Category: ठाणे

Thane news

 टिटवाळा स्टेशन परिसरात वाहतूक शाखेची धडक कारवाई

५३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई, ४० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल कल्याण : टिटवाळा स्टेशन परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग आणि नियमांचे सातत्याने होणारे उल्लंघन याविरोधात स्वतंत्र वाहतूक शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली असून विविध मोटार वाहन कायद्यांतर्गत एकूण ५३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत नो पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या तब्बल ४० दुचाक्यांवर कारवाई करण्यात आली असून ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या एका वाहनचालकावर, वाहन चालविताना परवाना जवळ न बाळगणाऱ्या चार जणांवर तसेच विनायूनीफॉर्म वाहन चालविणाऱ्या सात वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या संपूर्ण मोहिमेत एकूण ४० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कल्याण तालुका पोलीस ठाण्यांतर्गत वाहतूक शाखेकडून टिटवाळा स्टेशन परिसरात ही विशेष मोहीम राबवण्यात आली. वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पी. बी. घोरपडे, पोलीस शिपाई निलेश मोरे, पोलीस शिपाई अमित पवार आणि महिला पोलीस शिपाई वैशाली ढेरे यांनी ही कारवाई केली. स्टेशन परिसरातील बेशिस्त पार्किंग आणि वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर नियंत्रण आणण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, टिटवाळ्यासह ठाणे ग्रामीण परिसरासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे शहराध्यक्ष ॲड. जितेंद्र जोशी यांनी सातत्याने लावून धरली होती. वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणारा शहर विस्तार, स्टेशन परिसरातील गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले होते. ००००००००

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात माजी पंतप्रधान ‘पंडित जवाहरलाल नेहरु’ यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभ‍िवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, दीपक झिंजाड, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, सुरक्षा अध‍िकारी घनश्याम फर्डे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

 दिव्यातील वीज समस्येने नागरिक त्रस्त

स्थानिक नगरसेवकांनी लक्ष देण्याची मागणी दिवा, दि. २७ मे : कडक उन्हाळ्यात दिवा परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. उकाड्यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत असून स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेऊन तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दिव्यात वाढत्या वीज चोरीचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याचे बोलले जात आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त ताण येत असून त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याने किंवा तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पूर्ववत होण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे मोठ्या लोकवस्तीच्या भागासाठी एकाच ट्रान्सफॉर्मरवर भार असल्याने त्याची देखभाल आणि दुरुस्ती वारंवार करावी लागत आहे. दिव्यातील काही भागात दिवसातून एक ते दोन वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्याच्या वेळेतही वीजपुरवठा बंद होत असल्याने अनेकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित वीज कंपनीने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दिवेकरांकडून जोर धरत आहे. ०००००००

येऊरमधील अनधिकृत बंगले पुन्हा चर्चेत

अनधिकृत नळजोडणी, बंगल्याची वन विभाग आणि महापालिकेकडे कागदोपत्री नोंदच नाही ठाणे : येऊर आणि अनधिकृत बंगले यांची सांगड जुनीच आहे.  अनधिकृत नळ जोडणी, स्विमिंग पूल आणि महिन्याला हजारो रुपयांची कमाई करून देणाऱ्या बंगल्याची महापालिका सोडाच पण आदिवासींच्या वन जमिनीवर बांधलेल्या बंगल्याची वन विभागाकडे कुठलीही कागदोपत्री नोंदच नसल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे. सर्वश्री गणेश टाक, गौतम मोरे, संजय पडवळ आणि हितेश राठोड या चौघा मित्रांनी २०१०-११ दरम्यान वन विभाग शेणाचा पाडा येथील जागा भूमापन क्र न स ७ उपविभाग १५(७/१७) ही १० गुंठे  जागा विकत घेतली होती. त्यानंतर काही वर्षांनी गणेश टाकने हितेश राठोडला त्याचे पैसे परत दिले. यादरम्यान घेतलेल्या जमिनीत भराव टाकून त्याठिकाणी बोअर वेल, वृक्षारोपण केले होते. नंतर गणेश टाकने इतर दोघांना डावलून त्याठिकाणी जलतरण तलाव असलेल्या हेरंब फार्म नावाचे पक्के अनधिकृत बांधकाम केले. विशेष म्हणजे ठाणे महापालिकेच्या पाणी विभागाचा कंत्राटदार असलेल्या गणेश टाकने या फॉर्ममध्ये १इंची पाण्याची पाईप लाईनही जोडून घेतली. बेकायदेशीर असलेला हा फॉर्म शनिवार – रविवार भाड्याने देऊन महिन्याला हजारो रुपयांची कमाई करत आहे. या बंगल्यासंदर्भात प्रशासनाकडे विचारणा केली असता, या बंगल्याची आमच्याकडे कुठल्याही प्रकारची नोंद नसल्याचे ठाणे महापालिका आणि वन विभागाने लिहून दिले आहे. महापालिकेचा हजारो रुपयांचा महसूल बुडवणारा गणेश टाक हा महापालिकेचा कंत्राटदार असल्याने त्या बंगल्यावर कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.

