Category: ठाणे

Thane news

शाळेच्या प्रवेशव्दारावरील झाड तोडल्याने कल्याणमधील सेंट थॉमस शाळेला नोटीस

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या उद्यान विभागाच्या कोणत्याही परवानग्या न घेता कल्याण पूर्व विजयनगर भागातील सेंट थॉमस शाळेने शाळेेच्या प्रवेशव्दारावरील बदामाचे जुनाट झाड तोडले. या नियमबाह्य कृतीबद्दल पालिकेच्या उद्यान विभागाने शाळा व्यवस्थापनाला कारवाईची नोटीस पाठवून सात दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी पालिका प्रशासनाचे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून उपक्रम सुरू आहेत. शहर, परिसरात हरितपट्टे विकसित करण्यासाठी पालिका प्रशासना बरोबर, सामाजिक, पर्यावरण संवर्धन संस्थांनी पुढाकार घ्यावा म्हणून आयुक्त डाॅ. जाखड प्रयत्नशील आहेत. अशा परिस्थितीत कल्याणमधील एका शिक्षण संस्थेने पालिकेच्या परवानग्या न घेता झाड तोडल्याबद्दल आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करून याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश उद्यान विभागाचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांना दिले आहेत. सेंट थॉमस शाळेला शाळेच्या प्रवेशव्दारावर एक प्रवेशव्दार उभारायचे आहे. या कामासाठी शाळेच्या प्रवेशवद्रारावरील बदामाचे २५ वर्ष जुने २५ फूट उंचीचे बदामाचे झाड अडथळा येत होते. हा अडथळा हटविण्यासाठी हे झाड धोकादायक नसताना ते तोडल्याने नागरिक, पालक नाराज झाले होते. उन्हाळ्यात शाळेच्या प्रवेशव्दारावर सावलीसाठी हे झाड मोठा दिलासा होते, असे पालक सांगतात. याप्रकरणी या भागातील काही जागरूक नागरिकांनी हा विषय पालिका आयुक्त, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या निदर्शनास आणला. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी सेंट थॉमस शाळा प्रशासनाला महाराष्ट्र क्षेत्र झाडांच जतन व संरक्षण अधिनियमान्वये नोटीस पाठवली. आणि सात दिवसात याप्रकरणी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. विहित वेळेत शाळेने खुलासा केला नाहीतर या कलामन्वये शाळेवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नोटिशीत दिला आहे. दोन दिवसापूर्वी ठाणे पालिका हद्दीतील देसई-तांबडीपाडा गावातील एका रहिवाशावर घरासमोरील कडुनिंबाचे झाड तोडले म्हणून पालिकेने गुन्हा दाखल केला आहे. अशाच प्रकारची कारवाई सेंट थॉमससह बेकायदा झाडे तोडणाऱ्यांंवर करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.

मतदार यादी नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी राजकीय पक्षांनी केंद्रस्तरीय प्रतिनिधी नेमावेत- अशोक शिनगारे

ठाणे : पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादींचे अद्ययावतीकरण, नवीन मतदार नोंदणीसाठी तसेच प्रारुप व अंतिम मतदार यादीची माहिती नागरिकांपर्यंत पोहचावी, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नेमावेत. तसेच मतदार यादीत नाव असेल तरच मतदान करता येईल, हा संदेश सर्व नागरिकांपर्यंत पोहचवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने 1.7.2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) जाहीर केला आहे. त्याची माहिती देण्यासाठी आज ठाणे जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कदम, तहसीलदार प्रदीप कुडळ यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. श्री. शिनगारे यांनी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देऊन म्हणाले की, मतदारांपर्यंत मतदार यादीची माहिती पोहचविण्यासाठी राजकीय पक्षाची मोठी मदत होणार आहे. निवडणूक प्रशासनाकडून केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (बीएलओ) नेमण्यात आले आहेत. येत्या 25 जुलै 2024 रोजी एकत्रित प्रारुप यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यावेळी बीएलओंबरोबर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी समन्वय साधून नवीन मतदार नोंदणी करणे, मतदारांचे नाव यादीत आहे का तपासणे, यादी नाव नसेल अथवा त्यामध्ये दुरुस्ती असेल तर त्यासाठी मतदारांकडून अर्ज भरून घेणे ही कामे करावीत. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नवीन मतदान केंद्रे उभारणे व सध्याच्या मतदान केंद्रांचे सुसूत्रिकरणासाठीही राजकीय पक्षांनी सहकार्य करावे. मतदार यादींचे अद्ययावतीकरण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे मतदान यादीत नाव असेल तरच नागरिकांना मतदान करता येणार आहे. निवडणूक ओळखपत्र असेल आणि यादीत नाव नसेल तर मतदान करता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होताच त्यामध्ये आपले नाव आहे की नाही याची सहनिशा करावी. नाव नसेल तर किंवा त्यामध्ये दुरुस्ती असेल तर तातडीने अर्ज करून नाव नोंदणी/दुरुस्ती करावी, यासाठी राजकीय पक्षांनी मतदारांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहनही श्री. शिनगारे यांनी यावेळी केले. 00000

