Category: ठाणे

Thane news

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रोहन घुगे यांची नियुक्ती

अनिल ठाणेकर   ठाणे : जिल्हा परिषद ठाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रोहन घुगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी पदाचा पदभार आज स्वीकारला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार, प्रकल्प संचालक, जिल्हा परिषद ठाणे छायादेवी शिसोदे यांच्याकडे होता. छायादेवी शिसोदे यांनी जिल्हा परिषदेचा कार्यभार उत्कृष्टपणे सांभाळला आहे. सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते व प्रकल्प संचलक छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यापूर्वी रोहन घुगे वर्धा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते सन २०१८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची कारकिर्द यशस्वी राहिलेली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तिमिरातूनी तेजाकडे नेण्याकरिता रोहन घुगे यांच्या संकल्पेतून विविध प्रयोग राबविले गेले. यातूनच मिशन दीपस्तंभ राबवून विद्यार्थ्याचा गुणवत्ता विकास साधला. याचीच फलश्रुती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांना देशातील नामांकीत ‘स्कॉच’ पुरस्कार मिळाला आहे. कुपोषण मुक्त ग्राम अंतर्गत कुपोषित व अति तीव्र कुपोषित बालकांना पोषण किट वेळोवेळी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. प्रत्यक्ष पाहणी करून विकास कामांना उंचावर घेऊन जाण्यासाठी त्यांनी मोलाचे काम वर्धा जिल्ह्यात केले आहे.‌ वर्धा जिल्हा राज्यात पहिला पीएम विश्वकर्मा राबविण्यात रोहन घुगे यांनी विषेश प्रयत्न केले आहेत. कुपोषण, शिक्षण, कृषि, पशु, आरोग्य अशा विविध विषयावर अभ्यासपुर्वक कामकाज त्यांनी केले असून विविध नाविन्यपुर्ण योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी मोलाचे कामकाज वर्धा जिल्ह्यात केले आहे. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व विभागांच्या प्रगति पथावर असलेल्या कामांचा आढावा घेतला. शिक्षण विभागातील रिक्त पदे, शाळा भेटी, विद्यार्थी संख्या यांची माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी दिली.ग्रामीण भागात पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन नियोजन संदर्भातील माहिती घेण्यात आली. ग्रामस्थांच्या कल्याणासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन विकास कामांची प्रत्यक्ष पाहाणी करण्याचे नियोजन करण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या कामांना अधिक गती आणण्यासाठी सर्व विभाग प्रमुख यांनी प्रयत्नशील राहायला हवे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.पु. व स्व) प्रदिप कुलकर्णी, लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, कार्यकारी अभियंता संदिप चव्हाण, शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे, महिला व बालविकास विभाग प्रमुख संजय बागुल, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे आदी यावेळी उपस्थित होते. 0000

संजय केळकर यांनी काढली कोकणपट्टी पिंजून !

पदवीधर निवडणुकीत निरंजन डावखरे यांच्यासाठी ठाणे, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ आमदार संजय केळकर यांनी तीन दिवसांच्या दौऱ्यात अवघी कोकण पट्टी पिंजून काढली. कोकणच्या शैक्षणिक, रोजगार आणि पर्यटन विकासासाठी निरंजन डावखरे यांना विजयी करण्याचे आवाहन आ. संजय केळकर यांनी बैठका, सभा, मेळावे आणि भेटीगाठीतून केले. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पेण, माणगाव, गोरेगाव, महाड, दापोली चिपळूण, देवरूख, रत्नागिरी येथे शिक्षक आणि पदवीधरांचे मेळावे घेऊन मतदारांना आवाहन केले. विशेष म्हणजे वैयक्तिक आणि घरोघरी जाऊनही त्यांनी प्रचार केला. एक टर्म पदवीधर मतदार संघाचे आमदार आणि दोन टर्म विधानसभेचे आमदार अशा मोठ्या कारकीर्दीत त्यांनी ठाणे शहरासह ठाणे, पालघर तसेच रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या कामांचा फायदा त्यांना या दौऱ्यात झाला. केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार असून पुढील काळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. त्याच बरोबर पर्यटन आणि रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार असून कोकणातील पदवीधर आणि शिक्षकांच्या विकासासाठी भाजपचे निरंजन डावखरे यांना पहिल्या फेरीतच विजयी करा, असे आवाहन करुन केळकर यांनी पदवीधर मतदारांबरोबरच शिक्षकांच्या समस्यादेखील सोडवण्याबाबत आश्र्वासित केले. संचमान्यता, शालेय गणवेश, वैद्यकीय बिले, बी.एल.ओ. जबाबदारी, जिल्हांतर्गत बदली, मुख्यालय आदी अनेक मुद्द्यांवर ठोस कार्यवाही करण्याचे सांगितले. मत बाद होऊ नये यासाठी मतदारांनी पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. या दौऱ्यात श्री. केळकर यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, विजय पवार, वैभव कांबळे, उदय गायकवाड, भाजपचे केदार साठे, अनिकेत कानडे आदी उपस्थित होते. 0000