– ३७ वर्षांनंतरही मफतलाल कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत

थकबाकी देण्याची कामगारांची मागणी ठाणे : कळवा येथील मफतलाल इंजिनिअरिंग इंडस्ट्रियल लिमिटेड कंपनी बंद होऊन तब्बल ३७ वर्षे उलटूनही हजारो कामगारांना अद्याप न्याय मिळालेला नसल्याची खंत मफतलाल कामगार संघर्ष समितीने व्यक्त केली आहे. कंपनीची जमीन विकून कामगारांचे पीएफ, निवृत्तीवेतन आणि इतर थकबाकीची देणी तातडीने द्यावीत, अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे.२७ मे १९८९ रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनी बंद करण्यात आली होती. त्यामुळे २२०३ कामगार बेरोजगार झाले. त्यापूर्वी १९८६ मध्ये ९२३ कामगारांना सक्तीने निवृत्त करण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. २५ वर्षांहून अधिक सेवा बजावलेल्या कामगारांना अपमानास्पद पद्धतीने बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तत्कालीन कामगार नेते आणि स्वातंत्र्यसैनिक आप्पा सामंत यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेले होते. सर्वोच्च न्यायालयाने कामगारांना पुन्हा सन्मानाने कामावर घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, व्यवस्थापनाने या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. त्यानंतर उर्वरित कामगारांनाही १९८९ मध्ये बाहेर काढण्यात आले.कामगारांनी १९९० मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, कंपनीचे कथित गैरव्यवस्थापन आणि मालकांच्या निष्क्रियतेमुळे कंपनी पूर्णपणे बंद पडल्याचा आरोप मफतलाल कंपनीचे कामगार सतीश मनवल यांनी केला. वेतन, पीएफ, निवृत्तीवेतन आणि इतर कायदेशीर देणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या तीन दशकांत दीड हजारांहून अधिक कामगारांचे निधन झाले असून उर्वरित कामगार अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. न्यायालयीन आदेशानंतरही मालकांनी कंपनी पुन्हा सुरू करण्यास किंवा कामगारांची देणी देण्यास स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे १ फेब्रुवारी १९९९ रोजी कंपनी मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसिव्हरच्या ताब्यात देण्यात आली. न्यायमूर्ती काथावाला यांच्या आदेशानुसार कंपनी परिसराला कुंपण घालण्यात आले. जागेच्या विक्रीसाठी तीन वेळा लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली, मात्र कोणत्याही विकासकाने प्रतिसाद दिला नाही.यानंतर हे प्रकरण डेट रिकव्हरी ट्रिब्युनल न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले. २०२४ मध्ये पहिला लिलाव जाहीर करण्यात आला होता, मात्र त्यालाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे कामगारांनी सांगितले. डीआरटी कार्यालयातून समाधानकारक माहिती मिळत नसल्याचाही आरोप करण्यात आला. २०११ मध्ये किरण मोहिते यांच्या नेतृत्वाखाली “मफतलाल कामगार संघर्ष समिती” स्थापन करण्यात आली. २०१२ मध्ये जागेवरील ‘लँडलॉक’ हटविण्यात आला आणि सुमारे सव्वा दोन कोटी रुपये खर्चून परिसराला कंपाऊंड घालण्यात आले. १२३ एकर जागेचे मूल्यांकन करण्यात आले असता तिची किंमत तब्बल ११३२ कोटी रुपये असल्याचे समोर आले. तरीही जागा विक्रीसाठी कोणताही विकासक पुढे आला नसल्याचे समितीने म्हटले आहे. दरम्यान, आमदार संजय केळकर यांनी २०१२ पासून या प्रकरणात पाठपुरावा करून कामगारांना काही प्रमाणात देणी मिळवून दिल्याचा दावा समितीकडून करण्यात आला. तसेच वर्ग १ आणि वर्ग २ मधील जागांचे एकत्रीकरण करून जागा विक्रीचा मार्ग मोकळा करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मात्र, जागा विक्री अद्याप रखडल्याने हजारो कामगारांची देणी

