Category: ठाणे

Thane news

पुडुचेरी विधानसभा निवडणूक २०२६ साठी डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांची सह-समन्वयक म्हणून नियुक्ती

पुडुचेरी विधानसभा निवडणूक २०२६ साठी डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांची सह-समन्वयक म्हणून नियुक्ती उल्हासनगर: ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (अल्पसंख्यांक विभाग) तर्फे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली व इमरान प्रतापगढी यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांची पुडुचेरी विधानसभा निवडणूक २०२६ साठी सह-समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही नियुक्ती त्यांच्या संघटन कौशल्य, सामाजिक बांधिलकी आणि संविधाननिष्ठ कार्यपद्धतीवरील विश्वासाचे प्रतीक आहे. काँग्रेस नेतृत्वाने महाराष्ट्रातील एक बौद्धिक व जनआधारित नेतृत्व म्हणून त्यांच्यावर विश्वास दर्शविला आहे. डॉ. इंगळे यांनी यापूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीत जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. डॉ. प्रशांत इंगळे यांचे बालपण कन्नमवार नगर येथे गेले असून त्यांचे शालेय शिक्षण उल्हासनगर येथे झाले. डॉ. प्रशांत इंगळे त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी करत असताना त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत विजय मिळवून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. सन २००८ मध्ये UDCT (आताचे ICT, मुंबई) येथे SC/ST/OBC विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी आंदोलन तसेच शिक्षकांच्या रोस्टरनुसार बढतीसाठी त्यांनी प्रभावी लढा उभारला होता .सन २००५ पासून कल्याण विद्यापीठ उपकेंद्र स्थापनेसाठी त्यांनी आंदोलन सुरू केले, ज्यामुळे कल्याण–कर्जत भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.ते बहुजन समाज पक्षाचे (BSP) माजी राज्य महासचिव असून त्यांनी आमदार (MLA) व खासदार (MP) निवडणुका देखील लढवल्या आहेत. महाराष्ट्रात व शिक्षण क्षेत्रात त्यांचा मजबूत जनाधार आहे.ते भारतीय राज्यघटनेवर दृढ विश्वास ठेवणारे नेतृत्व आहे.डॉ. प्रशांत रमेश इंगळे हे दलित पँथर चळवळीच्या समृद्ध वारशात, त्यांचे वडील स्व. पँथर रमेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले नेतृत्व आहे. सामाजिक परिवर्तनासाठी त्यांच्या वडिलांनी सन १९७२ मध्ये माजगाव डॉक येथील व्यवस्थापक पदाचा त्याग केला होता.लहानपणापासूनच त्यांनी दलित पँथर चळवळ, लाँग मार्च आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन प्रत्यक्ष अनुभवले आहे.तसेच त्यांना त्यांचे काका एस.एल. इंगळे गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभले असून, डीसीपी वसंत इंगळे यांनी घाटकोपर येथील रामाबाई आंबेडकर नगर येथील गोळीबार प्रकरणानंतर अन्यायाविरुद्ध भूमिका घेत ३०० PSI सह दिलेला राजीनामा हा त्यांच्या विचारांवर प्रभाव टाकणारा ठरला आहे. पुडुचेरी विधानसभा निवडणूक २०२६ साठी डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांची सह-समन्वयक म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ देऊ नये – रणजित यादव

कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ देऊ नये – रणजित यादव अनिल ठाणेकर ठाणे : गुरुवारी, २६ मार्चला मुरबाड तालुक्याचा दौरा करून विविध ग्रामपंचायती, आरोग्य केंद्रे तसेच सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. शासनाच्या सर्वसमावेशक व लोकोपयोगी योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रशासनाने अधिक सजग व तत्पर राहावे, तसेच कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, असे स्पष्ट निर्देश ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी यावेळी दिले. दौऱ्याची सुरुवात मासले ग्रामपंचायतीपासून करण्यात आली. येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. ‘एक कुटुंब एक संचिका’ उपक्रम तसेच ‘पोषण परसबाग’ यांची पाहणी करून त्यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे कौतुक केले. महिला बचत गटांशी संवाद साधताना स्थानिक स्तरावर होत असलेल्या उपक्रमांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. न्हावे येथे ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा होईल यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींना देण्यात आल्या. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने शेलशेत येथील अंगणवाडी तसेच किशोर व सरळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देण्यात आली. औषध साठा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, माता-बालकांचे आरोग्य व पोषण या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला. यामध्ये आढळलेल्या त्रुटी तात्काळ दूर करण्याच्या सूचना देत सेवा अधिक गुणवत्तापूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सिंचन सुविधांचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. शिरवली (जानपाटलाचापाडा) येथील लाभार्थी नारायण घागस तसेच शिवळे येथील अशोक इसामे यांच्या सिंचन विहिरींची पाहणी करून आधुनिक शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. टेम्भरे येथील ‘दुर्गा स्वयंसहाय्यता समूहा’कडून चालविण्यात येणाऱ्या खाकरा उत्पादन उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. या समूहाला यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे व बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच ‘जनमन’ योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.संपूर्ण दौऱ्यात विकासकामांचा वेग, योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले. स्थानिक पातळीवर लोकसहभाग वाढवून शाश्वत विकास साधण्यावर त्यांनी विशेष भर दिला.यावेळी गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, उप अभियंता बांधकाम जडे, उपअभियंता पाणीपुरवठा जगदीश बनकरी, गटशिक्षणाधिकारी मधुकर गोरड, सर्व विभागाचे विस्तार अधिकारी, संबंधित ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सीआरपी,  स्वयंसहाय्यता समूहाचे सदस्य तसेच पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

६२ कोटींच्या ग्रीन कर्जरोख्यानंतर घनकचरा फाईव्ह स्टार होणार का? – शानू पठाण

६२ कोटींच्या ग्रीन कर्जरोख्यानंतर घनकचरा फाईव्ह स्टार होणार का? – शानू पठाण अनिल ठाणेकर ठाणे- ठामपा आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात घनकचरा विभागाला एका एजन्सीने थ्री स्टार दिले आहेत. या स्टार्सची विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनी खिल्ली उडविली. शर्टवर स्टार चिकटवून तसेच बॅगला स्टार लटकवून सर्वसाधारण सभेत प्रवेश केला. ठाणे महानगर पालिकेचे अंदाजपत्रक आयुक्त सौरव राव यांनी सादर केले असून या अंदाजपत्रकावर सध्या सभागृहात चर्चा झाली. या अंदाजपत्रकात घनकचरा विभागाचे कौतूक करून एका एजन्सीने थ्री स्टार मानांकन दिले आहे. या मानांकनाची शानू पठाण यांनी खिल्ली उडविली. छातीवर तीन तारे आणि बॅगला तीन तारे लावून शानू पठाण हे सभागृहात प्रवेशकर्ते झाले. याप्रसंगी पत्रकारांशी  बोलताना शानू पठाण यांनी, घनकचरा विभागाचे कौतूक व्हावे, हा एक विनोदच आहे. कारण, ठाणे शहरात कदाचित कचरा दिसत नसेल पण मुंब्रा, कौसा आणि दिवा भागात कचरा वहनाची व्यवस्थाच नसल्याने कचऱ्याचे ढिग लागलेले दिसत असतात. हे स्टार देताना एजन्सीने कोणत्या दुर्बिणीतून पाहिले असेल ती दुर्बिण आम्हालाही द्या, अशी टीका केली. दरम्यान, ६२ कोटींच्या ग्रीन कर्जरोख्यानंतर घनकचरा फाईव्ह स्टार होणार का, असा सवालही उपस्थित केला.

