Category: ठाणे

Thane news

तंबाखू मुक्त शाळा, लेट्स स्पिक इंग्लिश उपक्रमासाठी ८ कोटींचा निधी – छायादेवी शिसोदे

ठाणे : तंबाखू मुक्त शाळा, लेट्स स्पिक इंग्लिश, शाळा दुरुस्ती संदर्भात ८ कोटी निधी सेवाभावी संस्थांकडून तालुक्यात उपलब्ध करून शाळेची गुणवत्ता वाढवली आहे, यामुळे या सर्व कामांना मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी शुभेच्छा दिल्या. गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी शिक्षणविभागाची माहिती दिली. तालुक्यात ५७३ शाळा असून समग्र शिक्षा अंतर्गत पाठ्यपुस्तिका वाटप करण्यात आले आहे. शाळा प्रवेश उत्सव मंगळवारी करण्यात येणार आहे. विशेष मोहिम राबवून शाळाबाह्य मुले ३० जून पर्यंत शोधमोहीम करण्यात येईल. सावरोली येथिल प्राथमिक शाळेत २ हजार सिडबॉल तयार केले आहे.तंबाखू मुक्त शाळा, लेट्स स्पिक इंग्लिश, शाळा दुरुस्ती संदर्भात ८ कोटी निधी सेवाभावी संस्थांकडून तालुक्यात उपलब्ध करून शाळेची गुणवत्ता वाढवली आहे. या सर्व कामामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. शहापूर तालुक्यातील कामकाजची माहिती घेऊन योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी पंचायत समिती शहापूर येथे भेट देऊन विविध कामांचा आज (दि. १४ जून २०२४) आढावा घेतला. याप्रसंगी सर्व अधिकारी यांचे पंचायत समिती शहापूर मार्फत गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी स्वागत केले. आपत्कालीन, दुर्धर आजार, साथरोग आजार नियंत्रण करण्यासाठी नियंत्रण कक्ष व भरारी पथक जिल्हा व तालुका स्तरावर तयार करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवावे.‌ पाणी उकळून व गाळून प्यावे यासाठी ग्रामस्थांना माहिती घ्यावी असे ग्रामसेवकांना माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.  शहापूर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर घरकुल ३ हजार ८९५ असून ३७१६ पूर्ण घरकुल व १७९ अपूर्ण घरकुल असल्याने पुढील नियोजन लवकरात लवकर करावे अशा सूचना दिल्या. ग्रामविकास अधिकारी मंगलसिंग बाबुलाल परमार घरकुलाचे १८९ पैकी १८१ घरकुल पुर्ण केल्याने उत्तम कामकाज केल्याने व ग्रामसेवक मंगेश जाधव यांनी १५ वा वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत कोठेरे येथिल मौजे वेटा पाडा येथे नळ पाणी पाणीपुरवठा संदर्भातील डोंगराळ भागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. समाज कल्याण विभागातील ४५ काम पुर्ण केल्याबद्दल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी अभिनंदन केले. विभाग निहाय उपलब्ध झालेला निधी पुर्ण खर्च व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवं. ग्रामस्थांनाच्या कल्याणासाठी काम करताना आपण मोलाचं काम करावं. कृषी विभागाने भाजीपाला लागवड, बियाणे विक्री यासंदर्भात उत्तम काम करित असल्याने कृषी विभागाचे अभिनंदन केले. तालुक्यात १५ वित्त आयोग अंतर्गत अखर्चित रक्कम खर्च करण्यासाठी सुचना उप मुख्य कार्यकारी अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी दिले. जनसुविधा अंतर्गत ११२ काम आणि नागरीसुविधा ४३ काम, तिर्थक्षेत्र संदर्भातील ४ काम सुरू आहे. माझी वसुंधरा अतंर्गत सर्व ग्रामपंचायतींमधील कामाची माहिती घेण्यात आली. पीएम विश्वकर्मा अंतर्गत अपूर्ण कामे पुढील आठवड्यात पूर्ण करण्याबाबत माहिती देण्यात आली. मनरेगा अंतर्गत प्रत्येकी ग्रामपंचायत निहाय २०० वृक्षलागवड पुढील सात दिवसात करण्यासाठी सुचना देण्यात आल्या. सामाजिक वनीकरण मार्फत वृक्षलागवड करण्यासाठी वृक्ष उपलब्ध करण्यात आले आहेत. सर्वं कामांचा ग्रामपंचायत निहाय आढावा उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी घेतला.