ठाणेकरांना महागाईचा आणखी झटका! रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची मागणी

सिद्धेश शिगवण ठाणे : ठाणेकरांच्या खिशाला पुन्हा कात्री लागण्याची शक्यता असून, रिक्षा आणि टॅक्सी प्रवास लवकरच महाग होण्याची चिन्हे आहेत.सीएनजीच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ, वाढती महागाई आणि वाहनांच्या देखभालीचा वाढलेला खर्च यामुळे ठाण्यात रिक्षा आणि टॅक्सी प्रवास लवकरच महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे शहर रिक्षा-टॅक्सी समन्वय कृती समितीने प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) भाडेवाढीची मागणी केली आहे. समितीने आरटीओला दिलेल्या पत्रानुसार, रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात प्रति किलोमीटर ४ रुपयांची वाढ तसेच पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २ रुपयांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या सीएनजीचे दर ८४ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्याने चालकांचे आर्थिक गणित कोलमडल्याचा दावा रिक्षा-टॅक्सी संघटनांनी केला आहे. ठाणे शहरात सुमारे ८ लाख वाहने सीएनजीवर धावत असून, त्यामध्ये जवळपास २ लाख रिक्षा, १ लाखांहून अधिक टॅक्सी आणि ५ लाखांपेक्षा जास्त खासगी वाहनांचा समावेश आहे. वाढती महागाई, वाहनांच्या किंमती, दुरुस्ती व देखभाल खर्च तसेच बँक कर्जाचा वाढलेला बोजा यामुळे भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे युनियनचे म्हणणे आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ठाणे, लोकमान्य नगर, वागळे इस्टेट आणि घोडबंदर परिसरातील रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. खटुआ समितीच्या सूत्रानुसार तातडीने भाडेवाढ लागू करण्याची मागणी रिक्षा-टॅक्सी संघटनांनी केली आहे.

शहरातील प्रत्येक घराची नोंद होईल या दृष्टीने काळजीपूर्वक घरगणना करावी – आयुक्त सौरभ राव

ठाणे: ठाणे महानगरपालिका हद्दीत १६ मे पासून घरगणनेसाठी प्रगणक घराघरामध्ये भेटी देत असून प्रभाग समितीनिहाय सुरू असलेल्या घरगणना प्रक्रियेचा आढावा ‍आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला. १४ जून २०२६…

 निरंकारी राजमाताजी मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट संपन्न

कल्याण : संत निरंकारी मिशनच्या विद्यमाने २३ व २४ मे रोजी  विलेपार्ले स्थित धनजीभाई मेहता ग्राउंडमध्ये निरंकारी राजमाताजी मेमोरियल महिला क्रिकेट टूर्नामेंटचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यामध्ये मुंबई परिक्षेत्रातील एकंदर २२…