विशाल जाधव ठरला कोपरी केसरी २०२६ चा मानकरी

विशाल जाधव ठरला कोपरी केसरी २०२६ चा मानकरी ठाणे : सत्यनारायण प्रतिष्ठान ग्रामस्थ मंडळ कोपरे विरार ( पूर्व ) , यांच्यातर्फे  सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त आयोजित केलेल्या श्री सत्यनारायणाच्या  भव्य यात्रे निमित्त भरवलेल्या कोपरी कुस्ती केसरी २०२६ या स्पर्धेत मिरा भाईंदर येथील श्री गणेश आखाड्यातील युवा कुस्तीपटू विशाल सुनील जाधवने  कोपरी केसरी किताबाचा मान मिळवीला. किताबाच्या झालेल्या लढतीत विशालने कल्याणच्या विजय म्हात्रेचा  अटीतटीच्या लढतीत पराभव केला. ही कुस्ती तब्बल अर्धा तास चालली .या कुस्तीमध्ये विशालने झोळी या डावावर विजयला  अखेर चित्तपट करत प्रेक्षणीय विजय संपादन केला. त्याला बक्षीस म्हणून आकर्षक चषक , गदा व ११,००० रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या कुस्ती मैदानामध्ये श्री गणेश आखाड्यातील प्रतीक बोबडे , विपीन गौतम , ओम जाधव , अनिकेत यादव यांनी देखील शानदार कुस्त्या करून कुस्तीप्रेमींची मने जिंकली . या मैदानात  ठाणे, कल्याण , भिवंडी, मुंबई उपनगर ,मुंबई शहर ,नवी मुंबई भाईंदर, पालघर येथील १५० पेक्षा जास्त  कुस्तीपटूंनी भाग घेतला . विशाल सध्या अभिनव कॉलेजच्या कला शाखेतील शेवटच्या वर्षात शिकत आहे. त्याला वसंतराव पाटील व  एन.आय.एस.कुस्ती प्रशिक्षक वैभव माने यांचे  मार्गदर्शन मिळत आहे.  . विशाल सध्या जाणता राजा कुस्ती केंद्र लोणीकंद येथे सराव करतो. या मैदानाचे पालघर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव व मीरा-भाईंदर महानगर पालिकेच्या अग्निशामन दलाचे अधिकारी .सदानंद पाटील यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.