बोगस बियाणे, तांत्रिक तुटवडा, जास्त दरांनी बियाणे विक्री तालुक्यात होऊ नये यासाठी पंचायत समिती कृषी अधिकारी व तालुका स्तरावरील कृषी अधिकारी यांनी तपासणी करावी असे आदेश देण्यात आले. तालुक्यात बियाणांच्या तक्रारींकडे ग्रामसेवकांनी विशेष लक्ष द्यावे. बांबू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांचे बैठक घेऊन शेतकऱ्यांना योग्य माहिती द्यावी व शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रस्ताव जास्तीत जास्त यावे असे आदेश कृषि विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी दिले. आढावा बैठकीस अनुपस्थित असणाऱ्या ग्रामसेवकांना नोटीस बजावण्याचे सक्त सुचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिली. पशुसंवर्धन विभागातील बांधकाम संदर्भात माहिती यावेळी घेण्यात आली. मान्सून पूर्व लसीकरण तालुक्यात १०० टक्के पुर्ण करण्यात आली आहे. तालुक्यातील पशुपालकांना आवाहन करून टॅगिंग करून घेण्यात यावे अशी विनंती पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर यांनी केले. गाव निहाय चारा आराखडा तयार करण्यासाठी सुचना देण्यात आल्या त्यामुळे ग्रामपंचायत निहाय माहिती देण्यात यावी असे ग्रामसेवकांना आवाहन करण्यात आले. लघुपाटबंधारे विभागाचे सन २०२३-२४ मधील एकूण ३३ काम असून प्रत्येक काम निहाय आढावा उप विभागीय जलसंधारण अधिकारी असिफ सय्यद यांनी माहिती उपस्थितांना दिली. तालुक्यात जलस्रोतचे पाणी नमुने तपासणी करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. शहापूर तालुक्यात बाल मृत्यू व माता मृत्यू कमी करण्यासाठी पावसाळ्यात माहेर घर योजना राबविण्यात येणार आहे याद्वारे गरोदर मातांची काळजी घेतली जाणार आहे‌. जननी सुरक्षा योजना यशस्वी राबविण्यासाठी शहापूर तालुक्यात जास्त समस्या असून गरोदर मातेची कागदपत्रे ग्रामपंचायत मार्फत तयार करून द्यावी अशी विनंती डॉ.‌स्वाती पाटील यांनी केली. तालुक्यातील जन्म मृत्यू नोंदी ऑनलाईन पध्दतीने ग्रामसेवक यांनी करावी. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावर देखील यांची ऑनलाईन नोंद व्हावी. जल जीवन मिशन कामासंदर्भात ग्रामसेवकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना अपूर्ण काम निहाय योग्य मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. चार काम सुरू नसून ती काम लवकर सुरू करण्याच्या सक्त सूचना यावेळी कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी यांनी दिले. पाणी टाकी बांधकाम ११४ काम अपुर्ण असून संबंधित अधिकारी यांनी तात्काळ पूर्ण करावे. पुढील एक आठवड्यात अपूर्ण काम सुरू करण्याच्या सुचना दिल्या आहेत तसेच संबंधित कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. हायवे लगतच्या सर्व गावांच्या स्वच्छतेसाठी नोटीस बोर्ड, सुशोभीकरण करून कामकाज करावे अशा सुचना देऊन ग्रामसेवकांना आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती घेण्यात आली. कचरा व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत निहाय प्रयत्न करावे अशी सुचना देण्यात आली. ठाणे जिल्ह्यासाठी आपल्या सर्वांना कचरा व्यवस्थापन करण्यासाठी आपण जबाबदारीने नियोजन करण्यात यावे असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी ग्रामपंचायत विभाग प्रमुख प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग प्रदिप कुलकर्णी, कार्यकारी अभियंता संदिप चव्हाण, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर, गटविकास अधिकारी पंचायत समिती शहापूर भास्कर रेंगडे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील, उपअभियंता विकास जाधव, उप विभागीय जलसंधारण अधिकारी असिफ सय्यद, कार्यकारी अभियंता समग्र शिक्षा युवराज कदम, विस्तार अधिकारी सांख्यिकी संतोष पांडे, इतर सर्व तालुका स्तरावरील विभाग प्रमुख, मुख्य सेविका, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच अधिकारी व कर्मचारी आढावा बैठकीत उपस्थित होते.

