Category: ठाणे

Thane news

उल्हासनगरात कलानी ताकदवान, श्रीकांत शिंदेंकडून टीम कलानीवर स्तुतीसुमने

उल्हासनगरः उल्हासनगर शहरात आपले वर्चस्व राखून असलेल्या टीम ओमी कलानीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून तीन वेळा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी टीम ओमी कलानी यांची भेट घेतली असून शिंदेंसाठी कलानींनी दोन कार्यकर्ता मेळाव्याचेही आयोजन केले होते. तर एकदा घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाशी जवळीक असूनही यंदाही कलानी श्रीकांत शिंदेंसाठी प्रचारात उतरणार आहेत. राजकीय युती – आघाड्यांना तिलांजली देत अनेकदा उल्हासनगर शहरात विचित्र राजकीय समिकरणे तयार झाल्याचे दिसून आले आहे. २०१७च्या पालिका निवडणुकांपर्यंत शिवसेना आणि भाजप यांची नैसर्गिक युती शहरात होती. २०१७ नंतर भाजपने एकहाती सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेला दूर करत टीम ओमी कलानीशी आघाडी केली होती. शहरात ओमी कलानी यांची वेगळी ताकद आहे. त्यांच्याशिवाय सत्तेचे समीकरण गाठणे शक्य होत नसल्याचेही बोलले जाते. २०१७ वर्षात ओमी कलानी यांनी आपले उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणुकीत उतरवले होते. त्यामुळे पहिल्यांदाच भाजपचा महापौर उल्हासनगर पालिकेत निवडून आला होता. त्यानंतर अडीच वर्षानंतर शिवसेनेने टीम ओमी कलानीला आपल्याकडे वळवत पालिकेची सत्ता मिळवली होती. त्यानंतर शिवसेना भाजपात दुरावा होता. मात्र ओमी कलानीशी शिवसेनेचे चांगले संबंध होते. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर कलानी यांचा कल शरद पवार यांच्या गटाकडे होता. शरद पवार, जितेंद्र आव्हाड यांनी कलानी महल येथे जात कलानी कुटुंबाची भेटही घेतली होती. त्यामुळे कलानी गट शरद पवार गटाकडे झुकणार याची दाट शक्यता होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर कलानी कुटुंबाने शिवसेनेला उघड पाठिंबा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे संपूर्ण मतदारसंघ प्रचार करताना पिंजून काढत आहेत. या भेटीगाठींमध्ये कलानी गटाचे पदाधिकारीही हजेरी लावत आहेत. तर कलानी गटाने श्रीकांत शिंदे यांच्यासाठी दोन कार्यकर्ते मेळावे आयोजित केले होते. मंगळवारी कलानी महलात पुन्हा टीम ओमी कलानींच्या वतीने आयोजीत संघटना बैठकीला श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्याबद्दल त्यांनी कलानी टीमचे आभार मानले. यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी ओमी कलानी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. कलानी आणि शिवसेनेची मैत्री फार जुनी असून यापूर्वीही त्यांनी शिवसेनेला बिनशर्त मोठी मदत केल्याचे शिंदे यांनी सांगितले. टीम ओमी कलानीची उल्हासनगरमध्ये वेगळी ताकद असून ओमी कलानी एक उत्तम मित्र असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाशी जवळीक असली तरी टीम ओमी कलानी श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी आहे.