जय श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली कल्याण नगरी

जय श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली कल्याण नगरी रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद कल्याण : श्रीरामनवमी निमित्त कल्याण शहरात आयोजित करण्यात आलेल्या सकल हिंदू समाजाच्या भव्य शोभायात्रेला नागरिकांचा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा नगरसेविका हेमलता पवार, तसेच शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.  मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित या शोभायात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या शेकडो महिला, अनेक रामभक्त आणि युवक त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शोभायात्रेला कल्याण पश्चिमेतील किल्ले दुर्गाडी येथील भवानी चौक येथून सायंकाळी प्रारंभ झाला. दुर्गाडी देवीची आरती करून शोभायात्रा सुरू झाली. तिथून पुढे लालचौकी, आग्रारोड, सहजानंद चौक, देवी अहिल्याबाई होळकर चौक, टिळक चौकमार्गे पारनाका येथील श्रीराम मंदिरापर्यंत अत्यंत उत्साहात काढण्यात आली. त्यानंतर येथील श्रीराम मंदिरामध्ये महाआरती करून शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. विशेष म्हणजे या शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा भव्य चित्ररथ, महापराक्रमी श्री बजरंगबलींची आकर्षक झांकी, विविध पारंपरिक चित्ररथ, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच साहसी खेळांचे प्रात्यक्षिक यांचा समावेश होता. यामुळे नागरिकांना आपल्या पारंपरिक कला, संस्कृती आणि अध्यात्म यांचे दर्शन घडले. त्यामध्ये कल्याण कल्याण विकास फाऊंडेशनतर्फे वंदे मातरम् ला दिडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित माहिती देणारा चित्ररथ, शीख बांधवांचे नववे धर्मगुरू गुरु श्री तेग बहाद्दुर यांच्या पराक्रमावर आधारित चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तसेच त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गिनिज बूक मध्ये नोंद झालेले नारायणी लेझीम पथक, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वर विद्यालय, उज्वला महिला मंडळ व राष्ट्रीय सेविका समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संस्कृत भारती योग विद्याधाम संस्था, स्वराज्य मित्र मंडळ, लयभारी हास्य क्लब, कराओके, श्री ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय वारकरी सेवा ट्रस्ट, बालक मंदिर संस्थेचे कॅप्टन रवींद्र माधव ओक शाळेचे लेझीम पथक, विश्व मांगल्य बालसभा, श्री गजानन महाराज शेगाव भक्त, श्री संत राम मारुती, सात संगिनी फाउंडेशन ट्रस्ट, बोहरा आदिवासी नृत्य, भटके विमुक्त समाजाचे मरीआई पोथराज, बंजारा समाजाच्या महिला, इस्कॉन मंदिर संस्था असे शहरातील अनेक नामांकित संस्थांचा समावेश होता. या रामनवमी उत्सवानिमित्त नागरिकांनी आपल्या घरांवर भगवे ध्वज फडकवून, रांगोळी काढून तसेच दीप प्रज्वलित केल्याने संपूर्ण शहर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात रंगून गेले होते. या शोभायात्रेचे लालचौकी, आग्रा रोड, सहजानंद चौक, पारनाका आदी मार्गावर जोरदार पुष्पवृष्टीद्वारे स्वागत करण्यात आले. तर या मार्गावर ठिकठिकाणी सामाजिक संस्था, नागरिकांकडून पिण्याचे पाणी, आइस्क्रिम तसेच सरबत वाटप केले जात होते.

चरईमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने रहिवाशांना हुसकावण्याचा डाव – संजय केळकर

चरईमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने रहिवाशांना हुसकावण्याचा डाव – संजय केळकर अनिल ठाणेकर ठाणे, सर्वसामान्य रहिवाशांना दमदाटी करुन त्यांना जुन्या इमारतीमधून हुसकावण्याचा प्रयत्न बिल्डरकडून होत असल्याचा प्रकार ठाण्यातील चरई भागात उघडकीस आला आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावून रहिवाशांचा हक्क अबाधित ठेवण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत. या कार्यक्रमात नगरसेवक विकास पाटील, अनिल भगत, किशोर मसुरकर, राजेश गाडे उपस्थित होते. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात चरईतील एका जुन्या इमारतीमधील रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबत माहिती देताना श्री.केळकर यांनी सांगितले की चरई हा ठाण्यातील जुना भाग असून येथे अनेक जुन्या इमारती आहेत. या इमारतींना अधिकाऱ्यांना हाताशी धरून धोकादायक घोषित करण्याचे आणि रहिवाशांना हुसकावून लावण्याचे प्रकार विकासकांकडून होत आहेत. रहिवाशांच्या तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली. बिल्डरकडून रहिवाशांना दमदाटी करण्यात येत असून रहिवासी आणि विकासक यांच्यात योग्य करार झाल्याशिवाय रहिवाशांवर घरे खाली करण्याचा दबाव आणू नये, त्यांचा हक्क अबाधित राहावा, अशा स्पष्ट शब्दांत अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती श्री.केळकर यांनी माध्यमांना दिली. या कार्यक्रमात ठाण्यातील एका सीबीएसई शाळेतील पालकही उपस्थित होते. पालक आणि शिक्षकांचा समावेश असलेल्या शाळा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करता विविध उपक्रमांच्या माध्यमातून ज्यादा शुल्क वसूल करून आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार या पालकांनी केली. याबाबत आमदार संजय केळकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित शाळेची चौकशी करून कारवाई करण्याची सूचना केली. विविध प्रकल्पांत बाधित झालेल्या रहिवाशांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. बाधित रहिवाशांना हक्काची घरे मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात रेंटल घरे प्रशासनाने दिली आहेत. मात्र त्या ठिकाणी सुविधांअभावी रहिवासी नरकयातना भोगत आहेत. त्यामुळे हक्काचे घरही नाही आणि आता रेंटलची घरेही सोडण्याच्या नोटीसा बजावण्यात येत आहेत. या प्रकरणी आता जन आंदोलनाची तयारी करत असल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली. करवसुलीबाबतही सर्वसामान्य नागरीकांना मानसिक त्रास देऊन मालमत्ता सील करणे आणि नळ जोडणी तोडण्याची कारवाई केली जात आहे. दुसरीकडे कोट्यवधींची थकबाकी असलेल्या मोठमोठ्या आस्थापना, विकासक यांना मोकाट सोडले जात आहे. सर्वसामान्य नागरीक कर भरण्यास तयार आहेत पण प्रशासनाने सापत्न वागणूक देऊ नये, अशी तंबीही केळकर यांनी अधिकाऱ्यांना दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रातील दर्शनी इमारतीच्या खड्ड्यामुळे शेजारील इमारतीस धोका

