Category: ठाणे

Thane news

शिमग्यासाठी कळव्यातून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने सोडल्या मोफत बस

अनिल ठाणेकर ठाणे- कावेरी सेतु ,कळवा येथे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारातून सालाबाद प्रमाणे या ही वर्षी शिमगोत्सवासाठी कोकणातील नागरिकांना मोफत बस सेवा पुरविण्यात आली. शनिवारी रात्री जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी या बसगाड्यांना हिरवा झेंडा दाखविला. शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी संख्या असते. मात्र, एसटी आणि रेल्वेचे आरक्षण अनेकांना मिळत नाही. त्यावर तोडगा काढण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून डॉ.जितेंद्र आव्हाड हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांसाठी मोफत बससेवा पुरवित असतात. त्याच अनुषंगाने शनिवारी रात्री कावेरी सेतू येथील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयापासून बसगाड्या सोडण्यात आल्या. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह नगरसेवक अभिजीत पवार, युवती कार्याध्यक्ष पुजा शिंदे, दिपा गावंड, सपना पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मनोज प्रधान यांनी सर्व नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भारतीय इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन कल्याण :  कल्याण पश्चिम येथील गौरीपाडा परिसरातील भारतीय इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रयोगांचे आकर्षक प्रदर्शन आयोजित केले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थापक प्रभाकर जाधव आणि मुख्याध्यापिका सोनाली धाकराव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विज्ञान प्रदर्शन यशस्वीरीत्या पार पडले. या प्रदर्शनात एकूण ४८ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित प्रयोग सादर केले. विद्यार्थ्यांनी ऊर्जा संवर्धन, पर्यावरण संरक्षण, अंतराळ विज्ञान, रोबोटिक्स तसेच दैनंदिन जीवनातील विज्ञान या विषयांवर प्रात्यक्षिके सादर करून आपली गुणवत्ता दाखवून दिली. कार्यक्रमास इतर विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रयोग पाहून त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले. शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रसंगी मुख्याध्यापिका सोनाली धाकराव यांच्यासह शिक्षिका वैशाली दळवी, जयंश्री वानी, अर्चना अर्कल, प्रीती गौड, पल्लवी जायसवाल, कविता घेवादे तसेच शिक्षक राजेश परमार, संगीता सिंह आणि प्रणाली काळे उपस्थित होते. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड आणि जिज्ञासा अधिक वाढली आहे. अशा उपक्रमांमुळे त्यांचा आत्मविश्वासही बळकट होतो, असे मत व्यक्त करण्यात आले.

भावी पोलिसांची रस्त्यावरील परवड थांबवा –  प्रताप सरनाईक

भावी पोलिसांची रस्त्यावरील परवड थांबवा –  प्रताप सरनाईक मिरा-भाईंदर- ‘राज्याच्या सुरक्षेची धुरा भविष्यात ज्यांच्या खांद्यावर असणार आहे, त्या तरुण उमेदवारांना आज मिरा-भाईंदरमध्ये उघड्यावर रात्र काढावी लागणे, ही प्रशासनासाठी अत्यंत लज्जास्पद बाब आहे,’ अशा कठोर शब्दांत महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रशासकीय ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी पोलीस भरतीसाठी आलेल्या हजारो युवक-युवतींच्या निवासाची आणि मूलभूत सुविधांची तत्काळ व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांच्यात नियोजनाचा अभाव असल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचा ठपका पत्रात ठेवण्यात आला आहे. सोबतच मिरा-भाईंदर महानगरपालिकेची सभागृहे, एमएमआरडीए (MMRDA) आणि बीएसयूपी (BSUP) अंतर्गत असलेल्या रिक्त सदनिका पोलीस भारती देण्यासाठी आलेल्या उमेदवारांसाठी तात्काळ खुल्या कराव्यात, अशी सूचना देखील आयुक्तांना करण्यात आली आहे. प्रशासकीय दिरंगाई होत असतानाच, उमेदवारांच्या भोजनाची संपूर्ण जबाबदारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्वतः आणि त्यांच्या शिवसेना संघटनेच्या वतीने स्वीकारली असल्याचे हि या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.यासंपूर्ण प्रकरणाबद्दल बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात कि, ‘दोन-दोन दिवस उन्हातानात तग धरून हे तरुण आपल्या भविष्याची परीक्षा देत आहेत. जे उद्या कायदा व सुव्यवस्था राखणार आहेत, त्यांनाच आज सुरक्षित आसरा न मिळणे हे वेदनादायी आहे. प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून यावर ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा ही अनास्था खपवून घेतली जाणार नाही. तसेच भविष्यातील भरती प्रक्रियेसाठी कायमस्वरूपी ‘समन्वय आराखडा’ तयार करावा” प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून सकारात्मक पावले न उचलल्यास, उमेदवारांच्या हक्कासाठी अधिक आक्रमक भूमिका घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

