Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

 गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त अखंड भारताची मानवी प्रतिकृती साकार; राष्ट्रभक्तीचा जागर

कर्जतच्या भालिवडी कन्या आश्रमशाळेत जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत  गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त अखंड भारताची मानवी प्रतिकृती साकार; राष्ट्रभक्तीचा जागर अशोक गायकवाड रायगड-कर्जत : कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त सामूहिक गीताचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण अंतर्गत विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांच्यासोबत कर्जतचे तहसिलदार धनंजय जाधव, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, गटशिक्षणाधिकारी आणि आदिवासी विकास प्रकल्प, पेण प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांचे आगमन होताच आश्रमशाळेतील लेझीम पथकाने पारंपारिक थाटात त्यांचे जंगी स्वागत केले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री गुरु तेग बहादूर यांच्या स्वप्नातील ‘अखंड भारताच्या’ नकाशाची साकारलेली हुबेहूब मानवी प्रतिकृती होती. यावेळी सहभागी विद्यार्थिनींनी तिरंगी रंगांच्या टोप्या व फुगे घेऊन अखंड भारताच्या नकाशाच्या सीमारेषेवर उभे राहून प्रत्यक्ष तिरंग्याचेच स्वरूप साकारले होते. या प्रदर्शनात एका विद्यार्थिनीने श्री गुरु तेग बहादूर यांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सामूहिक गीतानंतर मान्यवरांच्या हस्ते आकाशात तिरंगी फुगे सोडून या दिनाचा उत्साह द्विगुणित करण्यात आला. याच सोहळ्यादरम्यान विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी या आयोजनामागचा उद्देश आणि महत्त्व स्पष्ट केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी विद्यार्थिनींना थोर पुरुषांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करत मोलाचे मार्गदर्शन केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

महाराष्ट्र अंनिसच्या बुकस्टॉलला ठाणेकरांचा भरभरून प्रतिसाद

विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळाव्यातील महाराष्ट्र अंनिसच्या बुकस्टॉलला ठाणेकरांचा भरभरून प्रतिसाद अनिल ठाणेकर ठाणे: जिल्हा न्याय प्राधिकरण आयोजित विधिसेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्यातील ठाणे महाविद्यालयाच्या प्रांगणातील, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती-ठाणे शहर शाखेच्या बुकस्टॉलला ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. याप्रसंगी महाराष्ट्र अंनिस राज्य प्रकाशन विभाग कार्यवाह प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंढे, राज्य कायदे विभाग पदाधिकारी ॲड तृप्ती पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.सुषमा बसवंत, ठाणे शहर प्रधान सचिव अशोक मोहिते, पुस्तक प्रकाशन व वितरण विभाग कार्यवाह प्रमोद तामसे यांनी सहभाग नोंदविला. दिवसभर अगदी सकाळी १० पासूनच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती-ठाणे शहर शाखेच्या या बुकस्टॉलला विविध जनसमुह भेट देत होते. हळूहू ही गर्दी वाढतच होती. महा अंनिसचे कार्यकर्ते प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंढे यांनी, पैशांचा पाऊस पाडणे, नारळात कपड्यांचे तुकडे दाखवणे, मनातले आकडे ओळखणे, लिंबूमधून दोरा फिरवल्यास दोऱ्याचा रंग बदलणे, नाकातून दूध टाकून कानातून काढणे, तांदळाचा चंबू मंत्राचा साहाय्याने उचलणे आदी चमत्काराच्या प्रयोगातून उपस्थितांचे प्रबोधन केले. लोकांनी यावेळी मोठ्यासंख्येने पुस्तक विक्री केली.ज्येष्ठ साहित्यिक यशवंत बैसाने यांनीही अनिसच्या या बुकस्टॉलला भेट दिली. जिल्हा न्यायाधीशांनी महा. अंनिसच्या सहभागाबद्दल प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.

