Category: ठाणे

Thane news

उल्हासनगरात नालेसफाईचा बोजवारा

संततधार पाऊसामुळे अनेक ठिकाणी साचले पाणी   उल्हासनगर : संततधार व रिमझिम पावसामुळे शांतीनगर स्मशानभूमी, कल्याण-बदलापूर रस्ता, गोलमैदान, विदर्भवाडी आदी ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र होते. नालेसफाई न झाल्याने, पाणी तुंबल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून शाळा क्रं-१४ येथे एक झाड पडल्याची घटना घडली आहे. तर रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. उल्हासनगरात सकाळपासूनच रिमझिम व संततधार पाऊस सुरू झाल्याने, शहरातील सखल भागात पाणी साचल्याचे चित्र होते. शांतीनगर स्मशानभूमीच्या बाहेरील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने, काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. महापालिका कर्मचारी व अग्निशमन विभागाने तुंबलेल्या पाण्याला मार्ग मोकळा केला. शहरातील कल्याण ते बदलापूर रस्त्याच्या स्टेट बँक, राधास्वामी सत्संग, अनिल-अशोक चित्रपटगृह व शांतीनगर प्रवेशद्वार आदी ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र होते. याव्यतिरिक्त गोलमैदान, गुलशननगर, खेमानी रस्ता, मयूर हॉटेल व आयआयटी कॉलेज रस्ता आदी ठिकाणी पाणी साचले. वेळीच नालेसफाई न झाल्याने शहराची तुंबापुरी झाल्याचा आरोप होत आहे. तसेच रस्त्यातील खड्डे पावसाळ्यापूर्वी न भरल्याने, रस्ते खड्डेमय झाले असून याचा त्रास नागरिकांसह वाहनचालकांना होत आहे. गायकवाड पाडा नाला खोदल्याने नागरिक त्रस्त ऐन पावसाळ्याच्या तोंडावर गायकवाड पाडा येथील एक लहान नाला खोदल्याने, नागरिकांसह शाळेकरी मुलांना नाल्यावरील पाईपवरून नाला ओलांडून जावे लागत आहे. संततधार पाऊस सुरू राहिल्यास, एकदी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 000000

३० जूनपर्यंत चिकू फळपिक विमा योजनेत सहभागी व्हा – दीपक कुटे

ठाणे- येत्या मृग बहारामध्ये विविध हवामान धोक्यामुळे चिकू फळपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी कृषि विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. योजनेमध्ये सहभागाकरिता विमा पोर्टल दि. १६ जूनपासून सुरु झाले असून ३० जून २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. जादा आर्द्रता व जास्त पाऊस या हवामान धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी निर्धारित केलेल्या कालावधीत फळ पिक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे यांनी केले आहे. योजनेची वैशिष्ट्ये : १ ठाणे जिल्ह्यामध्ये अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात चिकू पिकाच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल. २. कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकरी यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल. ३. खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही सदर योजना लागू राहील. मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. ४. या योजनेत प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरीता एका फळपीकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे (०.१० हे) अशी मर्यादा राहील. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रती शेतकरी ४ हे. मर्यादेपर्यंत राहील. विमा अर्जासोबत फळबागेचा जिओ टॅगिंग (Geo Tagging) असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील. ५. एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग व आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच बहाराकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. ६. सदर फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई – पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ७. विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळणेसाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक असावे. ८. फळपिक विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याचा ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.  ९. विमा संरक्षणाचे केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच लागू आहे. १०. विहित वयापेक्षा कमी वयाच्या फळबाग  लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण केव्हाही संपुष्टात येईल आणि शेतकऱ्याने भरलेला विमा हप्ता जप्त होईल. ११. योजनेत भाग घेण्यासाठी चिकू  फळपिकाचे उत्पादनक्षम वय ५ वर्षे आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि.(टोल फ्री नं. १८००२०९५९५९) मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. फळपिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत चिकू पिकाकरीता ३० जून आहे, असेही दिपक कुटे यांनी कळविले आहे. विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर (रु./ हेक्टर) :- ठाणे जिल्ह्यात चिकू फळपिकासाठी चालू वर्षी विमा संरक्षित रक्कम रु. ७०, ०००/- असून विमाहप्त्यात शेतकरी हिस्सा रु.१२, २५०/- इतका आहे. तालुकानिहाय अधिसूचित महसूल मंडळांची यादी :- चिकू पिकासाठी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील गोरेगाव व शहापूर तालुक्यातील किन्हवली व डोळखांब ही महसूल मंडळे अधिसूचित आहेत. विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) व विमा संरक्षण कालावधी – जादा आर्द्रता व जास्त पाऊस – दि.१जुलै ते ३० सप्टेंबर. प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (रुपये प्रति हेक्टर) – १. या कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग ५ दिवस ९० टक्के पेक्षा जास्त राहिल्यास व प्रतिदिन २० मि. मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग ४ दिवस झाल्यास रु. ३१,५००/- देय राहिल. २. या कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग १० दिवस ९० टक्के पेक्षा जास्त राहिल्यास व प्रति दिन २० मि. मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग ८ दिवस झाल्यास रु. ७०,०००/- देय राहिल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु, ७०,०००/-. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जवळच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी किंवा विमा कंपनीशी   संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे यांनी केले आहे. 0000