राज्य सरकारी कंत्राटदारांची उपासमार

२७ जूनला अधीक्षक अभियंत्यांच्या दारात करणार ठिय्या आंदोलन   ठाणे : राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या विविध पायाभूत कामांची पूर्तता महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे सदस्य असलेल्या ठेकेदारांनी केली आहे. मात्र, त्यांची देयके देण्यात चालढकल करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे विभागिय अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. या मागण्या मान्य केल्यास येत्या गुरूवारी, २७ जून रोजी, अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा आवळे यांनी दिला आहे. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्राम विकास, जलजीवन मिशन विभाग, ग्रामविकास व जलसंधारणसारख्या अनेक शासनाच्या विभागाकडे काम करणाऱ्या कंत्राटदार यांची अनेक प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी शासन, मंत्री व प्रशासनाकडून शासन स्तरावर काहीही प्रयत्न होत नाही. याबाबत शासनास कंत्राटदार महासंघाने वेळोवेळी ५ मागण्याचा ड्राफ्ट दिला होता. पत्रव्यवहार व बैठक ही घेतली होते, परंतु शासन काहीही करीत नाही, असा आरोप करून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने ही निदर्शने केली. दरम्यान,  राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्राम विकास जलजीवन मिशन, जलसंधारण, स्थानिक स्वराज्य संस्था इथे विकास कामे करणाऱ्या कंत्राटदार यांची देयके तातडीने देऊन   कंत्राटदार त्यांचे कुटुंब व त्यावर अवलंबून असणारे व्यवसायिक यांची वर्षानुवर्षे देयकेच मिळत नसल्याने होणारी आर्थिक पिळवणूक व उपासमार तातडीने बंद करावी;  राज्यातील सर्व विभागाकडील कामे मंजुरी करण्याच्या अगोदर त्या कामांना निधीची उपलब्धता असल्याशिवाय शासनाने सदर कामांसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया अजिबात राबविण्यात येऊ नये, आदी मागण्यांचे निवेदन महासंघाने दिले असून या मागण्यांची आठवडाभरात पूर्तता न केल्यास अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ००००

प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

अनिल ठाणेकर   ठाणे :पांढऱ्या रेशनकार्डधारकांना महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य सेवेअंतर्गत  ५ लाखापर्यंत मोफत आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मुख्यमंत्री या नात्याने राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळीत असून गोर-गरीब जनतेसाठी मुख्यमंत्री म्हणून आरोग्य सेवेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून गोर-गरीब रूग्णांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळत आहेत. या आरोग्य सेवेचा फायदा ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असलेल्या पिवळे व केशरी रेशनकार्डधारकांना दिला जात आहे. त्यामुळे पांढर्‍या रेशनकार्डधारक या सुविधेपासून वंचित राहत होते. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून ज्या पध्दतीने पिवळे व केशरी रेशनकार्डधारकांना जी आरोग्य सुविधा मिळते त्याचप्रमाणे पांढर्‍या रेशनकार्डधारकांना मिळावी, अशी  मागणी जनतेतून होऊ लागली आहे. पांढरे रेशनकार्डधारक असलेले अनेक नागरिक या राज्यामध्ये असून त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांच्यावर मोफत वैद्यकिय उपचार होऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जर पांढर्‍या रेशनकार्डधारकांची शिधापत्रिका आधारकार्ड क्रमांकाशी संलग्न करून महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून पांढर्‍या रेशनकार्डधारकांना ५ लाखापर्यंत मोफत आरोग्य सुविधा दिल्यास याचा फायदा राज्यातील गोर-गरीब समाजाला होईल व त्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतील. मुख्यमंत्री या नात्याने नागरिकांच्या भल्यासाठी अनेक महत्वाचे धाडसी निर्णय घेतले आहेत त्याचप्रमाणे राज्यातील पांढर्‍या रेशनकार्डधारकांना ५ लाखापर्यंत मोफत आरोग्य सेवा देण्याचा हाही धाडसी निर्णय घ्यावा, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. ०००००

