Category: ठाणे

Thane news

‘रिक्षावाल्यांच्या मनमानीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी बससेवा सुरू करा’

रहिवाश्यांची मागणी मीरारोड – मुंबई अहमदाबाद महार्गावर वाढती गृहसंकुले पाहता मीरारोड रेल्वे स्थानक ते आराध्य हायपार्क  व मीरारोड स्थानक ते ठाणे व्हाया आराध्य हायपार्क अशी बससेवा सुरु करण्याची मागणी परिसरातील रहिवाश्यांनी…

ओला आणि सुका कचरा वेगळा देण्यावर आता ॲपद्वारे लक्ष

२ लाख घरांवर क्युआर कोड लावल्याची मनपाची माहिती मीरारोड – मीरा भाईंदर महापालिकेने ओला व सुका कचरा वर्गीकरण करून मिळावा ह्यासाठी शहरातील ५ हजार पेक्षा जास्त गृहनिर्माण सांस्थाच्या निवासी इमारतीतील…

‘राजन विचारे आमच्या मुळे जिंकले होते’

नरेश म्हस्के यांचा दावा मीरारोड : ह्या आधीच्या लोकसभा निवडणुकीत राजन विचारे हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , आमदार राजन विचारे , गीता जैन , रवींद्र फाटक , हेमंत म्हात्रे , ऍड रवी व्यास आदींसह माझ्या व कार्यकर्त्यांच्या बळावर लोकसभा निवडणूक जिंकले होते . आता त्यांना या पैकी कोणाचाही पाठिंबा नसल्याने त्यांनी यंदा जिंकून दाखवावे असे आव्हान ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी दिले. आमदार प्रताप सरनाईक यांच्या मीरारोड कार्यालयात शनिवारी रात्री झालेल्या पदाधिकारी बैठकीसाठी म्हस्के आले होते . यावेळी आ . सरनाईक सह आमदार गीता जैन, माजी आमदार रवींद्र फाटक , भाजपा ठाणे विभागाचे संघटन मंत्री हेमंत म्हात्रे , भाजपा मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख ऍड . रवी व्यास , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अरुण कदम , आरपीआयचे देवेंद्र शेलेकर , शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजू भोईर व विधानसभा क्षेत्र प्रमुख विक्रमप्रताप सिंह आणि सचिन मांजरेकर सह माजी नगरसेविका भावना भोईर , संध्या पाटील , वंदना पाटील , जिल्हासंघटक निशा नार्वेकर आदी उपस्थित होते. शहरातील शिलोत्र्यांच्या मिठागर जमिनीचा मालकी हक्क देणे , मिठागराच्या जागेवरील नेहरू नगर , शास्त्री नगर सारख्या तसेच शासकीय जमिनीवरील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणे , भाईंदर रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवणे व भाईंदर व मीरारोड स्थानके सर्व सुविधा युक्त बनवणे , आयटी पार्क , इस्टेट इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न आदी विविध मुद्यांवर दोन्ही स्थानिक आमदारांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. ह्या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा व माजी आमदार नरेंद्र मेहता मात्र अनुपस्थित असल्या बद्दल नेत्यांना प्रश्न करण्यात आला . त्यांना निमंत्रण दिले होते परंतु ते दुसऱ्या कामात व्यस्त असल्याने येऊ शकले नाहीत असे सांगण्यात आले.

ठाणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करावे- केंद्रीय निवडणूक निरीक्षक

