Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

‘आयसीएआय’च्या कल्याण-डोंबिवली शाखेच्या अध्यक्षपदी अमित मोहरे यांची निवड

‘आयसीएआय’च्या कल्याण-डोंबिवली शाखेच्या अध्यक्षपदी अमित मोहरे यांची निवड कल्याण : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या कल्याण-डोंबिवली शाखेच्या वर्ष २०२६-२७ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. शाखेच्या अध्यक्षपदी डोंबिवलीकर आणि सीए अमित मोहरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष अमित मोहरे, उपाध्यक्ष प्रदीप मेहता, सचिव अमृता जोशी, कोषाध्यक्ष ईश्वर रोहरा, विकासा अध्यक्ष रोहन पाठक, माजी अध्यक्ष राकेश अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य गिरीश तारवानी, अनुराग गुप्ता आणि विपुल शाह यांचा समावेश आहे. कल्याण-डोंबिवली शाखेचे कार्यक्षेत्र अतिशय मोठे असून यामध्ये कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर, तसेच कर्जत आणि कसारा या भागांचा समावेश होतो. सध्या या शाखेशी ४ हजार ८०० हून अधिक सीए सभासद आणि १३ हजार हून अधिक विद्यार्थी जोडले गेले आहेत. सध्या ही शाखा ५ अभ्यासिका आणि २ आयटी प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून भाड्याच्या जागेतून कार्यरत आहे. मात्र, सभासद आणि विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या  सहकार्याने लवकरच संस्थेची स्वतःची सुसज्ज इमारत उभी राहणार आहे, अशी माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष सीए अमित मोहरे यांनी दिली. व्यावसायिक पारदर्शकता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक बांधिलकी जपत ही शाखा येणाऱ्या काळात उल्लेखनीय कार्य करेल, असा विश्वास नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.

 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा पहिला टप्पा राज्यात सुरू

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा पहिला टप्पा राज्यात सुरू जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती अशोक गायकवाड अलिबाग : राज्यातील सामान्य जनता, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आणि तक्रारी सत्वर निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा १)’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान व्हावे, या उद्देशाने प्रत्येक जिल्हयातील तालुक्यातील मंडळ स्तरावर या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत १८ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत पूर्व तयारी करण्यात येणार असून, प्रत्यक्ष शिबिरांची सुरुवात ७ मार्चपासून होणार आहे. या विशेष मोहिमेद्वारे नागरिकांना एकाच दिवशी सेवा पुरविण्यावर आणि महसूल संहितेतील नवीन तरतुदींची जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे. या अभियानाचे महत्त्व अधोरेखित करताना रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी समस्त रायगडकरांना या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अभियानाच्या वेळापत्रकानुसार, मार्च महिन्यात ७ आणि १४ तारखेला मंडळ स्तरावर शिबिरे होतील. त्यानंतर एप्रिल महिन्यात १० आणि १७ तारखेला पुन्हा मंडळ स्तरावर आयोजन करण्यात येईल, तर मे महिन्यात ८ आणि १५ तारखेला नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर ही शिबिरे घेतली जातील. या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष हेल्प डेस्क उपलब्ध करून देणे आणि उत्पन्न, अधिवास व जातीच्या दाखल्यांचे वाटप करणे अशा महत्त्वाच्या सेवा पुरविल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, अकृषिक (NA) रूपांतरणासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची गरज नसून, विकास आराखडा मंजुरी हीच परवानगी समजली जाईल, यासारख्या नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नांसंबंधी बदलांची माहितीही या शिबिरात दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त, जमिनीच्या तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा, एक वेळचे अधिमूल्य भरण्याची सोपी व्यवस्था आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ उताऱ्यांची कायदेशीर वैधता यांबाबत नागरिकांचे प्रबोधन केले जाईल. भूसंपादन झालेल्या जमिनींचे कमी-जास्त पत्रक तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्याची कार्यवाही देखील याच कालावधीत पूर्ण केली जाणार आहे. ‘एक खिडकी योजना’ राबवून सर्व महसूल अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध राहतील आणि लोकांचे प्रश्न तातडीने सोडवतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