ठामपा वृक्ष प्राधिकरण व उद्यान विभागातील बेजबाबदार अधिकार्‍यांवर कडक कारवाई करा – प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर   ठाणे : पावसाळ्याच्या पुढील तीन महिन्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने झाडांच्या फाद्यांची छाटणी योग्य प्रकारे करण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश द्यावेत तसेच आपल्या जबाबदारीची जाणीव न ठेवता नागरिकांच्या जिवाशी खेळणार्या अधिकाऱवर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई कर अशी मागणी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिकेचे स्वत:चे वृक्ष प्राधिकरण विभाग व उद्यान विभाग असून या ठिकाणी त्या क्षेत्राशी संबंधीत अधिकारी बसलेले आहेत. असे असतानाही गेल्या आठवड्यामध्ये पावसाच्या पहिल्याच तडाख्याने शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी अपघात झाले असून, काही ठिकाणी मोटार गाड्यांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. गावंडबाग येथे फुटबॉल खेळत असताना क्रीडापट्टूना अपघात झाल्याची बातमी मला मीरा-भाइर्दर मधील एका कार्यक्रमादरम्यान रात्री १० वाजता कळली. बातमी कळल्यानंतर मी तातडीने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील रस्त्यावरून बेथनी हॉस्पिटलकडे येत असताना माझ्या समोरच ८ ते ९ मोठ-मोठी झाडे कोसळली. त्याचबरोबर शहराच्या इतरही भागामध्ये अनेक झाडे उन्मळून पडल्याचे समजले. त्या दिवशीच्या घटनेवरून असे लक्षात आले की, ह्या सर्व झाडांच्या फाद्यांची छाटणी पावसाळ्यापुर्वी योग्य प्रकारे न झाल्याने त्या फाद्यांचे वजन व सोसाट्याच्या वार्यामुळे ही सर्व झाडे उन्मळून पडल्याचे दिसून येते. माझ्या मतदारसंघामध्ये ठाणे महानगरपालिकेबरोबरच मीरा-भाइर्दर महानगरपालिकेचा भाग येत असून त्या ठिकाणी झाडांच्या फाद्यांची छाटणी योग्य प्रकारे झाल्यामुळे तेथे झाडे पडल्याच्या तुरळक घटना दिसून येतात. परंतू, ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व उद्यान विभागाच्या अधिकार्यांच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना या घटनाना सामोरे जावे लागत आहे. झालेल्या पावसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली असली तरी सुदैवाने कोणतीही भयंकर घटना घडलेली नाही. तरी पावसाळ्याच्या पुढील तीन महिन्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने झाडांच्या फाद्यांची छाटणी योग्य प्रकारे करण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश द्यावेत तसेच आपल्या जबाबदारीची जाणीव न ठेवता नागरिकांच्या जिवाशी खेळणार्या अधिकाऱवर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशो मागणी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. 000000

प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या 100 बसगाड्या अशोक लेलँडच्या सर्व्हीस सेंटरमध्ये जमा