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या

कर्ज योजनांसाठी संकेतस्थळावरून अर्ज करण्याचे आवाहन   ठाणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत दारिद्र्य रेषेखालील बेरोजगारांकरिता विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनांसाठी अर्ज करण्यासाठी www.lokshahir.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. अनुसूचित जातीतील युवकांनी या संकेतस्थळावर जाऊन विविध कर्ज योजनांसाठी अर्ज करावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक वंदना राणे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग समाज व त्यातील 12 पोटजाती – मांग, मातंग, मिनी मादिंग, मादिग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग-गारुडी, मांग-गारोडी, मादगी, मादिगा या पोटजातीतील 18 ते 50 या वयोगटातील दारिद्र्य रेषेखालील (वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 3,00,000/-) बेरोजगारांकरिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. महामंडळामार्फत थेट कर्ज योजना (कर्ज मर्यादा रु.1.00 लाख) तसेच केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या पीएम एजेएवाय योजनांचे कर्ज प्रस्ताव/अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी पोर्टल विकसित करण्यात आले असून www.lokshahir.in अशी आहे. या सुविधेचा ठाणे जिल्ह्यातील मांतग समाजातील शहरी / ग्रामीण भागातील इच्छुक / पात्र व्यक्तीने जास्तीत जास्त लाभ घ्यावा. कर्जप्रस्ताव सादर केल्यानंतर महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार मंजुरी संदर्भातील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. अधिक माहितीकरिता जिल्हा कार्यालयाच्या जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ३ रा मजला, दत्तवाडी, स्वामी समर्थ मठासमोर, सहयाद्री शाळेच्या बाजुला, खारेगाव, कळवा (प), ठाणे ४००६०५. दूरध्वनी क्र. ०२२-२५३८८४१३. या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) च्या जिल्हा व्यवस्थापक वंदना राणे यांनी कळविले आहे. 000000

पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी बिनचूक व पारदर्शी होण्यासाठी प्रयत्न करावे – विभागीय आयुक्त पी. वेलरासू

अशोक गायकवाड   ठाणे : विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आज पहिले प्रशिक्षण विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी बिनचूक व पारदर्शीपणे होण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी यावेळी सांगितले. भारत निवडणूक आयोगाने कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. या मतदारसंघात २६ जून रोजी मतदान होणार असून १ जुलै २०२४ रोजी नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात आज मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे, रायगड जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे, पालघर जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर तावडे, नगर परिषद प्रशासनाचे संचालक मनोज रानडे, उपायुक्त तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, कोकण विभागाचे उपआयुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, रेवती गायकर, सत्यम गांधी आदी यावेळी उपस्थित होते. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मतमोजणीचे हे पहिले प्रशिक्षण होते. यावेळी गायकवाड यांनी मतमोजणीसाठी करावयाची तयारी, मतपत्रिका कशा मोजाव्यात, त्यांची वैध-अवैधता कशी तपासावी, वैध मतांचा कोटा कशा प्रकारे तपासावे, किती फेऱ्या होणार आदी माहिती दिली. तसेच रानडे यांनीही मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणकोणती काळजी घ्यावी, डेटा कसा भरावा आदींची माहिती दिली. वेलरासू यांनीही मार्गदर्शन करून म्हणाले की, यंदा कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी झाली आहे. तसेच यंदा मतदानाची वेळ वाढविण्यात आल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार आहे. या निवडणुकीत १३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे. सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा या निवडणुकीची प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया वेगळी असणार आहे. पसंतीक्रमानुसार मतदान होणार असल्याने मोजणी प्रक्रियेची व्यवस्थित तयारी करावी व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व बिनचूक होण्यासाठी प्रयत्न करावे. कोकण पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त असल्याचे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी सांगितले. तहसीलदार आसावरी संसारे यांनी सूत्रसंचालन केले. 000000

