Category: ठाणे

Thane news

पनवेलमधील माता-बाल संगोपन केंद्राला मुहूर्त मिळेना

सिडकोकडून भूखंड हस्तांतरास विलंब; आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया रखडली पनवेल ः पनवेल महापालिकेकडून नवीन पनवेल नोड-आसूडगाव हद्दीमध्ये साडेचारशे खाटांचे माता-बाल संगोपन केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूदही केली आहे, मात्र तांत्रिक अडचणींमुळे रुग्‍णालयाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. सिडकोकडून भूखंड हस्तांतरास विलंब झाल्‍याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडल्‍याचे बोलले जात आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात डॉ नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय वगळता इतर शासकीय रुग्णालय नाही. परिसरात सद्यःस्थितीत सुमारे आठ लाख लोकवस्ती असून दिवसेंदिवस वाढत आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती केंद्र अपुरे पडत असल्‍याने अनेक गर्भवतींना प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात जावे लागते. खांदा वसाहतीलगत आसूडगाव सेक्टर १८ मध्ये भूखंड क्रमांक ८अ आणि ८ ब येथे आठ हजार चौरस मीटरचा भूखंड जिल्हा रुग्णालयासाठी सिडकोने राखीव ठेवला आहे. येथे पनवेल महापालिकेने १०० खाटांचे माता  संगोपन व बाल आरोग्य केंद्र करण्याबाबतचा प्रस्ताव संमत केला होता. सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीमध्ये या ठरावाला तीन वर्षांपूर्वी मंजुरीही देण्यात आली. हा प्रस्ताव आरोग्य संचालनालयाला पाठवण्यात आला होता, त्‍यानंतर त्‍या काही सुधारणा करण्यात आल्‍या. रुग्णालयांच्या खाटांमध्ये आणखी ३५० खाटांची वाढ करण्यात आली आहे. त्‍यानुसार बांधकाम आराखडाही बदलण्यात आला आहे. अतिशय भव्य  स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या केंद्रात विविध सोयी-सुविधा प्रस्तावित आहेत. हिरकणी या नावाने हा वैद्यकीय उपक्रम साकारला जाणार आहे. गतवर्षी अर्थसंकल्पात प्रशासनाने आरोग्यावर विशेष भर देत माता बाल संगोपन केंद्रासाठी निधीची तरतूदही केली होती. मात्र पनवेल महापालिकेला सिडकोने वेळेत भूखंड हस्तांतरित केला नाही. त्यामुळे हा आरोग्य आणि वैद्यकीय दृष्ट्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिकेकडे जागा वर्ग करण्यात आली आहे. मात्र सध्या आचारसंहित लागू असल्याने याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत.

कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेचा रौप्य महोत्सव

कल्याण : महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने गणेश घाट आगार या ठिकाणी रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी परिवहन व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आगारात सत्यनारायणाची महापूजा तसेच आरोग्य शिबिर आणि छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी परिवहन कर्मचारी ज्ञानेश्वर रहाणे यांच्या संकल्पनेतून पंचवीस किलोचा केक केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते कापण्यात आला. याप्रसंगी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवहनचे अधिकारी कार्यालय अधीक्षक प्रिया निगडे, किशोर घाडी, तृषार्त मुळीक, प्रमोद बागुल, दीपक चौधरी, भारत सांगळे, मच्छिंद्र कणसे, संदीप दलाल, प्रशांत जावळे, गंगाधर राठोड, गौरख पवार तसेच सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

