुचना दिनांक ३० जून २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत महिला व बालविकास आयुक्तालय,२८ राणीचा बाग, जुन्या सर्कीट हाऊस जवळ, पुणे-०१ या पत्त्यावर अथवा childpolicy@gmail.om या इमेलवर पाठविण्यात याव्यात असे आवाहन डॉ.प्रशांत नारनवरे,आयुक्त,महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केले आहे. 0000

पहिल्या पावसानंतर भातपेरणीला सुरुवात

  डहाणू, : तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील गावात सोमवारी (ता. १०) मध्यरात्रीच्या वेळी विजांच्या कडकडाटात मॉन्सूनच्या पहिल्या पावसाचे आगमन झाले. त्यानंतर मंगळवार (ता. ११)पर्यंत पावसाने विश्रांती घेतली, मात्र शेतकऱ्यांनी पावसाच्या पहिल्या…

माथेरानमध्ये हातरीक्षा चालकांना ई रिक्षा सुपूर्द

  माथेरान : मागील वर्षभर ठेकेदारामार्फत ई रिक्षा सुरू असल्याने ज्या हातरीक्षा चालकांनी एक तपाहून अधिक काळ ई रिक्षा सुरू होऊन स्वतःची अमानवीय प्रथेतून मुक्ती व्हावी यासाठी कठोर संघर्ष केला होता. अनेक आव्हाने आणि काही नेहमीच्या विरोधक मंडळींच्या विरोधाचाही सामना केला होता.अखेरीस आज एकूण वीस हातरीक्षा मालकांना पायलट प्रोजेक्ट म्हणून सहा महिने या ई रिक्षा सुपूर्द करण्यात आल्या आहेत. सायंकाळी चार वाजता शास्त्री हॉल याठिकाणी गावातील काही राजकीय पक्षांची मंडळी त्याचप्रमाणे सर्व ई रिक्षा समर्थक उपस्थित होते. याप्रसंगी छोटेखानी कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, अजय सावंत, माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, प्रदीप घावरे, राजेश चौधरी,स्मिता गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले. २०१२ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष अजय सावंत यांनी नगरपरिषदेच्या सभागृहात ई रिक्षा सुरू व्हावी यासाठी सर्वानुमते ठराव मंजूर केला होता.त्यानंतर माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका पार पाडली होती. तर राजकारण बाजुला ठेऊन गावामध्ये ई रिक्षाच्या माध्यमातून पर्यटन क्रांती होणार आहे हा दुरदृष्टिकोन समोर ठेवून कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता मनोज खेडकर, शिवाजी शिंदे यांनी ई रिक्षाच्या लढ्यात सहभाग घेतला होता. तर काहींनी मतांच्या राजकारणापायी यातून काढता पाय घेत ई रिक्षाच्या विरोधात असणाऱ्या मंडळींना सहकार्य केले आहे आणि आजही त्यांची तीच भूमिका कायम दिसत आहे. परंतु आता अमानवीय प्रथेतून कायमस्वरूपी मुक्ती मिळणार असल्याने हातरीक्षा चालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.नगरपालिका मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी नव्याने दाखल झालेल्या ई रिक्षांना झेंडा दाखवून पहिल्याच दिवशी संघटनेच्या वतीने मोफत प्रवास देण्यात आला याचा पर्यटकांननी मोठया प्रमाणावर लाभ घेतला.गावात एकूण ९४ हातरीक्षा असल्याने उर्वरित ७४ हातरीक्षा मालकांना लवकरच टप्प्याटप्प्याने या ई रिक्षा ताब्यात मिळणार आहेत त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ————————————————————————– हात रिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्ती व्हावी या संघर्षाला मिळालेले अभूतपूर्व यश आहे. 94 हात रिक्षा चालकांपैकी 20 चालकांनी  दि.१० पासून ई रिक्षा सुरू केल्या आहेत उर्वरीत 74 हातरिक्षा चालकांना परवानगी मिळे पर्यंत हा संघर्ष सुरू राहणार आहे. सुनिल शिंदे, याचिकाकर्ते व सचिव श्रमिक रिक्षा संघटना —————————————————————————– ई रिक्षा आमच्या ताब्यात मिळाल्यामुळे जे समाधान आम्हा सर्व हातरीक्षा चालक मालक वर्गात आहे ते शब्दात वर्णन करता येऊ शकत नाही. आमच्या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे.या जोखडातून मुक्ती मिळून आमची पुढील पिढी तरी सन्मानाने जीवन जगू शकते. रुपेश गायकवाड –ई रिक्षा चालक माथेरान —————————————————————————- गावात अनेक मुले आजही सुशिक्षित बेकार आहेत. अजूनही उर्वरीत एकूण ७४ ई रिक्षा लवकरच येणार आहेत.त्यामुळे सर्वमिळून ९४ मालकांसह अन्य मुलांना या व्यवसायामुळे आपल्या कुटुंबाला आधार प्राप्त होणार आहे.ई रिक्षामुळे पर्यटन वाढून याच माध्यमातून गावातील सर्वाना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. संतोष लखन —-हातरीक्षा मालक माथेरान