केडीएमसी-धर्माधिकारी प्रतिष्ठानची विशेष स्वच्छता मोहीम यशस्वी

केडीएमसी-धर्माधिकारी प्रतिष्ठानची विशेष स्वच्छता मोहीम यशस्वी कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका व महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने  संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन आज करण्यात आले होते. कल्याण पश्चिमेत महापौर हर्षाली चौधरी ,आयुक्त अभिनव गोयल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील  इतर पालिका सदस्य यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात स्वच्छता मोहीम राबविली तर डोंबिवली पूर्वेत महापालिका कार्यालयानजीकच्या परिसरात उपमहापौर राहुल दामले व इतर पालिका सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या सह १०० पोलिसांनी देखील या मोहिमेत सहभाग घेतला. महापालिकेच्या प्रभागांतही मनपा स्वच्छता अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य तसेच पालिका सदस्य यांनी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. आमदार राजेश मोरे व सुलभा गायकवाड यांनी देखील इतर पालिका सदस्यांसमवेत स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. या मोहिमेदरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यावरील कचरा, धुळ ,माती साफ सफाई करून घंटागाडी,डंपर मार्फत संकलित करण्यात आली. सुमारे १७५८० किलो ओला कचरा आणि ४६९९६ सुका कचरा यावेळी संकलित करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेकरिता महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे जवळपास ४००० सदस्य व महापालिकेचे जवळपास १००० कर्मचारी तसेच पालिका सदस्य सहभागी झाले होते.

बालक मंदिर संस्था आयोजित विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

बालक मंदिर संस्था आयोजित विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद कल्याण :  शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कला ही अत्यंत महत्त्वाची आहे. कला विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासाला चालना देते. त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो आणि सर्जनशीलता वाढते. विद्यार्थ्यांच्या जन्मजात प्रतिभांना वाव मिळावा या उद्देशाने, कल्याणमधील बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेने गेल्या नऊ वर्षांपासून ही जिल्हास्तरीय आंतरशालेय रंगभरण आणि हस्ताक्षर स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली आहे. आणि हे वर्ष स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. नेहमीप्रमाणे, इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय आंतरशालेय रंगभरण आणि हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बहुतेक शाळांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावर्षी या स्पर्धेला सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सर्व शाळांमधील सुमारे ५००० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी कठोर परिश्रम घेतले. या वर्षीच्या स्पर्धेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी या स्पर्धांमध्ये दोन नाविन्यपूर्ण स्पर्धा जोडण्यात आल्या आहेत: एकपात्री अभिनय आणि समूह गायन. या दोन्ही स्पर्धा पहिल्यांदाच होत असल्याने, सहभागींची संख्या तुलनेने कमी होती, परंतु प्रतिसाद आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त होता. सुमारे २०० स्पर्धकांनी या स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतला. तसेच, स्पर्धेसाठी आलेल्या सर्व शाळांनी आयोजक म्हणून काम करणाऱ्या आमच्या बालक मंदिर संस्थेबद्दल स्पर्धकांनी खूप सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार, २८ फेब्रुवारीला कल्याण येथील बालक मंदिर संस्थेच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  निखिल राणे (स्मायलिंग व्हिसलर), सुधीर चित्ते (रंगकर्मी) आणि रमेश गोरे, बालक मंदिर संस्था प्राथमिक शाळेचे अध्यक्ष उपस्थित होते.