मिरा-भाईंदरमध्ये पाणीटंचाईचे संकट

भाईंदर : मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसी या दोन्हीकडून पावसाळ्यातील देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी बुधवारी (ता. २९) ते शुक्रवार (ता. ३१) असे पाठोपाठ शटडाऊन घेण्यात येणार आहेत. परिणामी शहरात चार ते पाच दिवस तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. एकीकडे उन्हाळ्यामुळे आधीच पाण्याची मागणी वाढत असताना होत असलेल्या शटडाऊनमुळे शहरात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. मिरा-भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लिटर, तर एमआयडीसीकडून ११५ दशलक्ष लिटर पाणी दिले जाते. या दोन्ही स्रोतांकडून सुमारे दोनशे लिटर पाणी मिळत असले तरी शहराची दैनंदिन पाण्याची गरज २२५ ते २३० दशलक्ष लिटर आहे. त्यामुळे नागरिकांना आधीच ३० ते ३५ तासांनी पाणी मिळते. यात एकाही स्रोताकडून पाणीपुरवठा खंडित झाला, तरी शहरात पाणीटंचाई निर्माण होते. आता तर स्टेम, एमआयडीसी या दोघांकडून पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी पाठोपाठ शटडाऊन घेण्यात येणार आहेत. स्टेमकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी (ता. २९) सकाळी ९ ते गुरुवारी (ता. ३०) सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे, तर एमआयडीसीचा पाणीपुरवठा काही तासांच्या अंतराने म्हणजेच गुरुवारी (ता. ३०) रात्री १२ ते शुक्रवारी (ता. ३१) रात्री बारा वाजेपर्यंत २४ तासांसाठी बंद असणार आहे. यामुळे शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण होणार आहे. स्टेम प्राधिकरणाचा पाण्याचा उद्‍भव शहाड, टेमघर येथे आहे, तर एमआयडीसीचा पाण्याचा उद्‍भव बारवी धरण आहे. या दोन्ही स्रोतांपासून मिरा-भाईंदर शहर हे सुमारे ८० किमी लांब असून पाणीपुरवठ्यासाठी तेवढ्या लांबीची जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. त्यामुळे दोघांपैकी एकाचा पाणीपुरवठा खंडित झाला, तरी जलवाहिनी पाण्याने पूर्ण भरून पाण्याचा दाब पूर्ववत होण्यासाठी दोन दिवस लागतात. त्यामुळे दोन ते तीन दिवस नागरिकांना पाणी कमी दाबाने व उशिराने तर मिळतेच; शिवाय पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडून ३० ते ३५ तासांवरचा पाणीपुरवठा ६० ते ७० तासांवर जातो. आता दोघेही लागोपाठ शटडाऊन घेणार आहेत. त्यामुळे नागरिकांना चार ते पाच दिवस तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती आहे. खासगी टँकरचे उखळ पांढरे तीव्र पाणीटंचाईचा खासगी टँकरमालकांना मात्र चांगलाच लाभ होणार आहे. शहरात पाचशे ते सातशे लिटर पाणी देणारे छोटे, तसेच दहा हजार लिटर पाणी देणारे टँकर कार्यरत आहेत. शिवाय या पाण्याची गुणवत्ता काय असते, याबाबतही शंका व्यक्त होत असते; मात्र शहरातील पाणीटंचाईदरम्यान हेच पाणी घेण्यावाचून नागरिकांपुढे दुसरा पर्याय नसणार आहे. विविध कारणाने शटडाऊन रखडले वास्तविक एमआयडीसीकडून घेण्यात येणारा शटडाऊन गेल्या आठवड्यात शुक्रवारी घेण्यात येणार होता; मात्र आयत्या वेळेस तो रद्द करण्यात येऊन या आठवड्यात घेण्यात येणार आहे. एमआयडीसीचा शटडाऊन गेल्या आठवड्यात झाला असता, तर नागरिकांचा त्रास काही प्रमाणात कमी झाला असता. दुसरीकडे स्टेम प्राधिकरणाचा गेल्या दोन महिन्यांपासूनचा शटडाऊन घेण्याचा प्रस्ताव होता. मात्र काही ना काही कारणांमुळे तो पुढे ढकलण्यात आला. आता हे दोन्ही शटडाऊन एकाच आठवड्यात काही तासांच्या अंतराने एका पाठोपाठ घेण्यात येत आहेत.

कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित लोकलमधील शीत यंत्रणा बंद

प्रवासी उकाडा, घामाने हैराण कल्याण : कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलमधील काही डब्यांमधील वातानुकूलित यंत्रणा दोन दिवसांपासून बंद असल्याने प्रवासी लोकलच्या डब्यात बटाट्यासारखे उकडून निघत आहेत. उकाड्यामुळे बहुतांशी प्रवासी वातानुकूलित लोकलला आता पसंती देत आहेत. डब्यात घुसल्यानंंतर काही क्षणात प्रवाशांना डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याचे लक्षात आल्यावर प्रवाशांचा संताप होत आहे. अगोदरचा उकाड्याने नागरिकांचा घामटा निघाला आहे. सकाळची वेळ असली तरी उकाडा प्रवाशांची पाठ सोडत नाही. सकाळची वेळ असूनही घाम पुसून पुसून प्रवाशांंचे रुमाल ओलेचिंब होत आहेत. अशा परिस्थितीत वातानुकूलित लोकलमधून मस्त समाधानाने प्रवास करून या विचाराने या लोकलमध्ये चढून मुंबईपर्यंतचा प्रवास करणारे प्रवासी लोकलमधील वातानुकूलन यंत्रणा बंद राहत असल्याने संताप व्यक्त करत आहेत. वातानुकूलित लोकलमधील शीत यंत्रणा सुरू आहे की नाही हे लोकल सुरू करण्यापूर्वी कारशेडमध्ये तपासले जाते की नाही, असे प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत. कल्याणमधून सकाळी सुटणारी वातानुकूलित लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाचवर सकाळी नऊ वाजता येते. ही लोकल मुंबईत कार्यालयीन वेळेपूर्वी पोहोचत असल्याने बहुतांशी प्रवाशांची या लोकलला पसंती असते. गेल्या दोन दिवसांपासून प्रवासी या लोकलमध्ये चढत आहेत. लोकलमध्ये चढल्यानंतर काही डब्यांमधील वातानुकूलन यंत्रणा बंद असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास येत आहे. शीत यंत्रणा बंद असेल तर प्रवाशांना डब्यामध्ये सूचना करणारे एक लाल बटन आहे. ते दाबल्यानंतर मोटरमन, गार्डकडून त्याची दखल घेतली जाते. हे सूचना बटन दाबूनही त्याची मोटारमन, गार्डकडून दखल घेतली जात नाही, असे डोंबिवलीतील एक प्रवासी तुषार साठे यांनी सांगितले. एकदा वातानुकूलित लोकलमध्ये चढल्यानंंतर पुन्हा ती लोकल सोडून दुसऱ्या लोकलमध्ये चढणे प्रवाशांना शक्य होत नाही. त्यामुळे कोंडमारा करत, गुदमरत प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करत आहेत. अनेक प्रवाशांंना अती उकाड्यामुळे डब्यात अस्वस्थ वाटू लागले की ते पुढील रेल्वे स्थानकात उतरत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. प्रवासी वातानुकूलित लोकलचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करतात. पण दरवाजेही उघडत नसल्याने जीव गुदमरत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी सोशिक आहेत, असे समजून वातानुकूलित लोकलमधील बिघाड नाही काढला तरी चालेल असा विचार रेल्वे अधिकाऱ्यांनी करू नये. अन्यथा, रेल्वे प्रवाशांच्या उद्रेकाला एक दिवस रेल्वे प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.

‘डोंबिवलीतील उद्योजक म्हणजे शासनाला कल्हईवाले वाटले का?’

