Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

ठामपाच्यावतीने ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत पर्यावरण जनजागृती व हरित शपथ स्पर्धा – २०२६

ठामपाच्यावतीने ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत पर्यावरण जनजागृती व हरित शपथ स्पर्धा – २०२६ अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे महानगरपालिकेमार्फत ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण जनजागृती व हरित शपथ स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले असून ठाणे महानगरपालिका हद्दीतील स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, ठामपा व खाजगी शाळांना सहभागी व्हावे असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर व महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे, लोकसहभाग वाढविणे तसेच नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धा दोन टप्प्यांत होणार असून प्रथम टप्प्यासाठी २५ मार्च २०२६ पर्यंत तर द्वितीय टप्प्यासाठी २० ऑगस्ट २०२६ पर्यंत माहिती ऑनलाईन सादर करावी लागणार आहे. स्पर्धेचा निकाल ७ सप्टेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त जाहीर करण्यात येणार आहे. स्पर्धेत चार गटांचा समावेश असून स्वयंसेवी संस्थांसाठी महापालिका स्तरावर, महाविद्यालयांसाठी परिमंडळ स्तरावर तर ठामपा व खाजगी शाळांसाठी प्रभाग समिती स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांना रील/डॉक्युमेंटरी निर्मिती व हरित शपथ या दोन्ही प्रकारांत सहभाग बंधनकारक असून प्रत्येक टप्प्यात किमान पाच विषयांवरील व्हिडिओ सादर करणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांमधून किमान १० टक्के किंवा २०० ‘पर्यावरण दूत’ निवडून विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवायचे आहेत. शाळांनी किमान एक ते पाच जनजागृती कार्यक्रम आयोजित करून त्याचे जीओ-टॅग छायाचित्रे व सोशल मीडिया लिंक सादर करणे आवश्यक राहणार आहे. हरित शपथ नोंदणी राज्य शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार असून ULB मध्ये “Thane Municipal Corporation” निवडणे बंधनकारक आहे. शपथेनुसार कृती पूर्ण केल्यास स्वतंत्र गुण दिले जाणार आहेत. तसेच स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. स्वयंसेवी संस्थांसाठी प्रथम क्रमांकाचे रु. १ लाख, द्वितीय रु. ७५ हजार व तृतीय रु. ५० हजार तर उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. महाविद्यालये व शाळांसाठीही विविध स्तरांवर रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. सहभागी संस्था/आस्थापनांनी दोन्ही टप्प्यांत स्वतंत्र माहिती ऑनलाईन सादर करणे आवश्यक असून गुणांकन स्वमूल्यांकन पद्धतीने करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष पाहणी करून अंतिम गुण निश्चित केले जातील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी लिंक ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी www.thanecity.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा pcctmc.ho@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

मेट्रो दुर्घटनेत मृताच्या मदतीसाठी यादव समाज एकवटला

मेट्रो दुर्घटनेत मृताच्या मदतीसाठी यादव समाज एकवटला कल्याण: मुलुंडमध्ये मेट्रोच्या सुरु असलेल्या कामाचा एक स्लॅब कोसळला, ज्यामुळे घटनास्थळीच एकाचा मृत्यू झाला आणि इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रामधन यादव यांना मदत मिळवून देण्यासाठी रविवारी आर. एन. यादव यांच्यासह संपूर्ण यादव समुदायाचे सदस्य दिवसभर जबाबदार अधिकाऱ्यांकडून भरपाईच्या मागणीबाबत लेखी आश्वासन मागत राहिले, परंतु एमएमआरडीए किंवा उपकंत्राटदाराचा कोणताही अधिकारी प्रतिसाद देण्यासाठी उपलब्ध नव्हता. अखेर, दुपारी ४ वाजता, समुदायाच्या एका वरिष्ठ सदस्याने निर्णय घेतला की जर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठोस निकाल लागला नाही तर त्यांना रस्त्यावर उतरून निषेध करण्यास भाग पाडले जाईल. ही माहिती माध्यमांना आणि पोलिस ठाण्याला मिळाल्यावर, एक अधिकारी पीडितेच्या कुटुंबाशी बोलण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचला. रात्री १० वाजेपर्यंत निकाल लागला, परंतु रात्री धनादेशावर स्वाक्षरी न झाल्यामुळे, अधिकारी लेखी आश्वासन देऊन निघून गेले. रात्री धनादेश न मिळाल्याने, कुटुंब रुग्णालयातून मृतदेह घेऊ शकले नाही. आज सोमवारी धनादेश मिळाला आणि मृतदेह घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शंशिकांत यादव, ईश्वर देव यादव, पारस यादव, मोतीलाल यादव, राम यादव, जितेंद्र यादव, कमलेश यादव, आर.डी. यादव, राम झलक यादव, पप्पू यादव, जयसिंग यादव, कीर्ती यादव, रमेश यादव, सुरेश यादव, सुनील यादव, ईश्वर देव यादव आणि पारस यादव यांच्यासह सुमारे २०० समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या सर्वांचे आर.एन. यादव यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आणि सांगितले की पीडितेला न्याय समुदायाच्या एकजुटीमुळे मिळाला.

