Category: ठाणे

Thane news

मच्छीमारांनो सावधान! १ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी

नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील मच्छीमारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. समुद्रातील मासळीच्या साठ्याचे जतन करण्यासाठी आणि पावसाळ्यातील वादळी हवामानापासून मच्छीमारांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी शासनाने यंदा १ जून ते ३१ जुलै  या कालावधीत पावसाळी मासेमारीवर अधिकृत बंदी जाहीर केली आहे. ठाणे-पालघर जिल्ह्याचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त (तांत्रिक) दिनेश पाटील यांनी या संदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीत समुद्रातील माशांचा प्रजोत्पादन काळ असतो, त्यामुळे या बंदीमुळे मासळीच्या बीज निर्मिती प्रक्रियेला मोठा वाव मिळून समुद्रातील मासळीचा साठा वाढण्यास मदत होते. मत्स्यव्यवसाय विभागाने दिलेल्या आदेशानुसार, ही पावसाळी मासेमारी बंदी सर्व प्रकारच्या यंत्रचलित आणि यांत्रिक नौकांना पूर्णपणे लागू राहील. मात्र, पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचलित नौकांना या बंदीतून सवलत देण्यात आली आहे. सध्या समुद्रात गेलेल्या सर्व यांत्रिक नौकांनी ३१ मे पूर्वीच आपापल्या बंदरांमध्ये परतणे बंधनकारक करण्यात आले असून, १ जून किंवा त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरांवर मासे उतरवण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच, राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंतच्या क्षेत्राबाहेर खोल समुद्रात जाणाऱ्या नौकांना केंद्र शासनाचे धोरण व मार्गदर्शक सूचना लागू राहतील. या शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन सर्व मच्छीमार सहकारी संस्थांना करण्यात आले आहे. जर बंदीच्या काळात कोणतीही यांत्रिक नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करताना आढळली, तर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम अंतर्गत ती नौका, त्यावरील उपसाधने आणि पकडलेली मासळी जप्त करून संबंधित मालकावर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. इतकेच नव्हे तर, बंदीच्या काळात समुद्रात जाऊन अपघात झाल्यास अशा नौकेला शासनाकडून कोणतीही आर्थिक नुकसान भरपाई मिळणार नाही, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व नौकामालकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आले आहे.

 ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, ६ जणांना अटक ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली २७ मे रोजी एक मोठी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अनेक अन्न व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी विविध अन्न आस्थापनांची तपासणी करून तब्बल ७ लाख ३० हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा संशयास्पद साठा जप्त केला आहे. यामध्ये १,४९,७२४ रुपयांचे खाद्यतेल, ९३,८३० रुपयांचे फरसाण, २,०६,८०० रुपयांचे तूप, ८,१९० रुपयांचे हक्का नुडल्स, १७,१०० रुपयांची ताडी, ५४,०९६ रुपयांचे शरबत आणि १,९७,६४० रुपये किंमतीच्या डिंकाचा (गम अरेबिक) समावेश आहे. याशिवाय, याच दिवशी प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून ४,५३,३४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाने सर्व अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे कडक आवाहन केले आहे. नागरिकांना अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा किंवा वागळे इस्टेट, ठाणे येथील सह आयुक्त कार्यालयात लेखी तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अशी कडक कारवाई यापुढेही नियमितपणे सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त दीपक झिंजाड, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी…

केडीएमसीने बदलले जुने धोकादायक २६८ पथदिवे पोल

कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दिवाबत्ती सेवे करीता एकूण ३३ हजार ८७० पथदिवे पोल व ४१ हजार ९०७ लाईट बसविण्यात आलेले आहेत.  तसेच प्रभागनिहाय कार्यलयीन इमारती, दवाखाने, हॉस्पीटल, आराग्येकेंद्रे इ. आस्थापना…