मुंबई-नाशिक महामार्गावरील कोंडी आणखी वर्षभर

महामार्गाचे ६० टक्के काम पूर्ण   ठाणे : ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीच्या दृष्टिने महत्त्वाच्या असलेल्या मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या सुमारे २४ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. आता हा प्रकल्प आता मे २०२५ पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. प्रकल्पाचे काम लांबणीवर पडल्याने या मार्गावर आणखी वर्षभर कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई नाशिक महामार्ग हा वाहतुकीच्या दृष्टिने महत्त्वाचा आहे. दररोज हलक्या वाहनांसह उरण जेएनपीटी येथून सुटणाऱ्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकही या मार्गावरून होत असते. हा महामार्ग असूनही अनेक ठिकाणी अरुंद आहे. तसेच रस्त्याची अवस्था देखील अत्यंत वाईट झाली आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यारित आहे. प्राधिकरणाकडून या रस्त्याची दुरुस्ती केली जात नव्हती. त्यामुळे पावसाळ्यात माजिवडा, साकेत, खारेगाव, भिवंडी भागात मोठ्याप्रमाणात खड्डे पडत होते. येथील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. यावरून टिका होऊ लागल्याने राज्य रस्ते विकास मंडळाने माजिवडा ते वडपे या रस्त्याचे काम २०२१ पासून हाती घेतले. सुमारे २४ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. याच मार्गाला समृद्धी महामार्ग जोडला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गावर वाहनांची वाहतुक मोठ्याप्रमाणात होणार आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामासोबतच येथील साकेत, खारेगाव या खाडी पूलांच्या प्रकल्पाचे महत्त्वाची कामे केली जात आहेत. तसेच भिवंडी येथील एक रेल्वे पूल आणि वडपे उड्डाणपूलाची कामांचीही यात समावेश आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु विविध तांत्रिक कारणांमुळे प्रकल्पाचे काम वेळेत पुर्ण होऊ शकलेले नाही. या प्रकल्पाचे काम केवळ ६० टक्के पूर्ण झाले आहे. येत्या तीन महिन्यांत उर्वरित ४० टक्के पूर्ण होणे शक्य नसल्याने राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रकल्प कामाला मे २०२५ पर्यंत मुदतवाढ घेण्याचे ठरविले आहे. ठाणे शहर, घोडबंदर भागात पावसाळ्यापूर्वी अनेक रस्त्यांची कामे, मेट्रो मार्गिका निर्माणाची कामे यामुळे अवजड वाहनांसाठी करण्यात आलेले वाहतुक बदल, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची निवडणूक प्रचाराच्या कालावधीतील वाहतूक तसेच निवडणूकीच्या कालावधीत मजूर गावी जाणे अशा विविध कारणांमुळे प्रकल्पाचे काम लांबणीवर पडले आहे. त्यामुळे आता वर्षभरानंतरच ठाणेकरांची कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाची वैशिष्ट्ये एकूण १ हजार १८२ कोटी ८७ लाख रुपये या प्रकल्पासाठी खर्च होत आहे. खारेगाव येथे ३८ मार्गिकांचा टोलनाका चार पदरी मुख्य मार्गिकांचे आठ पदरी मार्गामध्ये रुपांतर तसेच प्रत्येकी दोन-दोन पदरी सेवा रस्ते. महामार्गावरील महत्त्वाच्या पूलांपैकी खारेगाव पूलाचे ६२ टक्के, साकेत पूलाचे ६९ टक्के, रेल्वेपूलाचे ३० टक्के आणि वडपे उड्डाणपूलाचे ३७ टक्के काम पूर्ण झाले आहे. -0000

ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजारांनी काढले डोके वर

१५ दिवसात मलेरियाचे २५ रुग्ण तर, डेंग्यूचे ११ रुग्ण   ठाणे : जिल्ह्यात गेल्या १५ दिवसात मलेरियाचे २५ तर, डेंग्यू चे ११ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू आणि मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण हे ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत. यामुळे पावसाळा सुरू होताच साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे. साथ आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्ह्यासह पालिकांच्या आरोग्य यंत्रणा सर्तक झाल्या असून त्यांनी उपाययजोना आखण्यास सुरूवात केली आहे. पावसाळ्याच्या कालावधीत विशेष करुन डेंग्यू आणि मलेरियाची साथ मोठ्याप्रमाणात पसरत असते. जिल्ह्यात सध्या तरी ऊन आणि पावसाचा खेळ सुरु असल्याचे दिसून येत आहे. सलग पाऊस कोसळत नसल्यामुळे वातावरणात पुन्हा उकाडा वाढतो आहे. वातावरणातील या बदलाचा परिणाम, नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. ताप, सर्दी, खोकला आणि अंगदुखी या आजारांनी डोके वर काढले आहेत. यामध्ये तापाची साथ मोठ्याप्रमाणात असल्याची माहिती ठाण्यातील खासगी दवाखान्याचे डॉक्टर नंदकुमार ठाकूर यांनी दिली. ज्या रुग्णांना वारंवार ताप येतो आहे, त्यांनी तात्काळ चाचणी करुन घ्यावी, डेंग्यू किंवा मलेरियाची लागण झाली नाही ना हे पहावे, असा सल्ला त्यांनी नागरिकांना दिला आहे. पावसाळ्याच्या कालावधीत साथीचे आजार मोठ्याप्रमाणात पसरु नये यासाठी स्थानिक पातळीवर आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जातात. यात, धुर फवारणी करणे, घरात साठविलेल्या पाण्यातील जंतू नष्ट करणे अशा विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय, भितीपत्रकांच्या माध्यमातून साथीच्या आजारांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यंदाही ठाणे महापालिकेकडून शहरातील मुख्य चौकात ‘शहर डेंग्यू मलेरिया मुक्त करुया ’ अशा मथळ्याचा फलक लावण्यात आले आहेत. त्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे आजार रोखण्यासाठी कोणती कशी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मलेरियाचे २५ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ठाणे १२, कल्याण-डोंबिवली सहा, नवी मुंबई एक, मिराभाईंदर पाच आणि ठाणे ग्रमाणीमधील एका रुग्णाचा समावेश आहे. तर, जिल्ह्यात डेंग्यूचे ठाणे शहरात चार, कल्याण-डोंबिवलीत दोन, नवी मुंबईत दोन आणि ठाणे ग्रामीण मध्ये तीन असे एकून ११ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 00000

 ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर बांबूचे छत

पावसापासून बचाव करण्यासाठी तात्पुरता आडोसा   ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील नव्यानेच विस्तारित करण्यात आलेल्या फलाट क्रमांक पाचवर प्रवाशांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात हिरव्या जाळीचे बांबूचे छत उभारले आहे. फलाट क्रमांक पाचचे अलीकडेच रूंदीकरण करण्यात आले. पहिल्याच पावसात या फलाटावर पावसाचे पाणी तुंबल्याने प्रवाशांना लोकलमध्ये चढ उतर करताना त्रास होत होता. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचचे विस्तारिकरण झाल्यानंतर समाधानाने प्रवास करता येईल, असे प्रवाशांना वाटले होते. विस्तारिकरण करण्यात आलेल्या फलाटाच्या भागावर पत्र्याचे छत नाही. त्यामुळे पहिल्याच मोसमी पावसाचे पाणी फलाटावर पडून साचले होते. फलाटावरील काँक्रीटचे बांधकाम नवीन असल्याने त्याच्यावर काँक्रीटच्या गारव्यासाठी घायपताच्या पाण्यात भिजवलेल्या गोण्या टाकण्यात आल्या होत्या. या गोण्यांमध्ये प्रवाशांचे पाय अडकून पडण्याचे प्रमाण वाढले होते. डोक्यावर छत नाही आणि पावसातून सुटका करून घेण्यासाठी घाईत फलाटावर उतरले तर गोण्यांमध्ये पाय अडकून प्रवासी पडत होते. या फलाटावर दोन्हीकडून प्रवाशांना त्रास होत होता. या त्रासाची बातमी ‘लोकसत्ता’ने प्रसिध्द केली होती. या वृत्ताची गंभीर दखल घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक पाचवर विस्तारित फलाट क्रमांक पाचवर पत्र्याचा निवारा होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात हिरवी जाळी असलेले बांबूचे छत विस्तारित भागात लावून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या बांबुच्या छतामुळे आता पावस किंवा उन्हापासून बचाव होणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. मुसळधार पाऊस सुरू झाला तर मात्र बांबूच्या छतामधून पावसाच्या पाण्याची गळती होण्याची शक्यता प्रवाशांनी व्यक्त केली. बांबूचे छत लगतच्या लोखंडी सांगाड्यांना बांधून तयार करण्यात आले आहे. हे छत कोसळणार नाही याची दक्षता रेल्वेने घेण्याची मागणी प्रवासी करत आहेत. ०००००