ठाणे महापालिका क्षेत्रातील दर्शनी इमारतीच्या खड्ड्यामुळे शेजारील इमारतीस धोका अनिल ठाणेकर ठाणे: महानगरपालिका क्षेत्रातील गुरुकुल सोसायटी जवळील महापालिका मंजूर नगररचना क्रमांक १ अंतिम भूखंड क्रमांक ३४१ या भूखंडावर संबंधित विकासकाने दर्शनी इमारतीचे काम करताना तीन ते चार वर्षांपूर्वी मोठा खड्डा खणून ठेवलेला आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्षांनी दिली. सदर खड्ड्यांमध्ये दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी साचत असल्याने परिसरात मलेरिया ,डेंगू सारख्या गंभीर आजारांची परिसरातील नागरिकांना लागण होत असल्याचा गंभीर प्रकार वारंवार उघडकीस आलेला आहे . त्यातच सदरच्या खड्ड्यामुळे आमच्या इमारतीच्या कंपाऊंडला तडे गेलेले असून बाजूची इमारत कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाल्याची गंभीर बाब वारंवार आपल्या निदर्शनास आणलेली,आहे ,येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . सदर गंभीर प्रकरणे स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच गणेश कृपा हाउसिंग सोसायटीचे माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका यांचे कडे वारंवार तक्रारी करूनही सदर प्रकरणी कारवाई करण्यास दिरंगाई केली जात असल्याने  येथील नागरिकांमध्ये  तीव्र असंतोष पसरलेला आहे .तसेच सदर दर्शनी इमारतीची महापालिकेची सी. सी.परवानगी एप्रिल  महिन्यात संपत आहे. सदर प्रकरणी  त्वरित कारवाई न केल्यास महापालिकेवर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल,आपण या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित विभागास आवश्यक त्या सूचना करून सदर समस्या सोडवावी ही नम्र विनंती.

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ ३ ते ५ किमी अंतरावरील शाळांचे पर्याय निवडण्याची संधी कायम ठाणे: शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आता३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. पालकांना अर्ज सादर करण्यासाठी तसेच आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी जाहीर केल्यानुसार, पालकांना ३ ते ५ किलोमीटर अंतरावरील शाळांचे पर्याय निवडण्याची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार शाळेच्या अंतरासंबंधीची १ किलोमीटरची अट शिथिल करण्यात आल्यामुळे पालकांना अधिक शाळांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. या निर्णयामुळे अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या शाळांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे. तसेच, ज्या पालकांनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत, त्यांना अर्जामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी ‘अनकन्फर्म’ करून पुन्हा ‘कन्फर्म’ करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध आहे. याबाबत पालकांना पोर्टलवरील पॉप-अप सूचनांद्वारे माहिती देण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद ठाणे श्री. बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले की, “आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांचा समावेश व्हावा, यासाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. पालकांनी या संधीचा लाभ घेऊन अर्ज सादर करावेत तसेच आवश्यक असल्यास दुरुस्ती करून प्रक्रिया पूर्ण करावी.” तरी सर्व पात्र पालकांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन नवीन अर्ज सादर करावेत किंवा पूर्वीच्या अर्जांमध्ये आवश्यक दुरुस्ती करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच ही माहिती अधिकाधिक पालकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