 एसएसटी महाविद्यालयात गुरु तेग बहादूरजींच्या शहिदी समागम निमित्त सामूहिक गीत गायन उत्साहात

एसएसटी महाविद्यालयात गुरु तेग बहादूरजींच्या शहिदी समागम निमित्त सामूहिक गीत गायन उत्साहात ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’कडून दखल कल्याण- शिखांचे नववे गुरू “हिंद दी चादर”  परमपूज्य गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त २३ फेब्रुवारी रोजी आयोजित सामूहिक गीत गायन उपक्रमाची ‘ बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस’ कडून विशेष दखल घेतली जाणार असून, या ऐतिहासिक उपक्रमात एस.एस.टी. कला व वाणिज्य महाविद्यालयाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात एनएसएस सह महाविद्यालयाच्या सर्व विभागांतील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. गुरु तेग बहादूरजींच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी गीताचे सामूहिक सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि बलिदानाची परंपरा जपण्याचा संदेश दिला. कोकण विभागातील सुमारे २० हजार शैक्षणिक संस्था, ५१ लाख विद्यार्थी आणि १.५ लाख शिक्षक-कर्मचारी एकाच वेळी सहभागी झाल्याने हा उपक्रम वैश्विक स्तरावर नोंद घेण्याजोगा ठरला आहे. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा ठाणे जिल्हा एनएसएस समन्वयक प्रा. जीवन विचारे यांनी गुरू तेग बहादुर यांच्या शौर्य आणि त्यागाचे स्मरण करून राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे आवाहन केले. उपप्राचार्य डॉ.दीपक गवादे, उपप्राचार्य डॉ. संतोष करमानी, सर्व विभाग प्रमुख आणि प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.

महापालिका शाळेच्या व्यासपीठावरुन संवाद साधण्याचा आनंद वेगळाच –  दत्तू मोरे

महापालिका शाळेच्या व्यासपीठावरुन संवाद साधण्याचा आनंद वेगळाच –  दत्तू मोरे अनिल ठाणेकर ठाणे- ‘स्वत: ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. १११ चा माजी विद्यार्थी असून शाळेत असताना याच मंचावरुन मला प्रथम क्रमाकांचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. शाळेच्या मंचावरुन सुरू झालेला हा प्रवास आज हास्यजत्राच्या मंचापर्यत पोहचला आहे, त्यामुळे आज शाळेच्या व्यासपीठावरुन संवाद साधताना एक वेगळाच आनंद वाटत आहे’, असं हास्यजत्रा फेम अभिनेता दत्तू मोरे यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेता म्हणून ओळख मिळेपर्यंत कसा झाला, याचा प्रेरणादायी प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आयोजित मध्यवर्ती सांस्कृ तिक महोत्सव २०२५-२०२६ हा आज दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी गडकरी रंगायतन येथे उत्साहात व जल्लोषात पार पडला. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपआयुक्त उमेश बिरारी, उपआयुक्त (शिक्षण) मिताली संचेती, नगरसेवक मनोहर डुंबरे, शिक्षणाधिकारी शेषराव बडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण, दीपप्रज्वलन व नटराज पूजनाने झाली.  या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये एकूण १०२ शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. इयत्ता १ ली ते ५ वी नृत्य विभाग, इयत्ता ६ वी ते ८ वी नृत्य विभाग तसेच इयत्ता १ ली ते ८ वी नाट्य विभाग अशा विभागनिहाय स्पर्धा दि. २३ व २४ डिसेंबर रोजी पार पडल्या होत्या. इयत्ता १ ली ते ५ वी नृत्य विभाग: शाळा क्र. ५३ – प्रथम क्रमांक, इयत्ता ६ वी ते ८ वी नृत्य विभाग: शाळा क्र. ५९ – प्रथम क्रमांक, नाट्य विभाग: शाळा क्र. ११ – प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून त्यांच्या कलागुणांना उत्तेजन देणारे मनोगत व्यक्त केले. मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सव समितीच्या अध्यक्षा सविता चौधरी, उपकार्याध्यक्षा नीलिमा पाटील, चिटणीस वर्षा मटकर, सहचिटणीस आशा पाटे, युआरसी प्रमुख रविंद्र पाटील, मुश्ताक पठाण व इतर पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी शेषराव बडे व गटाधिकारी संगीता बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. तसेच ठाणे जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष सुनील फापाळे, ठाणे मनपा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाबाजी फापाळे, ठाणे जिल्हा शिक्षक पतपेढीचे संचालक जगन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पाटील व वनिता जाधव यांनी प्रभावीपणे केले.एकूणच उत्साह, जल्लोष आणि आनंदाने ओतप्रोत भरलेला हा मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सव विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.खांचे नववे गुरु, “हिंद दी चादर” परमपूज्य गुरु तेग बहादूर यांच्या जीवनावर आधारित भक्तिगीताचे समूहगान सादर करण्यात आले. मनपा शाळा क्र. १३ व ४१ च्या विद्यार्थिनींनी सुरेल ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून वातावरण भक्तिमय केले.

ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहनेतेपदी हणमंत जगदाळे तर विरोधी पक्ष नेतेपदी अशरफ शानू पठाण

ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहनेतेपदी हणमंत जगदाळे तर विरोधी पक्ष नेतेपदी अशरफ शानू पठाण अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहनेतेपदी शिवसेनेचे हणमंत जगदाळे तर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते अशरफ ऊ शानू पठाण यांची निवड झाल्याची घोषणा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नुकत्याच झालेल्या महासभेत केली. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते. महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी सभागृह नेते हणमंत जगदाळे व विरोधी पक्ष नेते अशरफ ऊ शानू पठाण यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसेना पक्षाचे गटनेते पवन कदम, भारतीय जनता पार्टीचे गटनेते मुकेश मोकाशी, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे गटनेते नजीब मुल्ला, एमआयएमचे सरफराज खान ऊर्फ सैफ पठान यांचेही पुष्पगुच्छ देवून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अभिनंदन केले.

स्वाभिमान व समता शिवरायांच्या स्वराज्याचे सूत्र – कैलाश देसाई

स्वाभिमान व समता शिवरायांच्या स्वराज्याचे सूत्र – कैलाश देसाई अनिल ठाणेकर सांगली – ‘बंधुता, स्वाभिमान व समता हेच शिवरायांच्या स्वराज्य पायाभरणीचे सूत्र होते. शिवरायांनी घालून दिलेली स्वराज्याची आदर्श नैतिक मूल्ये आजच्या राज्यकर्त्यांनी स्वीकारावीत’, असे प्रतिपादन शिवशंभु प्रतिष्ठानचे राज्य समन्वयक  कैलाश देसाई यांनी केले. मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयाच्या इतिहास विभागामार्फत आयोजित केलेल्या ‘छत्रपती शिवाजी राजांचे सांस्कृतिक धोरण व आजची दशा’ या विषयावरील व्याख्यानामध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अंकुश बेलवटकर होते.  कैलाश देसाई पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज मुत्सद्दी, लोककल्याणकारी आणि नीतिमान राजे होते.  शिवरायांनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही.  आपल्या राजकीय विरोधकांच्या आईचा, पत्नीचा, मुलांचा, बहिणींचा आदर, सन्मान आणि संरक्षण करण्याचे शिवरायांचे धोरण होते. परंतु आजचे राज्यकर्ते अगदी खालच्या पातळीवर येऊन विरोधकांच्या कुटुंबीयांवर टीका करतात. जाती-जाती धर्मा-धर्मात द्वेष पसरवण्याचे काम करतात. वतनदारी व जहागीरदारी व्यवस्था शिवरायांनी संपविली. परंतु आजचे राज्यकर्ते नवसरंजामदार बनले आहेत. आजची राज्यव्यवस्था शिवरायांच्या स्वराज्याच्या विचाराला व लोकशाहीला घातक आहे. राजकारण करणाऱ्यांनी शिवरायांच्या