डोंबिवलीतील उद्योजकांचा संतप्त सवाल डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान रासायनिक कंपनीत स्फोट झाला आहे. कामगारांचा नाहक जीव गेले आहेत. अनेक जखमी झाले आहेत. आजुबाजुच्या कंपन्या बेचिराख झाल्या आहेत. याचे दुःख सर्वच उद्योजकांना आहे. आता स्फोटानंतरची सर्व परिस्थिती सुव्यवस्थित होण्यासाठी सर्व उद्योजक प्रयत्नशील आहेत. या चिंताग्रस्त वातावरणात डोंबिवली एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी संध्याकाळी डोंबिवली एमआयडीसीतील सर्वच उद्योजकांना कंपनी स्थलांतर संमतीपत्रावर स्वाक्षऱ्या करून ती पत्र तात्काळ एमआयडीसी कार्यालयात जमा करण्याचे फर्मावले आहे. हा प्रकार पाहून डोंबिवलीतील उद्योजकांनी आम्ही म्हणजे कल्हईवाले आहोत का? असा संतप्त सवाल केला आहे. अमुदान कंपनी आणि परिसरातील रासायनिक कंपन्यांच्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. तेथे अग्निशमन, आपत्कालीन विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांंना उद्योजक सूचना करतील त्याप्रमाणे काम बचावाचे काम करावे लागते. चौकशी अधिकारी उद्योजकांना बोलावून काही अत्यावश्यक माहिती घेत आहेत. ही सर्व धावपळ सुरू असताना डोंबिवली एमआयडीसीतील अधिकाऱ्यांनी उद्योजक म्हणजे चोर समजून, ते उद्या कंपन्या सोडून पळून जातील या भावनेतून आम्ही आमची कंपनी स्थलांतरास तयार आहोत की नाही, अशा आशयाचे एमआयडीसीचे शीर्षक नसलेले, तळाला कोणत्याही जबाबदारी अधिकाऱ्याचे स्वाक्षरी नसलेले संमतीपत्र उद्योजकांना देऊन त्यावर तातडीने स्वाक्षऱ्या करून ते पत्र एमआयडीसी डोंबिवली कार्यालयात जमा करण्याचे फर्मान काढले आहे. अटींमुळे उद्योजक हैराण कंपनीच्या नावावर जलमापक करायचे असेल तर ते मुद्रांक शुल्कावर हवे. कंपनी प्रायव्हेट असेल तर संचालक मंडळाचा ठराव हवा. फॅक्टरी प्लान असुनही बीसीसी द्यायला दिव्य करावे लागते. संमतीपत्राची घाई करताना ते कोणाकडून पाठविले गेले आहे. पाठविणाऱ्याची स्वाक्षरी, शिक्का त्या पत्राखाली नको का, असे प्रश्न उद्योजकांनी केले आहेत. डोंबिवली एमआयडीसीतील औद्योगिक भूखंडांवरील बेकायदा इमले तोडायची हिम्मत एमआयडीसी अधिकाऱ्यांमध्ये नाही. उद्योजक काही बोलत नाहीत म्हणून त्यांच्यावर दबाव आणि भूमाफिया बळाचा वापर करतात त्यांच्या समोर शरणागती. हे दुटप्पी धोरण अधिकाऱ्यांनी सोडावे, असा इशारा उद्योजकांनी दिला आहे. उद्योजकांकडून तातडीने स्थलांतराची संमतीपत्रे घेताना जशी जबरदस्ती केली जाते. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी औद्योगिक भूखंडांवरील बेकायदा निवासी इमले तोडण्यासाठी तेवढीच ताकद लावावी म्हणजे एमआयडीसीतील एक मोठा प्रश्न मार्गी लागेल, अशी भूमिका उद्योजकांनी मांडली.

“बेकायदा हॉटेल्स, पब्ज, डान्स बारवर कारवाई करा”