श्रीरामकृष्ण सेवाट्रस्टतर्फे गरजूंना अन्न धान्य वाटप व आरोग्य तपासणी शिबिर

श्रीरामकृष्ण सेवाट्रस्टतर्फे गरजूंना अन्न धान्य वाटप व आरोग्य तपासणी शिबिर कल्याण : कल्याणच्या श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट तर्फे दर महिन्याला गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात येते.  कल्याण पश्चिम शहरात गेली ३५ वर्ष हा उपक्रम चालू असून अनेक गोरगरीब गरजू या योजनेचा लाभ घेत असतात. महिन्यातून एकदा हे धान्य वाटप केलं जातं. त्याचबरोबर रोज दुपारी भुकेल्या लोकांना जेवण दिले जाते. आधारवाडी च्या लोटस हॉस्पिटल समोर अन्नक्षेत्र असून येथे हे उपक्रम राबविले जातात. गुरूवार झालेल्या अन्नधान्य वितरण व आरोग्य तपासणी शिबिर या उपक्राला विशेष अतिथी म्हणून कल्याण पोलीस परिमंडळ -३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, नगरसेवक प्रतिक पेणकर उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे संचालक  जसू चंदाराणा व तुषार दाणी यांनी संस्थे तर्फे त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी उपस्थित विमल ठक्कर, केशु लिमानी, डॉक्टर अवधूत शेट्ये, मोनीस चंदाराणा,  सुभाष रायचुरा, विष्णूकुमार चौधरी, राजीव चंदाराणा आदी मान्यवरांच्या हस्ते अन्नधान्य वितरण करण्यात आले. यावेळी नगर सेवक प्रतिक पेणकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की आपल्या संस्थेचे चांगले कार्य असून आपल्या सेवा कार्य मघ्ये सहभागी होवू अशी खात्री दिली आणी संस्थेच्या सेवा कार्याचे कौतुक करुन कामात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले व त्या कामात सहकार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.

अल्पवयीन मुलींशी छेडछाड प्रकरणी क्रिकेट प्रशिक्षकला टिटवाळा पोलिसांनी केली अटक     

अल्पवयीन मुलींशी छेडछाड प्रकरणी क्रिकेट प्रशिक्षकला टिटवाळा पोलिसांनी केली अटक कल्याण: दोन अल्पवयीन मुलींशी छेडछाड़ केलेल्या प्रकरणी क्रिकेट प्रशिक्षकला पोलिसांनी अटक केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा पोलिस हद्दीतील ५९ वर्षीय आरोपी खासगी क्रिकेट कोचला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने शेजारच्या दोन अल्पवयीन मुलींशी विनयभंग केला होता. पीडित कुटुंबांच्या तक्रारीवर कल्याण तालुका पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलींचे वय १२ ते १४ वर्षे आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात आरोपीने एका मुलीशी अयोग्य पद्धतीने स्पर्श केला होता, तर नुकत्याच एका मुलीशी त्याने अशीच कृत्य करण्याचा प्रयत्न केला. नुकत्याच्या घटनेची माहिती जेव्हा दुसऱ्या मुलीने आपल्या पालकांना दिली, तेव्हा त्यांनी परिसरातील लोकांना सांगितले. तेव्हा त्यांना कळले की आरोपीने शेजारच्या दुसऱ्या मुलीशीही अशीच चूक कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर दोन्ही पीडितांच्या पालकांनी बुधवारी कल्याण तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.