Category: ठाणे

Thane news

ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासासाठी डिजिटल ओळखपत्रासाठी अर्ज स्वीकृतीला सुरुवात

ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासासाठी डिजिटल ओळखपत्रासाठी अर्ज स्वीकृतीला सुरुवात ठाणे : ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसमधून ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी डिजिटल ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी नमुना अर्ज वितरित करून तो भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. सध्या ठाणे स्थानक, कोपरी आगार, आनंदनगर व वागळे आगार येथे अर्ज स्वीकृती सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता शनिवार, ७ फेब्रुवारीपासून वृंदावन सोसायटी, लोकमान्यनगर टर्मिनस, पवारनगर टर्मिनस व धर्मवीर चौक येथेही अर्ज स्वीकृती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्रांवर सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार असून नागरिकांनी नमुना अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. डिजिटल ओळखपत्रानुसार सदर योजना १ मार्च २०२६ पासून सुरू करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, ओळखपत्रासाठी आलेल्या अर्जांचा विचार करून सर्व अर्जदार ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र मिळेपर्यंत जुन्या पद्धतीप्रमाणे मोफत प्रवासाची सवलत सुरू राहणार आहे याची नोंद ज्येष्ठ नागरिकांनी घेवून परिवहन सेवेचे सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

केडीएमसीची रुग्णालये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ यांना संलग्नित करणार

केडीएमसीची रुग्णालये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ यांना संलग्नित करणार कल्याण: अंबरनाथ येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबरनाथ जिल्हा ठाणे यांनी त्यांच्याकडील विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष रुग्णालयीन अनुभव मिळण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची बाई रुमिणीबाई रुग्णालय, कल्याण (प.), शक्तीधाम रुग्णालय, कल्याण (पू.) व गौरीपाडा रुग्णालय, कल्याण (प.) ही रुग्णालये तात्पुरत्या स्वरुपात किमान सात वर्षांसाठी किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतःची स्वतंत्र ईमारत निर्माण होईल यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत सामंजस्य कराराद्वारे वापरण्याकरिता हस्तांतरण करण्यासाठी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबरनाथ जिल्हा ठाणे यांनी विनंती केली आहे. त्या अनुषंगाने वरीलप्रमाणे रुग्णालये सामंजस्य कराराद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना संलग्नित करुन देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात येत आहे. प्रथमतः बाई रुक्मिणीबाई रुग्णालय येथे आयसीयू करणे व अत्यावश्यक सेवा सुरू करण्यासाठी बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण (प.) हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबरनाथ यांचेमार्फत ताब्यात घेऊन आयसीयू व अत्यावश्यक सेवा तात्काळ कार्यान्वित करण्यात येईल. तद्नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबरनाथ यांच्या  आस्थापनेवर आवश्यक अध्यापकीय तसेच तांत्रिक व अतांत्रिक अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध झाल्यानंतर गौरीपाडा रुग्णालय करिता असलेली इमारत ताब्यात घेऊन Gynaecology & Paediatrics Department कार्यान्वित करण्यात येतील. सर्वात शेवटी शक्तिधाम रुग्णाल, कल्याण (पू.) येथील ईमारतीचे आरक्षण बदल झाल्यानंतर सदर रुग्णालय ताब्यात घेऊन तेथे इतर विभाग कार्यान्वित करण्यात येतील. हि रुग्णालये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ यांच्याशी संलग्नित झाल्यावर महाविद्यालयामार्फत तज्ञ वैद्यकीय अधिकारी व इतर मनुष्यबळ उपलब्ध होणार असून त्यांचेमार्फत प्रगत वैद्यकीय सुविधा, विशेषज्ञ सेवा व अतिदक्षता विभागाची सुविधा कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत. हा प्रस्ताव राज्य शासनाच्या मान्यतेसाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून पाठविण्यात येणार असून शासनाची मान्यता प्राप्त झाल्यास याबाबतची प्रत्यक्ष कार्यवाही नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर व आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात येईल

 आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व अधिकारी समन्वेत महापौर, उपमहापौर यांची भेट घेत केले अभिनंदन

आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व अधिकारी समन्वेत महापौर, उपमहापौर यांची भेट घेत केले अभिनंदन महापौर व उपमहापौर निवडणूकीनंतर आज महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व विभागप्रमुख व अधिकारी यांच्यासह महापौर श्रीम.सुजाता पाटील व उपमहापौर श्री.दशरथ भगत यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी सर्व अधिका-यांनी ओळख करुन दिली व आपल्याकडे असलेल्या विभागांची दिली. याप्रसंगी  विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने नागरिकांना अपेक्षित असलेले शहर विकासाचे काम करुया असे महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी प्रतिपादन केले.