ठाणे : देशात लोकसभा निवडणुकांचा उत्सव सुरू असून पाचव्या टप्यातील मतदान प्रक्रिया येत्या 20 मे रोजी होत आहेत. ठाणे जिल्ह्यातील 23-भिवंडी, 24- कल्याण आणि 25 – ठाणे या लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करायचे असून ही निवडणूक प्रक्रिया ही शांततेत व नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी आपल्यावर सोपविण्यात आलेले काम हे गांभीर्यपूर्वक करावे, असे निर्देश भिवंडी, कल्याण, ठाणे या मतदारसंघात दाखल झालेल्या सर्व निवडणूक निरीक्षकांनी तीनही लोकसभा क्षेत्रातील निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी तसेच पोलीस यंत्रणांना काल झालेल्या बैठकीत दिले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी श्री. अशोक  शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन भवनातील समिती सभागृहात आयोजित बैठकीत निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने काल निवडणूक निरीक्षकांनी आढावा घेतला. या बैठकीस 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठीचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) जे.श्यामला राव (आयएएस), खर्च निरीक्षक श्री.चंद्र प्रकाश मीना (आयआरएस) , 24 कल्याण लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) मनोज जैन (आयएएस), खर्च निरीक्षक श्री. नकुल अग्रवाल (आयआरएस) आणि पोलीस निरीक्षक कु. इलाक्किया करुणागरन (आयपीएस) , आणि 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री.राजनवीर सिंग कपूर (आयएएस), खर्च निरीक्षक श्री.चित्तरंजन धंगडा माझी  (आयआरएस) आणि पोलीस निरीक्षक के. जयरामन (आयपीएस) उपस्थित होते.‍ तसेच तीनही लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी श्री. शिनगारे यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघांची माहिती उपस्थित निरीक्षकांना दिली. तसेच  भिवंडी, कल्याण, ठाणे या मतदारसंघातील निवडणुकांसाठी राबविण्यात येणारी मतदान प्रक्रिया व त्यासाठी लागणारी यंत्रणा यांची माहिती सर्व निरीक्षकांना दिली. नि:पक्षपातीपणे, शांततेत व भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करुन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपापसात उत्तम समन्वय साधावा. त्यासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचा बारकाईने अभ्यास करावा, असे निर्देश ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री. राव यांनी यावेळी दिले. 23 भिवंडी, 24 कल्याण, 25 ठाणे या लोकसभा मतदारसंघात संवेदनशील असलेल्या मतदार केंद्रांवर लक्ष केंद्रीत करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही, याची आचारसंहिता कक्षाने गांभीर्याने काळजी घ्यावी. मतदारसंघात पुरेशा प्रमाणात व्हिडिओ रेकॉर्डिंग टीम असतील व ते संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवतील, यासाठी सूक्ष्म निरीक्षकांनी दक्ष राहावे. व्हिडिओ सर्व्हेलन्स टीमने स्टार कॅम्पेनअरचे संपूर्ण भाषण रेकॉर्ड करून ठेवावे. तसेच रॅली, प्रचारामध्ये विहीत परवानगी घेतलेली वाहनेच असतील. विनापरवाने वाहने आढळल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही श्री. राव यांनी यावेळी दिले. पेड न्यूजचे प्रकार घडू नयेत यासाठी दररोजची वर्तमानपत्रे, टिव्ही चॅनेल, सोशल मीडिया, आकाशवाणी केंद्र याद्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवावे,असेही त्यांनी नमूद केले. तसेच आतापर्यत पेडन्यूजचे प्रकार घडले आहेत का याबद्दलची माहिती त्यांनी जाणून घेतली. लोकसभा निवडणूक 2024 साठी निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकांकडून होणाऱ्या मोठ्या व्यवहारांसाठी देण्यात आलेल्या क्यू-आर कोडच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत केलेल्या कारवाईची माहिती घेतली. तसेच सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींची माहिती घेवून कशा पध्दतीने कारवाई केली जात आहे, याबाबतही निरीक्षकांनी जाणून घेतले. रेल्वेच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कॅशची ने-आण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नमूद करीत ठाणे रेल्वे स्टेशनवर पोलीस विभागाच्या माध्यमातून आरपीएफची नेमणूक करण्याच्या सूचना खर्च निरीक्षक श्री. नकुल अग्रवाल यांनी या बैठकीत दिल्या. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष यांना त्या दिवशी सकाळपासून कोणकोणत्या गोष्टी करावयाच्या आहेत उदा. मतदान सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत भरण्यात येणारे फॉर्म, त्यासाठीची प्रक्रिया, मॉक पोलिंग आदी कामाची चेकलिस्ट करुन ती सर्व मतदान केंद्रावर देता येईल का ते पाहावे. जेणेकरुन मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना काम करणे सोपे जाईल. तसेच मनुष्यबळ व साहित्याची वाहतूक करण्यासाठी सूक्ष्म आराखडा तयार करण्याच्या सूचनाही सर्वसाधारण निरीक्षक श्री. जैन यांनी यावेळी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिल्या. 20 मे 2024 ही मतदानाची तारीख आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेता मतदान केंद्रावर पाणी, सरबत आदींची सोय होईल हे पाहावे. तसेच पाऊस पडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, यासाठी ज्या ठिकाणी मंडप टाकून मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे त्या ठिकाणी पावसाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात सुविधा मिळतील, यासाठीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याच्या सूचना श्री. जैन यांनी यावेळी दिल्या. मतदान प्रक्रिया हे टीमवर्क आहे. शेवटच्या टप्प्यातील ठाणे जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया ही यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री.के.जयरामन, कु.करुणागरन, श्री.मीना यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. बैठकीच्या शेवटी एकत्रित मीडिया कक्ष व माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी उपस्थित केंद्रीय निवडणूक निरीक्षक आणि उपस्थित नोडल अधिकाऱ्यांचे आभार मानले.