टिटवाळ्यात रेल्वेच्या कारवाईत १९ बेकायदेशीर बांधकामे पाडली

टिटवाळ्यात रेल्वेच्या कारवाईत १९ बेकायदेशीर बांधकामे पाडली कल्याण: टिटवाळा परिसरातील रेल्वेच्या हद्दीत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामांवर आज रेल्वे प्रशासनाने निर्णायक कारवाई करत १९ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. सकाळपासून सुरू झालेल्या या धडक तोडक मोहिमेमुळे परिसरात मोठी हालचाल निर्माण झाली असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. मध्य रेल्वेच्या भूमी व्यवस्थापन विभागाच्या सूचनेनुसार अप लाईनजवळील कि.मी. ६३/५-१८ परिसरातील रेल्वे मालकीच्या जागेवर उभारलेली कच्ची-पक्की दुकाने आणि काही निवासी बांधकामांचे भाग अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले होते. संबंधितांना यापूर्वी लेखी नोटिसा देऊन ठराविक मुदत देण्यात आली होती; मात्र त्यानंतरही अतिक्रमण कायम राहिल्याने प्रशासनाने थेट पाडकामाची कारवाई हाती घेतली. कारवाईदरम्यान कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून टिटवाळा पोलीस ठाण्याकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांसह मोठ्या संख्येने पुरुष व महिला पोलीस कर्मचारी तैनात होते. रेल्वे प्रशासन, स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलीस दल यांच्या समन्वयातून ही मोहीम सुरळीत पार पडली. मधुबन सोसायटीसमोरील रेल्वे पावर हाऊसजवळील रस्त्यालगतचा भाग असल्याने पाडकामाची कारवाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. काही ठिकाणी रहिवाशांमध्ये भावनिक प्रतिक्रिया उमटल्या; मात्र प्रशासनाने संयम राखत परिस्थिती नियंत्रणात ठेवली आणि कारवाई कोणताही अनुचित प्रकार न घडता पूर्ण केली. रेल्वे मार्गांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण व्हावे, या दृष्टीने अतिक्रमण हटविण्याची मोहीम सातत्याने राबविली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी  सूत्रांनी  स्पष्ट केले. या कारवाईनंतर रेल्वेच्या जागेवर अनधिकृत बांधकामे उभारणाऱ्यांना स्पष्ट संदेश मिळाला असून, पुढील काळात अशा प्रकारांवर प्रशासन अधिक कठोर भूमिका घेणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. टिटवाळ्यातील या मोहिमेमुळे रेल्वे हद्दीतील अतिक्रमणांबाबत प्रशासनाचा निर्धार अधोरेखित झाला आहे.

 आरोग्य सेवेसाठी आशा वर्कर्स यांचे योगदान अमूल्य

आरोग्य सेवेसाठी आशा वर्कर्स यांचे योगदान अमूल्य महापौर शर्मिला पिंपळोलकरांचे वक्तव्य अनिल ठाणेकर ठाणे, तळागाळात जाऊन वर्षानुवर्षे लोकसेवा आणि रुग्णसेवा बजावणाऱ्या आशा वर्कर्स या आरोग्यव्यवस्थेचा कणा आहेत, त्यांचे योगदान हे अमूल्य असल्याचे वक्तव्य महापौर शर्मिला पिंपळोलकर येथे केले. आज ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विशेष सन्मान करण्यात आला. संशयित क्षयरुग्णांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करताना अपेक्षेपेक्षा अधिक कामगिरी करणाऱ्या प्रतिनिधीक स्वरुपात २० आशा वर्कर्संना महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ठाणे महानगरपालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांसह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधत, आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहन देत आणि आजारांबाबत जनजागृती करत आशा वर्कर्स आरोग्य यंत्रणेचा भक्कम आधारस्तंभ ठरत आहेत. संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांची नोंदणी करणे ही अत्यंत जबाबदारीची भूमिका त्यांनी प्रभावीपणे पार पाडली आहे. अनेक आशा वर्कर्सनी निर्धारित उद्दिष्टांपेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी करून आपली कर्तव्यनिष्ठा सिद्ध केली असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले. तर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी देखील आशा वर्कर्सच्या कामाचे कौतुक करीत ठाणे महापालिका त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.तर प्रास्ताविकपर भाषणात मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी आशा वर्कर्सच्या कामाचे कौतुक केले. संशय‍ित क्षयरुग्णाच्या नोंदणी  कामात आशांनी सक्रिय सहभागी घेतला. तसेच १० दिवसांत १५० जणांची नोंदणी करण्याचे उद्द‍िष्ट दिले असताना हजारहून अधिक संशयित रुग्णांची नोंदणी त्यांनी केली, त्यामुळेच त्यांचा सन्मान करण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद महानगर गॅस लिमिटेड यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासाठी ₹१.२५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दोन अ‍ॅडव्हान्स सोनोग्राफी मशीन आणि एक २D इको मशीन उपलब्ध करण्यात आली आहे.या अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. रेडिओलॉजी विभागाचे बळकटीकरण करण्यासाठी या मशीन महत्त्वपूर्ण ठरणार असून विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. अत्याधुनिक तपासण्या स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने रुग्णांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत. यावेळी ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे शीख धर्मातील नववे गुरु गुरूतेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दीनिमित्तच्या कार्यक्रमाच्या फलकाचे अनावरणही महापौरांच्या हस्ते करण्यात आले. गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवतेच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे. या शताब्दी वर्षानिमित्त आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व आरोग्य केंद्रात आरोग्‌य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी नमूद केले.

