Category: ठाणे

Thane news

भाजपच्या दबावाला शिंदेंचा ‘खो’

ठाण्याची जागा शिवसेनाच लढवणार? ठाणे : आली लग्न घटीका समीप… तरीही नवऱ्या मुलाचा पत्ता नाही, अशी काहीशी अवस्था ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीची झाली आहे. आधी जागा वाटपासाठी चर्चांचे गुर्‍हाळ व त्यानंतर पसंत- नापसंतीचा रंगलेला खेळ यामुळे गेल्या महिन्याभरापासून मतदारसंघात बिनचेहऱ्याचा नुसताच प्रचार सुरू आहे. आता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होण्यास अवघे चार दिवस उरले आहेत, तरी नावाची घोषणा झाली नाही. शिंदे गटाकडे ही जागा येणार हे निश्चित झाले आहे; पण भाजपप्रणित नावावर फुली मारत शतप्रतिशत शिवसेनेचाच उमेदवार निवडणूक रिंगणात पाठवण्यावर शिंदे गट ठाम आहे. त्यामुळे इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असला तरी खरी लढत ही शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातच होणार आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे विभागलेले दोन मावळे एकमेकांसमोर उभे राहणार असल्याने निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. त्यात मुख्यमंत्र्यांसाठी हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. त्यामुळे कोणत्याही बाबतीत या मतदारसंघासाठी तडजोड न करण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते ठाम आहेत. त्यामुळेच सुरुवातीपासून दावा करणाऱ्या भाजपला जागावाटपात एक पाऊल मागे टाकण्यास भाग पडले. चिन्ह तुमचे उमेदवार आमचा हा फॉर्म्युला देत सुरुवातीला संजीव नाईक यांचे नाव भाजपने पुढे केले. त्यांना तयारीला लागा, असे संकेत देताच नाईक थेट प्रचारालाही लागले; मात्र या नावाला शिंदे गटातून नापसंती मिळाल्याने नवीन उमेदवार देण्यात आला; पण या नवीन चेहऱ्याला जनाधार नसल्याचे सांगत मोठी फुली मारण्यात आल्याचे समजते. शिंदे गटात सुरुवातीपासूनच माजी महापौर नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांची नावे आघाडीवर आहेत. असे असताना भाजपकडून उमेदवार आयात केला असता मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता होती. महविकास आघाडीकडून विद्यमान खासदार राजन विचारे तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ते ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिले, ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यात त्यांच्या मेळावे आणि सामाजिक, धार्मिक उपक्रमांमध्ये होणारी गर्दी शिंदे गटाला आव्हान आहे. अशा घट्ट पाय रोवलेल्या मूळ ठाणेकर चेहऱ्याला टक्कर द्यायची असेल, तर महायुतीतील उमेदवारही तितकाच ताकदीचा पाहिजे. नुसता लोकप्रिय किंवा विचारवंत उमेदवार देऊन भागणार नाही. यावर शिंदे गटाचे एकमत झाले आहे. तसा संदेशही भाजपपर्यंत पोहोचल्याचे समजते. त्यामुळे नवीन ‘चेहऱ्या’पेक्षा चर्चेतल्याच नावाचा विचार होऊन तशी घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रचारासाठी मिळणार कमी वेळ २६ एप्रिल ते ३ मेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यानंतर १८ मेपर्यंत प्रचार करता येणार आहे. विद्यमान खासदारांनी जोरदार प्रचार सुरू केला असताना महायुतीच्या उमेदवाराचे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. उद्या नाव जरी जाहीर केले तरी महायुतीच्या उमेदवाराला प्रचारासाठी अवघे २० ते २५ दिवस मिळणार आहे. नवी मुंबई ते मिरा- भाईंदरपर्यंत विस्तारलेल्या या मतदारसंघात प्रचाराचे आव्हान उमेदवाराला पूर्ण करावे लागणार आहे. दरम्यान, उमेदवार कोणताही असला तरी आमचा प्रचार सुरू आहे. यावेळी महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडून आणणे हे ध्येय असल्याने तशी अडचण भासणार नसल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे.

कोचमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका!

