Category: ठाणे

Thane news

आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये पनवेल शहरातील खेळाडूंची १३ पदकांची कमाई

आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये पनवेल शहरातील खेळाडूंची १३ पदकांची कमाई ठाणे: नवी दिल्ली येथे वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशन, स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया तसेच जेके टायर यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित वाको इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग २०२६ च्या स्पर्धेत पनवेल येथील खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना‌‌ ४ सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ कास्य अशी एकुण १३ पदकांची कमाई केली. के.डी जाधव इनडोअर इंदिरा गांधी स्टेडियम येथें स्पर्धा  आयोजित करण्यात आली होती. भारतीय संघामध्ये पनवेल शहरांमधील १० खेळाडूंची निवड करण्यात आली होती तसेच संपूर्ण महाराष्ट्र मधून ९१ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता पॅलेस्टाईन, उझबेकिस्तान, इराक, इटली, कझाकिस्तान, स्विझर्लंड, नेपाळ, युरोप यांच्यासहित २५ देशातील खेळाडूंचा समावेश ‌स्पर्धेत होता. पनवेलच्या अर्णव इंगोलेने २ सुवर्ण पदके मिळवली तर अन्वी निकम, काव्य सेजलला प्रत्येकी एक सुवर्ण पदक मिळाले. रोनल पाटीलने २ रौप्य पदकांची कमाई केली. शुभम पवार, सानिया शेखला देखील रौप्य पदक मिळाले. श्रेया कुडलकरने २ कांस्य पदक पटकावली तर प्रणव लब्दे, शुभम पवार, आर्यन शिवतरकर यांनी प्रत्येकी एक कांस्य पदक मिळवले. पदक विजेत्या खेळाडूंना पनवेल शहर किकबॉक्सिंगचे अध्यक्ष परेश ठाकूर, सचिव मंदार पनवेलकर, कार्याध्यक्ष व सीनियर प्रशिक्षक निलेश भोसले, प्रशिक्षक योगेश बैकर, रोहित थळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

नवी मुंबई महानगरपालिकेत १२ परिवहन सदस्य नेमणूक

नवी मुंबई महानगरपालिकेत १२ परिवहन सदस्य नेमणूक महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २५(२) अन्वये, प्रशासनाचा किंवा परिवहनचा अनुभव असलेल्या तसेच अभियांत्रिकी, औद्योगिक, वाणिज्यिक, वित्तीय किंवा कामगार विषयक बाबतीत ज्यांची क्षमता दिसून आली असेल तसेच जे पालिका सदस्य असतील वा नसतील अशा व्यक्तींमधून परिवहन समितीवरचे सदस्य म्हणून १२ व्यक्तींची नेमणूक करण्याचा प्रस्ताव आज महासभेच्या पटलावर घेण्यात आला. या १० परिवहन सदस्यांमध्ये राहुल चंद्रकांत शिंदे, राजेश हौसला राय ,विकास कुंडलिक झंझाड, शितल श्रीपत भोईर, रोशन रामचंद्र पाटील, राजश्री नारायण कातकरी, विनोद तुळशिराम म्हात्रे, यशपाल सिद्राम ओव्हाळ, कुणाल प्रकाश महाडिक, हनुमंत कोंडीबा रोडे, अभिजीत प्रकाश पेडणेकर, तिर्था मारूती सकपाळ आदी मान्यवरांची निवड झाली असून त्यांचे महापौर सुजाता पाटील, उपमहापौरदशरथ भगत आणि आयुक्त डॉ.कैलाश शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

हिंद दी चादर” गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त ठाण्यात समूहगान कार्यक्रम