डोंबिवलीत उबाठा गटाला पुन्हा एकदा झटका!

उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश! ठाणे : कल्याण लोकसभेत उबाठा गटाला पुन्हा एकदा झटका बसला आहे. उबाठा गटाचे कल्याण ग्रामीणमधील उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आठवडाभरात उबाठा गटाला कल्याण डोंबिवलीत दुसरा मोठा झटका बसला आहे. यापूर्वी उबाठा गटाचे शहरप्रमुख विवेक खामकर, महिला जिल्हा संघटक कविता गावंड यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे हे उबाठा गटात सक्रिय होते. त्यांच्यासह केशव पाटील, शाखाप्रमुख परेश पाटील, उमेश सुर्वे, अशोक पाटील, विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आपल्याला विश्वासात घेतले गेले नाही, आणि आपला भ्रमनिरास झाल्याची खंत यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या १० वर्षात कल्याण लोकसभेत विकासाची गंगा आणली असून आपण आता विकासापासून अलिप्त राहू शकत नसल्याचे ते म्हणाले. शिवसेनेत ४० वर्ष काम करूनही मला मातोश्रीवर कुणी ओळखत नाही. बाळासाहेब हयात होते, तोपर्यंत आमची श्रद्धा होती, पण आता आमची मातोश्री ठाणेच आहे, अशी भावना यावेळी प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली. तर या सर्वांना उबाठा गटात मिळालेली वागणूक या सर्वाला कारणीभूत असून दुसरीकडे राज्य सरकार आणि शिवसेना यांचे काम उत्तम सुरू आहे. विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे एका विश्वासाने लोक शिवसेनेत येत असल्याची प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवलीचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक योगेश म्हात्रे, बंडू पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कपिल पाटील यांचा वकिलांबरोबर संवाद

बारावे व गौरीपाड्यातील नागरिकांची भेट कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी कल्याणमधील वकिलांबरोबर शनिवारी संवाद साधला. तसेच बारावे व गौरीपाड्यातील स्थानिक महिलांसह नागरिकांची भेट घेऊन चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात कल्याणबरोबरच देशभरात केलेल्या निवडक कार्याची माहिती देऊन, विकसित भारत घडविण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचे आवाहन केले. कल्याण शहरातील बारावे व गौरीपाडा परिसराचा कपिल पाटील यांनी काल दौरा केला. तत्पूर्वी कल्याणमधील अॅडव्होकेट्स वेल्फेअर फोरमच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वकिलांबरोबर संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात झालेल्या विकासकार्याबरोबरच कायदा क्षेत्राविषयी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. तसेच सलग तिसऱ्यांदा मोदींना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. या वेळी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार, शहराध्यक्ष वरुण पाटील, कल्याण बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रकाश जगताप, सतीश अत्रे, शिल्पा राम, अर्चना सबनीस, भाजपाच्या पदाधिकारी वैशाली पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. गौरीपाडा येथील जय हनुमान मंदिरात कपिल पाटील यांनी दर्शन घेतले. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून स्मार्ट सिटी योजनेतून राबविलेल्या सिटी पार्क व पार्किंग प्लाझासह विविध कामांची माहिती दिली. या वेळी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक अर्जुन म्हात्रे, भगवान म्हात्रे, रघुनाथ म्हात्रे, लक्ष्मण म्हात्रे आदींची उपस्थिती होती. गौरीपाड्यापाठोपाठ बारावे येथील भगवान शिवमंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर या भागातील स्थानिक नागरिकांबरोबर संवाद साधला. चौकट कपिल पाटील यांच्याकडून चणे-शेंगदाण्याचा आस्वाद लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिमच्या दौऱ्यावर आलेल्या महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी शनिवारी सायंकाळी बाजारपेठेत फिरताना गरमागरम चणे-शेंगदाण्याचा आस्वाद घेतला.