जिल्ह्यातील शाळांमध्ये १५ जूनला प्रवेशोत्सव-डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग : १५ जूनपासून नवीण शैक्षणिक वर्ष सुरु होत असून, शिक्षण विभागाची जय्यत तयारी सुरु आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव राबविण्यात येणार असून, शाळांचा परिसर सजविण्यासोबत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत, प्रभातफेरी, पुस्तके वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर एकही बालक शाळाबाह्य राहणार नाही याची काळजी घेतली जात असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके देण्यात येतात. ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळतील असे नियोजन करण्यात येत आहे. सरकारच्या बालभारती विभागाकडे शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी केली होती. सरकारकडून पुस्तके प्राप्त झाली असून, ही पुस्तके तालुक्याच्या गटशिक्षण अधिकार्‍यांमार्फत केंद्रप्रमुख व केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांकडे सूपूर्द करण्यात येत आहेत. रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख ८४ हजार १६२ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात एकही शाळाबाह्य विद्यार्थी राहणार नाही या दृष्टीने शिक्षण विभागामार्फत पाऊले उचलण्यात येत आहेत. १५ जून रोजी शळा सुरु होणार आहेत. त्यापूर्वी ६ ते १४ वयोगटातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नये, यासाठी प्रवेश पात्र बालकांच्या याद्या ग्रामपंचायत व शाळा फलकावर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. प्रवेश पात्र बालकाची यादी लाऊडस्पीकरवर घोषित करून शैक्षणिक पदयात्रा व शिक्षकांच्या गृहभेटी व सरपंच, गावकरी, व्यवस्थापन समिती सदस्य, युवक, बचतगट, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वाच्या गृहभेटींचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी स्वागत करण्यासाठी शाळांना तोरणे लावण्यात येणार आहेत. रांगोळ्या काढण्यात येतील. विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांमार्फत स्वागत करण्यात येणार आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना पुष्प देऊन स्वागत करण्यात येईल. गावात, वार्डात प्रभातफेरी काढण्यात येईल. या प्रभातफेरीत युवक, गावकरी, जेष्ठ नागरिकांना प्रभातफेरीमध्ये सहभागी होण्याची विनंती करण्यात येणार आहे. तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हस्तरीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. वर्षभर १०० टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची माहिती देणे तसेच एकही विद्यार्थी शाळेबाहेर राहणार नाही अशी उपस्थितांसह प्रतिज्ञा घेण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचे रूप पूर्णपणे बदलून गेले आहे. डिजिटल क्लासरूम्स, कृतीयुक्त अध्ययन, विविध खेळ, सहशालेय व अभ्यासपूरक ज्ञानरचनावादी उपक्रम राबविले जात आहेत. तसेच मूल्य शिक्षणावर विशेष भर, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जात आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रशिक्षित उच्च शिक्षित शिक्षक, तसेच विद्यार्थ्यांना शाळेत मोफत प्रवेश, मोफत गणवेश, मोफत मध्यान्ह भोजन, उपस्थिती भत्ता, शिष्यवृत्ती, संगणक शिक्षण या सुविधांचा लाभ दिला जात आहे.