  कचोरे कोळीवाडा येथील गणेश घाट सुशोभिकरणाचा शुभारंभ

कचोरे कोळीवाडा येथील गणेश घाट सुशोभिकरणाचा शुभारंभ नगरसेविका रेखा चौधरी यांच्या प्रयत्नांना यश कल्याण : कल्याण ठाकुर्ली समांतर रस्त्यावर असलेल्या कचोरे कोळीवाडा येथील खाडी किनारी गणेश घाट सुशोभिकरणाचा शुभारंभ कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्याहस्ते आज करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा तथा स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व प्रयत्नांमुळे या विकासकामाला सुरुवात होत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राला मोठा खाडी किनारा लाभला असून काही ठिकाणी गणेश घाट तयार करून सुशोभिकरण करण्यात आले आहे. अशाच प्रकारे कचोरे कोळीवाडा येथे असलेल्या खाडी किनाऱ्याचे देखील सुशोभिकरण व्हावे यासाठी नगरसेविका रेखा चौधरी पाठपुरावा करत होत्या. या ठिकाणी सागर देवीचे मंदिर असून गणपती विसर्जन देखील केले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक आणि नागरिक येत असतात. त्यामुळे या परिसराचे सुशोभिकरण करून कायापालट करण्याची मागणी नागरिकांकडून देखील करण्यात येत होती. त्यानुसार रेखा चौधरी यांनी प्रशासनाकडे, खासदार, आमदार यांच्याकडे पाठपुरावा करून या कामासाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे. त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे यांनी या कामासाठी तब्बल 5 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून या खाडी किनाऱ्याचे सुशोभिकरण करून रुपडे पालटणार आहे. आज या सुशोभिकरण कामाचा शुभारंभ आमदार राजेश मोरे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. या कामासाठी स्थानिक नागरिकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे आणि स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांचे आभार मानले आहेत. यावेळी आमदार राजेश मोरे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा तथा स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, बजरंग दल कल्याण जिल्हा संयोजक राजन चौधरी, भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष अतिश चौधरी, शिवसेना सचिव संतोष चव्हाण, माजी परिवहन सभापती मनोज चौधरी यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कचोरे येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई

कचोरे येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कचोरे परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका जे प्रभाग कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली. हे बांधकाम ठेकेदार यांच्यामार्फत करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पथकाने स्थळावर जाऊन कारवाई केली. आणखी काही ठिकाणी सुद्धा कारवाई करण्यात येईल. कारवाईदरम्यान संबंधितांना पुढील काळात कोणतेही अनधिकृत बांधकाम केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (MRTP Act) अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली. महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या व मंजूर नकाशा घेणे बंधनकारक आहे. अन्यथा नियमबाह्य बांधकामांवर प्रशासन कठोर कारवाई करेल.

स्मार्ट सिटी कामांमुळे नाशिक पुन्हा कोंडीत

स्मार्ट सिटी कामांमुळे नाशिक पुन्हा कोंडीत हरिभाऊ लाखे नाशिक: शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या रस्ते व भुयारी गटारांच्या कामांमुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरात सध्या विविध भागांत रस्ते रुंदीकरण, काँक्रिटीकरण तसेच भुयारी मार्ग आणि गटारांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. द्वारका, त्र्यंबक रोड, शालिमार, पंचवटी, नाशिकरोड आदी प्रमुख भागांमध्ये एकाच वेळी कामे सुरू असल्यामुळे त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत आहे. विशेषतः द्वारका सर्कल येथे भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्यामुळे वाहतुकीचा ताण वाढला आहे. सारडा सर्कल ते काठे गल्ली दरम्यान भुयारी मार्गाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले असले, तरी सध्या दोन ते तीन ठिकाणी एकाच वेळी काम सुरू असल्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी काठे गल्लीमार्गे मुंबई नाक्याकडे वाहतुकीसाठी डायव्हर्जन देण्यात आले आहे. या मार्गावर विशेषतः मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येते. ठिकठिकाणी पर्यायी मार्ग (डायव्हर्जन) देण्यात आले असले, तरी वाहनांची वाढती संख्या आणि अरुंद रस्ते यामुळे कोंडी टळत नाही. वाहतूक शाखेतर्फे अतिरिक्त कर्मचारी तैनात करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र वाहनांचा प्रचंड ताण लक्षात घेता कर्मचाऱ्यांची चांगलीच कसरत होत आहे. कामे लवकर पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत असून, तोपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मिरा भाईंदर महापालिकेत महासभेचे  चित्रीकरण करण्यास पत्रकारांना बंदी

मिरा भाईंदर महापालिकेत महासभेचे चित्रीकरण करण्यास पत्रकारांना बंदी अरविंद जोशी मिरा -भाईंदर : जनतेच्या प्रश्नावर चर्चा सुरु असताना जनतेचा आवाज असणाऱ्या पत्रकारांनाच त्याचे चित्रिकरण करण्यास मनाई करण्याचा अजब निर्णय मिरा भाईँदर महापालिकेने घेतल्याने गोंधळ उडाला.…