इगतपुरी यार्डमध्ये रेल्वेची मॉकड्रील ठाणे : रेल्वे दुर्घटना, आगीच्या घटना, पूल कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर सुरक्षा विभागाने कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे. याबाबत मध्य रेल्वेने कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रशिक्षण देत असते. सोमवारी मध्य रेल्वेने,इगतपुरी अप यार्डमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि इतर आपत्ती व्यवस्थापन टीमसोबत संयुक्तरित्या यशस्वी मॉकड्रिल केली. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज इगतपुरी अप यार्ड येथे एनडीआरएफ आणि इतर आपत्ती व्यवस्थापन टीमसोबत संयुक्तरित्या यशस्वी मॉकड्रिल घेण्यात आली आहे. सर्वप्रथमक सकाळी ११.१० वाजता मॉकड्रिलची सुरुवात झाली. इगतपुरी अप यार्डमध्ये एक डब्या रेल्वे रुळावरून घसरून अचानक आग लागली. या अपघातांची माहिती मुंबई विभागाच्या नियंत्रण कक्षाला निरोप देण्यात आला. नियंत्रण कक्षाने तातडीने कार्यवाही करत एनडीआरएफ, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि रेल्वे अपघात मदत वाहन (एआरटी) आणि सर्व संबंधितांना संदेश पाठविला. सकाळी सव्वा अकरा वाजता रेल्वेची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. तसेच एनडीआरएफची एक तुकडी सकाळी ११.१९ वाजता घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी तत्काळ संरक्षण दलाच्या व अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. रेल्वेच्या कार्यरत कर्मचाऱ्यांकडून अग्निशामक यंत्रांचा वापर करून त्यांनी ११.२४ वाजता आग नियंत्रणात आणली.एनडीआरएफच्या पथकाने सकाळी ११.२५ ते १२.०६ या वेळेत एकूण १८ जखमींना वाचवले. त्याचवेळी एनडीआरएफ आणि एआरटी च्या पथकांनी सदर डब्याचे छत दोन्ही बाजूंनी कापून प्रत्येकी एक जीव वाचवला. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी, एनडीआरएफला प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.या पथकात ‘फेरो’ नावाचा आठ वर्षांचा कुत्रा देखील आपली भूमिका बजावत होता.संकटकाळातील तयारी आणि प्रभावी प्रतिसाद यंत्रणेच्या माध्यमातून प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेची वचनबद्धता या सरावातून दिसून आली. अपघाताची पूर्वतयारी आणि त्याच्या जलद प्रतिसादासाठी रेल्वेकडून संयुक्तपणे असे सराव सुरू राहतील. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या सुरक्षा विभागाने या सरावाचे संयोजन केले होते.

ठाणे महापालिकेतर्फे जागतिक वसुंधरा दिन साजरा

तलाव परिसर स्वच्छता, खुली पर्यावरण कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन ठाणे : रायलादेवी तलाव परिसर स्वच्छता, खुली पर्यावरण कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा आणि प्लास्टिक कचऱ्याचे संकलन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून ठाणे महापालिकेतर्फे सोमवार, २२ एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. परिसर भगिनी विकास संघ या स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांनी रायलादेवी तलाव परिसराची स्वच्छता केली. या मोहिमेत भीम नगर येथील अभ्यास वर्गातील विद्यार्थी, कचरा वेचक महिला, महापालिका कर्मचारी यांनी सहभाग घेतला. त्यांनी या अभियानात परिसरातून २५ किलो प्लास्टिक कचरा संकलित केला. याप्रसंगी, विद्यार्थ्यांना वसुंधरा दिनाविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर, या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महापालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांनी नागरिकांना पर्यवरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ऑनलाईन खुल्या पर्यावरण शाळेचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात, २२ एप्रिल रोजी डॉ. संजय जोशी यांचे व्याख्यान झाले. त्यांनी पर्यावरण चळवळ, त्याची सुरूवात, वसुंधरा दिनाचा इतिहास याची माहिती दिली. यंदाच्या वसुंधरा दिनाची संकल्पना ग्रह वि. प्लास्टिक अशी आहे. त्याअनुषंगाने, डॉ. जोशी यांनी प्लास्टिकचा वाढता वापर, त्याच्या विविध प्रकारांमुळे होणारे प्रदूषण आणि त्याचा पर्यावरणावर होत असलेला परिणाम याची माहिती उदाहरणांसह दिली. तसेच, दैनंदिन जीवनशेलीमध्ये प्लास्टिक वापरामुळे होणारा कचरा कमी करण्यासाठी सोप्या उपायांचा अवलंब करण्याची आवश्यकता त्यांनी सांगितली. आतापर्यंत या कार्यशाळेची १० सत्रे झाली आहेत. ती आपलेपर्यावरण या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत. ही सत्रे दर शुक्रवारी दु. ४ ते. सायं. ६ या वेळात ऑनलाईन होतात. त्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या प्रमुख पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी केले आहे. जागतिक वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर, वाढत्या उष्णतेचा मुकाबला करण्यासाठी महापालिका सज्ज असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. त्यानुसार, उष्णतेच्या लाटेबाबत जनजागृती, वृक्ष लागवड, संवर्धन, पिण्याच्या पाण्याचा जपून वापर, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुर्नवापर यावरही भर देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले असल्याचेही मनिषा प्रधान यांनी सांगितले.

ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा

पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा ठाणे : येथील कोलशेत भागातील २०.५ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ला सव्वादोन महिन्यात ४ लाख ८५ हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. या भेटीमुळे पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा झाला आहे. यानिमित्ताने सेंट्रल पार्कला भेटी देण्याचा नागरिकांचा ओढा कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे येथील कोलशेत भागातील पार्कसिटी गृहप्रकल्प परिसरात ठाणे महापालिकेला विकास प्रकल्पांतर्गत २०.५ एकरचा सुविधा भूखंड उपलब्ध झाला होता. त्यावर महापालिकेने बांधीव हस्तांतरण विकास हक्काच्या (कन्स्ट्रक्शन टीडीआर) माध्यमातून कल्पतरू विकासकाकडून ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ हे उद्यान विकसित करून घेतले आहे. या उद्यानाला विविध प्रकारची ३ हजार ५०० हून अधिक रोपे, फुल झाडे आहेत. मुघल गार्डन, चायनीज थिमने केलेले उद्यान, मोरोक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरोक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहे. मुलांसाठी खेळायला जागा, ज्येष्ठांना चालण्यासाठी जॉगींग ट्रॅक, देशातील सर्वात मोठा स्केटींग यार्ड, लॉन टेनीस, व्हॉलीबॉल कोर्ट अशी व्यवस्था पार्कमध्ये करण्यात आली आहे. योगा, ध्यान धारणेसाठी देखील येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या उद्यानाचे ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच हे उद्यान सर्वांसाठी खुले करण्यात आले असून याठिकाणी ठाणे शहरासह मुंबई महानगरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सव्वादोन महिन्यात ४ लाख ८५ हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. या भेटीमुळे पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा झाला आहे. ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ला सव्वादोन महिन्यात ४ लाख ८५ हजार ६२ अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. यामध्ये ३ लाख ८२ हजार ४२२ प्रौढांचा, २२ हजार ८७१ ज्येष्ठ नागरिकांचा तर, ७९ हजार ७६९ लहान मुलांचा समावेश आहे. या उद्यानातून पालिकेला आतापर्यंत १ कोटी १६ लाख ९७ हजार ४८८ रुपयांचा महसूल मिळाला आहे.