 किडनी पेशंटला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मदत

किडनी पेशंटला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मदत कल्याण: कल्याणमधील किडनी पेशन्टला  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रामबाग शाखेतर्फे रूपये ५० हजार रुपयांची  मदत करण्यात आली.  शिवसेना रामबाग शाखेचे निष्ठावंत शिवसैनिक व ओम कबड्डी संघाचे खेळाडू मंगेश नेटावटे यांना किडनीचा मोठा आजार झाला. त्यांना आता डायलीसच्या मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागणार आहे. त्यांना मीरा हॉस्पिटल मध्ये पंधरा दिवस उपचार घ्यावे लागले, मीरा हॉस्पिटल ने त्यांना बिल कमी करून भरपुर सहकार्य केले. त्यांचा डायलीसीसच्या मोठ्या खर्चाचा विचार करून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी  मार्गदर्शनाखाली  रामबाग शाखेने तसेच  शिवजयंती उत्सवात तर्फे रू.५० हजरांचा धनादेश देऊन सहकार्य केले.

अपघात मुक्त प्रवास ‘ हेच परिवहन विभागाचे उद्दिष्ट-प्रताप सरनाईक

अपघात मुक्त प्रवास ‘ हेच परिवहन विभागाचे उद्दिष्ट-प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर ठाणे, राज्याच्या परिवहन विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विभागाच्या कार्याचा गौरव करताना, ‘हा केवळ एका विभागाचा वर्धापन दिन नसून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि लोकसेवेच्या अखंड परंपरेचा उत्सव आहे,’ असे प्रतिपादन केले. वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवर, अधिकारी वर्ग, कर्मचारी बांधव-भगिनी आणि नागरिकांना शुभेच्छा देताना नाईक म्हणाले की, परिवहन विभाग हा राज्याच्या अर्थकारणाचा आणि सामाजिक जीवनाचा कणा आहे. रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करणे नव्हे तर ‘अपघात मुक्त प्रवास’ हेच भविष्यात परिवहन विभागाचे उद्दिष्ट असले पाहिजे! ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच उद्योग-व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी हा विभाग थेट जोडलेला आहे. दुर्गम आदिवासी पाड्यांपासून ते महानगरांपर्यंत सुरक्षित, शिस्तबद्ध  वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे ही विभागाची अभिमानास्पद परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विभागात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यात आल्याचे सांगताना त्यांनी ऑनलाइन परवाना प्रक्रिया, डिजिटल सेवा, रस्ता सुरक्षा उपक्रम आणि अवैध वाहतुकी विरुद्धची कठोर कारवाई यांचा विशेष उल्लेख केला. ‘आपल्या कर्मचाऱ्यांचे कष्ट, समर्पण आणि शिस्तबद्ध कामगिरी हीच विभागाची खरी ताकद आहे,’ असे ते म्हणाले. उन्हाळा, पावसाळा किंवा कोणतीही प्रतिकूल परिस्थिती असे – परिवहन विभागाचे कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात, याचा अभिमान असल्याचे सरनाईक यांनी व्यक्त केले. आगामी काळात सुरक्षित, हरित आणि स्मार्ट परिवहन सेवा उभारणी हे शासनाचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्ता सुरक्षा जनजागृती, पर्यावरणपूरक वाहने, पारदर्शक प्रशासन आणि जनसहभाग यावर अधिक भर देऊन राज्याच्या विकासाला नवे वेग देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमाला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्या सह परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कुटुंबियांसह उपस्थित होते.