नावे मतांचा जोगवा मागू नये. सर्व जाती धर्मीयांचा मानसन्मान ठेवावा. शिवरायांचे स्वराज्य म्हणजे आधुनिक लोकशाहीचा पायाच होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिवरायांच्या स्वराज्याचे संविधानात रूपांतर केले. शिवरायांचा ध्वज गेरू व मातीच्या रंगाचा आहे तो ध्वज वारकरी आहे. वारकरी परंपरेचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा.” अध्यक्ष डॉ. बेलवटकर म्हणाले. “पर्यावरण रक्षण, शेती सुधारणा व लोककल्याणकारी कामे शिवाजी राजांनी घडवून आणली. त्यांच्या आज्ञापत्रातून स्वराज्याची आदर्श मूल्ये दिसून येतात.स्वराज्याला नैतिक अधिष्ठान शिवरायांनी मिळवून दिले. त्यांनी कधीच आत्यंतिक धर्मवाद जोपासला नाही. कर्मकांड व अंधश्रद्धा विरोध केला.”कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. राम घुले यांनी केले. या निमित्ताने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कल्याणी साळुंखे, द्वितीय क्रमांक अक्षय पाटील व तृतीय क्रमांक तृप्ती गोंधळी यांना प्राप्त झाला. स्पर्धेचे परीक्षक प्रा. संध्या साठे व प्रा. स्वाती चौधरी होते. बीए भाग एकच्या विद्यार्थ्यांनी  शिवबाचा पाळणा व पोवाडा सादर केला.छत्रपती शिवाजी राजे व स्वराज्याची राजचिन्हे या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.  त्यामध्ये प्रथम क्रमांक आरती चव्हाण, द्वितीय क्रमांक श्रावणी पाटील व तृतीय क्रमांक करुणा काळे यांना प्राप्त झाला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. शैलजा पाटील व प्रा. उत्तरा पाटील यांनी केले. प्रथम तीन क्रमांकांना ट्रॉफी, प्रमाणपत्रे व रोख रक्कम देण्यात आली. विद्यार्थिनींनी शिवकालीन वेशभूषा परिधान केली. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. सूत्रसंचालन करुणा काळे यांनी केले. प्रा. के. बी. पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिव पदयात्रा इस्लामपूर शहरात काढण्यात आली. प्रा वर्षा पाटील यांनी पदयात्रेचे संयोजन केले. महाविद्यालयाचा शिक्षक वर्ग व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी नवी मुंबई: स्वच्छता, सामाजिक न्याय आणि सुधारणांवर भर देणारे आधुनिक संत म्हणून नावजले गेलेल्या संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, नगरसेविका माधुरी सुतार, सायली शिंदे, शैला पाटील, प्रिती भगत, प्रशासन विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, मालमत्ताकर विभागाचे उपआयुक्त अमोल पालवे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकाण, मुख्य विधी अधिकारी  अभय जाधव, कार्यकारी अभियंता  तानाजी शिंदे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