ठाणे : सदोष बसगाड्यांची विक्री केल्यानंतरही त्यांची दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष करणे; बस खरेदीदारांच्या समस्या ऐकून न घेणे यामुळे संतप्त झालेल्या मुंबई बस मालक संघटना आणि बस ओनर सेवा संघर्ष समितीचे  सदस्य आक्रमक झाले आहेत. या बस मालकांनी सोमवारी नायगावनजीकच्या सर्व्हीस सेंटरवर जाऊन आपल्या 100 हून अधिक बसगाड्या जमा केल्या. विशेष म्हणजे, या बसगाड्या जमा केल्यानंतरही अशोक लेलँडकडून प्रतिसाद न मिळाल्याने वाहनधारकांनी भरपावसात धरणे आंदोलन केले. खासगी वाहतूकदारांनी सुमारे एक कोटी रूपये खर्च करून अशोक लेलँडने बाजारात आणलेल्या 13. 5  मीटर लांबीच्या बसगाड्या विकत घेतल्या आहेत. मात्र, या बसगाड्या सदोष असल्याने प्रवासादरम्यान अपघातग्रस्त होण्याचा धोका बळावला आहे. या संदर्भात मुंबई बस मालक संघटनेने 13 जून रोजी ठाण्यातील अशोक लेलँड कंपनीच्या प्रशासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली होती. मात्र, व्यवस्थापनाने त्यांच्या या विनंतीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतरही अनेक बसगाड्यांचे  फ्रंट व्हील हब क्रॅक होणे, व्हील डिस्क तुटणे,  क्लच-  प्रेशर प्लेट, रिलीझ बेरिंग,  क्लच सिलेंडर, डिझेल पाईप तुटणे,  सायलेन्सर पाईप फुटणे ,  पुरवठा करणे करणारे पाईप फुटणे,  गियर बॉक्स –  ब्रेक लायनर तुटणे या समस्या सुरूच होत्या. विशेष म्हणजे अवघ्या काही महिन्यातच या समस्या निर्माण झाल्या असून अशोक लेलँडकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा किंवा वाॅरंटी प्रदान केली जात नाही. त्यामुळे हताश झालेल्या सुमारे 100  बस मालकांनी आज थेट सर्व्हीस सेंटर गाठून आपल्या बसगाड्या परत केल्या. दरम्यान, या बसगाड्या परत केल्यानंतरही व्यवस्थापनाकडून साधी विचारणाही केली नाही. किंवा व्यवस्थापनातील एकही अधिकारी बसमालकांची भेट घेण्यास न आल्याने संतप्त झालेल्या बसमालकांनी तेथील चिखलातच बसून धरणे आंदोलन केले. 00000

नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम

अशोक गायकवाड नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून जाणारा सायन पनवेल महामार्ग हा जरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असला तरी या मार्गावरून दररोज बाहेरच्या शहरातील हजारो नागरिक ये – जा…

महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कोंडी

माजिवाडा उड्डाणपुलासह खारेगाव टोलनाका भागात खड्डे ठाणे : ठाणे, घोडबंदर आणि नाशिक भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या माजिवडा, कापुरबावडी उड्डाण पुलावरील मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापुर्वी करण्यात आलेली असतानाच, या मार्गावर पहिल्याच पावसात खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तसेच मुंबई-नाशिक मार्गावर रस्ते आणि पुल बांधणीची कामे सुरू असून त्यातच या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे खारेगाव नाका, माजिवाडा, मुंब्रा बाह्यवळण मार्गावर कोंडी झाल्याचे दिसून आले. ठाणे महापालिका क्षेत्रातील महामार्गावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. खड्ड्यांमुळे वाहतूकीचा वेग मंदावून कोंडी होते. त्याचा परिणाम, शहरातील अंतर्गत मार्गांवर दिसून येतो. यंदाही हे चित्र कायम असल्याचे शनिवारी दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाला सुरूवात झाली. परंतु अर्ध्या तासांच्यावर पाऊस पडत नव्हता आणि पावसाचा जोरही फारसा नव्हता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून त्याचबरोबर सतत पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ठाणे, घोडबंदर आणि नाशिक भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या माजिवडा पुलावरील घोडबंदरहून नाशिक आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर खड्डे पडले आहेत. या पुलाच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापुर्वी करण्यात आले होते. मास्टीक पद्धतीने या रस्त्याची बांधणी करण्यात आली होती. परंतु पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पुलावरून अवजड, हलक्या वाहनांसह दुचाकींची वाहतूक सुरु असते. या सर्व चालकांना खड्डे चुकत प्रवास करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. त्याचबरोबर मुंबई-नाशिक मार्गावरील खारेगाव चौकाजवळील रस्त्यावर दरवर्षी खड्डे पडतात आणि कोंडीची समस्या निर्माण होते. यंदाही पहिल्याच पावसात याठिकाणी खड्डे पड़ले असून ते संबंधित विभागाकडून बुजविण्याची कामे सुरु आहेत. या मार्गावर रस्ते आणि पुल बांधणीची कामे सुरू असतानाच, त्यात खारेगाव टोलनाका भागात खड्डे पडल्यामुळे शनिवारी येथे कोंडी झाली. मुंब्रा बाह्य वळण मार्गापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच माजिवाडा येथून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरही कोंडी झाली होती. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणेकरांना पावसाळ्यात कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.

