Category: रायगड

raigad news and updates

श्रीमती भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयाची अद्वितीय कामगिरी

प्लास्टिक रिसायकलिंग वॉरियर्स स्पर्धा पनवेल : इंडियन सेंटर फॉर प्लास्टिक इन द एनवोर्मेन्ट यांच्यामार्फत प्लास्टिक रिसायकलिंग वॉरियर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या  द्रोणागिरी येथील श्रीमती भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयाने अद्वितीय अशी कामगिरी बजावली. यामध्ये एकूण 157 किलोग्रॅमवेस्ट प्लास्टिक जमा करून शाळेने एक उच्चांक प्रस्थापित केला आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शाळेचे चेअरमन चंद्रकांत घरत, मुख्याध्यापिका अनुराधा काठे यांचा मंगळवारी सत्कार केला. ही स्पर्धा इंडियन ऑइल एस पी एल ओ पी एल गेल इंडिया लिमिटेड रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यातर्फे रायगड जिल्हा आणि नवी मुंबई शाळांसाठी प्रायोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल 26 फेब्रुवारी 2024 ला जाहीर करण्यात आला होता. त्यानिमित्ताने 1 एप्रिल 2024 सोमवार रोजी या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेमध्ये अद्वितीय कामगिरी बजावल्याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शाळेचा पालक वर्ग शिक्षक वर्ग शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा काठे, इनचार्ज टीचर निकिता मॅडम आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेच्या निमित्ताने मुलांनी उत्स्फूर्तपणे प्लास्टिक रिसायकलिंग चे महत्व पालकांना पटवून देत घराघरातून रिसायकलेबल प्लास्टिक जमा करून शाळेत आणले तसेच ठिकठिकाणी फेकून दिल्या जाणाऱ्या बाटल्या आणि प्लास्टिकचा कचरा योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत विद्यार्थ्यांनी सर्वांना समजून सांगितली.

मतदार जनजागृती गीतांच्या सिडीचे प्रकाशन

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते अशोक गायकवाड रायगड : मतदार जनजागृतीसाठी गीतमाला तयार करण्यात आली आहे. या गीतांच्या सिडीचे प्रकाशन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते करण्यात आले. रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हानिवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून मतदार जनजागृतीसाठी गीतमाला तयार करण्यात आली आहे. या गीतांच्या सिडीचे प्रकाशन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या प्रकाशन सोहळ्यास अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन महेश पाटील, तहसिलदार म्हसळा, समीर घारे आदि उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मतदान प्रक्रिया हा लोकशाहीचा उत्सव आहे. या उत्सवात प्रत्येक मतदाराने मतदान करुन आपला सहभाग नोंदवावा यासाठी या गीतांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघांचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार समीर घारे यांनी या गीतांची निर्मिती केली आहे. एकूण ६ गीते असून पारंपरिक चालीवर असलेल्या या गीतांचे लेखन, गायन भिमराव सूर्यतळ यांनी केले असून संगीत सचिन धोंडगे यांनी दिले आहे. सहकलाकार म्हणून प्रतिक निकम, आदेश डेरवणकर आणि किरण शिंदे यांनी काम केले आहे. या गीतमाला सिडीची निर्मिती नायब तहसिलदार धर्मराज पाटील, तहसिलदार समीर घारे यांनी केली आहे. ही संपूर्ण निर्मिती शासकीय अधिकारी कर्मचारी यांची आहे. या उत्कृष्ट निर्मितीसाठी संपूर्ण यंत्रणेचे जिल्हाधिकारी जावळे यांनी कौतुक करून अभिनंदन केले. रायगड जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणी या गीतांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली काढा – न्या. ए.एस. राजंदेकर

अशोक गायकवाड रायगड : राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग ए.एस. राजंदेकर यांनी केले आहे. विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून रायगड जिल्ह्यामध्ये ५ मेला  राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे, तसेच ग्रामपंचायत यांच्याकडील घरपट्टी, पाणी पट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग ए.एस. राजंदेकर यांनी केले आहे.