शिक्षक व पदवीधर निवडणूक मतदानाच्या वेळेत वाढ

ठाणे :  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी बुधवार, 26 जूनला होणाऱ्या मतदानासाठी सकाळी 7.00 ते सायं 6.00  ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातीलर उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म.स.पास्कर यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाने 24 मे 2024 च्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.  या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदारसंघांकरिता मतदान करण्याची वेळ बुधवार, 26 जून सकाळी 8.00 ते सायं 4.00 अशी निश्चित करण्यात आली होती.  परंतू आता भारत निवडणूक आयोगाने  दिनांक 03 जून,2024 रोजीच्या पत्रकान्वये लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 56 नुसार पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदानाच्या वेळेमध्ये बदल केलेला आहे.  कोकण पदवीधर मतदारसंघाच्या बुधवार, दि.26 जून 2024 रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी 7.00 ते सायं 6.00  ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी मतदान करावे या उद्देशाने मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली असून दिनांक 26 जून,2024 रोजी  पदवीधर व शिक्षक मतदारांनी  मोठ्या संख्येने व उत्साहाने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा  असे आवाहन उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म.स.पास्कर यांनी केले आहे.

कल्याणमधून विधानसभा निवडणूक लढवणारच

काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटेंचा निर्धार   कल्याण : 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील चुकांमधून आपण भरपूर काही शिकलो आहोत. परंतू त्याच चुका आता पुन्हा होणार नाहीत. कल्याण पूर्वेतून विधानसभा निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक आहोत. पक्षाने पश्चिमेचे तिकीट दिल्यास त्याची देखील तयारी आहे. 2024 च्या विधानसभेची गणिते तयार असून या निवडणूकीत पक्षाने तिकिट दिले नाही तर अपक्ष उभे राहण्याची देखील तयारी असल्याचे मत कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी डोंबिवली येथे व्यक्त केले. कल्याण डोंबिवलीतील पत्रकारांची प्रमुख संघटना असलेल्या निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी डोंबिवलीत करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार बोलून दाखविला. या कार्यक्रमात सचिन पोटे यांनी आपली राजकीय कारकीर्द, लोकसभा निवडणुकीतील अनुभव, दबावाचे राजकारण, दहा वर्षांत पक्ष सोडून गेलेले नेते, कल्याण डोंबिवलीतील नागरी समस्या, कल्याण जिल्हा काँग्रेसची सद्यस्थिती अशा विविध विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा केली. महाराष्ट्रात महविकास आघाडीचेच सरकार पुन्हा येणार… काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यातून गेली, त्या सर्व ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जिंकले आहेत. महाराष्ट्रामध्ये आम्ही नंबर एकचा पक्ष असून 100 ते 140 विधानसभा मतदारसंघात आम्हाला चांगला लीड आहे. मात्र स्वबळावर लढण्याबाबत कुठेही चर्चा झाली नसून तिन्ही पक्षांना एकत्रित लढण्याशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा महविकास आघाडीचेच सरकार येणार असा ठाम विश्वास पोटे यांनी यावेळी व्यक्त केला.