कचरा समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतींनी कायमस्वरूपी उपाययोजना करा – रोहन घुगे

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहरालगत व हायवेलगतच्या ग्रामपंचायती मधील घनकचरा व्यवस्थापनाबाबत ठाणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. भिवंडी, कल्याण, शहापूर, अंबरनाथ तालुक्यातील डंपिंग…

मोबाईल स्कूल उपक्रमातील ४७० मुलांचा शाळा प्रवेश-महेन्द्र गायकवाड

ठाणे : रस्त्यावरील बालकांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत फिरते-पथक (मोबाईल स्कूल) ही संकल्पना राबविली होती. या उपक्रमांतर्गत ४७० मुलांना शाळा प्रवेशपत्र देण्यात आल्याची माहिती…

मर्जिया पठाण यांचा पाण्यासाठी ‘तिरडी मोर्चा’

ठामपा कार्यालयाच्या दारात फोडली मडकी ठाणे : विविध कारणे पुढे करून सातत्याने मुंब्रा- कौसावासियांना पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. या सापत्न वागणुकीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली…

नमुंमपा वाशी रूग्णालयामधील आयुष्यमान भारत डिजीटल मिशनच्या कामकाजाबाबत समाधानकारक-दिप्ती गौर मुखर्जी

 अशोक गायकवाड नवी मुंबई :नमुंमपा वाशी रूग्णालयामधील आयुष्यमान भारत डिजीटल मिशनच्या कामकाजाबाबत समाधानकारक असल्याचे मत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती गौर मुखर्जी यांनी व्यक्त केले. आयुष्यमान भारत डिजीटल मिशनच्या कामकाजाची पाहणी करण्याकरिता आज राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.दिप्ती गौर मुखर्जी आणि संचालक एलपीएल विक्रम पगारीया यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रूग्णालयास भेट दिली. याप्रसंगी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजेश म्हात्रे उपस्थित होते. सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे आयुष्यमान भारत डिजीटल मिशनच्या अंतर्गत आभा ॲपव्दारे रुग्णांची आभा नोंदणी करणे, त्यांचे टोकन नंबर तयार करणे व त्याव्दारे आभा नोंदणी कक्षातून त्वरित केसपेपर मिळविणे अशा कामांबाबतचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, पाणी पुरवठा, स्वच्छ भारत मिशन आदी विविध उपक्रमांची सविस्तर माहिती आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी उपस्थितांना दिली तसेच नजिकच्या काळात रुग्णालयविषयक सर्व कामकाजाचे संगणकीकरण करण्यात येत असल्याचेही नमूद केले. आभा ॲपव्दारे नोंदणीकरण झालेल्या रुग्णांना लांबलचक रांगा टाळून त्वरित केसपेपर मिळत असल्यामुळे रुग्णांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच आभा नंबर हा युनिक असल्यामुळे संपूर्ण देशात आभा ॲपचा वापर होत असलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची सर्व माहिती जसे की यापूर्वीचा आजार, त्यावर झालेला उपचार, तपासण्या, औषधे अशी सर्व प्रकारची माहिती रुग्णाच्या सहमतीने उपलब्ध असणार आहे. त्यामुळे रुग्णांना चांगल्या व दर्जेदार रुग्णसेवा कमी कालावधीत देता येणे शक्य होणार आहे. आभा ॲपचा वापर होत असलेल्या खाजगी रुग्णालये, प्रयोगशाळा येथे देखील रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.दिप्ती गौर मुखर्जी यांनी सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे आयुष्यमान भारत डिजीटल मिशनच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन हे कामकाज प्रभावीपणे होत असल्याचे नमूद केले. या योजनेचे पुढील टप्प्यातील कामकाज करणेबाबत त्यांनी मार्गदर्शन केले व राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत नमुंमपाला याकामी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. या भेटी दरम्यान कोपरखैरणे येथे जूनी क्षेपणभूमी शास्त्रोक्तरित्या बंद करून त्याठिकाणी बनविण्यात आलेल्या निसर्गेद्यानाला, तेथील मियावाकी जंगल परिसराला तसेच त्या जवळील टाकाऊतून टिकाऊ संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आकांक्षी शौचालयाचीही पाहणी करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरणशील नाविन्यपूर्ण कामांची प्रशंसा केली.