एक गाव – एक होळी संकल्पनेची तपपूर्ती

एक गाव – एक होळी संकल्पनेची तपपूर्ती ठाणे : चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट, ठाणे यांच्या विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गावकीची होळी होळीच्या एक दिवस आधी रविवार, १ मार्चला विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. सुमारे ८४ वर्षापूर्वी खंडीत झालेली ही परंपरा २०१५ साली जमात ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रकांत नाखवा यांनी सुरु केली. यंदा या उत्सवाचे १२ वे वर्ष होते, त्यामुळे एक गाव एक होळी या संकल्पनेची तपपूर्ती मोठ्या उत्साहात साजरी केली. सुरुवातीला परंपरेनुसार होळी मातेच्या अग्रपूजेचा मान नवदांपत्याला देण्यात आला. त्यानुसार जमात ट्रस्टचे विश्वस्त जमीर कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री प्रियंका विहंग कोळी, प्रांजल भावेश ठाणेकर, प्रभुती कैवल्य ठाणेकर, केतकी वैभव ठाणेकर, स्मिता रोहित कोळी, अमृता धीरज पाटील, अक्षता तन्मय कोळी, जागृती जित बारांगुळ, कोमल सन्मान कोळी या दांपत्यांनी होळी मातेची रितसर विधिवत पूजा केली. त्यानंतर कोळी गाण्यांच्या गजरात जमात ट्रस्टचे अध्यक्ष अमरेश ठाणेकर यांनी होळीला अग्नी दिला. चेंदणी कोळीवाड्याचा १२ वा गावकीचा होलिकोत्सव यावर्षी पूर्व ठाण्यात कोळीवाड्यातील विठ्ठल मंदिराच्या परिसरात साजरा करण्यात आला. याआधीचे सात पूर्वेत आणि पाच उत्सव पश्चिम भागात साजरे झाले. गावकीची ही परंपरा पुन्हा सुरु करण्यात जमात ट्रस्टचे माजी अध्यक्ष चंद्रकांत नाखवा यांनी विरोध सहन करून पुढाकार घेतला होता. यासंदर्भात चंद्रकांत नाखवा म्हणाले, चेंदणी कोळीवाड्यात एक गाव एक होळी ही परंपरा खूप आधी सुरु होती. पण ८५ वर्षापूर्वी ही परंपरा खंडित झाली. २०१५ साली  जमात ट्रस्टचा अध्यक्ष असताना पुन्हा एक गाव एक होळी ही संकल्पना पुढे आली. मी आणि माझ्या कार्यकलरिणीतील सर्वच सदस्यांनी त्याला पाठिंबा देत सुरुवात केली. त्यावेळी काही लोकांनी त्यास विरोध केला, पण त्यांची समजूत घालण्यात आली. त्यावेळी हरियाली तलावाचा काही भाग सुकला जायचा. त्याठिकाणी होळी लावली जात असे. २०१५ साली हा उत्सव साजरा करताना गावकऱ्यांनी एक अट टाकली. होळीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरासमोर लागणारी कुटुंबीयांची होळीही दारात लागणार. माझ्या कार्यकारीकरिणीसह सर्वांनी गावकीची ही अट मान्य केली. २०१५ साली गावाचा पाटील म्हणून मला होळी पेटवण्याचा मान देण्यात आला.  पश्चिम विभागात होळी लावण्यासाठी लागणारा गाडा मी उपलब्ध करुन देतो. होळी मातेच्या अग्रपूजेचा मान नवदाम्पत्याला देण्याची प्रथा आजही पाळली जाते. तरुण वर्गानेही सक्रिय होत या उत्सवात काळाप्रमाणे बदल केलेत. होळीसाठी म्हणून दरवर्षी ड्रेसकोड असतो. त्यालाही गावकीचा चांगला प्रतिसाद असतो. उत्सव साजरा करताना बदल पाहिजेत. आतापर्यंत तन,मन, धनाने माझा सहभाग असतोच तो नेहमीच असेल.

शिकाऱ्यांच्या टोळीकडून बिबटयाची क्रूरपणे हत्या

शिकाऱ्यांच्या टोळीकडून बिबटयाची क्रूरपणे हत्या हाताचे पंजे तोडून नखे केली लंपास दोन जणांना अटक ठाणे : शहापूर उपवनसंरक्षकांच्या कार्यक्षेत्रातील वाशाळा वनपरिक्षेत्रातील मौजे ढाकणे चिंध्याचीवाडी कळभोंडा येथे नदीच्या पात्रालगत एक मृत…

वर्दळीच्या ठिकाणी उभारलेल्या मोबाईल टॉवरमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

वर्दळीच्या ठिकाणी उभारलेल्या मोबाईल टॉवरमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात दिलेली परवानगी रद्द करून पर्यायी सुरक्षित ठिकाण निश्चित करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यालयासमोरील शंकरराव चौक येथील वाहतूक बेटावर…