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे आदेश कल्याण : ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बेकायदा हॉटेल्स, पब्ज, डान्स बारवर तातडीने कारवाई सुरू करा. या कारवाईत कोणीही पोलीस अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केला तर, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ठाणे पोलीस आयुक्त डॉ. आशुतोष डुंबरे यांनी मंगळवारी ठाणे पोलीस आयुक्तालयात घेतलेल्या परिमंडळातील पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिला. पुणे येथील एका धनाढ्याच्या मुलाने दोन संगणक अभियंत्यांना मद्यसेवन करून वाहन चालविताना उडविले. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डुंबरे यांनी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील कल्याण, भिवंडी, उल्हासनगर परिमंडळ क्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत परिमंडळ हद्दीत बेकायदा हॉटेल्स, पब्ज, डान्सबार रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असतील तर त्यांच्यावर तातडीने कारवाई सुरू करावी. कोणीही अधिकारी या कारवाईत कुचराई करत असेल, याची माहिती मिळाल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डुंबरे यांनी दिला. रात्री उशिरपर्यंत नृत्यगाणी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील भिवंडी परिसर, कल्याण शिळफाटा, नेवाळी, अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात अधिक संख्येने डान्सबार आहेत. काही ठिकाणी पब्ज, बेकायदा हॉटेल्स, ढाबे आहेत. ढाब्यांवर चोरून मद्य विकले जाते. या ढाब्यांना शासनाची परवानगी नाही. डान्सबार बंद असताना ते रात्री उशिरापर्यंत चालविले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याविषयी ठाणे पोलीस आयुक्तालयापर्यंत अनेक तक्रारी गेल्या आहेत असे समजते. पोलीस मुख्यालय, परिमंडळातील काही पोलीस अधिकारी वरिष्ठांचे ‘कलेक्टर’ म्हणून परिसरात काम करतात. ते अधिकारी या बेकायदा उद्योगांची पाठराखण करत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. असे जुने ‘कलेक्टर’ शोधून आयुक्त डुंबरे यांनी या अधिकाऱ्यांना पालिका मुख्यालय किंवा नियंत्रण कक्षात पदस्थापना देण्याची मागणी काही पोलीस अधिकारीच करत आहेत. अशा ‘कलेक्टर’ अधिकाऱ्यांची एक यादीच काही पोलीस अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. हे अधिकारी वर्षानुवर्ष पोलीस आयुक्तालय क्षेत्रात असून त्यांची काही वरिष्ठांशी संबंध असल्याने या विषयावर उघडपणे बोलण्यास कोणीही अधिकारी तयार नाही. आता या अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील बेकायदा हॉटेल्स, पब्ज, डान्स बार अशा बेकायदा व्यवहारांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला तर या अधिकाऱ्यांची यादी आयुक्त डुंबरे यांना देण्याच्या विचारात काही पोलीस अधिकारी आहेत. कल्याण परिमंडळातील एका वरिष्ठाचा एक कलेक्टर अन्य भागात बदलीने गेला. पण वरिष्ठाने अथक प्रयत्न करून त्या ‘कलेक्टर’ची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करून घेऊन आपले कार्य अबाधित चालू राहिल याची काळजी घेतल्याची चर्चा पोलिसांमध्ये आहे.

होर्डिंगपासून सुरक्षिततेबाबत ठाण्यात भाजपा आग्रही

 माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन ठाणे : घोडबंदर रोड परिसरात मुख्य रस्ते, इमारती, इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्वाच्या चौकात उभारण्यात आलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबरोबरच बेकायदा होर्डिंग तत्काळ काढून टाकावीत. त्याचबरोबर होर्डिंगपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात महापालिकेने नियमावली तयार करावी, अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या वेळी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, भरत चव्हाण यांचीही उपस्थिती होती. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील मुख्य रस्ते, इमारती, इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्वाच्या चौकामध्ये उभारलेल्या होर्डिंगची तपासणी करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत जाहिरातीला आलेल्या महत्वामुळे ठिकठिकाणी होर्डिंग उभारली गेली. काही ठिकाणी महापालिकेच्या नियमाची पायमल्ली करीत बेकायदा पद्धतीने होर्डिंग थाटली गेली. काही ठिकाणी कमी जागेची परवानगी घेऊन मोठी होर्डिंग लावण्यात आली असल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील काही ठिकाणी अनधिकृत व धोकादायक इमारतींवरही होर्डिंग असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो, अशी भीषण परिस्थिती आहे. घोडबंदर रोडवर दोन इलेक्ट्रिक टॉवरला वेल्डिंग करून होर्डिंग उभारण्यात आला आहे, याकडे आयुक्त राव यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तपासणी करावी. तसेच बेकायदा होर्डिंग काढून टाकून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उंचावरील होर्डिंगची नियमित तपासणी करावी. तसेच भविष्यात होर्डिगपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात नियमावली तयार करावीत, अशी मागणी माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

ठाणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला त्यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार संजय भोसले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

डोंबिवलीतील कंपनीच्या स्फोटात ९४१ मालमत्तांचे नुकसान

डोंबिवली : डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटामुळे किती नुकसान झाले याचे पंचनामे करण्यात आले असून एकुण ९४१ मालमत्तांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या स्फोटात झालेल्या एक ते दोन किलोमीटर…

ठाण्यातील जिजाऊ अभ्यासिकेतील आदिवासी मुलांचे उज्वल यश

ठाणे : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात चालणार्‍या १० अभ्यासिकांतील येऊरच्या आदिवासी पट्टयातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत उज्वल यश संपादन केले. यामध्ये येऊरच्या अभ्यासिकेतील…