हिंद दी चादर” गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त ठाण्यात समूहगान कार्यक्रम अनिल ठाणेकर ठाणे,– “हिंद दी चादर” म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त  २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमांच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पाचपाखाडी, ठाणे येथे  २३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता विशेष समूहगान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गुरु तेग बहादूर यांच्या जीवनकार्यावर आधारित सादर केलेले प्रेरणादायी गीत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या सहभागातून सामूहिकरित्या गायन करण्यात आले. समूहगानातून गुरु तेग बहादूर यांच्या बलिदान, धर्मस्वातंत्र्य व मानवतेच्या मूल्यांची आठवण उपस्थितांना करून देण्यात आली.या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, प्रकल्प संचालक (स्वच्छ भारत मिशन) पंडित राठोड, उपशिक्षणाधिकारी (योजना) शुभांगी बढे, विस्तार अधिकारी (शिक्षण) आशिष झुंझारराव, जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे तसेच मुख्याध्यापिका मानसी मिलिंद ढवळीकर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची माहिती नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचते, असे मत व्यक्त केले.तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये “हिंद दी चादर” गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त समूहगान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी वर्गाने विविध शाळांना भेट देऊन या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला व विद्यार्थ्यांना प्रेरित केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदविला. देशभक्ती, त्याग व मानवतेचा संदेश देणाऱ्या या समूहगान उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. आगामी २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी होणाऱ्याषका मुख्य शहीदी समागम कार्यक्रमासाठी या उपक्रमातून सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

 मिरा -भाईंदर, वसई – विरार पोलीस आयुकत्तालयाची एकूण ८७९ पदांसाठी पोलीस भरती

मिरा -भाईंदर, वसई – विरार पोलीस आयुकत्तालयाची एकूण ८७९ पदांसाठी पोलीस भरती मिरा – भाईंदर सुभाषचंद्र मैदान,  भाईंदर येथे पोलिस आयुक्तालयाची मोठ्या उत्साहात आणि कडक देखरेखीखाली २०२४-२५ ची पोलिस कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ८७९ रिक्त पदांसाठी या भरतीसाठी एकूण ५७९९० अर्ज प्राप्त झाले आहेत, ज्यामुळे स्पर्धा अत्यंत कठीण झाली आहे. या भरतीत ८४० पोलिस कॉन्स्टेबल आणि ३९ ड्रायव्हर पदे भरली जाणार आहेत.  २५ मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेत रोज २५०० उमेदवारांची चाचण्या घेतल्या जाणार आहेत.  १०० मीटर आणि १६०० मीटर आणि गोळफेक अश्या तीन ५० मार्कांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओग्राफी केली जात आहे, ज्यासाठी ६९ कॅमेऱ्यांची टीम तैनात करण्यात आली आहे. मैदानाबाहेर सुरळीत वाहतूक राखण्यासाठी विशेष पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. कोणत्याही अनियमिततेसाठी कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सुभाषचंद्र बोस मैदानात होणाऱ्या या भरतीत डॉक्टर, परिचारिका आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसह एक वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. उमेदवारांसाठी मोफत पिण्याचे पाणी आणि बिस्किटे दिली जातात आणि तक्रार निवारण कक्षाची स्थापना देखील करण्यात आली आहे.

आरोग्य केंद्रातील कॅन्टीन इमरती वापराविना पडून

आरोग्य केंद्रातील कॅन्टीन इमरती वापराविना पडून ठाणे: प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या कॅन्टीन इमारती अनेक वर्षे कुलूप बंद अवस्थेत वापराविना पडून आहेत.या कॅन्टीन इमारती भाडे तत्वावर देण्याच्या निविदेअभावी धूळ खात पडून आहेत. आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने ही कॅन्टीन योजना फोल ठरल्याचे दिसून येत आहे.  प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील गाव पाड्यातील गोरगरीब आदिवासी रुग्णांना स्वस्तात चहा,नाष्टा उपलब्ध व्हावा तसेच शासनालाही भाडे मिळेल या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत सन २०१४ ते २०१५ दरम्यान प्रत्येकी १० लाख रुपये खर्च करून जिल्ह्यातील ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाच्या नाविन्य पूर्ण योजनेतून लाखो रुपये खर्च करून कॅन्टीनसाठी इमारती उभारल्या आहेत.शहापूर तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांना याचा लाभ झाला आहे.कॅन्टीनसाठी उभारलेल्या या इमारतींना दहा वर्ष होऊनही शासनाकडून या कॅन्टीन भाडे तत्वावर देण्यासाठीच्या निविदाच आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आल्या नसल्याने प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे शासनाची ही योजना फोल ठरल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.

 सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पळस फुलांचे अनोखे सौंदर्य

 सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पळस फुलांचे अनोखे सौंदर्य  शहापूरच्या वनराईत निसर्गाची लालसर उधळण – अविनाश उबाळे, ठाणे फेब्रुवारीच्या कडक उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच सह्याद्री पर्वतरांग मध्ये पळस फुलांच्या गडद लाल रंगांनी निसर्ग अक्षरशः बहरून गेला आहे.…

महाराष्ट्र अंनिसच्या बुकस्टॉलला ठाणेकरांचा भरभरून प्रतिसाद

विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळाव्यातील महाराष्ट्र अंनिसच्या बुकस्टॉलला ठाणेकरांचा भरभरून प्रतिसाद अनिल ठाणेकर ठाणे: जिल्हा न्याय प्राधिकरण आयोजित विधिसेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्यातील ठाणे महाविद्यालयाच्या प्रांगणातील, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती-ठाणे शहर शाखेच्या बुकस्टॉलला ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. याप्रसंगी महाराष्ट्र अंनिस राज्य प्रकाशन विभाग कार्यवाह प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंढे, राज्य कायदे विभाग पदाधिकारी ॲड तृप्ती पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.सुषमा बसवंत, ठाणे शहर प्रधान सचिव अशोक मोहिते, पुस्तक प्रकाशन व वितरण विभाग कार्यवाह प्रमोद तामसे यांनी सहभाग नोंदविला. दिवसभर अगदी सकाळी १० पासूनच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती-ठाणे शहर शाखेच्या या बुकस्टॉलला विविध जनसमुह भेट देत होते. हळूहू ही गर्दी वाढतच होती. महा अंनिसचे कार्यकर्ते प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंढे यांनी, पैशांचा पाऊस पाडणे, नारळात कपड्यांचे तुकडे दाखवणे, मनातले आकडे ओळखणे, लिंबूमधून दोरा फिरवल्यास दोऱ्याचा रंग बदलणे, नाकातून दूध टाकून कानातून काढणे, तांदळाचा चंबू मंत्राचा साहाय्याने उचलणे आदी चमत्काराच्या प्रयोगातून उपस्थितांचे प्रबोधन केले. लोकांनी यावेळी मोठ्यासंख्येने पुस्तक विक्री केली.ज्येष्ठ साहित्यिक यशवंत बैसाने यांनीही अनिसच्या या बुकस्टॉलला भेट दिली. जिल्हा न्यायाधीशांनी महा. अंनिसच्या सहभागाबद्दल प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.

 एसएसटी महाविद्यालयात गुरु तेग बहादूरजींच्या शहिदी समागम निमित्त सामूहिक गीत गायन उत्साहात

एसएसटी महाविद्यालयात गुरु तेग बहादूरजींच्या शहिदी समागम निमित्त सामूहिक गीत गायन उत्साहात ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’कडून दखल कल्याण- शिखांचे नववे गुरू “हिंद दी चादर”  परमपूज्य गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त २३ फेब्रुवारी रोजी आयोजित सामूहिक गीत गायन उपक्रमाची ‘ बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस’ कडून विशेष दखल घेतली जाणार असून, या ऐतिहासिक उपक्रमात एस.एस.टी. कला व वाणिज्य महाविद्यालयाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात एनएसएस सह महाविद्यालयाच्या सर्व विभागांतील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. गुरु तेग बहादूरजींच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी गीताचे सामूहिक सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि बलिदानाची परंपरा जपण्याचा संदेश दिला. कोकण विभागातील सुमारे २० हजार शैक्षणिक संस्था, ५१ लाख विद्यार्थी आणि १.५ लाख शिक्षक-कर्मचारी एकाच वेळी सहभागी झाल्याने हा उपक्रम वैश्विक स्तरावर नोंद घेण्याजोगा ठरला आहे. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा ठाणे जिल्हा एनएसएस समन्वयक प्रा. जीवन विचारे यांनी गुरू तेग बहादुर यांच्या शौर्य आणि त्यागाचे स्मरण करून राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे आवाहन केले. उपप्राचार्य डॉ.दीपक गवादे, उपप्राचार्य डॉ. संतोष करमानी, सर्व विभाग प्रमुख आणि प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.