ठाणे खाडीत दोन जणांनी घेतली उडी

पुरुषाचा मृतदेह सापडला तर महिलेचा शोध सुरू   ठाणे : मुंबई- नाशिक महामार्गावरील साकेत पुलावरून ठाणे खाडीत दोन जणांनी उडी मारली आहे. यातील पुरुषाचा मृतदेह रविवारी पोलिसांना आढळून आला आहे. तर महिलेचा शोध लागू शकला नाही. याप्रकरणाची नोंद कळवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बबलू विश्वकर्मा (३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते पत्नी आणि तीन मुलांसह वागळे इस्टेट भागात राहत होते. शनिवारी सायंकाळी ७ वाजता साकेत पुलावरून दोनजणांनी खाडीत उड्या मारल्याची माहिती कळवा पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या माहितीनुसार, पोलिसांचे पथक, ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून खाडीत शोधकार्य सुरू होते. रात्री अंधार असल्याने शोध कार्य थांबविण्यात आले. रविवारी सकाळी पथकांनी पुन्हा शोधकार्य सुरू केले. त्यावेळी बबलू विश्वकर्मा याचा मृतदेह पथकांना आढळून आला. तर चार तासांच्या शोध कार्यानंतरही महिलेचा शोध लागू शकला नव्हता. त्यामुळे शोधकार्य तात्पुरत्या स्वरुपात थांबविण्यात आले आहे. याप्रकरणाची नोंद कळवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ०००००

विद्यार्थ्यांना एसटी पास आता थेट शाळेत मिळणार..!

अनिल ठाणेकर   ठाणे : शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट आता त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66% इतकी सवलत दिली आहे,म्हणजे केवळ 33% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या *पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर* योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जात असत. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पास साठी आता रांगेत  ताटकळत  उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार  एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही. या संदर्भात १८ जुन पासुन एसटी प्रशासनातर्फे ” एसटी पास थेट तुमच्या शाळेत ” हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे.  या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे. ००००

 १७ कोटी ६९ लाखांची मदत, गंभीर आजारातील २५८ रुग्णांना मिळाले जीवनदान –  रामेश्वर नाईक

 राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाकडून ठाणे : निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधि – न्याय विभाग अंतर्गत विशेष राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्ष सुरु केले असून या कक्षाच्या माध्यमातून कॅन्सर, लिव्हर – किडनी ट्रान्सप्लांट, बोनमॅरो ट्रान्सप्लांट सारख्या गंभीर आजार असणाऱ्या २५८ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करुन त्यांना नवीन जीवनदान देण्यात आले आहेत. या शस्त्रक्रियांसाठी १७ कोटी ६९ लाख रुपयांची मदत या कक्षाच्या माध्यमातून देण्यात आली असल्याची माहिती कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. निर्बल आणि दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात १० टक्के बेड आरक्षित ठेवण्यात आले असून त्या बेडवर मोफत तसेच सवलतीच्या दरात चांगले उपचार मिळावे म्हणून राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जानेवारी २०२४ पासून हे कक्ष सुरु झाले असून राज्यभरातील धर्मादाय रुग्णालयांनी यात उत्साहाने सहभाग घेतला आहे.  कॅन्सर, लिव्हर – किडनी  ट्रान्सप्लांट, बोनमॅरो ट्रान्सप्लांट, ह्दय प्रत्यारोपन सारख्या गंभीर आजाराच्या शस्त्रक्रियासाठी लाखोंचा निधी लागतो त्यामुळे हा खर्च सामान्य रुग्णांच्या आवाक्या बाहेर असतो. म्हणून अशा रुग्णांना पुन्हा नवीन जीवन मिळावे यासाठी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून उपचार तसेच आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात या कक्षाची स्थापना झाली असून मे महिन्यांपर्यंत २५८ गंभीर आजार असलेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया करुन त्यांना जीवनदान देण्यात आले आहे. या शस्त्रक्रियांसाठी धर्मदाय रुग्णालय तसेच खासगी संस्थेच्या माध्यमातून या २५८ रुग्णांना १७ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी या कक्षाच्या माध्यमातून देण्यात आला. राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले की, केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या विविध योजना यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर या धर्मादाय योजनेस उपचाराच्या खर्चाची कोणतीही मर्यादा नसल्याने कॅन्सर, लिव्हर ट्रान्सप्लांट, ह्दय प्रत्यारोपन अशा महागड्या शस्त्रक्रीया या योजनेतून निर्धन गटातील रुग्णास मोफत करण्यात येतात, त्यामुळे गोर-गरीब रुग्णांकरीता ही योजना वरदान असल्याचे रामेश्वर नाईक यांनी अधोरेखित केले. चौकट : महीना                      धर्मादाय रुग्णालय मदत                 खासगी ट्रस्टकडून मदत जानेवारी :                २.१६ कोटी                                        ६८ लाख फेब्रुवारी  :                ३.१५ कोटी                                         १.१४ कोटी मार्च  :                      ३.१७ कोटी                                       १.३२ कोटी एप्रिल :                    १.६१ कोटी                                         ७० लाख मे       :                   १.६७ कोटी                                         २.९ कोटी एकूण :                    १७ कोटी ६९ लाख रूपये 00000