ठाण्यात मैदानावरील प्रदर्शनासाठी मुंबईच्या धर्तीवर नियमावली करणार

संजय वाघुलेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला आयुक्तांचे आश्वासन   ठाणे : ठाणे शहरातील सार्वजनिक मैदानांवरील व्यावसायिक प्रदर्शनाबाबत मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नियमावली निश्चित करण्यात येणार आहे. या नियमावलीनुसार वर्षातील ३६५ पैकी ४५ ते ५० दिवसांपर्यंत मैदानात प्रदर्शन भरविता येतील. तर उर्वरित काळ मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध होतील, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी काल मंगळवारी येथे दिली. त्याचबरोबरच वर्षातून दोन वेळा झाडांच्या फांद्या कापण्याचे, गावदेवी व ज्युपिटर हॉस्पिटलजवळील वाहनतळ लवकरच सुरू करण्याचे आश्वासन महापालिकेकडून देण्यात आले आहे. ठाणे शहरातील नागरी समस्या व नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक- नगरसेविकांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची मंगळवारी सायंकाळी भेट घेतली. या शिष्टमंडळात माजी गटनेते नारायण पवार, मनोहर डुंबरे, भरत चव्हाण, मुकेश मोकाशी, कृष्णा पाटील, सुनेश जोशी, नंदा पाटील, दीपा गावंड, अर्चना मणेरा, कमल चौधरी, कविता पाटील, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी, नम्रता कोळी, राजकुमार यादव आदींचा समावेश होता. ठाण्यातील मुलांना जास्तीत जास्त दिवस खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध राहावीत, अशी भाजपाच्या शिष्टमंडळाने मागणी केली होती. त्यावर आयुक्त राव यांनी मुंबई महापालिकेचे मैदाने भाड्याने देण्याचे धोरण मागवून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मुंबई महापालिकेच्या धोरणानुसार ठाण्यात धोरण तयार केले जाईल. त्यामुळे केवळ ४५ ते ५० दिवसांपर्यंत सार्वजनिक मैदानात प्रदर्शन भरविता येणार आहेत, असे जिल्हाध्यक्ष वाघुले यांनी सांगितले. वर्षातून दोनदा वृक्ष फांद्यांची छाटणी रस्त्यालगतची झाडे व झाडांच्या फांद्या कोसळून होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वर्षभरातून दोन वेळा झाडांच्या धोकादायक झालेल्या फांद्या तोडण्याची विनंती भाजपाकडून करण्यात आली. त्यावेळी वर्षभरातून दोन वेळा झाडांच्या फांद्या तोडण्याच्या निविदा जारी करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. शहरातील दोन वाहनतळ लवकरच खुला ज्युपिटर हॉस्पिटललगतच्या सर्व्हिस रोडवरील वाहतूककोंडी व गावदेवी भाजी मार्केट येथील दुचाकींचा वाहनतळ खुला करण्याची मागणी करण्यात आली. ज्युपिटर वाहनतळात १४०० वाहने पार्क होणार असून, तो वाहनतळ महिनाभरात खुला होईल. तर गावदेवी पार्किंगबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्त राव यांच्याकडून देण्यात आले. बेकायदा होर्डिंगची पाहणी शहरातील काही भागात महापालिकेकडून कमी क्षेत्रफळाची परवानगी घेऊन भव्य होर्डिंग उभारण्यात आले आहेत. तर अनेक ठिकाणी बेकायदा होर्डिंग थाटले आहेत. त्याबाबत तक्रार केल्यानंतर पाहणी करून तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्याचबरोबर शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्याची मागणीही भाजपाच्या शिष्टमंडळाने केली. त्यावरही कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ००००

महाराष्ट्र सदनात पाणीटंचाई पण केंद्रीय मंत्री करताहेत चक्क मिनरल वॉटरने आंघोळ !

मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन कुलूपबंद करावे – नितीन देशपांडे   अनिल ठाणेकर   ठाणे : महाराष्ट्र सदनात भीषण पाणीटंचाई असताना, नवनियुक्त केंद्रीय मंत्री नीलाजारेपणाने चक्क मिनरल वॉटरने अंघोळ करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे जोपर्यंत दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र सदन कुलूपबंद करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी केली आहे. दिल्लीतील पाणीटंचाईचा फटका नवीन महाराष्ट्र सदनालाही बसला असल्याचे दिसून आले असून, एका नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीवेळी बाहेरुन पाण्याच्या (मिनरल वॉटर) बाटल्या आणून, त्यांत्या्या आंघोळीची व्यवस्था करण्याची वेळ व्यवस्थापनावर आल्याचे धक्कादायक आणि तितकेच संतापजनक वास्तव उघड झालेले आहे. दिल्लीत भीषण पाणीटंचाई असताना, महाराष्ट्रातील एका नवनियुक्त केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र सदनात वास्तव्यास असणे आणि त्यांच्यासाठी पाणी उपलब्ध नसतानादेखील या केंद्रीय मंत्र्याने चक्क मिनरल वॉटरच्या फिल्टरच्या पाण्याने अंघोळ करणे, ही घटना म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. हे सरकार जनतेचे की लोकप्रतिनिधींचे असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, एकीकडे महाराष्ट्रातील दुर्गम खेड्यांत आणि आदिवासी पाड्यांत, पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असल्यामुळे, अबालवृद्धांना पाच-पाच किलोमीटरवरुन पाणी आणावे लागत असताना, दुसरीकडे महाराष्ट्र सदनात भीषण पाणीटंचाई असताना, हे नवनियुक्त केंद्रीय मंत्री नीलाजारेपणाने चक्क मिनरल वॉटरने अंघोळ करतात, यालाच असंवेदनशीलता म्हणतात. याबाबत ‘धर्मराज्य पक्षा’च्या भावना अतिशय तीव्र असून, जोपर्यंत दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र सदन कुलूपबंद करण्यात यावे आणि यासंदर्भात तातडीने कार्यवाही करीत, आपली संवेदनशीलता प्रकट करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करीत असल्याचे नितिन देशपांडे यांनी सांगितले आहे. ००००

रागिणीताई बैरीशेट्टी यांच्यावतीने रविवारी ज्येष्ठ व विधवा महिलांसाठी मोफत छत्री वाटप – भास्कर बैरीशेट्टी

ठाणे : स्थानिक माजी नगरसेविका सौ रागिणीताई बैरीशेट्टी यांच्यावतीने  शिवाई नगर परिसरातील सर्व विभागामधील, वय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला यांच्यासाठी छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी २३ जून रोजी करण्यात आल्याची माहिती सामाजिक बांधिलकी जपणारे सच्चे समाजसेवक श्री भास्कर बैरीशेट्टी यांनी दिली आहे. पावसाळा सुरू होत आहे. पावसापाण्यात महिलांना संरक्षण मिळावे या हेतुने स्थानिक माजी नगरसेविका सौ रागिणीताई भास्कर बैरीशेट्टी यांच्यावतीने शिवाई नगर परिसरातील सर्व विभागामधील, वय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला यांच्यासाठी छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी, २३ जून २०२४ रोजी,सायंकाळी ७ वाजता, जनसंपर्क कार्यालय, उपवन सोसायटी, शिवाई नगर शिवसेना शाखेजवळ, ठाणे (प) येथे करण्यात आले करण्यात आले आहे. छत्री वाटप कार्यक्रमध्ये जो उपस्थित राहील आणि कूपन आणेल त्यालाच छत्री मिळेल. छत्री वाटपाची कूपन जनसंपर्क कार्यालय येथून घेऊन जाणे. कूपन शिवाय छत्री दिली जाणार नाही. एका व्यक्तीला एकच कूपन दिले जाईल आणि एका व्यक्तीला एक कूपन एक छत्री दिली जाईल. एका कूपन व्यतिरिक्त दुसरे कूपन आणले तर छत्री मिळणार नाही. कार्यक्रमानंतर कूपन आणल्यास छत्री मिळणार नाही, याची नोंद घ्यावी, तरी या छत्रीवाटप कार्यक्रमास महिलांनी मोठ्यासंखेने उपस्थित रहावे असे आवाहन स्थानिक कार्यसम्राट माजी नगरसेविका सौ. रागिणीताई भास्कर बैरीशेट्टी व सामाजिक बांधिलकी जपणारे सच्चे समाजसेवक श्री भास्कर बैरीशेट्टी  यांनी केले आहे. ०००००