नगरपरिषदेच्या ई रिक्षांचा वापर घनकचरा व्यवस्थापनसाठी करावा

स्थानिकांची मागणी माथेरान : सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सध्या इथे हातरीक्षा मालकांना एकूण वीस ई रिक्षा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याची मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे अल्पावधीतच या वीस ई रिक्षा शालेय विद्यार्थी, दिव्यांग,जेष्ठ नागरिक, रुग्णांना त्याचप्रमाणे पर्यटकांना सेवा देण्यासाठी सज्ज राहणार आहेत. याअगोदर प्रायोगिक तत्त्वावर ठेकेदारामार्फत  सुरू असणाऱ्या नगरपरिषदेच्या मालकीच्या  सात ई रिक्षा बंद कराव्या लागण्याची शक्यता आहे.या सात ई रिक्षांची विक्री करण्याऐवजी त्या घनकचरा व्यवस्थापन कामी उपयोगात आणल्यास दरवर्षी लाखो रुपयांची उधळण ह्या ठेक्यासाठी केली जात आहे त्यावर मात करता येऊ शकते. याच माध्यमातून नगरपरिषदेच्या तिजोरीवर आर्थिक भार येणार नसून लाखो रुपयांची बचत यानिमित्ताने होऊ शकते. हीच आर्थिक गुंतवणूक गावातील अन्य विकास कामांसाठी उपयोगी पडू शकते. गावातील त्याचप्रमाणे पॉईंट्स भागातील कचऱ्याचे संकलन जलदगतीने करण्यासाठी मदत होऊ शकते. यामुळे माथेरान हे सुंदर पर्यटनस्थळ स्वच्छतेत अग्रेसर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सात ई रिक्षांमध्ये कोणत्याही प्रकारची प्रवासी वाहतूक न करता घनकचरा व्यवस्थापन साठी उपयोगात आणल्यास हे शहर खऱ्या अर्थाने अस्वच्छतेवर मात करू शकते. या गावाचे हीत जोपासण्यासाठी नगरपरिषदेच्या अधिकारी वर्गाने,जिल्हाधिकारी रायगड यांनी सनियंत्रण समितीला विश्वासात घेऊन पाऊले उचलल्यास नक्कीच हे शहर प्लास्टिक कचरा मुक्त पर्यटनस्थळ बनेल अशी मागणी पुढे येत आहे. मॉनिटरिंग समितीकडे हा विषय मांडण्यात येईल.त्यानंतर पुढील आदेश प्राप्त झाल्यास निर्णय घेण्यात येईल. -राहुल इंगळे प्रशासक तथा मुख्याधिकारी माथेरान नगरपरिषद

शिवप्रेमींची साक्षीने रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा

अशोक गायकवाड रायगड : युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज किल्ले रायगडावर आज मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. संभाजी राजे छत्रपती आणि जिल्हाधिकारी किशन जावळे…

डेक्कन एज्युकेशन सोसायटीने शाळा पूर्ववत सुरु करण्याचे स्पष्ट आदेश द्यावा-भालचंद्र देशपांडे

अशोक गायकवाड अलिबाग : डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांस शाळा पूर्ववत सुरु करण्याचे स्पष्ट आदेश त्वरित देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. शाळेचे विद्यार्थी, पालक तसेच समाजाच्या विविध स्तरावरून शाळेच्या भवितव्याविषयी विचारणा होत असल्याने आरसीएफ व्यवस्थापनातर्फे वस्तुस्थिती निर्देशक सदर निवेदन देण्यात येत आहे, अशी माहिती मुख्य प्रशासकीय व्यवस्थापक –आरसीएफ थळ भालचंद्र देशपांडे यांनी दिली आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित एक शाळा आरसीएफ वसाहत कुरुळ येथे गेली ४३ वर्षे सुरू आहे. आरसीएफचा थळ-वायशेत प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्यावेळी या परिसरात इंग्रजी माध्यमाची शाळा नसल्याने आरसीएफ कर्मचार्‍यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सदर शाळा सुरू करण्यात आली होती. शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाच्या आवश्यक सर्व परवानग्या व शाळेची नोंदणी डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांचे नावे करण्यात आली. यानुसार शासन नियम व शैक्षणिक धोरणानुसार शाळा चालविण्याचे संपूर्ण दायित्व डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांचे असल्याने शाळेसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांची नेमणूक देखील डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी केली आहे. तत्कालीन परिस्थितीत या शाळेत बहुतांश विद्यार्थी आरसीएफ कर्मचार्यांची मुलेच होती त्यामुळे शाळेसाठी पायाभूत सुविधा, संपूर्ण वार्षिक खर्चाइतके अर्थसहाय्य आणि व्यवस्थापन शुल्क आरसीएफने डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांना देण्याबाबत आरसीएफ व्यवस्थापन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्यात एक द्विपक्षीय करार १९८१ साली करण्यात आला. या कराराची मुदत २०११ पर्यन्त होती. कालांतराने सदर शाळेत शिकणार्‍या आरसीएफ कर्मचार्‍यांच्या मुलांच्या संख्येत लक्षणीय रित्या घट झाली असली तरीही परिसरातील आरसीएफ कर्मचारी व्यतिरिक्त नागरिकांची मुले शिकत असल्याने करारानुसार शाळेसाठी पायाभूत सुविधा आणि आवश्यक अर्थसहाय्य आरसीएफ व्यवस्थापनातर्फे करण्यात येते. २०११ पासून सदर करारात दोन्ही पक्षांच्या सम्मतीने कालानुरूप आवश्यक बदल करून दर पाच वर्षासाठी या कराराचे नूतनीकरण करण्यात येत होते. यानुसार विद्यमान कराराची मुदत ३१ मे २०२४ पर्यन्त होती. मात्र २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून सदर शाळेसंदर्भात आरसीएफसोबत करार नूतनीकरण करण्यास डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी अनाकलनीय कारणांनी असमर्थता दाखविली. शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यादृष्टीने सदर करार किमान दोन वर्षे मुदतीने पुन्हा करण्यात यावा म्हणून डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांना आरसीएफ व्यवस्थापनातर्फे लेखी स्वरुपात वारंवार विनंत्या करण्यात आल्या. मात्र सदर करार नूतनीकरण न करण्याबाबत डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे ठाम राहिली. सदर शाळा सुरू राहावी यासाठी आरसीएफ व्यवस्थापन विविध स्तरावर प्रयत्नशील आहे. मा. शिक्षणाधिकारी (रायगड) यांना दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी व्यवस्थापनाने पत्र पाठवून डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे द्वारा शाळा पूर्ववत सुरू ठेवणेबाबत आरसीएफची कोणतीही हरकत नसल्याचे कळविण्यात आले. तसेच मा. शिक्षण आयुक्त महाराष्ट्र शासन यांनी सदर प्रकरणात हस्तक्षेप करून संबंधित शैक्षणिक संस्थेस योग्य ते निर्देश द्यावेत अशी विनंती दिनांक २७ मे २०२४ च्या पत्राद्वारे व्यवस्थापनातर्फे करण्यात आली आहे. दरम्यानच्या कालावधीत डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या कार्यकारिणीसोबत बैठका घेऊन शाळा सुरू ठेवण्याचे यथोचित प्रयत्न करण्यात आले. शाळा सुरू ठेवण्याबाबत आरसीएफ व्यवस्थापनाचा सातत्याने सकारात्मक दृष्टीकोण असताना आरसीएफसोबत करार नूतनीकरण न करण्याबाबत डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या भूमिकेमुळे आगामी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पुढे शाळा सुरू ठेवण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या अनिश्चित परिस्थितीमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने आरसीएफ व्यवस्थापनातर्फे मा. विभागीय शिक्षण संचालक, मुंबई यांना दिनांक ४ जून २०२४ रोजी पत्र देण्यात आले आहे. यात डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांस शाळा पूर्ववत सुरु करण्याचे स्पष्ट आदेश त्वरित देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. शाळेचे विद्यार्थी, पालक तसेच समाजाच्या विविध स्तरावरून शाळेच्या भवितव्याविषयी विचारणा होत असल्याने आरसीएफ व्यवस्थापनातर्फे वस्तुस्थिती निर्देशक सदर निवेदन देण्यात येत आहे, असे मुख्य प्रशासकीय व्यवस्थापक, आरसीएफ थळ, अभय देशपांडे यांनी सांगितले आहे.