मेट्रोच्या कामांमुळे शिळफाटा रस्त्यावरील अवजड वाहने पर्यायी रस्त्यावरून वळविण्याच्या हालचाली

कल्याण: कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या मध्यभागी कल्याण-तळोजा मेट्रो मार्गिकेची कामे गेल्या महिन्यांपासून सुरू झाली आहेत. या कामांमुळे मागील दोन वर्षापासून कोंडी मुक्त झालेला शिळफाटा रस्ता पुन्हा वाहन कोंडीच्या विळख्यात अडकू लागला आहे. या कोंडीतून प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी शिळफाटा दिशेने कल्याणकडे येणारी अवजड वाहने काटई-बदलापूर रस्ता, नेवाळी चौक ते मलंग रस्त्याने, चक्कीनाका दिशेने वळविण्याच्या विषयावर पालिका, वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमत झाले आहे. तसेच, शिळफाटाकडून कल्याण दिशेने येणारी डोंबिवलीतील बहुतांशी वाहने विको नाका येथे वळण घेऊन डोंबिवलीत प्रवेश करतात.या वाहनांना मानपाडा चौक येथे मज्जाव करून ती मानपाडा रस्त्याने डोंबिवली शहरात वळविण्याचाही विचार कल्याण डोंबिवली पालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत एमएमआरडीए, एमएसआरडीसी, वाहतूक, पालिका अधिकारी उपस्थित होते. शिळफाटा रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन न करता ही कामे सुरू करण्यात आल्याने, शिळफाटा रस्त्यावरील गोळवली, विको नाका भागात वाहन कोंडीला सुरूवात झाली आहे. मेट्रो कामांसाठी शिळफाटा रस्त्याच्या मध्यभागी अवजड खोदकाम यंत्रणा उभी करण्यात आली आहे. रस्त्याच्या मध्यभागात दो्न्ही बाजुने संरक्षित पत्रे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजुने रस्ता अरूंद झाला आहे. या अरूंद रस्त्यावरून कंटेनर, अवजड वाहने, मोटारीसह सर्व प्रकारची वाहने धावत आहेत. त्यामुळे शिळफाटा रस्त्यावर कोंडी होऊ लागली आहे. या कोंडीचा सर्वाधिक फटका नोकरदार, शाळकरी विद्यार्थी बसना बसू लागला आहे. या कोंडीवर उपाय करण्यासाठी पालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण होईपर्यंत शिळफाटा दिशेने कल्याण, डोंबिवलीकडे येणारी अवजड वाहने काटई नाका येथून बदलापूरमार्गे नेवाळी चौक, मलंग रस्ता, चक्कीनाका ते पत्रीपूल अशी वळविण्यात यावीत. किंवा काही वाहने बदलापूरमार्गे इच्छित स्थळी जातील. डोंबिवलीत येणारी वाहने विको नाका भागात जाऊ न देता ती मानपाडा चौकात रोखून ती मानपाडा रस्त्याने डोंबिवली शहरात सोडण्यात यावीत यामुळे सोनारपाडा, गोळवली, विको नाका भागात डोंबिवलीतील वाहनांमुळे होणारी कोंडी कमी होईल. या रस्त्यावरून फक्त लहान वाहने कल्याणच्या दिशेने धाऊ लागली तर मेट्रो कामांच्या ठिकाणी होणारी कोंडी कमी होईल, अशी चर्चा बैठकीत करण्यात आली. मेट्रो मार्गिकेच्या कामामुळे शिळफाटा रस्त्यावरील कोंडी सोडविण्यासाठी अवजड वाहने पर्यायी मार्गाने वळविणाच्या नियोजन करण्याच्या सूचना वाहतूक विभागाला केल्या आहेत. लवकरच त्याची अंमलबजावणी करून या रस्त्यावरील कोंडी कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. डाॅ. इंदुराणी जाखड (आयुक्त)

लोकनेते जोमात पण सामान्य माणूस कोमात

जलजीवन योजनेचा फज्जा   राजीव चंदने   मुरबाड : मुरबाड तालुक्यात जल जीवन मिशनची १८३ योजनांची कामे सुरू आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याची समस्या जाणवू नये यासाठी दोन वर्षांपासून ‘जल जीवन मिशन’ ची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र दरवर्षी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या वर्षी सुद्धा ४१ गाव पाड्यात टँकरने पाणीपुरवठा केला होता. टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी तो पुरेसा नसल्याने पाणी टंचाई भासते. तालुक्यातील नागरिकांना रोज पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. जलजीवन मिशन मध्ये घरात थेट नळाद्वारे पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु अतिशय संथगतीने कामे सुरू आहेत. ३१ मार्च २०२४ रोजी या योजनांची कामे पूर्ण करण्याची मुदत संपली आहे. तरीही जलजीवन मिशनची एकही योजना पूर्ण झाली नसून कामे पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदारांना अपूर्ण कामांचे बिल देण्यात येऊ नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांनी संबंधित अधिकारी यांच्याकडे केली आहे. 00000