कोंडीस कारणीभूत बंद केलेला कापूरबावडी- ढोकाळी मार्ग खुला करण्याचा निर्णय

ठाणे : घोडबंदर मार्गालगत असलेल्या महत्त्वाचा कापूरबावडी ते ढोकाळी हा बंद मार्ग अखेर ठाणे महापालिकेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक ते दोन दिवसांत हा मार्ग खुला होणार आहे. हा मार्ग खुला करण्यात यावा यासाठी नागरिकांकडून मागणी केली जात होती. मार्ग खुला झाल्यानंतर कोलशेत, हायलँड, कापूरबावडी, ढोकाळी येथील वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा मार्ग एका ‘ सुमित बाबा’च्या आदेशाने बंद केल्याची चर्चा ठाण्यात सुरू होती. गेल्याकाही वर्षांमध्ये ठाण्यातील घोडबंदर, हायलँड, बाळकूम, कोलशेत, ढोकाळी आणि मनोरमानगर भागात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. या भागातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. घोडबंदर मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी ठाणे महापालिकेने कापूरबावडी आणि माजिवडा चौकात काही बदल सूचवले होते. या बदलाचा भाग म्हणून ठाणे महापालिकेने येथील ढोकाळी, कोलशेत मार्गाला जोडणारा कापूरबावडी ते ढोकाळी हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहनांची वाहतुक कापूरबावडी येथून हायलँड, ढोकाळी मार्गे सोडली जात होती. या वाहतुक बदलामुळे कापूरबावडी चौकात मोठी वाहतुक कोंडी होत होती. काही महिन्यांपूर्वी कोलशेत भागात सेंट्रल पार्क आणि हायलँड भागात प्रशस्त मंदीर उभारण्यात आले आहे. त्यामुळे या पार्कमध्ये आणि मंदीरात येणाऱ्या वाहनांचा भार देखील मार्गावर वाढला होता. सुट्ट्यांच्या दिवसांत हायलँड, कोलशेत भागात मोठ्या वाहतुक कोंडीचा सामना ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. हा मार्ग खुला करण्यासाठी वाहतुक पोलिसांकडे नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि नागरिकांकडून देखील हा मार्ग खुला करण्यासाठी मागणी केली जात होती. परंतु महापालिकेकडून हा मार्ग खुला केला जात नव्हता. त्यामुळे येथील कोंडी सोडविताना वाहतुक पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. गेल्या आठवड्याभरात कापूरबावडी, हायलँड भागात वाहतुक कोंडीच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर अखेर उशीराने जाग आलेल्या ठाणे महापालिकेने येथील कापूरबावडी- ढोकाळी मार्गिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील दुभाजक हटविण्यात आले आहेत. येथे डांबरी रस्ता तयार करून येत्या एक ते दोन दिवसांत हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. ठाणे शहरात ठिकठिकाणी मुख्य मार्गावर दुभाजक बसविण्यात आले आहेत. कापूरबावडी-ढोकाळी हा मार्ग देखील बंद करण्यात आला होता. हे दुभाजक ‘सुमित बाबा’ नावाच्या व्यक्तीच्या सूचनेवरून बसविण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. हा रस्ता देखील त्यांच्या सांगण्यावरून केल्याची चर्चा ठाण्यात सुरू होती. त्यामुळे रहिवाशांकडून मागणी करूनही रस्ता खुला केला जात नसल्याची चर्चा रंगली होती. शिवसेना- भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रस्ता खुला करण्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांनीच पाठपुरावा केल्याने हा रस्ता खुला झाल्याचा दावा केला जात आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी परिसरात मोठे फलक उभारले आहे. तर भाजपचे पदाधिकारी दत्ता घाडगे यांनी सहा महिन्यांपासून आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करत असल्याचा दावा केला आहे. हा रस्ता खुला करण्यात यावा यासाठी नागरिकांकडून मागणी केली जात होती. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हायलँड येथे सभेला आले असताना, त्यांचासोबत आम्ही चर्चा केली. त्यामुळे हा रस्ता खुला झाला. परंतु काही लोक फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका संजय भोईर यांनी केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे असे म्हणत त्यांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांचे नाव घेणे टाळले. मागील सहा महिन्यांपासून आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून रस्ता खुला करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे ठाणे शहर जिल्हा फ्रेंड्स ऑफ भाजपचे संयोजक दत्ता घाडगे यांनी सांगितले. राज्यात भाजपची युती आहे. तन-मन-धनाने ही युती असायला हवी. परंतु ठाण्यात हे चित्र कमी प्रमाणात दिसते. ठाणे महापालिकेत केवळ एकाच पक्षाची ‘दादा’गिरी सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकी दिसून येत नाही असा आरोप त्यांनी केला.