निवडणूक मतमोजणीसाठी आवश्यक मनुष्यबळाची सरमिसळ संपन्न

संजीव कुमार झा, कमलेश कुमार अवस्थी आणि किशन जावळे यांच्या उपस्थितीत अशोक गायकवाड रायगड:रायगड लोकसभा निवडणूकीची मतमोजणी उद्या दि.०४ जून रोजी स.८ वाजेपासून सुरु होणार आहे. या मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मनुष्यबळाची द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) निवडणूक निरीक्षक संजीव कुमार झा मतमोजणी निरीक्षक कमलेश कुमार अवस्थी आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाली. यामध्ये मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक यांचा समावेश होता. नेहुली येथील क्रीडा संकुलातील हॉलमध्ये पार पडलेल्या या सरमिसळ प्रक्रियेवेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा सूचना अधिकारी निलेश लांडगे यांसह विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, इतर अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, तालिका कर्मचारी, शिपाई, हमाल, इतर कर्मचारी असे एकूण १ हजार अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणीची रंगीत तालीम संपन्न.आज नेहुली येथील क्रीडा संकुलात मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली. सर्व मतमोजणी अधिकारी आणि कर्मचारी यांनी घ्यावयाची दक्षता, कामाकाजाचा प्रोटोकॉल यांसह सर्व आवश्यक बाबींचे प्रशिक्षण आणि सराव यावेळी करण्यात आला. निवडणूक यशस्वी करण्यासाठी सर्वजण अतिशय प्रामाणिक पणे कार्यरत आहात. एकूणच जिल्हा प्रशासनाने चांगली तयारी केली असून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशप्रमाणे सर्व कार्यवाही करावी असे निवडणूक निरीक्षक संजीव कुमार झा यांनी सांगितले. तसेच सर्वाना शुभेच्छा दिल्या. मोबाईल नेण्यास मनाई मतमोजणी केंद्रात मोबाईलसह प्रतिबंधीत वस्तू आणण्यास मनाई निवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्यूलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रीयेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.