कल्याण-डोंबिवलीकरांना जुन्या दरानेच यावर्षीही पाणीदर आकारणी

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिकांना जुन्या दरानेच पाणी दर आकारणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाला शासनाने मंजुरी दिल्याने प्रशासनाने १ एप्रिलपासून जुनेच पाणी दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेचा अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी पाणी पुरवठा विभागाकडून पालिकेचा महसूल वाढ करण्याच्या दृष्टीने पाणी दर वाढीचे प्रस्ताव आयुक्तांंकडे दाखल केले जातात. नवीन वाढीव दर लागू केले तर नागरिकांकडून ओरड सुरू होते. आणि त्याचा परिणाम मग राजकीय मंडळींकडून दबाव येण्याकडे होतो. आगामी पालिका निवडणुकींचा विचार करून या राजकीय दबावापोटीच प्रशासनाने नागरिकांवर पाणी दर वाढीचा बोजा न टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या नवीन दर प्रणालीप्रमाणे गेल्या वर्षी ज्या दराने नागरिकांनी पाणी दराची देयके भरली त्याच दराने आगामी आर्थिक वर्षात नागरिकांंना पाणी दराची देयके भरावी लागणार आहेत. ही दरवाढ न केल्याने पालिकेला मिळणाऱ्या वाढीव महसुलावर पाणी सोडावे लागते. पालिकेला दरवर्षी पाणी देयक वसुलीतून सुमारे ८० कोटी महसूल मिळणे अपेक्षित असते. या पाणी दर वसुलीतील सुमारे २० ते ३० कोटी वसुलीवर पालिकेला पाणी सोडावे लागले. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशाप्रमाणे मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांंनी १ एप्रिलपासून प्रशासकीय ठरावाप्रमाणे जुने पाणी दर लागू करण्याचे आदेश दिले आहेत. फेब्रुवारीमध्ये जुने पाणी दर लागू करण्याचा ठराव प्रशासनाने केला होता. आगामी आर्थिक वर्षासाठी पालिकेने पाणी देयकाच्या माध्यमातून ९० कोटी ६० लाख रुपये वसुलीचा लक्ष्यांंक पालिका अर्थसंकल्पात निश्चित केला आहे. पाणी दर आकारणी सर्व प्रकारच्या घरगुती पाणी वापरासाठी प्रति घनमीटर ७ रुपये आकारणी. धार्मिक स्थळे, शिक्षण संस्था प्रति घनमीटर १५ रुपये. सर्व प्रकारची व्यापारी दुकाने प्रति घनमीटर ३० रुपये. १५ खाटांच्या रुग्णालयांना प्रति घनमीटर ३० रुपये. १५ हून अधिक खाटांच्या रुग्णालयांसाठी प्रति घनमीटर ५० रुपये. उपहारगृहे, मंगल कार्यालये, व्यापारी निवासी संकुल प्रति घनमीटर ६० रुपये. कारखाने, तबेले, गॅरेज प्रति घनमीटर ६० रुपये.

‘राजगती’ नाटकाची ५ मेला शिवाजी मंदिर नाट्यगृहात प्रस्तुती !

