Category: ठाणे

Thane news

 मालमत्ता कर न भरल्यामुळे मुरबाड रोड वरील “ए ॲण्ड जी” हॉस्पिटलची ॲडमीन रुम सिल

मालमत्ता कर न भरल्यामुळे मुरबाड रोड वरील “ए ॲण्ड जी” हॉस्पिटलची ॲडमीन रुम सिल डोंबिवली महापालिकेच्या ४/जे प्रभागाची कडक कारवाई. डोंबिवली, दि. २६ फेब्रुवारी – कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोडवर असलेल्या भारत एम सूचक संचलित “ए ॲण्ड जी” मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चा मिळकत क्र. B०२०१२३३८६०१, नुसार हॉस्पिटलने मालमत्ता कराची एकूण पंचाहत्तर लाख, सत्तेचाळीस हजार, पंचवीस रुपये, (७५,४७,०२५)/- एव्हढ्या रक्कमेचा भरणा न केल्यामुळे पालिकेच्या प्रभाग ४/जे च्या सहाय्यक आयुक्त सविता हिले व त्यांच्या पथका- कडून हॉस्पीटलची ॲडमीन रुम सिल करण्याची धडक कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या प्रभागात कर वसुलीची मोहिम अधिकाधीक तीव्र करण्यात येत आहे.  कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर या पुढेही अशी कारवाई केली जाईल.  तरी महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपला कराचा भरणा विहित मुदतीत करावा असे आवाहन महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागामार्फत करण्यात येत आहे .

नोवेल साळवे यांच्या उपोषणाला कल्याण न्यायालय वकील संघटनेचा पाठींबा

नोवेल साळवे यांच्या उपोषणाला कल्याण न्यायालय वकील संघटनेचा पाठींबा कल्याण :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील जनतेच्या प्रश्नांसाठी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण करणारे नोवेल साळवे यांना कल्याण न्यायालाय वकील संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. आझाद मैदान मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांवर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज आठवा दिवस असुन या आंदोलनाला कल्याण न्यायालाय वकील संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट प्रकाश जगताप यांनी त्यांच्या सहकारी वकिलांसोबत आझाद मैदान मुंबई येथे येऊन वकील संघटनेच्या वतीने नोवेल साळवे यांना जाहीर पाठिंबा दिले आहे.

 कल्याण डोंबिवलीत नोटरी करारावरील घरांचा कर नवीन मालकाच्या नावे करा

कल्याण डोंबिवलीत नोटरी करारावरील घरांचा कर नवीन मालकाच्या नावे करा भाजप नगरसेवक दिपेश म्हात्रे यांची आयुक्तांकडे मागणी कल्याण : कल्याण डोंबिवली नोटरी करारावर विक्री झालेल्या घरांचा मालमत्ता कर नवीन मालकाच्या नावे हस्तांतरित होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढत असल्याचा मुद्दा पुढे करत भाजप नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी केडीएमसी प्रशासनाकडे ठोस भूमिका घेण्याची मागणी केली आहे. नोटरी करारावर अनेक घरे विकली गेल्यानंतरही त्या मालमत्तांचा कर जुन्या मालकाच्या नावावरच राहतो. परिणामी कर वसुलीत अडथळे निर्माण होत असून कोट्यवधी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम होत असल्याचे म्हात्रे यांनी नमूद केले. यासंदर्भात त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. नोटरी कराराच्या आधारे मालमत्ता विक्री झालेल्या प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीनंतर नवीन मालकाच्या नावे कर हस्तांतरण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

  पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन करा

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन करा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे प्रशासनाला निर्देश ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामाचा आढावा आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई मार्च अखेरीसपासून हाती घेऊन मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले. महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या या बैठकीस घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत शहरातील रस्ते साफसफाई, कचरा हस्तांतरण केंद्र, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची स्थिती, बांधकाम व पाडकाम कचऱ्याची प्रक्रिया तसेच ‘स्वच्छ ठाणे व्हिजन’ या उपक्रमाची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. शहरातील काही प्रभागांमध्ये सार्वजनिक शौचालयांची नियमित साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी येत असल्याचे निदर्शनास आणून देत महापौरांनी याकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले. शौचालयांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असावे, पाण्याच्या टाक्या रिकाम्या झाल्यावर तत्काळ भरल्या जाव्यात, तसेच दरवाज्यांचे कडी-कोयंडे सुस्थितीत ठेवावेत, यासाठी संबंधित स्वच्छता निरीक्षकांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरी भागात ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात असला तरी झोपडपट्टी भागात हे प्रमाण कमी असल्याचे महापौरांनी नमूद केले. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात दोन सत्रांत रस्त्यांची साफसफाई केली जाते. यासाठी १६५६ सफाई कर्मचारी कार्यरत असून ६ वाहनांच्या माध्यमातून यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता केली जाते. तसेच ओला कचरा प्रकल्प, सुका कचरा प्रकल्प, पूर्वप्रक्रिया केंद्रे आणि बांधकाम व पाडकाम कचऱ्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेची माहितीही यावेळी देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शहरात सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रभागांतील अंतर्गत रस्त्यांची नियमित साफसफाई करावी आणि सर्व प्रभागांमध्ये व्यापक नियोजन करावे, अशा सूचनाही महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी या बैठकीत दिल्या.

जनगणनाविषयक तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीरास उत्साहात प्रारंभ

जनगणनाविषयक तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीरास उत्साहात प्रारंभ अशोक गायकवाड नवी मुंबई : विकासाची ध्येय- रणे ठरविण्यासाठी जनगणनेद्वारे प्राप्त होणारी माहिती अत्यंत महत्वाची असून हे काम काळजीपूर्वक व बिनचूक करावे असे महापालिका…

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची शहापूरात स्थापना

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची शहापूरात स्थापना ठाणे :  महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ११६०१ अर्थात ४३४० च्या शहापूर तालुका अध्यक्ष पदावर लक्ष्मण महाळुंगे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.तर उपाध्यक्षपदी माधुरी राठोड, सचिव पदावर संजय पोंढेकर,यांची निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्ष महेश बागराव व शशिकांत सपाट, खजिनदार पुनम भेरे,सहसचिव रविंद्र पवार, प्रसिद्धी प्रमुख  निलेश विशे, संपर्क प्रमुख पद्माकर राठोड व विकास मेतकर, सल्लागार रमेश लोभी,चित्रा जगताप व अलका चव्हाण,संघटक सदानंद सोनारे, यांची निवड करण्यात आली.शहापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बी.एच.राठोड महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियनचे जिल्हा अध्यक्ष गजानन विशे तसेच सहायक.प्रशासन अधिकारी अजय भोंडिवले यांच्या अध्यक्षेतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली शहापूर पंचायत समितीच्या या नव्या  कार्यकारणीची निवड ही सर्वानुमते करण्यात आली आहे.यावेळी मोठ्या संख्येने पंचायत समिती शहापूरचे कर्मचारी उपस्थित होते.कर्मचा-यांच्या वेतनत्रुटी तसेच पदोन्नती स्तर कमी करणेकरिता जिल्हा तसेच राज्य स्तरावर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या माध्यमातून पाठपुरावा करुन कर्मचाऱ्यांचे हे जिव्हाळयाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष लक्ष्मण महाळुंगे यांनी सांगितले कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन केले जात आहे.