 १४ वर्षीय आरव आहुजा याचा  पोहण्याचा विक्रम

पिरवाडी बीच ते ट्रॉम्बे जेट्टी दरम्यान २३ किमी खुला समुद्र पार करत केला विक्रम कल्याण :  डोंबिवलीतील पवार पब्लिक स्कुल येथील इयत्ता नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय मास्टर आरव आहुजा याने खुल्या समुद्रातील पोहण्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत रायगड येथील पिरवाडी बीच ते मुंबईतील ट्रॉम्बे जेट्टी दरम्यान एकल समुद्र पोहण्याचा पराक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणारा पहिला जलतरणपटू होण्याचा मान मिळवला आहे. आरवने अपूर्व जिद्द, शारीरिक क्षमता आणि मानसिक ताकद दाखवत सुमारे २३ किलोमीटरचे अंतर अवघ्या ४ तास १४ मिनिटांत पूर्ण केले. अरबी समुद्रातील आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात त्याने संपूर्ण पोहण्यादरम्यान उल्लेखनीय चिकाटी आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन केले.आरव हा ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर, पलावा येथे कार्यरत असलेल्या रुपाली रेपाळे स्विमिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असून तो दररोज सुमारे ३ ते ४ तास कठोर सराव करतो. विशेष म्हणजे, वयाच्या ९व्या वर्षी जेव्हा त्याने पोहण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याला पाण्याची भीती वाटत होती. मात्र सातत्यपूर्ण प्रशिक्षण, पालकांचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्याने त्या भीतीवर मात करत खुल्या समुद्रातील पोहण्यामध्ये विशेष प्राविण्य मिळवले. आरवने यापूर्वीही राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच कोची येथे पार पडलेल्या ओपन नॅशनल स्विमॅथॉन स्पर्धेत त्याने १० कि.मी. शर्यतीमध्ये रौप्यपदक पटकावले. तसेच पोरबंदर येथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या जलतरण स्पर्धेत १० कि.मी. गटात कांस्यपदक जिंकले आहे. याशिवाय राज्यस्तरीय खुल्या जलतरण स्पर्धांमध्येही त्याने अनेक पदके आणि गौरव संपादन केले आहेत. ही ऐतिहासिक समुद्र पोहण्याची मोहीम आरवची पहिलीच एकल लांब पल्ल्याची समुद्रातील पोहण्याची मोहीम होती, त्यामुळे या यशाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या पोहण्यादरम्यान त्याला जोरदार वारे, उंच भरती आणि खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा सामना करावा लागला. मात्र सर्व अडचणींवर मात करत त्याने यशस्वीरित्या हे आव्हान पूर्ण केले. या कामगिरीदरम्यान शेवटच्या टप्प्यात डॉल्फिन माशांनी आरवच्या सोबत पोहत त्याच्या या यशात एक विस्मरणीय आणि प्रेरणादायी क्षण निर्माण केला. ही संपूर्ण मोहीम महाराष्ट्र स्टेट अमेचुअर अॅकव्याटीक असोसिएशन यांच्या निरीक्षणाखाली पार पडली असून सर्व अधिकृत नियम, सुरक्षा निकष आणि प्रक्रियांचे काटेकोर पालन करण्यात आले. आपल्या यशाबद्दल बोलताना आरवने आपल्या आई-वडिलांचे त्यांच्या सततच्या पाठिंबा आणि प्रोत्साहनाबद्दल आभार मानले. तसेच त्याने आपले प्रशिक्षक  रुपाली रेपाळे आणि अनिरुद्ध महाडिक   यांचे मार्गदर्शन आणि मेहनतीबद्दल विशेष आभार व्यक्त केले. तसेच संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दलही त्याने कृतज्ञता व्यक्त केली. तसेच कराबी थायलंड ओपन वॉटर स्वमिंग २ किलोमीटर स्पर्धा सिल्वर व ५०० मीटर स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवले.

 महेंद्रशेठ घरत हे दिलेला शब्द पाळणारे नेते!

उरण-पनवेल प्रीमियर लिगच्या आयोजकांचे मत उलवे, ता. २५ : राधेय कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ चिर्ले आयोजित उरण-पनवेल प्रीमिअर स्पर्धेच्या फायनलला रविवारी (ता. २३) आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात महेंद्रशेठ घरत आणि गौतमी पाटील यांचे स्वागत केले. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मी कलेवर आणि कलाकारांवर प्रेम करणारा माणूस आहे. कलाकारांना प्रोत्साहन देणे, हे माझे कर्तव्य मानतो. त्यामुळे चिर्ले येथील तरुण ‘सुखकर्ता’ बंगल्यावर आले होते. त्यांनी माझ्याकडे आमच्या प्रीमियर लिगला आम्ही गौतमी पाटील यांना आणत आहोत. येथील रसिकांना आणि क्रीडाप्रेमींना सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नृत्याचा आनंद द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही प्रायोजकत्व स्वीकारावे, अशी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन मी उरण-पनवेल प्रीमियर लिगचे प्रायोजकत्व स्वीकारले. कलाकारांना प्रोत्साहन आणि स्थानिक तरुणांच्या उदात्त भावना लक्षात घेतल्या. क्रिकेटचा मी नुसता चाहता नाही, स्वतः भरपूर खेळतो.” “महेंद्रशेठ घरत यांनी दिलेला शब्द पाळला. असा शब्दाचा पक्का राजकीय पटलावर एकच नेता आहे तो म्हणजे महेंद्रशेठ घरत,” अशा भावना आयोजकांनी यावेळी व्यक्त केल्या. उरण-पनवेल प्रीमियर लिगचे आयोजक दीपक पाटील, संतोष पाटील आणि त्यांच्या टीमने शाल, सन्मानचिन्ह देऊन महेंद्रशेठ घरत यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी हजारो क्रिकेटप्रेमींनी महेंद्रशेठ जिंदाबाद, अशा घोषणांनी क्रिकेट मैदान दणाणून सोडले. यावेळी परिसरातील इतरही अनेक मान्यवर उपस्थित होते. ०००००००