उल्हास नदीचे ‘हिरवे’ रूप पाहिले का ?

जलपर्णीमुळे नदीपात्र हरवले, उल्हासनदी प्रदूषणाच्या विळख्यात बदलापूरः ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांची पिण्याच्या पाण्यासाठी जीवन वाहिनी असलेल्या उल्हास नदीला प्रदूषणाने ग्रासले असून त्याचे परिणाम अगदी गडदपणे दिसू लागले आहेत. बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीवर जलपर्णीचा विळखा दिसून येत असून नदीचे पात्र दिसेनासे झाले आहे. जलपर्णीचा विळखा नदीपात्रात दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नदीतील जलचर धोक्यात असून पाणी पातळी झपाट्याने कमी होते आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत घरोघरी उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी फिरताना दिसत आहेत. मात्र नदी प्रदूषणाकडे सर्वांचाच कानाडोळा झाल्याचे दिसते आहे. उल्हास नदी ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. कर्जत तालुक्यातून वाहत येत वांगणीजवळ ही नदी ठाणे जिल्ह्यात प्रवेश करते. नदी किनारी अनेक ग्रामपंचायती या नदीतून पिण्यासाठी पाणी उचलतात. बदलापूर शहरात बॅरेज बंधाऱ्यावर अंबरनाथ आणि बदलापूर शहराची पाणी योजना आहे. येथून पाणी उचलून त्यावर प्रक्रिया केली जाते. पुढे याच नदीला जांभूळ येथे बारवी नदी येऊन मिळते. यात बारवी धरणातून पाणी साोडले जाते. ते पुढे जांभूळ बंधाऱ्यावरून उचलून त्यावर अंबरनाथजवळील जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रियेसाठी पाठवले जाते. पुढे मोठमोठ्या जलवाहिन्यातून हेच पाणी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, मिरा भाईंदर, ठाणे या शहरांना तर विविध औद्योगिक वसाहतींनाही पुरवले जाते. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने उल्हास नदीचे मोठे महत्व आहे. मात्र तरीही गेल्या काही दिवसांपासून नदीच्या पात्राला जलपर्णीचा विळखा पडला आहे. बदलापूर पश्चिमेतील चौपाटी परिसरापासून थेट जांभूळ बंधाऱ्यापर्यंतच्या भागात संपूर्ण नदीचा पात्र जलपर्णीमध्ये हरवले आहे. जलपर्णी इतकी दाट आहे की काही दिवसांपूर्वी एका तरुणीने येथे आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र या जलपर्णीत अडकल्याने सुदैवाने बचावली. सध्याच्या घडीला हे पात्र जलपर्णीमुळे इतके गर्द झाले आहे की एखाद्या उद्यानातील हिरवा गालीचा असल्यासमान नदी भासते. नदी पात्रावर आलेल्या जलपर्णीमुळे खाली तळापर्यंत सुर्यप्रकाश पोहोचण्यास अडथळा होत असून त्यामुळे पाण्यातील जलचर धोक्यात आले आहेत. नदीच्या या प्रदुषणावर तातडीने तोडगा काढून उल्हास नदी पुन्हा जलपर्णीमुक्त करावी अशी मागणी होते आहे. प्रदुषण सुरूच उल्हास नदी पात्रात नागरी आणि औद्योगिक सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप वर्षानुवर्षे होतो आहे. कर्जतपासून थेट कल्याणपर्यंत नागरीकरण झालेली, नागरिकरणाच्या वाटेवर असलेली शहरे, गावांतून येणारे सांडपाणी थेट नदीत मिसळते आहे. त्याकडे कायमच कानाडोळा झाला आहे. नदीत कचरा मिसळण्यापासून रोखण्यासाठी स्थानिक पालिका प्रशासन फक्त फलकबाजी करण्यात धन्यता मानते आहे. त्यामुळे नदी प्रदूषण दिवसेंदिवस वाढतेच आहे. मोहीम थंडावली तीन वर्षांपूर्वी उल्हास नदी जलपर्णीमुक्तीसाठी सगुणा रूरल फाऊंडेशनच्या मदतीने विशेष मोहीम राबवण्यात आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यात पुढाकार घेतला होता. मात्र त्यांच्या बदलीनंतर ही मोहीम थंडावली. चला जाणुया नदीला ही मोहीम राज्य सरकारने सुरू केली. मात्र तीचा प्रभाव पडू शकलेला नाही.