  उल्हासनगरात बुद्ध विहारांचे राष्ट्रीय अधिवेशन

उल्हासनगरात बुद्ध विहारांचे राष्ट्रीय अधिवेशन डॉ. भदंत उपगुप्त महास्थवीर अधिवेशन अध्यक्ष तर डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर प्रमुख पाहुणे ठाणे : (प्रतिनिधी) बुध्द विहार समन्वय समिती द्वारा आयोजीत बुध्द विहारांचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन २८ फेब्रुवारी आणि १ मार्च, २०२६ रोजी शहीद जनरल अरूण कुमार वैद्य टाऊन हॉल, उल्हासनगर 3 जिल्हा ठाणे, कोंकण विभाग मध्ये आयोजित करण्यात आले आहे. अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूजनीय डॉ. भदंत उपगुप्त महास्थविर (पूर्णा जिल्हा परभणी) हे अधिवेशनाचे अध्यक्ष राहणार आहेत. अधिवेशनाचे उद्घाटन, कामगार नेते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) चे राष्ट्रीय अध्यक्ष शामदादा गायकवाड करतील. मुख्य अतिथी भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर राहतील. अतिथी म्हणून महाबोधी बुद्ध गया मुक्ती आंदोलन नेते आकाश लामा, तामिळनाडू बौध्द नेते जी. मोहनन, राजस्थान चे विचारवंत भेरुलाल नामा, बुद्धीस्ट समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष उमेश नागदिवे राहतील. दिल्ली विद्यापीठ दिल्लीच्या प्रोफेसर डॉ. हेमलता महिश्वर महीला चर्चासत्र, पणजी (गोवा) येथील संबोधी ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ. उल्हास आंबेडकर (चांदेलकर) हे युवा सत्राचे, ठाणे येथील समन संघाचे राजेश कांबळे हे डिस्कशन प्यानलचे, बुध्द विहार समन्वय समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा. घनशाम धावर्डे हे प्रतिनिधी सत्राचे, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक सरस्वती बौद्ध हे समारोप सत्राचे अध्यक्ष पद भूषवणार आहेत. बुध्द विहाराचे समन्वयात महिला, युवक, युवती, धम्म प्रचारक, विचारवंत यांची भूमिका या विषयावर चर्चा होईल. मुख्य आयोजक अशोक सरस्वती बौध्द यांचे नेतृत्वात शंभर कार्यकर्त्यांची आयोजन समिती अधिवेशन यशस्वी करण्यासाठी परिश्रम करीत आहे, अशी माहिती संयोजन समिती सदस्य प्रा. राजेश सोनवणे यांनी दिली.

 अखेर पाच वर्षानंतर महिलांना मिळाला न्याय

अखेर पाच वर्षानंतर महिलांना मिळाला न्याय सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांचा पाठपुरावा मुंबई / रमेश औताडे दावडी.ता.खेड येथील जमीन गट नं ३२४/१/क व ३२४/५ मधील साडेचार एकर क्षेत्राचा ताबा गेली पाच वर्षे चांगुणाबाई गव्हाणे व राणी गव्हाणे यांना मिळत नव्हता. प्रशांत बेडसे  तहसीलदार खेड यांच्या १५ सप्टेंबर २०२३ च्या आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती. याबाबत प्रशांत बेडसे तहसीलदार, डॉ.नितीन सुर्यवंशी भुमी-अभिलेख उप अधिक्षक खेड यांच्या सहकार्याने व सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्या पाठपुराव्यानुसार ताबा प्रक्रियेची अंमलबजावणी आज दावडी येथे करण्यात आली. यावेळी उप अधिक्षक भूमी-अभिलेख डॉ.नितीन सूर्यवंशी,निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे,माणिक गायकवाड मंडल अधिकारी पिंपळगाव,भुकरमापक नामदेव कोल्हे व महसूल खात्याचे कर्मचारी उपस्थित होता.खेडचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी चोख पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था केली होती.यावेळी चांगुणाबाई गव्हाणे व प्रतिवादींमधील वादाचे सामंजस्याने निराकरण करण्यात आले. खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांचा सत्कार करताना अशोकराव टाव्हरे व ग्रामस्थ उपस्थित होते. चांगुणाबाई गव्हाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ॲड वासिम सामलेवाले यांचेमार्फत रिट याचिका दाखल केली होती.सरकारी अभियोक्ता यांनी १८ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयास सात,दिवसात ताब्याची अंमलबजावणी करण्याबाबत लेखी पत्र दिले होते. प्रशांत बेडसे तहसीलदार खेड यांनी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्याशी चर्चा करून गव्हाणे यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली. २० फेब्रुवारी रोजी हद्द दाखवून ताबा देण्याची प्रक्रीया उपअधिक्षक भूमी-अभिलेख खेड नितीन सूर्यवंशी,निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे यांच्या उपस्थितीत पुर्ण करण्यात आली.