ठाणे जिल्हा पशुसंवर्धन विभाग ‘बकरी ईद’साठी सज्ज

ठाणे : बकरी ईद सण आनंदाने साजरा करण्यात यावा यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून ठाणे जिल्ह्यात मुब्रा, भिवंडी, ठाणे, खोणी या ठिकाणी बकरी ईद निमित्ताने कुर्बानी देण्यात येते. त्यासाठी महानगरपालिका व जिल्हा परिषद मार्फत तात्पुरत्या कत्तलखान्याला परवानगी देण्यात आली आहे. प्रादेशिक सह आयुक्त मुबई विभाग डॉ. प्रशांत कांबळे यांनी मार्गदर्शन व सूचना दिल्याप्रमाणे जिल्ह्यात नियोजन करण्यात आले आहे.‌ पशुसंवर्धन विभागामार्फत बकरी ईद सण आनंदाने साजरा करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत कुर्बानीसाठी आलेल्या म्हैस वर्गाचे कत्तली पूर्व तपासणीसाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व पशुधन विकास अधिकारी तसेच सिंधुदुर्ग, रायगड व पालघर जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बकरी ईद १७ जून ते १९ जूनपर्यंत साजरा करण्यात येत असून या सणानिमित्त मुस्लिम बांधव मोठ्या म्हैस वर्गीय पशुधनाची खरेदी करतात. या पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर ईयर टॅगिंग करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांची नियुक्ती तीन दिवसांसाठी करण्यात आली आहे. परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, जिल्हा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त ठाणे डॉ. वल्लभ जोशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ठाणे डॉ. समीर तोडणकर, सहाय्यक आयुक्त बदलापूर डॉ. लक्ष्मण पवार, सहाय्यक आयुक्त जि.प.स.चि.शेलार डॉ. अजित हिरवे, सहाय्यक आयुक्त ता.ल.प.स.चि कल्याण डॉ. दीपक कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे.