जनतेला निवडणुकीपुरता विकास कामाचं गाजर दाखवणारे  निष्क्रिय खासदार म्हणजे कपिल पाटील-सुरेश (बाळ्यामामा )म्हात्रे

राजीव चंदने मुरबाड : निवडणुकीचे रणशिंग फुकताच मुरबाड मधे महाविकास इंडिया आघाडीचा भव्य दिव्य प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा शहरातील खुले नाट्यगृहात संपन्न झाला, त्याप्रसंगी सुरेश (बाळ्या मामा)म्हात्रे यांनी आपल्या भाषणात खासदार कपिल पाटीलांवर  टीका करत म्हणाले की दहा वर्ष खासदार पदाची ज्याना संधी मिळाली तीन वर्ष राज्यमंत्री पद असतांना देखील कुठल्याही प्रकारचे विकास कामे केली नसून फक्त जनतेची दिशाभूल करत निवडणुकी पुरता विकास कामांचा गाजर दाखवायच काम केला आहे, कपिल पाटील हे निष्क्रिय खासदार आहेत, असा घणाघाती आरोप बाळ्या मामा यांनी महाविकास इंडीया आघाडीच्या मेळाव्यात केला, त्यानंतर ते पुढे म्हणाले की  खासदार पदाची संधी मला मिळाली तर अनेक वर्षापासून मुरबाडकरांचा रखडलेल्या रेल्वेचा प्रश्न,मार्गी लावणार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आजोळ असलेले आंबेटेंबे गाव येथिल अपूर्ण भीमाई स्मारकाचा काम पूर्ण करणार, यासर्व कामांचा आढावा प्रत्येक वर्षी पत्रकार परिषद घेऊन सादर करणार असे हि यावेळी ते म्हणाले त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा याकरिता त्त्यांच्या साठी वेगळी बाजार पेठ तयार करण्याचे आश्वासन हि दिले, त्याप्रसंगी राष्ट्रवादी(शरद पवार) गटाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, मुरबाड तालुका अध्यक्ष दिपक वाघचौडे, शहराध्यक्ष तेजस व्यापारी, शिवसेना उ.बा.ठा उपजिल्हा प्रमुख मधुकर घुडे, मुरबाड तालुका अध्यक्ष संतोष विशे, राजाराम  निचीते, गणपत टावरे, आम आदमी पार्टीचे  ऍड, नितीन देशमुख, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मुरबाड तालुका महिला अध्यक्षा कविता वारे, दिलीप कराळे,निलेश शिंदे,संजय चंदने, भाविक चंन्ने, अभिषेक डुंकवाल,यांच्या सह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

मनसेच्या भिवंडी कार्यालयाला कपिल पाटील यांची भेट

भिवंडी : मनसेच्या भिवंडी शहरातील अशोकनगर येथील मुख्य कार्यालयाला महायुतीचे उमेदवार व केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी सदिच्छा भेट दिली. या वेळी भिवंडी शहर व ग्रामीण भागातील प्रचाराच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. या वेळी भाजपाचे आमदार महेश चौघुले, मनसेचे ठाणे-पालघर विभाग अध्यक्ष अविनाश जाधव, भिवंडी पूर्व मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख संतोष शेट्टी, शिवसेनेचे भिवंडी शहर जिल्हाप्रमुख सुभाष माने, मनसेचे डी. के. म्हात्रे, मनोज गुळवी, परेश चौधरी, रवींद्र विशे, विकास जाधव, कामिनी खंडागळे, भाजपाचे माजी नगरसेवक सुमित पाटील, राजू गाजेंगी आदींची उपस्थिती होती.

