अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांनी उमेदवाराचे नाव घोषित करावे, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी महायुतीच्या मेळाव्यात बोलताना केली. बुधवारी सायंकाळी ठाण्यातील टीपटॉप प्लाझा येथील शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष (आठवले) व मित्रपक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी खासदार संजीव नाईक, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष ॲड. माधवी नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, रिपाईचे सुरेश बारशिंगे, भास्कर वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. उमेदवाराचे नाव घोषित केल्यावर कोणीही इकडे तिकडे जाणार नाही, शिवसेना मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, भाजप नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे तीनही नेते जो उमेदवार देतील त्याला निवडून आणू, यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांनी उमेदवाराचे नाव घोषित करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आपल्या भाषणात बोलताना केले. ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरेंद्र मोदी हेच असल्याचे महायुतीच्या सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणात म्हटले होते, हाच धागा पकडून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले की, ठाणे लोकसभेत सन्मानजनक उमेदवार दिला जाईल. आघाडी कोणाची आहे, उमेदवार कोण आहे यापेक्षा नरेंद्र मोदीं यांना पंतप्रधान करण्यासाठी देशात ४०० पार व महाराष्ट्रात ४५ प्लस पार जागा निवडून आणुया, असे आवाहन उपस्थित महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ना. शंभूराज देसाई यांनी केले.