अनिल ठाणेकर ठाणे : देशातील राजकीय पक्षांना तसेच मतदारांना संविधानाच्या राजनैतिक चेतनेशी जोडून ‘भारताला’ अबाधित ठेवण्याचे आंदोलन आहे, मंजुल भारद्वाज रचित ‘राजगती’ हे नाटक, रविवारी ५ मेला सकाळी ११ वाजता शिवाजी नाट्यमंदिर, दादर येथे प्रस्तुत होणार आहे. लोकशाही आणि संविधान कायम ठेवायचे असेल तर जनतेचा विवेक जागृत करणे आवश्यक आहे. लोकशाहीचे पर्व म्हणजेच निवडणुका जाहीर झाल्या आहेत. विकारी प्रवृत्तींनी संविधान उद्ध्वस्त करण्याची घोषणा केली आहे. आम्ही संविधान बदलू असे उघडपणे जाहीर केले आहे. अशा विनाशाच्या काळात ही निवडणूक केवळ सरकार निवडण्यासाठी नाही तर संविधानाची  मूल्य जपणारे लोकशाहीचे शिलेदार निवडण्यासाठी आहे. लक्षात ठेवा २६ जानेवारी १९५० रोजी भारतात प्रथमच सर्वांना समानतेचा अधिकार मिळाला. समतेने वर्णव्यवस्थेतून मुक्तीचा बिगुल फुंकला आणि देशातील प्रत्येक व्यक्तीला व महिलांना समानतेचा अधिकार मिळाला. विचार करा, आपल्याकडून या समानता आणि मतदानाचा हक्क काढून घेतला तर आपल्याला कसे वाटेल? मणिपूरप्रमाणे भारतभर महिलांवर लैंगिक अत्याचार होत असतील तर आपल्याला काय वाटेल ? अस्मिता आणि प्रतिष्ठा या शब्दांनी भ्रमाचे जाळे पसरवले जात आहे. पण त्याऐवजी ‘सत्य, अहिंसा आणि संविधान’ हा भारताचा वैचारिक आणि तर्कशुद्ध कणा म्हणजे भारतीयता आहे. हे भारताच्या लोकांनो, जागे होऊया आणि संविधान जपुया. राजकारण म्हणजे केवळ सत्ता मिळवणे, निवडणुका घेणे किंवा संसदेत वाद-विवाद करणे नव्हे, तर मानवतेच्या सर्वांगीण कल्याणासाठी जनतेची आणि राज्यकर्त्यांची चेतना जागृत करण्याची प्रक्रिया आहे. ‘थिएटर ऑफ रेलेव्हन्स शुभचिंतक आणि अभ्यासक’ रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित – दिग्दर्शित नाटक  ‘राजगती’ रविवारी ५ मे रोजी सकाळी ११ वाजता श्री शिवाजी नाट्यमंदिर दादर येथे प्रस्तुत करणार आहेत. राजकारण म्हणजे घाणेरडे, राजकारण हे केवळ राजकीय पक्षांपुर्ते मर्यादित आहे, याचा भ्रम मोडीत काढून देशाच्या जनतेला नागरिक करण्याची प्रक्रिया आहे हे नाटक. देशातील राजकीय पक्षांना तसेच मतदारांना संविधानानुसार राजनैतिक चेतनेशी जोडून ‘भारताला’ अबाधित ठेवण्याचे आंदोलन आहे, ‘राजगती’ हे नाटक ! संविधानाने आपल्याला मालक होण्याचा हक्क दिला आहे आणि तो हक्क म्हणजे मताधिकार. आपण आपला मताधिकार निभवत नाही आणि मग दरवेळी राजनीतीला नावं ठेवतो.आपली मनोभूमिका ठरवून टाकतो की, राजनीती ‘वाईट’ आहे,चिखल आहे. राजनीतिशी आमचं काहीही घेणं देणं नाही. आपले आयुष्य  दर क्षणी ‘राजनीती’ ने प्रभावित आणि संचालित होत असते पण एक ‘सभ्य’ नागरिक होऊन आपण केवळ आपल्या ‘मताचे दान’ करतो किंवा आपले मत मोफत धान्य,पैसा, दारू किंवा साडीसाठी विकतो. जेव्हा तुम्ही तुमचे मत विकता, तेव्हा लक्षात घ्या तुम्ही तुमचा देश ही विकता. ही आपल्या राजनैतिक भूमिकेपासूनची पळवाट आहे. एक क्षण विचार करूया, की खरंच राजनीती वाईट आहे की आपण त्यात सहभागी न होऊन त्याला वाईट बनवत आहोत ? आणि जेव्हा देशाचे नागरिक त्याला नाही चालवणार तर मग वाईट प्रवृत्तीचे लोक सत्ता चालवणार आणि आज तेच घडतं आहे. नाटक राजगति जनतेला आपल्या राजनैतिक मुक्तिसाठी चार सूत्र देते सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीति. सत्ता नेहमीच भ्रष्ट राहणार, मग ती कोणतीही असो किंवा कोणाचीही असो, व्यवस्था आपल्या जडत्वातून कोणत्याही परिवर्तनाला प्रभावहीन बनवते, राजनैतिक चरित्र घडवल्याशिवाय संपूर्ण राजनैतिक प्रक्रिया पाखंडाची शिकार होते. म्हणूनच सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीति या चारही आयामांना एकत्र समजणे अनिवार्य आहे. नाटक राजगति ‘राजनीति’ ला पवित्र नीती मानते. जनतेकडून राजनीति मध्ये विवेकपूर्ण सहभागितेची अपेक्षा करते. राजनीति सत्ता, व्यवस्था आणि राजनैतिक चरित्राला स्वच्छ करणारी पवित्र नीती आहे. प्रत्येक भारतवासीयांत राजनीतिची विवेकी मशाल पेटवून आपल्या स्वतंत्रता सेनानींनी देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. पण काही  सत्तालोलुपांनी, सत्तेच्या दलालांनी‘राजनीति घाण आहे या कलंकाला सुनियोजित षडयंत्राने १४२ करोड देशवासियांच्या मेंदूत रुजवले. ज्याच्या मूळे जनता राजनैतिक प्रक्रियेत सहभागी नाही होत. कोणी सहभागी होत आहे तर ते फक्त सत्तालोलुप जे भांडवलदारांच्या बळावर वोट विकत घेऊन प्रत्येक निवडणुकीत लोकशाहीचे हनन करत आहेत. नाटक ‘राजगती’! हुकूमशाही सत्ता आणि राजकीय परिदृश्याला बदलण्याचे राजकीय सूत्र आहे.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने सन्मान