 केडीएमसी महापौरांनी अधिकाऱ्यांसमवेत केली महापौर निवासाची पाहणी

केडीएमसी महापौरांनी अधिकाऱ्यांसमवेत केली महापौर निवासाची पाहणी केडीएमसी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे करदात्या नागरिकांच्या पैशांचा चुराडा कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीनंतर महापौरांची निवड देखील झाली आहे. मात्र महापौरांसाठी महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या महापौर निवासस्थानाची दुरावस्था झाली आहे. गेली कित्येक वर्षे हा बंगला बंद असल्याने वाळवी लागली आहे. या महापौर निवासस्थानाची आज केडीएमसी  महापौर हर्षाली चौधरी थविल यांनी शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त शहर अभियंता जगदीश कोरे, प्रशांत भागवत, शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे यांच्यासह पाहणी केली. कल्याण पश्चिमेतील आधारवाडी जेल परिसरात २०१० साली जनतेचे लाखो रुपये खर्च करून हे महापौर निवासस्थान बांधण्यात आले होते. मात्र, या निवासस्थानाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने तसेच इतर वादामुळे हे निवासस्थान सुरुवातीपासूनच चर्चेत राहिले. बांधकामानंतर अनेक वर्षे हा बंगला वापराविना ओस पडून होता. यानंतर पुन्हा लाखो रुपये खर्च करून बंगल्याची डागडुजी करण्यात आली. मात्र, तत्कालीन महापौरांनी केवळ बंगल्याची पूजा करून त्यामध्ये वास्तव न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा हा बंगला वापरात आला नाही. कोरोना काळापासून तर हा बंगला पूर्णपणे बंद अवस्थेत असून, देखभालीअभावी त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. सध्या बंगल्यातील संपूर्ण लाकडी फर्निचर खराब झाले असून, अनेक ठिकाणी वाळवीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. नियमित देखभाल व संरक्षण न केल्यामुळे महापौर निवासस्थानाची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे. केडीएमसी प्रशासनाने या बंगल्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा दुरुस्तीसाठी जनतेच्या लाखो रुपयांची उधळपट्टी होणार आहे. या या निवासस्थानाची पाहणी करण्यात येऊन लवकरच या निवासाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे शहर अभियंता अनिता परदेशी यांनी सांगितले. दरम्यान महापौर हर्षाली चौधरी थविल या सद्ध्या मोहने येथे भाड्याच्या घरात राहत असून, महापौर निवासस्थानाची डागडुजी लवकर झाल्यास कल्याणमध्ये महापौर निवासस्थानी राहून नागरिकांच्या कामासाठी जास्तीत जास्त वेळ देता येईल.

धक्कादायक ! ठाणे पोलिसच आरोपीच्या पिंजऱ्यात ?

धक्कादायक ! ठाणे पोलिसच आरोपीच्या पिंजऱ्यात ? साकेत येथील कांदळवनांचा ह्रास व पाणथळ क्षेत्रातील भरणी प्रकरण भोवणार ठाणे : ठाण्यातील रुस्तमजी गृहप्रकल्पाच्या येथून साकेत पोलीस ग्राउंडच्या बाजूने तसेच राबोडी स्थित आकाशगंगा…

एकताच्या शोर्मा स्टॉलला डोंबिवलीत ‘मनसे’ साथ

एकताच्या शोर्मा स्टॉलला डोंबिवलीत ‘मनसे’ साथ डोंबिवली : डोंबिवली स्थानकाजवळ शोर्मा चिकन रोल विक्री करणाऱ्या मराठी तरुणी एकता सावंतचा स्टॉल महापालिकेच्या कारवाईत काही दिवसांपूर्वी हटवण्यात आला होता. यावर तिने सोशल मीडीयावर आवाज उठवल्यावर मनसे…

कल्याणामध्ये रंगणार ‘हिंदुहृदयसम्राट श्री २०२६’  शरीरसौष्ठव स्पर्धा

कल्याणामध्ये रंगणार ‘हिंदुहृदयसम्राट श्री २०२६’  शरीरसौष्ठव स्पर्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विजय साळवी यांच्या आयोजनाखाली होणार भव्यदिव्य स्पर्धा कल्याण : हिंदुस्तानातील तमाम हिंदुप्रेमी नागरिकांचे आराध्य दैवत असणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष असून यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण शहर शिवसेना शाखेने शरीर सौष्ठव स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन केले आहे. या स्पर्धेत कोण होणार ‘हिंदुहृदयसम्राट श्री २०२६’ चा मानकरी हे पाहणे मात्र उत्सुकतेचे ठरणार आहे. शिवसेना उपनेते विजय साळवी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण शहर शाखा यांच्या वतीने “हिंदुहृदयसम्राट श्री २०२६’ ही शरीरसौष्ठव स्पर्धा शुक्रवार ६ फेब्रुवारीला  सायंकाळी ६ वाजता कल्याणमधील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण (मॅक्सी ग्राउंड) संतोषी माता मंदिर रोड, कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेस ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनची मान्यता आहे. या स्पर्धेला कल्याणकर क्रीडाप्रेमींनी व खेळाडूंनी तसेच निष्ठावंत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, कल्याण पश्चिम व मुरबाड जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, कल्याण पश्चिम शहरप्रमुख बाळा परब, कल्याण पश्चिम विधानसभा संघटक किशोर शुक्ला आदींनी केले आहे.