महापालिका शाळेच्या व्यासपीठावरुन संवाद साधण्याचा आनंद वेगळाच –  दत्तू मोरे

महापालिका शाळेच्या व्यासपीठावरुन संवाद साधण्याचा आनंद वेगळाच –  दत्तू मोरे अनिल ठाणेकर ठाणे- ‘स्वत: ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. १११ चा माजी विद्यार्थी असून शाळेत असताना याच मंचावरुन मला प्रथम क्रमाकांचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. शाळेच्या मंचावरुन सुरू झालेला हा प्रवास आज हास्यजत्राच्या मंचापर्यत पोहचला आहे, त्यामुळे आज शाळेच्या व्यासपीठावरुन संवाद साधताना एक वेगळाच आनंद वाटत आहे’, असं हास्यजत्रा फेम अभिनेता दत्तू मोरे यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेता म्हणून ओळख मिळेपर्यंत कसा झाला, याचा प्रेरणादायी प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आयोजित मध्यवर्ती सांस्कृ तिक महोत्सव २०२५-२०२६ हा आज दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी गडकरी रंगायतन येथे उत्साहात व जल्लोषात पार पडला. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपआयुक्त उमेश बिरारी, उपआयुक्त (शिक्षण) मिताली संचेती, नगरसेवक मनोहर डुंबरे, शिक्षणाधिकारी शेषराव बडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण, दीपप्रज्वलन व नटराज पूजनाने झाली.  या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये एकूण १०२ शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. इयत्ता १ ली ते ५ वी नृत्य विभाग, इयत्ता ६ वी ते ८ वी नृत्य विभाग तसेच इयत्ता १ ली ते ८ वी नाट्य विभाग अशा विभागनिहाय स्पर्धा दि. २३ व २४ डिसेंबर रोजी पार पडल्या होत्या. इयत्ता १ ली ते ५ वी नृत्य विभाग: शाळा क्र. ५३ – प्रथम क्रमांक, इयत्ता ६ वी ते ८ वी नृत्य विभाग: शाळा क्र. ५९ – प्रथम क्रमांक, नाट्य विभाग: शाळा क्र. ११ – प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून त्यांच्या कलागुणांना उत्तेजन देणारे मनोगत व्यक्त केले. मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सव समितीच्या अध्यक्षा सविता चौधरी, उपकार्याध्यक्षा नीलिमा पाटील, चिटणीस वर्षा मटकर, सहचिटणीस आशा पाटे, युआरसी प्रमुख रविंद्र पाटील, मुश्ताक पठाण व इतर पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी शेषराव बडे व गटाधिकारी संगीता बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. तसेच ठाणे जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष सुनील फापाळे, ठाणे मनपा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाबाजी फापाळे, ठाणे जिल्हा शिक्षक पतपेढीचे संचालक जगन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पाटील व वनिता जाधव यांनी प्रभावीपणे केले.एकूणच उत्साह, जल्लोष आणि आनंदाने ओतप्रोत भरलेला हा मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सव विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.खांचे नववे गुरु, “हिंद दी चादर” परमपूज्य गुरु तेग बहादूर यांच्या जीवनावर आधारित भक्तिगीताचे समूहगान सादर करण्यात आले. मनपा शाळा क्र. १३ व ४१ च्या विद्यार्थिनींनी सुरेल ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून वातावरण भक्तिमय केले.

ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहनेतेपदी हणमंत जगदाळे तर विरोधी पक्ष नेतेपदी अशरफ शानू पठाण

ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहनेतेपदी हणमंत जगदाळे तर विरोधी पक्ष नेतेपदी अशरफ शानू पठाण अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहनेतेपदी शिवसेनेचे हणमंत जगदाळे तर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते अशरफ ऊ शानू पठाण यांची निवड झाल्याची घोषणा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नुकत्याच झालेल्या महासभेत केली. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते. महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी सभागृह नेते हणमंत जगदाळे व विरोधी पक्ष नेते अशरफ ऊ शानू पठाण यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसेना पक्षाचे गटनेते पवन कदम, भारतीय जनता पार्टीचे गटनेते मुकेश मोकाशी, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे गटनेते नजीब मुल्ला, एमआयएमचे सरफराज खान ऊर्फ सैफ पठान यांचेही पुष्पगुच्छ देवून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अभिनंदन केले.