गद्दारांना गाढण्यासाठी सांगवीमध्ये धडाडणार महाविकास आघाडीच्या तोफा

८ मे रोजी महाविकास आघाडीची महासभा ठाकरे आणि शरदचंद्र पवार अशा दोन दिगजांच्या होणाऱ्या घणाघातामुळे महायुतीमध्ये अस्वस्थता राज भंडारी पनवेल : एका जगविख्यात विचारवंताने एक अजरामर वाक्य लिहून ठेवले आहे.”तुम्ही एखाद्याची मालमत्ता चोरू शकता पण त्याचे मालमत्ता कमावण्याचे हुनर तुम्हाला कदापिही चोरता येत नाही”. हे वाक्य महायुतीमधील महाचोरांना चपखल बसते. असाच घणाघात ८ मे रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर ऐकायला मिळणार आहे. ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची महासभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष चोरून,बाळासाहेब ठाकरेंचे नाव चोरून आणि पारंपारिक निशाणीवर दावा सांगून गद्दारी केलेल्यांना त्यांची योग्य जागा दाखविण्यासाठी महाविकास आघाडीने संजोग वाघेरे पाटील यांच्या स्वरूपामध्ये एक प्रामाणिक, सजग आणि जनमानसातील प्रश्नांची जाण असणारे उमदे उमेदवार दिले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक ८ मे रोजी सायंकाळी सहा वाजता महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, सी पी आय (एम),आर पी आय (ए), स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पार्टी, स्वराज इंडिया असे महाविकास आघाडी मधील घटक पक्षांचे नेते या महासभेमध्ये आपले विचार मांडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा विधान परिषद सदस्य आमदार जयंत भाई पाटील, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह, आर पी आय ( ए) चे दीपक भाऊ निकाळजे या वक्त्यांचे  विचारवैभव उपस्थित श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांना जनमानसातून मिळणारा पाठिंबा राज्यभरात चर्चेचा विषय ठरतो आहे. वयाची ८० उलटून देखील असाध्य व्याधींना नामोहरम करत संघर्ष योद्धा आधारवड शरद पवार साहेब अक्षरशः पायाला भिंगरी लावून महाविकास आघाडीचा प्रचार करत आहेत. भाई जयंत पाटील यांचे आक्रमक भाषण नेहमीच विरोधकांच्या उरात धडकी भरवत असते. पृथ्वीराज चव्हाण यांचे अनुभवी प्रगल्भ आणि मुद्देसूद भाषणाला विरोधकांच्या कडून एक टक्का देखील प्रत्युत्तर होत नाही. संजय सिंह आणि दीपक भाऊ निकाळजे यांची सडेतोड भाषणे महायुतीच्या पायाखालची वाळू सरकवत आहे. त्यामुळे नागरिकांना देखील आठ मे रोजी महाविकास आघाडीच्या धडाडणाऱ्या तोफांचे आवाज ऐकण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने तमाम नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