मतदान करण्याचे विद्यार्थ्यांकडून पालकांना आवाहन- चंद्रकांत सूर्यवंशी

अशोक गायकवाड रत्नागिरी : मानवी साखळीतून, कलाकृतीतून मतदान करण्याचा संदेश देण्यात येत आहे. पालकांनी मतदान करावे, यासाठी विद्यार्थ्यांच्यामार्फत त्यांना आवाहन करण्यात येत आहे, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विरेंद्र माईन, मुख्याध्यापिका निलम जाधव यांच्या उपस्थितीत पालकांनी मतदान करुन आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन करणाऱ्या संकल्प पत्राचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र.१५ दामले विद्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची कलाकृती आणि साखळी निर्माण करण्यात आली. पालकांनी मतदान करुन आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन करणाऱ्या संकल्प पत्राचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. येत्या लोकसभा मतदानात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगून, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी म्हणाले, मानवी साखळीतून, कलाकृतीतून मतदान करण्याचा संदेश देण्यात येत आहे. पालकांनी मतदान करावे, यासाठी विद्यार्थ्यांच्यामार्फत त्यांना आवाहन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना संकल्पपत्राचे वाटप करण्यात आले असून, हे संकल्प पत्र पालकांनी भरुन द्यावे. मतदार जनजागृती अंतर्गत सायकल रॅली, मॅरेथॉन याबरोबरच बोट रॅलीचे आयोजनही करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांना आज वाटप करण्यात आलेल्या संकल्पपत्रामध्ये, मी शपथ घेतो, मी भारतीय घटनेने मला मतदान करण्याचा जो अमूल्य अधिकार दिला आहे, त्या अधिकाराचा कोणत्याही परिस्थितीत वापर करेन. मततदान करुन आपला उमेदवार निवडण्याचा माझा फक्त अधिकारी नसून, ती माझी राष्ट्रीय जबाबदारी आहे. मी अशीही शपथ घेतो, देशहिताकरिता जनतेच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करु शकणाऱ्या सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्यासाठी, मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना तसेच माझ्या परिचित व्यक्तींना मतदान करण्यासाठी प्रेरित व प्रोत्साहित करेन. मी अशीही शपथ घेतो, मी धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली किंवा कोणत्याही प्रलोभास बळी न पडता मतदान करण्याची जबाबदारी मी पार पाडेन, असा मजकूर आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विरेंद्र माईन, मुख्याध्यापिका निलम जाधव यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विशेषत: उपविभागीय अधिकारी, तहसील कार्याल, नगरपरिषद, जिल्हा परिषद यंत्रणा यांच्या माध्यमातून विविध विधानसभा मतदार संघात फ्लेक्स, सेल्फी पॉईंट यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. ‘मत आपले द्यायचे, कर्तव्य आपले बजावायचे’, ‘मतदान अधिकार पण, कर्तव्य पण’, ‘मतदान मतदात्याची शान’, ‘मतदानाचे कर्तव्य बजावून महाराष्ट्राला एक उत्तम राज्य बनवू या’, असे संदेश देणारे फलक प्रदर्शित करण्यात आले आहेत.

ई -रिक्षामुळे माथेरानच्या पर्यटनात क्रांती घडणार का?

माथेरान : माथेरान मध्ये ई-रिक्षा सुरू झाल्यानंतर दळणवळणाचे एक नवीन पर्व सुरू होणार आहे या ई रिक्षांमुळे हात रिक्षा या कालबाह्य होणार असून हात रिक्षा ओडणाऱ्यांना एक सन्मानजनक व्यवसाय मिळणार…

आरटीओने ई-रिक्षाचे दर निश्चित करावे

स्थानिकांची मागणी माथेरान : श्रमिक हातरीक्षा चालकांच्या ताब्यात ई रिक्षा द्याव्यात असे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले असताना देखील सनियंत्रण समितीच्या हेकेखोर वृत्तीमुळेच  सध्या पायलट प्रोजेक्टवर केवळ ठेकेदाराला पोसण्यासाठी या समितीने ई रिक्षाचा ठेका दिलेला असून दस्तुरी ते माथेरान रेल्वे स्टेशन दरम्यान प्रति माणसी ३५ रुपये दर आकारण्यात येत आहे.सहा ते सात मिनिटांत हे अडीच किलोमीटर अंतर ई रिक्षाच्या प्रवासासाठी लागते.तर शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करण्यासाठी फक्त पाच रुपये इतका माफक दर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही महिने येथील शासकीय अधिकारी कर्मचारी वर्गाला दस्तुरी माथेरान दस्तुरी या प्रवासासाठी दर दिवसाला केवळ पाच रुपयांत मासिक पास देण्यात आले होते. ज्यांना  लाख रुपये मासिक पगार मिळतो अशा शासकीय अधिकारी वर्गाला ही सवलत देण्यात आल्यामुळे अनेकदा ३५ रुपये दर भरणाऱ्या प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत होते. परंतु या शासकीय अधिकारी वर्गाला नागरिकांच्या तक्रारी वरून या सुविधे पासून बंद करण्यात आले आहे.ज्या ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना इथे शासकीय खोल्या उपलब्ध आहेत अशी मंडळी सुध्दा नेरळ अथवा कर्जत याठिकाणी राहून ई रिक्षाच्या साहाय्याने नोकरीसाठी येतात. तर येथील  निमशासकीय कर्मचारी सुध्दा आपल्या स्वतःच्या खोल्या असताना माथेरान परीसरात वास्तव्यास आहेत.काही दिवसांनी जवळपास वीस नवीन ई रिक्षांची सेवा उपलब्ध होणार आहे. यासाठी आरटीओ ने या ई रिक्षाचे परवडणारे दर निश्चित केल्यास सर्वाना सोयीस्कर होऊ शकते अशी मागणी जोर धरू लागली आहे.