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्कार देण्यात यावा

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्कार देण्यात यावा बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र व तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघातर्फे साजरी, शासकीय यंत्रणेला मात्र विसर पडल्याचे चित्र पोंभुर्ले – पत्रकारांचे दैवत तसेच आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची २१४ वी जयंती आज २० फेब्रुवारी रोजी पोंभुर्ले येथे जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष नारायण पांचाळ यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जांभेकर यांचे पोंभुर्ले येथील वंशज सुधाकर रामचंद्र जांभेकर व कुटुंबीय उपस्थित होते. मात्र शासकीय यंत्रणेला पोंभुर्ले येथील स्मारकाच्या ठिकाणी येवून अभिवादन करण्यासाठी विसर पडल्याचे चित्र आज पहावयास मिळाले. २० फेब्रुवारी रोजी थोर महापुरुष व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची २१४ व्या जयंती निमित्ताने पोंभुर्ले येथे जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या पदाधिकारी यांनी उपस्थित राहून अभिवादन केले. बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्याचे शासकीय आदेश आहेत. त्यामुळे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची जयंती शासन पातळीवर सर्वच ठिकाणी साजरी झाली पाहिजे होती. मात्र बाळशास्त्री जांभेकरांच्या मूळ गावी पोंभुर्ले येथे खरं म्हणजे शासनाच्या वतीने अभिवादन झाले पाहिजे होते, मात्र शासनाची यावेळीं उदासीनता दिसून आली. शासनाचा एकही अधिकारी, कर्मचारी किंवा लोकप्रतिनिधी या थोर महापुरुषांच्या जन्मस्थानी फिरकले देखील नसल्याची खंत जर्नालिस्ट युनियन ऑफ  महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार नारायण पांचाळ यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षी हाच दिवस जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्रित आणून जयंती मोठ्या दिमाखात साजरी केली होती. दरवर्षी येथे जयंती साजरी करण्यात येईल अशी ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिली होती. मात्र यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांना व शासकीय यंत्रणेला याचा विसर पडला अशी भावना जांभेकर कुटुंबीयांनी व्यक्त करुन याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे राज्य सरचिटणीस पत्रकार राजेंद्र साळसकर, खजिनदार सतिश साटम, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार उदय दुधवडकर, सचिव संजय खानविलकर, महाराष्ट्र जर्नालिस्ट युनियनचे सिंधुदुर्ग अध्यक्ष गणेश चव्हाण, सुनिल आचरेकर, बाजीराव जांभेकर, दळवी महाविद्यालयाचे प्रा. प्रशांत  हाटकर आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते. पत्रकारितेचे संस्थापक व समाजातील सुविचारांचे व्यासपिठाचे जनक असलेले तसेच समाजाचा आरसा पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना  मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा. बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाने कोकणात पत्रकारितेचे विद्यापीठ व्हावे. पोंभुर्ले गांवास जागतिक दर्जाचे प्रेक्षणीय व माहिती स्थळ म्हणून मान्यता मिळावी. अशा मागण्या शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे   जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष पांचाळ यांनी सांगितले. फोटो ओळी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले येथील स्मारकात त्यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना जर्नालिस्ट युनियन महाराष्ट्राचे अध्यक्ष नारायण पांचाळ, राज्य सरचिटणीस राजेंद्र साळसकर, सुधाकर जांभेकर, सतीश साटम, उदय दुधवडकर, संजय खानविलकर, गणेश चव्हाण, बाजीराव जांभेकर, प्रा.प्रशांत हटकर व इतर