 ‘प्रत्येक मतदान केंद्रावर वीज, पाणी, रॅम्प, फर्निचर, शौचालय, व्हीलचेअर आदी अत्यावश्यक बाबी उपलब्ध करा !’

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांचे निर्देश अनिल ठाणेकर ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रत्येक बूथनिहाय, मतदान केंद्रावर वीज, पाणी, रॅम्प, फर्निचर, शौचालय, व्हीलचेअर या सर्व अत्यावश्यक बाबी उपलब्ध असल्याची खात्री करा असे निर्देश ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिले. पंचायत समिती मुरबाड येथे जिल्हा परिषद, ठाणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आज पार पडली. यावेळी गट विकास अधिकारी श्वेता पालवे याच्या समवेत पंचायत समितीच्या सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत विभाग निहाय आढावा घेण्यात आला. विविध कामकाज जलदगतीने करण्याच्या सुचना देण्यात आल्या. सॅममॅम बालकांची संख्या वाढ होऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्यासाठी सुचना देण्यात आले. प्रत्येक ग्रांमपंचायत अंतर्गत पाणी पुरवठा किंवा पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्यासाठी यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कार्यक्रमानुसार बूथनिहाय प्रत्येक मतदान केंद्रावर वीज, पाणी, रॅम्प, फर्निचर, शौचालय, व्हील चेअर या सर्व अत्यावश्यक बाबी उपलब्ध असल्याबाबत आढावा घेण्यात आला. महिला बचत गटातील महिलांना मतदानाबाबत जनजागृत करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बचत गटातील महिलांसमवेत मतदान जनजागृतीपर शपत घेतली तसेच स्वीप कार्यक्रमाबाबत आढावा घेण्यात आला. बांबू लागवड व मनरेगा संदर्भांतील सुरु असलेल्या कामाची विस्तारित माहिती घेण्यात आले. माझी  वसुंधरा अंतर्गत झालेल्या कार्यक्रमांची माहिती वेळेत भरण्याच्या सुचना दिल्या. यावेळी समाज कल्याण विभागप्रमुख संजय बागुल, जिल्हा कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, पंचायत समिती मुरबाडचे गटविकास अधिकारी श्वेता पालवे तसेच पंचायत समिती अंबरनाथ येथील सर्व विभाग प्रमुख व केंद्रप्रमुख उपस्थित होते. अंबरनाथ विधानसभा स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृतीसाठी केलेल्या उपक्रमांची माहिती घेण्यात आली. तसेच मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी विविध पध्दतीचा वापर करुन, जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचून मतदान जनजागृती करणे. पंचायत समिती अंबरनाथ येथील जिल्हा परिषदेच्या ४२८ शाळेत प्रभात फेरी काढणे, रांगोळी, गायन, नृत्य, नाटक, पथनाट्यद्वारे मतदान जनजागृती करणे महिला बचत गटांद्वारे मतदानाबाबात जनजागृती करून जास्तीत जास्त महिलांचा सहभाग वाढविणे. प्री- मॅट्रिक शिष्यवृत्ती संदर्भात सर्व शाळांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन पूर्ण करणे याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच कामकाज वेळेत पुर्ण करण्याबाबत सांगण्यात आले. मुख्याध्यापक व शिक्षक यांचे नांवाचे रजिस्ट्रेशन करणे. एक शिक्षकी शाळा आहे तेथे प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकाने रजिस्ट्रेशन करणे व शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाईन अर्ज भरणे. ग्रामीण भागातील ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळांना लाईट/ पिण्याच्या पाण्याची सोय, खोली वर्ग व्यवस्था सुस्थितीत असल्याची माहिती घेण्यात आली. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा पोर्टलवर नोंदणी करून प्रशिक्षण घ्यावे व शेवटी शपथ घेऊन प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याबाबत सांगण्यात आले. संस्थेमार्फत कचरा उचलण्यात येणाऱ्या नेवाळी नाक्याच्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट दिली. कचरा व्यवस्थापन व रस्त्यालगत साठलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना गटविकास अधिकारी, पंचायत समिती अंबरनाथ यांना यावेळी देण्यात आल्या. यावेळी समाज कल्याण विभागप्रमुख संजय बागुल, जिल्हा कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, पंचायत समिती अंबरनाथचे गटविकास अधिकारी नारायणसिंग परदेशी, अंबरनाथ नगरपालिका अतिरिक्त मुख्याधिकारी अभिजीत पराडकर, पंचायत समिती अंबरनाथचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार जतकर, कुळगाव- बदलापूर प्रशासन अधिकारी विलास जडये, तसेच पंचायत समिती अंबरनाथ येथील सर्व विभाग प्रमुख व केंद्रप्रमुख उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांना स्व. शि. म. परांजपे स्मृती पुरस्कार जाहीर !