माकपचे जे पी गावित यांची उमेदवारी मागे,

राष्ट्रवादीचे भास्कर भगरे यांना पाठिंबा – डॉ. उदय नारकर अनिल ठाणेकर ठाणे : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव सुनिश्चित करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉ. जे. पी. गावीत यांची उमेदवारी मागे घेऊन महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा दिल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डाॅ उदय नारकर यांनी दिली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज, वाढता जनाधार, सर्व जनविभागांच्या उपजीविकेसाठी केलेले जोमदार सातत्यपूर्ण लढे आणि प्रभावी उमेदवार या जोरावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉ. जे. पी. गावीत यांना दिंडोरी (अज) लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने आमच्या पक्षाच्या उमेदवारास अधिकृतपणे पुरस्कृत करावे, अशी माकपची रास्त अपेक्षा आणि मागणी होती. त्यासाठी  राज्य आणि केंद्रीय स्तरापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले होते. महाराष्ट्रातील ४८ पैकी केवळ ही एकच जागा पक्षास मिळावी, अशी माकपची मागणी होती. तथापि, पक्षाच्या या प्रयत्नांना यश आले नाही. महाविकास आघाडीने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरच्चंद्र पवार) पक्षास दिली. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांतील मैत्रीपूर्ण लढत माकपने स्वीकारलेल्या उद्दिष्टास घातक ठरू शकते. वस्तुतः सर्वत्र सत्ताधारी भाजप आणि दिंडोरी मतदारसंघातील त्याच्या उमेदवाराविरुद्ध मतदारांत कमालीचा असंतोष आहे. त्याचे रूपांतर त्या पक्षाच्या आणि दिंडोरीतील उमेदवाराच्या पराभवात होणे अटळ आहे. पण महाविकास आघाडीचे दोन उमेदवार असल्यास जनतेच्या इच्छेचा अनादर होईल. जनतेच्या संभाव्य कौलाचा असा अवमान होऊ नये, भाजप उमेदवाराचा पराभव आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय यावर शिक्कामोर्तब करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. हे ध्यानात घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी (अज) लोकसभा मतदारसंघातील कॉ. जे. पी. गावीत यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव करण्यासाठी मविआचे अधिकृत उमेदवार  भास्कर भगरे यांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटी करत आहे असे डॉ. उदय नारकर यांनी म्हटले आहे.

लोकसभा, विधानसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी योजना – अशोक शिनगारे

अनिल ठाणेकर ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्यानुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांना प्रचारविषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे व्हावे, याकरिता एक खिडकी योजना कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकार  व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. लोकसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर एक खिडकी कक्ष तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टर लँडिंग व टेक ऑफ परवानगी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत देण्यात येईल. हा कक्ष कार्यालयीन वेळेत कार्यरत राहील. तरी निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आल्याप्रमाणे सर्व संबंधितांनी नमूद केलेल्या आवश्यक कार्यपध्दतीचा अवलंब करुन सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये घेण्याची-देण्याची कार्यवाही करावी, असे ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कळविले आहे. कार्यक्षेत्र- ठाणे जिल्हा, वाहन परवाना- १.नोंदणीकृत राजकीय पक्ष, २.नोंदणीकृत पक्षाचे जिल्हास्तरीय पदाधिकारी. परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी (लोकसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे – १.आर.सी. बुक, २.वाहनाचा इन्शुरन्स, ३.वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, ४.टॅक्स भरल्याची पावती, ५.व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, ६.चालकाचा परवाना, ७.पी.यू.सी., ८.वाहनाच्या चारही बाजूचा फोटो. कार्यक्षेत्र- लोकसभा मतदारसंघ, वाहन परवाना : उमेदवार/उमेदवार प्रतिनिधी- परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी (एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे – १.आर.सी. बुक, २.वाहनाचा इन्शुरन्स, ३.वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, ४.टॅक्स भरल्याची पावती, ५. व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, ६. चालकाचा परवाना, ७.पी.यू.सी., ८. वाहनाच्या चारही बाजूचा.कार्यक्षेत्र- विधानसभा मतदारसंघ, वाहन परवाना- उमेदवार/उमेदवार प्रतिनिधी- परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी (एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे – १.आर.सी. बुक, २.वाहनाचा इन्शुरन्स, ३.वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, ४.टॅक्स भरल्याची पावती, ५.व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, ६.चालकाचा परवाना, ७.पी.यू.सी., ८.वाहनाच्या चारही बाजूचा फोटो. कार्यक्षेत्र- विधानसभा मतदारसंघ, तात्पुरते पक्ष कार्यालय उभारणे, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी (एक खिडकी कक्ष), ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १.संबंधित जागा मालक यांची संमती, २.स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३.पोलीस विभाग. कार्यक्षेत्र- लोकसभा मतदारसंघ, कोपरा सभा / प्रचारसभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. कार्यक्षेत्र- विधानसभा मतदारसंघ- कोपरा सभा / प्रचारसभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. कार्यक्षेत्र- लोकसभा मतदारसंघ- रॅली / मिरवणूक / रोड शो / पदयात्रा/ पथनाटय / लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. पोलीस विभाग, २.वाहतूक नियंत्रण विभाग. कार्यक्षेत्र-विधानसभा मतदारसंघ- रॅली / मिरवणूक / रोड शो / पदयात्रा/ पथनाटय / लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – 1. पोलीस विभाग, २.वाहतूक नियंत्रण विभाग. एकापेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघातील मिरवणूक/रॅलीच्या परवानगीसाठी लोकसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्र अर्ज करण्यात यावा, अशी सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. कार्यक्षेत्र-लोकसभा मतदारसंघ- स्टेज/बॅरोगेट/रोस्ट्रम, परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. ४. सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) ना-हरकत प्रमाणपत्र, 5. अग्निशमन विभागाचे ना-हरकत†कार्यक्षेत्र-विधानसभा मतदारसंघ – स्टेज/बॅरोगेट/रोस्ट्रम, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी कक्षातील सक्षम पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. ४. सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) ना-हरकत प्रमाणपत्र, 5. अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र. कार्यक्षेत्र-ठाणे जिल्हा- हेलिकॉप्टर लँडिंग व टेक ऑफ परवाना, परवानगी देणारे अधिकारी – अतिरिक्त  जिल्हादंडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. ४. सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) ना-हरकत प्रमाणपत्र, 5. अग्निशमन विभागाचे ना-हरकत. निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आल्याप्रमाणे सर्व संबंधितांनी नमूद केलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये घेण्याची-देण्याची कार्यवाही करावी, असे ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कळविले आहे.