ठामपाच्यावतीने जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेचे प्राचीनत्व’ या विषयावर व्याख्यान

ठामपाच्यावतीने जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेचे प्राचीनत्व’ या विषयावर व्याख्यान अनिल ठाणेकर ठाणे : जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आणि ऐतिहासिक वारशाचा गौरव करण्यासाठी ‘मराठी भाषेचे प्राचीनत्व’ (मराठी भाषेच्या जन्मापासून आजवरची स्थित्यंतरे) या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार श्रीकांत बोजेवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन शुक्रवार २७ फेब्रुवारीला करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ४ वाजता महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे होणार आहे. या कार्यक्रमास महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उमेश बिरारी उपस्थित राहणार आहेत. मराठी भाषेची उत्पत्ती, तिची प्राचीन मुळे, संत साहित्याची परंपरा, शिवकालीन आणि पेशवेकालीन काळातील भाषेची भूमिका, तसेच आधुनिक काळातील मराठी भाषेचे बदलते स्वरूप यांचा सखोल आढावा ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत बोजेवार हे  आपल्या व्याख्यानातून घेणार आहेत.मराठी भाषेचा उगम, तिचे संस्कृत आणि प्राकृत भाषांशी असलेले नाते, विविध शिलालेख आणि ऐतिहासिक दस्तऐवजांतील उल्लेख, तसेच ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांच्या साहित्यामुळे भाषेला लाभलेले वैभव यावरही ते प्रकाश टाकणार आहेत. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून संस्कृती, परंपरा आणि अस्मितेची वाहक आहे, हा संदेश या व्याख्यानातून अधोरेखित होणार आहे.जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि प्रसार यासाठी समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी, साहित्यप्रेमींनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

 एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा – प्रताप सरनाईक

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा – प्रताप सरनाईक २१० कोटी रुपयांपैकी १०० कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध! अनिल ठाणेकर ठाणे : राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर अखेर समाधानाची झळाळी उमटली आहे. वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होताच, दिलेला शब्द पाळणाऱ्या परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वासाची मोहर उमटली. मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने चर्चा करत २१० कोटी रुपयांची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आणि त्यापैकी १०० कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध झाला. एसटी महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणे कठीण झाले असताना शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली. परिणामी, फेब्रुवारी महिन्याच्या  थकीत वेतन वाढीचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला. हा केवळ आर्थिक दिलासा नसून, तो शासनाच्या संवेदनशीलतेचा आणि बांधिलकीचा प्रत्यय आहे. असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने कामगार संघटनांच्या बैठकीत दरमहा सुमारे ६५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार डिसेंबरपासून थकीत हप्त्यांची प्रक्रिया सुरू झाली. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीत निधीअभावी हप्ता देणे अशक्य झाले आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची लाट उसळली.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने चर्चा करत २१० कोटी रुपयांची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आणि त्यापैकी १०० कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध झाला. उर्वरित रक्कमही लवकरच प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.२४ फेब्रुवारी रोजी सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनवाढीचा हप्ता जमा होताच, नाराजीचे ढग दूर झाले आणि विश्वासाचा सूर्य पुन्हा तेजाने उगवला. “दिलेला शब्द पाळला,” अशी भावना व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांचे मनापासून आभार मानले.

 डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा

डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा भाजप नगरसेविका रंजना पेणकर यांची महापौर, उपमहापौर, आयुक्तांकडे मागणी कल्याण: डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशन परिसरातील वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येमुळे नागरिकांना होत असलेला त्रास, वाहतुकीची अडचण तसेच सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन भाजप नगरसेविका रंजना पेणकर यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षली चोधरी, उपमहापौर राहुल दामले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. नागरिकांकडून प्राप्त झालेली निवेदने, स्थानिक रहिवाशांच्या मागण्या व सार्वजनिक हिताचा विचार करून हा परिसर फेरीवाला मुक्त करण्याची तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व निर्बाध पादचारी मार्ग उपलब्ध व्हावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा येणाऱ्या काळात नागरिकांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा नगरसेविका रंजना पेणकर आणि मितेश पेणकर यांनी दिला आहे.

अभिनव महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

अभिनव महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिरा – भाईंदर: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा’ या उपक्रमांतर्गत आयोजित महाविद्यालयीन…