ठाण्यात  मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले

ठाणे : ठाण्यात  गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. ठाणे शहरात सकाळी ८.३० ते ९.३० या एक तासाच्या कालावधीत २६.४२ मिमी पाऊस पडला असल्याची नोंद ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे करण्यात आली आहे. जून महिना सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी शहरात पुरेशा प्रमाणात पावसाने हजेरी लावली नव्हती. यामुळे वातावरणातही उकाडा कायम होता. या उकाड्याने नागरिक देखील हैराण झाले होते. परंतु, जिल्ह्यात बुधवारपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याने नागरिकांना दिलासा मिळाला. गुरुवारी देखील पहाटेपासून पाऊस पडायला सुरुवात झाली. यामुळे सकाळी कामाला जाणार्‍या नागरिकांची तसेच शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. ठाणे शहरात सकाळी ८.३० ते ९.३० या कालावधीत २६.४२ मिमी पाऊस पडला. यामुळे शहरातील पेढ्या मारुती रोड, वंदना बस डेपो जवळ पाणी साचले होते. ०००००

जागतिक सिकलसेल जागरूकता दिवसानिमित्त २०० रुग्णांची तपासणी

ठाणे- सिकलसेल या आजाराबद्दल लोकांमध्ये जनजागृती असणे आवश्यक आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून रुग्णांना माहिती देण्यासाठी त्यांचे उपचार करून घेण्यासाठी नक्कीच मदत होईल त्यामुळे आरोग्य विभागाने नेहमी सज्ज राहून काम करावे…

संजय केळकर यांनी काढला कोकण पिंजून !

पदवीधर निवडणुकीत निरंजन डावखरे यांच्यासाठी   ठाणे: कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ आमदार संजय केळकर यांनी तीन दिवसांच्या दौऱ्यात अवघी कोकण पट्टी पिंजून काढली. कोकणच्या शैक्षणिक, रोजगार आणि पर्यटन विकासासाठी निरंजन डावखरे यांना विजयी करण्याचे आवाहन आ. संजय केळकर यांनी बैठका, सभा, मेळावे आणि भेटीगाठीतून केले. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पेण, माणगाव, गोरेगाव, महाड, दापोली चिपळूण, देवरूख, रत्नागिरी येथे शिक्षक आणि पदवीधरांचे मेळावे घेऊन मतदारांना आवाहन केले. विशेष म्हणजे वैयक्तिक आणि घरोघरी जाऊनही त्यांनी प्रचार केला. एक टर्म पदवीधर मतदार संघाचे आमदार आणि दोन टर्म विधानसभेचे आमदार अशा मोठ्या कारकीर्दीत त्यांनी ठाणे शहरासह ठाणे, पालघर तसेच रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या कामांचा फायदा त्यांना या दौऱ्यात झाला. केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार असून पुढील काळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. त्याच बरोबर पर्यटन आणि रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार असून कोकणातील पदवीधर आणि शिक्षकांच्या विकासासाठी भाजपचे निरंजन डावखरे यांना पहिल्या फेरीतच विजयी करा, असे आवाहन करुन केळकर यांनी पदवीधर मतदारांबरोबरच शिक्षकांच्या समस्यादेखील सोडवण्याबाबत आश्र्वासित केले. संचमान्यता, शालेय गणवेश, वैद्यकीय बिले, बी.एल.ओ. जबाबदारी, जिल्हांतर्गत बदली, मुख्यालय आदी अनेक मुद्द्यांवर ठोस कार्यवाही करण्याचे सांगितले. मत बाद होऊ नये यासाठी मतदारांनी पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. या दौऱ्यात श्री. केळकर यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, विजय पवार, वैभव कांबळे, उदय गायकवाड, भाजपचे केदार साठे, अनिकेत कानडे आदी उपस्थित होते. 0000

ठाण्यात शुक्रवार, शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार

० तातडीच्या दुरुस्ती कामांसाठी शटडाऊन ० वेगवेगळ्यावेळी पाणी पुरवठा बंद राहणार        ठाणे  : ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील तातडीच्या दुरुस्ती कामांमुळे शुक्रवार, २१ जून रोजी स.११.०० वाजल्यापासून शनिवार, २२ जून रोजी…