ध्यानधारणेबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

ध्यानधारणेबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कल्याण : विद्यार्थ्यांना ध्यानाच्या माध्यमातून एकाग्रता वाढवणे, स्मरणशक्ती सुधारणा तसेच मोबाईलचा अतिरेक सोशल मीडिया, टेलिव्हिजनमुळे एकाग्रता भंग होणे, मानसिक आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी व ताण-तणाव नियंत्रण याबाबत ध्यानधारणा क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक व सर्च विदिन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल काजरोळकर यांनी मार्गदर्शन केले. लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त प्रवीण काजरोळकर व विश्वस्त लता परब, कैलास रेडीज यांच्या पुढाकाराने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, परळी, वाडा, जिल्हा–पालघर येथे विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय ध्यान (मेडिटेशन) शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विलास बंजारा यांनी सर्च विदिन फाउंडेशनचे कोकण विभाग समन्वयक संजय हुंबरे तसेच शाळेतील शिक्षकवर्ग व इतर कर्मचारी यांचे आभार मानले.

केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांना शिवसेना नगरसेवकांनी झापले

केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांना शिवसेना नगरसेवकांनी झापले कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. यावेळी आयोजित  महासभेत शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना झापले. महापालिकेची पहिली महासभा ही आज पार पडली. ती खऱ्या अर्थाने गाजली, या महासभेत शिवसेना नगरसेवक मल्लिक शेट्टी यांनी आक्रमक भूमीका घेतली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना झापले. या महासभेत तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही,  बोलू नका, नाहीतर बाहेर पडा असा दम त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. अधिकाऱ्यांना खूप माज आलाय असं ही ते म्हणाले.  महापौर निवडीनंतर भाषणा दरम्यान अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि मल्लेश शेट्टी यांच्यामध्ये वाद पहायला मिळाला.

दिवा स्टेशन ते पडले बीएसयुपी व डोंबिवली मार्गावरील बस फेऱ्या वाढवण्याची मनसेची मागणी

दिवा स्टेशन ते पडले बीएसयुपी व डोंबिवली मार्गावरील बस फेऱ्या वाढवण्याची मनसेची मागणी आरती परब दिवा : दिवा रेल्वे स्टेशन ते पडले बीएसयुपी तसेच दिवा स्टेशन ते डोंबिवली या मार्गांवरील ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बसची संख्या व फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मनसे दिवा शहराचे सचिव प्रशांत प्रभाकर गावडे यांनी ठाणे महानगर पालिकेच्या वाहतूक व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. दिवा रेल्वे स्टेशनजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पडले बीएसयुपी व डोंबिवली या मार्गांवर परिवहन सेवेच्या बसेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही सध्या या मार्गांवरील बसची संख्या अपुरी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दिवा स्टेशन ते पडले बीएसयुपी या मार्गावर केवळ दोन बसेस असून त्यामधून फक्त सहा फेऱ्या होत असल्याने दोन फेऱ्यांमधील अंतर एक ते दीड तासांपर्यंत जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच दिवा स्टेशन ते डोंबिवली या मार्गावरही फक्त दोन बसेस असल्याने फेऱ्यांमधील अंतर मोठे असून अनेक वेळा ऐनवेळी बस रद्द केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. विशेषतः रविवारी अचानक बस फेऱ्या रद्द केल्या जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत असून याबाबत प्रवाशांना कोणतेही स्पष्ट उत्तर मिळत नसल्याने प्रशासनाबाबत नाराजी वाढत असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले आहे. दिवा शहर व परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत असून अनेक नागरिक डोंबिवली एमआयडीसी, खिडकाळी आदी भागात जाण्यासाठी या परिवहन सेवेवर अवलंबून आहेत. भविष्यातील प्रवासी संख्या लक्षात घेता संबंधित मार्गांवरील बसची संख्या व फेऱ्या वाढवणे अत्यावश्यक असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय कमी होऊन परिवहन सेवेचे उत्पन्न व विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून दिवा शहरातील वरील मार्गांवरील बस सेवा तातडीने सुधारावी, अशी मागणी मनसे दिवा शहराच्या वतीने प्रशांत प्रभाकर गावडे यांनी केली आहे.