मोहने येथील एन.आर.सी. कामगारांचा नवीन कराराला तीव्र विरोध

अदानी समूहासोबतच्या बैठकीनंतर कामगारांमध्ये संताप कल्याण : गेल्या वीस वर्षापासून मोहने येथील एनआरसी कारखाना बंद असून कामगारांना अद्याप त्यांची हक्काची देणी मिळालेली नाहीत. एनसीएलटी कोर्ट मुंबई आणि दिल्ली येथे कामगार न्यायालयात कामगारांच्या न्याय हक्कासाठी आयटक आणि महाराष्ट्र जनरल कामगार युनियन कामगारांच्या बाजूने लढा देत आहेत. हा लढा अंतिम टप्प्यात आला आहे. कामगार युनियन च्या माध्यमातून कामगारांची देणी देण्यासंदर्भात कामगारांच्या प्रतिनिधींची नुकतीच मुंबई येथे एन.आर.सी युनिट अदानी व्यवस्थापना सोबत पार पडलेल्या बैठकीत आयटक आणि महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे प्रतिनिधी म्हणून एस. शुक्ला उपस्थित होते. या बैठकीमध्ये कामगार विरोधी करार पाहून शुक्ला यांनी या कराराला विरोध केला. या नवीन करारानुसार  कामगारांवर अन्याय होत असल्याचे स्पष्ट करत शुक्ला यांनी कराराला कडाडून विरोध केला. प्रतिनिधी म्हणून एस शुक्ला उपस्थित असल्याने घडलेला प्रकार समोर आला असून या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या बैठकीमुळे कंपनी व्यवस्थापन आणि काही संघटनांमध्ये संगनमत झाल्याची चर्चा कामगारांमध्ये जोर धरू लागली आहे. तसेच हा करार संगनमताने झालेला असून कामगार विरोधी असल्याचे कामगारांचे मत कामगारांनी व्यक्त केले. आयटक आणि एनआयसी मजदूर संघ यांनी केलेला करार हा सर्वसामान्य कामगारांच्या हिताला बाधा आणणारा असून, यामध्ये कामगारांच्या हक्कांबाबत कोणतीही ठोस भूमिका आणि कामगारांचे हित नसल्याचा आरोप संतप्त कामगारांनी केला आहे. इतकी वर्ष वाट पाहून जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर हा करार आम्हाला मान्य नसल्याचे कामगारांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात एन.आर.सी. परिसरातील कामगार चळवळ अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजप नगरसेविका वर्षा भानुशाली यांच्याकडून दलित चर्मकाराचा छळ

गळ्यात मंडकं आणि मागे झाडू बांधून आंदोलन मिरा -भाईंदर : महानगरपालिका प्रशासनाने मिरा-भाईंदर शहरातील चर्मकार समाजातील बेरोजगारांना चर्मकार व्यवसायासाठी गटई स्टॉल मंजूर केले होते. हे गटई स्टॉलधारक नियमानुसार शहरात आपला व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र त्यांच्यावर कारवाई करून त्यांना देशोधडीला लावण्याचे काम सुरू झाले आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक संपन्न झाल्यानंतर बहुमताने भाजप नगरसेवक निवडून आले. या बहुमताच्या जोरावर विशेषता शहरातील ज्या विभागात गुजराती राजस्थानी नगरसेवक जास्त आहेत, अशा ठिकाणाच्या नगरसेवकांनी मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनावर दबाव टाकून चर्मकार समाजाला त्रास देणे सुरू केले आहे. या प्रकारानुसार या प्रभागातील काही गुजराती राजस्थानी भाजप नगरसेवकांतर्फे मनपा प्रशासनावर दबाव टाकून यांच्यामार्फत त्यांनी महापालिकेस सदर स्टॉल हटवीण्यासाठी नोटीस काढण्यास लावली आहे. यावर सदर स्टॉल धारकाने सभापती श्रीमती वर्षा भानुशाली यांना १९ फेब्रुवारी रोजी आमच्या स्टॉलवर कारवाई करू नका, अशा पद्धतीने दया याचना केली होती, मात्र या नगरसेविकेने तुमच्यावर कारवाई होणारच असे या स्टॉलधारकास सांगितले. यामुळे महापालिका प्रशासनाने स्टॉल परवानगी रद्द केली. त्यामुळे या गरीब कुटुंबांने सदर स्टॉलला कर्ज काढून केलेला खर्च कुठून परतफेड करायचा ? तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा धारकाला दिलेली करायचा? या विवंचनेतून या कुटुंबाने नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सदर सागर कुंभारे आणि त्यांची पत्नी भाग्यश्री या युवक युवतींचा मोठा साडेतीन वर्षाचा मुलगा आदर्श, आणि पाळण्यातील चार महिन्याच्या नील या मुलास घेऊन हे कुटुंब उपोषण स्थळी बसलेले आहेत. मात्र १२ मे रोजी सुरू केलेल्या या उपोषणास एवढे दिवस झाले, तरीही महापालिका प्रशासन किंवा भाजप पक्षाचे कोणीही नेते या गरीब कुटुंबास भेटण्यास आले नाही. २६ मे रोजी कुंभारे यांनी गळ्यात मंडकं बांधून तसेच मागे झाडू बांधून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अटक करून सोडून दिले. यावर वंचित आघाडीने त्यांना समर्थन दिले असून हे आंदोलन शहरभर पसरविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष इकबाल महाडिक यांनी सांगितले.