हज कमिटीच्या गैर व्यवस्थापनामुळे सौदीत हज यात्रेकरूंचे हाल…

राज्य हज कमिटीचे सदस्य बबलु शेख यांचे, सीईओ लियाकत अफाकी यांच्यावर आरोप   ठाणे : भारतातुन सौदी अरेबिया येथे हज यात्रेसाठी गेलेल्या भाविकांचे तेथे हाल सुरु आहेत. यात्रेकरूंना भोजन, प्रवासाची आणि निवासाचीही व्यवस्था नसुन याला हज कमिटीचे सीईओ लियाकत अफाकी हेच जबाबदार आहेत. असा आरोप राज्य हज कमिटीचे सदस्य बबलु शेख यांनी केला आहे. प्रत्येक यात्रेकरूकडुन साडेतीन लाख रुपये घेऊनसुद्धा काहीही सुविधा दिलेल्या नसल्याने हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचेही बबलु शेख यांनी म्हटले आहे. शनिवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बबलु शेख यांनी हज यात्रेकरूंच्या हालअपेष्टांचे व्हीडीओ माध्यमांसमोर दाखवले. बकरी ईदच्या दरम्यान हज यात्रा संपन्न होत असते. आयुष्यात प्रत्येक मुस्लिम बांधवांची एक वेळेस तरी हज यात्रा करण्याची इच्छा असते. त्यानिमित्ताने देशभरातून सुमारे दीड ते पावणेदोन लाख भाविक जात असतात. १५ ते १६ जून आणि नंतर दोन दिवस सौदी येथे हज यात्रा संपन्न होत आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रसह इतर राज्यांतील भाविकांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील २१ हजार भाविक यात्रेस गेले आहेत. मात्र, सौदी अरेबियामध्ये भाविकांना हज यात्रेसाठी कुठलीच सुविधा नाही. वाहनाची, भोजनाची आणि निवासाचीही व्यवस्था नसल्याने हज यात्रेकरूचे हाल सुरु आहेत. २१ हजार लोकांसाठी केवळ ९० जणांचे पथक व्यवस्थेसाठी तैनात ठेवले आहे. हज यात्रेकरूंच्या दुर्दैवी हालाच्या सौदी अरेबिया येथुन पाठवलेल्या चित्रफिती दाखवुन राज्य हज कमिटीचे सदस्य बबलु शेख यांनी हज कमिटीचे सीईओ लियाकत अफाकी हेच याला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. यात्रेकरूंनी तसेच हज कमिटीच्या सदस्यांनी फोन केल्यानंतर फोनही उचलत नाहीत. लियाकत अफाकी यांनी सर्व कारभार आपल्याच हाती ठेवला असुन लाखो रुपये उकळुनही सुविधा न दिल्याने हा एक प्रकारे सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप बबलु शेख यांनी केला आहे. तेव्हा,केंद्र सरकारने याची दखल घेऊन त्वरीत कारवाई करावी. अशी मागणी बबलु शेख यांनी केली आहे.

मालमत्ता कराच्या सवलतीत ठाणे महापालिकेने जाहीर केली अंतिम मुदतवाढ

दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करात १० टक्के सवलत   ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील जे मालमत्ताधारक करदाते ३० जून २०२४ पर्यंत पहिल्या सहामाहीच्या करासोबत दुसऱ्या सहामाहीच्या कराची  रक्कम महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य कराच्या रक्कमेत थेट १०% सवलत देण्यात येणार आहे. सामान्य करातील सवलत योजेनस मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या कर सवलतीस अंतिम मुदतवाढ दिली आहे. तसेच, मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असल्याने मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करून करदात्यांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त राव यांनी केले आहे. ज्या करदात्यांनी ०१ एप्रिल ते १५ जूनपर्यंत पहिल्या सहामाहीच्या कराच्या रक्कमेसह दुसऱ्या सहामाहीचा कर एकत्रितरित्या महापालिकेकडे जमा केला आहे त्यांना दुसऱ्या सहामाहीच्या रक्कमेतील सामान्य करामध्ये १० टक्के सवलत देण्यात आली आहे. या सवलतीला करदात्याचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच, करदात्यांकडून प्रशासनास होणाऱ्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर, सामान्य करातील १० टक्के सवलत ३० जून २०२४ पर्वत अंतिमतः वाढविण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ करदात्यांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

छताचे प्लास्टर कोसळून तीनजण जखमी

ठाणे : कोपरी येथील मीठबंदर भागात सदनिकेतील छताचे प्लास्टर कोसळून तीन जण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. प्रदीप मोहीते (४६), यश मोहीते (१६) आणि निधी मोहीते (१२) अशी जखमींची नावे आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. मीठबंदर येथे सुमारे ३५ वर्ष जुनी श्रमदान ही चार मजली शासकीय इमारत आहे. या इमारतीमध्ये एकूण २० सदनिका असून १० ते १२ सदनिकांमध्ये खांबांना तडे गेले आहे. तसेच प्लास्टरही निखळले आहे. त्यामुळे ही इमारत राहण्यासाठी धोकादायक झाली आहे. रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास इमारतीतील एका सदनिकेतील छताचे प्लास्टर कोसळले. या घटनेत प्रदीप, यश आणि निधी हे तिघेही जखमी झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.