ठाणे : महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा स्व. शि.मं. परांजपे स्गृती पुरस्कार यावर्षी, ठाणे वैभव दैनिकाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांना जाहीर झाला आहे. मिलिंद बल्लाळ यांनी संपादक म्हणून दैनिक ठाणे वैभवच्या माध्यमातून परखड भाष्य करत शहराच्या विविध उपक्रमांतून योगदान दिले आहे. तसेच साहित्य क्षेत्रातही त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटविलेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र संपादक परिषदेने ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांना मानाचा स्व. शि.मं. परांजपे स्गृती पुरस्कार जाहीर केला आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व महावस्र असे पुरस्काराचे स्वरुप असून शनिवारी, ४ मे २०२४ रोजी, माटूंगा कल्चरल सेंटर, माटूंगा,  मुंबई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मिलिंद बल्लाळ यांना स्व. शि.मं. परांजपे स्गृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, प्रमुख अतिथी, ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर, ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे, संपादक प्रकाश पोहरे, ज्येष्ठ साहित्यिक रविंद्र आवटी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात झी  २४ तासचे संपादक कमलेश सुतार,  सायंदैनिक संध्याकाळच्या संपादक रोहिणी खाडिलकर आदी ज्येष्ठ पत्रकारांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.

ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती

ठाणे :  १४६ ओवळा माजिवडाविधानसभा क्षेत्रातील विविध भागात मतदान नोंदणी अधिकारी आशिषकुमार बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली नोडल अधिकारी वर्षा दिक्षीत यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत स्वीप (Sveep) मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमातंर्गत शिवाई नगर मध्ये देवदया नगर रिक्षा स्टॅण्डवर रिक्षा चालक यांना मतदान करण्याकरिता प्रवृत्त करण्यात आले. तसेच सेंट मेरी हायस्कूल, वसंत विहार हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज हरिकिसन स्कूल पोखरण रोड येथे देखील जनजागृती करण्यात आली. हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून वसंतविहार येथील श्री. बंशिधरजी हनुमान ट्रस्ट येथे आलेल्या भाविकांमध्ये देखील मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. 146 ओवळा-माजिवडा प्रभाग अंतर्गत भाईंदर पूर्व नवघर रोड येथील भारतरत्न सचिन तेंडुलकर मैदान येथे क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांमध्ये तसेच Max Moxa Gym येथे सरावासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये  मतदान जनजागृती करण्यात आली व जास्तीत जास्त मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. मिरा भाईंदर महानगरपालिका, कार्यक्षेत्र अंतर्गत महिला बचत गटाच्या कार्यक्रमात उपस्थित महिलांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. लोढा पेरेडाईज व लोढा क्लब माजिवडा ठाणे येथे नोडल अधिकारी  सुनिल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या स्वीप पथकाचे श्री.कैलास शेवंते, श्री.अशोक भोये व सर्व स्वीप कर्मचारी यांनी  मतदारांमध्ये जनजागृती करण्या बाबत सर्व महिला व नागरिकांना 100% मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

उमेदवारांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे राजकीय वाहन कोंडी

कल्याण : कल्याण, डोंबिवलीत मागील काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीतील उमेदवार, त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते वाहने घेऊन शहरांमध्ये प्रचार करत आहेत. या प्रचारासाठी उमेदवार, पदाधिकाऱ्यांकडून अधिक संख्येने वाहने वापरली जात आहेत. ही वाहने कार्यक्रम स्थळी, प्रचार कार्यासाठी शहरात वाट्टेल तशी उभी करण्यात येत असल्याने कल्याण, डोंबिवलीत काही दिवसांपासून राजकीय कोंडी सुरू आहे. या राजकीय वाहनांच्या कोंडीने वाहतूक पोलीसही हैराण आहेत. कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाग आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवार आणि त्यांच्यामागे प्रचारासाठी ३० ते ४० वाहने असा ताफा दररोज शहराच्या विविध भागातून मतदार, ज्येष्ठ व्यक्तिमत्व यांच्या भेटीगाठीसाठी फिरत आहेत. ही वाहने उमेदवार, नेता ज्या ठिकाणी थांंबेल तेथे रस्त्याच्या कडेला थांंबवली जातात. उमेदवार, नेता तेथून पुढे जात नाही तोपर्यंत वाहनेही जागीच खोळंंबून राहतात. या कोंडीत मग मुख्य रस्त्यावरील प्रवासी वाहतुकीची रिक्षा, बस, खासगी वाहने अडकून पडतात. मागील काही दिवसांपासून कल्याण, भिवंडी, डोंबिवली शहरांमध्ये हे राजकीय वाहन कोंडीचे प्रकार सुरू असल्याने मतदान करू पण तुमचा वाहनांमधील प्रचार आवरा, असे नागरिक संतप्त होऊन बोलत आहेत. भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार एकावेळी ३० हून अधिक वाहने घेऊन शहरांमध्ये प्रचारासाठी फिरत आहेत. ही वाहने प्रवाशांची मोठी डोकेदुखी झाली आहे. डोंबिवलीत सोमवारी एक उमेदवार प्रचार कार्यासाठी फिरत होता. पाठीमागे २५ हून अधिक वाहने होती. ही वाहने डोंबिवली पश्चिमेत भावे सभागृहाजवळ एका ज्येष्ठ व्यक्तीला भेटण्यासाठी थांबली, त्याचवेळी पाठीमागच्या सर्व गाड्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा उभ्या करण्यात आल्या. यावेळी याभागात अर्धा तास वाहन कोंडी झाली होती. उमेदवारांनी किमान संंध्याकाळच्या वेळेत प्रचारासाठी शहरात वाहने घेऊन फिरू नये अशी प्रवाशांंची मागणी आहे. नोकरदार वर्ग या वेळेत कामावरून घरी परतत असतो. त्याचवेळी प्रचाराची वाहने रस्त्यावर आली की अर्धा ते एक तास वाहने कोंडीत अडकतात, अशा तक्रारी आहेत. आम्ही या परिस्थितीला काही करू शकत नाही. आहे त्या परिस्थितीमधून मार्ग काढून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असे एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

शुक्रवारी ठाण्याच्या काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार, २६ एप्रिल रोजी स. ९ ते शनिवार, २७ एप्रिल रोजी स. ९ वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे. या काळात ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठा सुरू राहणार आहे. या शट डाऊनच्या काळात, शुक्रवार, २६ एप्रिलला सकाळी ९ ते शुक्रवार रात्री ९ या वेळेत घोडबंदर रोड, साकेत नवीन पाईप लाईन या भागाचा पाणीपुरवठा बंद राहील. तर, शुक्रवार रात्री ९ ते शनिवार, २७ एप्रिलला सकाळी ९ या वेळेत ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, समता नगर, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळवा येथील काही भाग यांचा पाणी पुरवठा बंद राहील. या शट डाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. या काळात नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.