प्रगणकांनी घेतले जनगणना विषयक प्रशिक्षण राष्ट्रीय कामात सहभाग नोंदवा

आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आवाहन अशोक गायकवाड नवी मुंबई : जनगणना २०२७ चे काम नियोजनबध्द रितीने सुरू असून प्रगणकांव्दारे घरोघरी जाऊन गृहगणना केली जात आहे. या अनुषंगाने महानगरपालिका मुख्यालयात ज्ञानकेंद्र येथे १५० हून अधिक प्रगणकांच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण फिल्ड ट्रेनर यांच्यामार्फत उत्तम रितीने पार पडले. प्रशिक्षणानंतर एपीएमसी, सिडको तसेच शासनाच्या विविध विभागातील कर्मचारी समाधान व्यक्त केले आणि जनगणनेचे काम करण्यास स्वेच्छेने स्वीकृती दर्शवली. महाराष्ट्र राज्यामध्ये जनगणनेचे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याचे काम दिनांक १६ मे पासून सुरू झाले आहे. हे काम दिनांक १४ जून पर्यंत सुरू असणार आहे. तरी सर्व नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांना जनगणनेविषयक आपल्या घराची व कुटुंबाची सत्य माहिती द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. आपल्या घरी येणारे प्रगणक हे शासकीय कर्मचारी असून या राष्ट्रीय कामामध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे त्यामुळे नागरिकांनी त्यांचे स्वागत करावे आणि त्यांना आवश्यक संपूर्ण माहिती पुरवावी. ही माहिती राष्ट्रीय नियोजनाप्रमाणेच त्या त्या क्षेत्रामध्ये शासकीय योजना राबवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. आपल्या क्षेत्रातील विकास कामे ही या आकडेवारीवर अवलंबून असतात याची नोंद घ्यावयाची आहे. तरी नागरिकांनी आपल्या घरी येणा-या प्रगणकाचे अधिकृत ओळखपत्र तपासून त्यांना आवश्यक माहिती पुरवावी आणि जनगणनेच्या राष्ट्रीय कामामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रमुख जनगणना अधिकारी तथा महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे सार्वजनिक कर्ज १० लाख कोटींच्या पुढे

कल्याण : राज्यातील जवळपास तीन लाख लघु कंत्राटदार आणि विकासकांना पूर्ण केलेल्या शासकीय प्रकल्पांची देयके न देता भाजपप्रणीत महाराष्ट्र सरकार त्यांना आर्थिक विनाशाच्या उंबरठ्यावर आणत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस…

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना महापालिकेचा दिलासा

ठाणे: ठाणे महानगरपालिकेकडून यंदाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू माती तसेच पर्यावरण पूरक साहित्य वापरून गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर मोफत जागा उपलब्ध करून देण्याचा…

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये पोलिसांचे पथसंचलन

दुर्गाडी किल्ला परिसरात कडेकोट बंदोबस्त, पोलिस प्रशासन सतर्क कल्याण : बकरी ईदच्या नमाजच्या पार्श्वभूमीवर तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून देण्यात आलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलिसांनी बुधवारी सायंकाळी शहरात पथसंचलन केले. विशेषतः दुर्गाडी किल्ला परिसर आणि संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या दुर्गामाता मंदिराशेजारील ईदगाहमध्ये दरवर्षी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने बकरी ईदची नमाज अदा करतात. नमाजसाठी मोठी गर्दी होत असल्याने रस्त्यावरही नमाज अदा केली जाते. याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रवेश आणि पूजा-अर्चनेचा मुद्दा दरवर्षी चर्चेत येत असतो. काही हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे की नमाजच्या वेळी हिंदू भाविकांना मंदिरात प्रवेश रोखला जातो. तसेच नमाज सुरू असताना घंटानाद होऊ नये म्हणून मंदिरातील घंटादेखील बांधण्यात येतात. या मुद्द्यावरून दरवर्षी आंदोलन केले जाते. सुमारे ४० वर्षांपूर्वी शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी नमाजच्या वेळी मंदिर प्रवेशाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर दरवर्षी ईदच्या काळात पोलिस प्रशासन विशेष सतर्कता बाळगत आहे. यंदा भाजपच्या वतीनेही नमाजच्या वेळी मंदिर प्रवेशाची मागणी केल्याने पोलिस प्रशासनाची धावपळ वाढली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी पोलिसांनी पथसंचलन केले. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. ०००००००