श्रीरंग आप्पा बारणे यांना निवडून देण्यासाठी शिवसैनिक सज्ज

माथेरान : खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे मावळ लोकसभा मतदार संघात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच कर्जतमध्ये शिवसेनेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. कर्जत – खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या नेतृत्वात श्रीरंग आप्पा बारणे यांना बहुसंख्य मताने निवडून देण्यास शिवसैनिक सज्ज आहेत. सलग दोनदा खासदारकीचा प्रदीर्घ अनुभव पाठिशी असणारे आणि पाच वेळा संसदरत्न पुरस्कार प्राप्त झालेले एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले बारणे यांनी मागील लोकसभा निवडणुकीत जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय संपादन केला होता. याही वेळेस त्यांना विकास कामाच्या जोरावर आणि समस्त शिवसैनिकांच्या बळावर पुन्हा एकदा विजयश्री मिळवून देण्यासाठी कर्जत खालापूर मतदार संघातील शिवसैनिक सज्ज झाले असून श्रीरंग बारणे कर्जतमध्ये आले असता त्यांचे शिवसेनेच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. बाळासाहेब भवन येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी औक्षण केल्यावर  जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी बारणे यांना हॅट्रिक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

एमएमआरडीएच्या नवनगर निर्मितीमुळे १२४ गावे उद्ध्वस्त होण्याची भीती

उरण : शासनाने अटल सेतू प्रभावित क्षेत्रातील उरण, पेण, पनवेल तालुक्यातील १२४ गावांत नवनगर (तिसरी मुंबई) उभी करण्यासाठी एमएमआरडीएला नवे नगर विकास प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे. यामुळे या गावातील नागरिकांचा…

शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन

अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी (29 मार्च ) निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी पेझारी येथे दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.…

रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबतीत राकेश कोकळे यांचे प्रशासकांना निवेदन

माथेरान : माथेरान मधील मुख्य रस्स्यावर लावण्यात आलेले क्ले पेव्हर ब्लॉक निकृष्ट दर्जाचे असल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे किरकोळ अपघात घडत असतात याकामी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते राकेश कोकळे यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रशासक राहुल इंगळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. एमएमआरडीए च्या माध्यमातून जवळपास चाळीस कोटी रुपये खर्च करून दस्तुरी पासून माथेरान गावांपर्यंत पर्यावरण पूरक क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनविण्यात आले होते परंतु अत्यंत घाईगडबडीत ही कामे उरकण्यात आली होती. आणलेले ब्लॉक हे उत्तम दर्जाचे आहेत किंवा नाही याची शहानिशा न करता कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे बहुतेक ठिकाणी कच्चे ब्लॉक होते ते झिजून गेल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. यातून मार्ग काढताना पादचाऱ्यांना तसेच पर्यटक, हातरीक्षा, घोडेवाल्याना खूपच त्रासदायक ठरत असून या खड्ड्यात पडून अनेकजण जखमी झाले आहेत. पुढील दोन महिने सुट्टयांचा हंगाम येत असून खड्डेमय रस्त्यामुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी लवकरच ही कामे पूर्ण करून घ्यावीत असे राकेश कोकळे यांनी निवेदनात म्हटले आहे. यावर लवकरच ठोस उपाययोजना करण्यात येईल असे उत्तम प्रशासक तथा कार्यक्षम मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सांगितले.