ठाणे:ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शाल, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, दैनिक पुढारीचे ठाण्याचे ब्युरो चीफ दिलीप शिंदे, जनमुद्राचे संपादक डॉ. दीपक दळवी ,छायाचित्रकार किस्तु फर्नांडिस आदीं उपस्थित होते. ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या  ३० मार्चला आयोजित पत्रकार मेळाव्याचे  ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे प्रमुख पाहुणे होते. मात्र अचानक केंद्रिय निवडणूक आयोगाच्या महत्वाच्या कामासाठी त्यांना  कल्याणला जायचे होते.  ते  सकाळी १०.३० वाजता पत्रकारांच्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले, मात्र त्यावेळी नियोजित कार्यक्रमानुसार  ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या नियोजित सर्वसाधारण सभा सुरू होती. सभेनंतर पत्रकार मेळावा असल्याचे जिल्हाधिकारी शिनगारे यांना संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर  जिल्हाधिकारी  शुभेच्छा संदेश देऊन  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामासाठी कल्याणला गेले होते.  त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात काल त्यांची भेट घेऊन त्यांना पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

कोपरी गावात हनुमान जयंती उत्साहात साजरी

ठाणे :कोपरी गावातील अंजनीपुत्र हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हाडांच्या सर्व दुखण्यावर विविध थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार करण्यात आले. ठाणे पूर्व कोपरी गाव येथे जुने अंजनी पुत्र हनुमान मंदिर असून, वर्षभर अंजनी पुत्र हनुमान सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून मंदिरात  मंगळवारी हनुमान जयंती साजरी करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी करण्यात आले. सोबतच एका मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन देखील माजी नगरसेविका मालती पाटील अणि रमाकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने घेण्यात आले होते.  या आरोग्य शिबिरात रुग्णांना कोणत्या व्याधीची लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर उपचार करण्याचे मार्गदर्शन देखील करण्यात आले होते. पेसमेकर, एनजिओग्राफी, केमोथेरेपी अशा महागडे उपचार यामध्ये समाविष्ट होते.

ठाणे जिल्हा समन्वय समितीची 24 एप्रिलला बैठक

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि ठाणे जिल्हा समन्वय समिती यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांची  बुधवारी, 24 एप्रिल दुपारी 3.00 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात ही बैठक होणार असून जिल्ह्यातील सर्व वर्ग एक व वर्ग दोनच्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे. राजपत्रित अधिकारी महासंघ ही संघटना अधिक सबळ आणि कार्यशील करण्याच्या दृष्टीने या बैठकीचे  आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी संस्थापक अध्यक्ष व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, कोषाध्यक्ष नितीन काळे या मान्यवरांसह राज्य कार्यकारीणीचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.‌ या बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभागाच्या राजपत्रित वर्ग- अ आणि ब अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, कार्याध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, उपाध्यक्ष मोहन पवार व सरचिटणीस तथा जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.

हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात बुकेऐवजी बुक

विश्व पुस्तक दिनानिमित्त पवनसुत प्रतिष्ठानकडुन वाचन चळवळीची रुजवात ठाणे :   सण उत्सव म्हटले की, संस्कृती,परंपरा जपण्याबरोबरच हल्ली जल्लोषी धांगडधिंगा सुरु असतो. परंतु, याला छेद देत ठाणे पुर्वेकडील कोपरीतील श्री पवनसुत सेवा…