पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे विचार आजच्या स्त्रियांनी अंगीकारणे ही काळाची गरज
ठाणे : जगाच्या इतिहासाची पाने चाळत असताना अनेक राजे महाराजे यांचे विविध चरित्र आपणास इतिहासात दिसून येतात यात अनेक स्त्रियांचे योगदानही मोलाचे दिसून येते. काही स्त्रियांनी इतिहास निर्माण करणारे योद्धे घडवली तर काही स्त्रियांनी स्वकर्तृत्वानेच इतिहास घडविलेला दिसतो. याचेच जगाच्या पाठीवरचे ज्वलंत, दैदिप्यमान, नेत्रदीपक उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. यांचं अहिल्यादेवी होळकर यांचे विचार महिलांनी अंगीकारणे हीच काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ प्रतीक्षा बोर्डे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक,मासुंदा तलाव ठाणे येथे धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने रविवारी संध्याकाळी पाच ते सात या वेळामध्ये हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यंदाचे वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष असल्याने हळदी कुंकू समारंभात उपस्थित महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पराक्रमाची माहिती देण्यात आली या कार्यक्रमात डॉ प्रतीक्षा बोर्डे बोलत होत्या.या कार्यक्रमाला माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेविका नंदिनी विचारे,रूपाली शिंदे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाचा अध्यक्षा माधवी बारगीर,सचिव गायत्री गुंड, संगिता खटावकर,सुषमा बुधे, सीमा कुरकुंडे, मीना कवितके, सुजाता भांड,मनीषा शेळके,स्मिता गावडे,अमृता बुधे,शीतल डफळ आदिसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पुढे बोलताना प्रतीक्षा बोर्डे म्हणाल्या की आजही एकविसाव्या शतकातील स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीनेच नव्हे तर एक पाऊल पुढे टाकून सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत याचा अभिमान वाटतो. राजकारण, समाजकारण, धर्मकारण, खेळ, इत्यादी सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.आजच्या महिलांनी आपल्या पाल्ल्यांना कार्टून चॅनल दाखवून भविष्य काळातील जोकर घडवण्या पेक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा क्रांतिकारी विचार बालकांच्या मनावर बिंबवले तर पुढील पिढया कडून आपण खूप मोठ्या क्रांतिकारी इतिहासाची अपेक्षा ठेऊ शकतो. माता हीच बालकाची पहिली गुरु असते .ज्याप्रमाणे अहिल्याबाईंनी त्यांच्या समोर उभ्या असलेल्या असंख्य संकटाचा सामना मोठ्या धैर्याने केला.याकामी त्यांना त्यांनी वाचन केलेले धर्मग्रंथ महापुरुषांचे चरित्र कामी आले . आजच्या स्त्रियांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई चे विचार आत्मसात करणे,समाज उपयोगी विचारांचा प्रसार,प्रचार करणे, अनावश्यक (घातक) पाश्चात्य संस्कृती टाळून ,भारतीय संस्कृती अंगीकारणे हीच काळजी गरज असल्याचे मार्गदर्शन डॉ प्रतीक्षा बोर्डे यांनी उपस्थित महिलांना केले.