ठाणे प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा

अंबरनाथ रायझिंग ठरले सरस ठाणे : नियमित डावानंतर सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्याने सर्वाधिक चौकरांमुळे अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने फटीएल एकादश संघावर सरशी मिळवत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. नियमित डावात उभय संघ १५१ धावांवर बरोबरीत राहिले. त्यानंतर ही बरोबरी सुपर ओव्हरमध्ये १० धावांवर कायम राहिल्याने दोन्ही डावात मिळून एकूण २२ चौकार मारणाऱ्या अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबला विजयी घोषित करण्यात आले. कमनशिबी ठरलेल्या एफटीएल एकादश नावावर १८ चौकार जमा होते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या एफटीएल एकादश संघाला सुर्यांश शेडगे(७७), यतीन मढवी(३२) आणि अर्जुन थापाने २० धावा करत एफटीएल एकादश संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. या डावात सौद अंसारीने सहा, परिक्षित वळसंगकरने दोन आणि प्रथमेश महालेने एक बळी मिळवला. त्यानंतर अनिल रोनंकी ने ३३ आणि परिक्षित वळसंगकरने ६१ धावांच्या धडाकेबाज खेळीने अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबला बरोबरी साधून दिली. या डावात सुर्यांश शेडगेने दोन बळी मिळवले. सुपर ओव्हरमध्ये अर्जुन थापाच्या सात धावांमुळे एफटीएल एकादश संघाला १० धावा जमवता आल्या. परिक्षितने ९ धावा करत संघाला विजयाच्या समीप नेले.शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची आवशयकता असताना फलंदाज धावचित झाल्याने सामन्यात पुन्हा बरोबरी झाली. संक्षिप्त धावफलक : एटीपीएल एकादश : २० षटकात सर्वबाद १५१ ( सुर्यांश शेडगे ७७, यतीन मढवी ३२, अर्जुन थापा २०, सौद मंसूरी ४-२६-६, परिक्षित वळसंगकर ४-२४-२, प्रथमेश महाले ३-२७-१) बरोबरीत अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब :  २० षटकात ८ बाद १५१ ( परिक्षित वळसंगकर ६१, अनिल रोनंकी ३३, सुर्यांश शेडगे ४-३७-२, नविन शर्मा ४-३०-१, अजय पाटील ४-३७-१, विकास पाटील ४-२५-१, अक्ष शर्मा ४-२०-१), सुपर ओव्हर : अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब : एक षटकात २ बाद १० ( परिक्षित वळसंगकर ९, विकास पांडे १-१०-१) बरोबरीत एफटीएल एकादश : एका षटकात २ बाद १० ( अर्जुन थापा  ७, परिक्षित वळसंगकर १-१०-१).