झिरवाळांच्या लाचखोर लिपिकाला जामीन मंजूर

झिरवाळांच्या लाचखोर लिपिकाला जामीन मंजूर मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातील लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या लिपिक राजू (राजेंद्र) ढेरिंगे याला मुंबई सत्र न्यायालयातील एसीबीच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच त्याच्या जामिनावर सुनावणी घेण्यात आली आणि त्याला दिलासा मिळाला. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एसीबी कोर्टाने ढेरिंगे याचा जामीन अर्ज मंजूर केला. दरम्यान, एसीबीने त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले होते. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर लगेचच जामीन अर्जावर सुनावणी झाली. लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी संबंधित लिपिकाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. केवळ चौकशीच नव्हे तर त्याची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागातील दक्षता पथकाला सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून, वस्तुनिष्ठ व सर्वंकष अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, एसीबीने ढेरिंगे याच्या नाशिक रोड येथील घराची काही दिवसांपूर्वी झडती घेतली होती. या झडतीत काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती आहे. ढेरिंगे हा मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी असून, वर्षभरापूर्वी तो अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर आला होता. तो मंत्र्यांच्या अपील विभागात कार्यरत होता.

ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाला दणका

ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाला दणका अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाकडून टॅरिफ रद्द टॅरिफ बेकायदेशीर असल्याचा निकाल न्युयॉर्क : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर लागू केलेले…

मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द

मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द स्लग- पाच टक्के आरक्षण रद्द  शासन निर्णयाविरोधता मुंबई उच्च न्यायालयात याचिका मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णय काढून शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सरकारी तसेच निमसरकारी नोकऱ्यांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिमांना देण्यात येणारे ५ टक्के आरक्षण रद्द केले. २०१४ पासून हे आरक्षण देण्यात आले होते. मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं आरक्षण रद्द करण्याच्या शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. अॅड एजाझ नक्वी यांनी याचिका दाखल केली आहे. शासनाचा निर्णय रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. अचानक असं काय झाल की राज्य सरकारने शैक्षणिक संस्थांमधील मुस्लिम समाजाला दिलेल पाच टक्के आरक्षण रद्द केलं? असा सवाल याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप सरकार मुस्लिमांच्या विरोधात काम करत असल्याचे मत आझमी यांनी व्यक्त केले. शासन निर्णयात मुस्लिम समाजाला देण्यात आलेले २३ डिसेंबर २०१४ रोजीचे आरक्षण रद्द झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. आरक्षण रद्द झाल्यानंतरही राबवली जाणारी जात प्रमाणपत्र वितरण आणि वैधता प्रक्रियेला शासनाकडून ब्रेक लावण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर, आगामी विधानसभा निवडणुकांकडे लक्ष ठेवून असलेल्या तत्कालीन काँग्रेसच्या महाराष्ट्र सरकारने मराठा आणि मुस्लिम आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला होता. सरकारने सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठ्यांना १६ टक्के आणि मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण जाहीर केले होते. यामुळे राज्यातील एकूण आरक्षण ७३ टक्के झाले होते. काँग्रेस नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नसीम खान यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुस्लिम समुदायासाठी ५ टक्के आरक्षणाचा प्रस्ताव मांडला होता. कोणत्याही चर्चेशिवाय एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.

स्‍थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे बिनविरोध

स्‍थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे बिनविरोध मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिका स्‍थायी समिती अध्यक्षपदी  प्रभाकर शिंदे यांची  बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या बिनविरोध निवडीची घोषणा केली.  बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ पार पडल्यानंतर सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या महानगरपालिका विशेष सभेत स्‍थायी समितीवर २६ महानगरपालिका सदस्यांची नामनिर्देशानुसार नियुक्ती करण्यात आली. तर शिक्षण समिती अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतात.  स्थायी समिती या वैधानिक समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याकरिता  २० फेब्रुवारी २०२६ला दुपारी २.०० वाजता विशेष सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. स्‍थायी समिती अध्यक्षपदासाठी श्री. प्रभाकर शिंदे यांचा एकमेव अर्ज प्राप्‍त झाल्‍याने त्‍यांची बिनविरोध निवड झाल्‍याचे पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी जाहीर केले.  स्थायी समितीच्या  सर्व सदस्यांसह अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.