 नाशिकमध्ये भाजप बंडखोर आणि मनसेला सत्तेची लॉटरी

नाशिकमध्ये भाजप बंडखोर आणि मनसेला सत्तेची लॉटरी स्थायी समितीत मिळाले स्थान! हरिभाऊ लाखे नाशिक: महापालिकेच्या तिजोरीची चावी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीत सोमवारी राजकीय पक्ष व आघाडीच्या तौलानिक बळानुसार १६ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपने महापौर व उपमहापौरपदाच्या स्पर्धेतील काहींना स्थायीवर संधी दिली. अपक्ष विजयी झालेल्या मुकेश शहाणे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाशी आघाडी करीत तर, मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनी शिवसेना शिंदे गटाशी आघाडी करीत स्थायीत प्रवेश मिळवला. महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्रित लढले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट त्यांच्याबरोबर होता. निकालानंतर मनसे शिवसेना शिंदे गटाशी हातमिळवणी करीत एकप्रकारे सत्तेत सहभागी झाली. तर भाजपचे बंडखोर मुकेश शहाणे हे अजित पवार गटाने आधीच दिलेल्या पाठिंब्यामुळे अप्रत्यक्षपणे सत्तेत सहभागी झाले. या समीकरणांनी बहुमतात असणाऱ्या भाजपला स्थायीत अधिक बळ मिळणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे महापौर, उपमहापौरांबरोबर स्थायी समिती व सभापतीला विशेष महत्व आले आहे. सदस्य पदांसाठी सत्ताधारी भाजपमध्ये मोठी स्पर्धा होती. महापौर व उपमहापौर निवडणूक झाल्यानंतर सर्वांचे लक्ष स्थायी सभापतीपदाकडे आहे. २२ सदस्यांच्या पालिकेत ७२ जागा मिळवणाऱ्या भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. अखेरच्या क्षणी राज्यातील मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाला भाजपने उपमहापौरपद देत बरोबर घेतले. राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपला यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे. पालिकेत शिवसेना शिंदे गट (२६), राष्ट्रवादी अजित पवार गट (चार), ठाकरे गट (१५), काँग्रेस (तीन), मनसे आणि अपक्ष प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. विविध समित्यामध्ये अधिकतम प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी अन्य राजकीय पक्षांनी समीकरणे जुळवली. महापालिकेत ७२ जागा मिळवणाऱ्या भाजपचे नऊ, शिवसेना शिंदे गट मनसेच्या गटाला चार, शिवसेना ठाकरे गट- काँग्रेस आघाडीला दोन, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि् अपक्ष आघाडीच्या एका सदस्याला संधी मिळाली. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडून पक्षनिहाय सदस्यांची नावे जाहीर झाली. भाजपने महापौर पदाच्या स्पर्धेतील माधुरी बोलकर आणि दीपाली कुलकर्णी तसेच उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ऐनवेळी माघार घ्यावे लागलेले मच्छिंद्र सानप यांच्यासह नितीन निगळ, पल्लवी गणोरे, इंदुबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड यांची स्थायीवर नियुक्ती केली. शिवसेना शिंदे गट-मनसे आघाडीकडून मनसेच्या मयुरी पवार, शिंदे गटाच्या किरणताई गामणे, राहुल दिवे आणि रंजना बोराडे, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आघाडीच्या भारती ताजनपुरे आणि योगेश गाडेकर तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि अपक्ष आघाडीचे मुकेश शहाणे यांची अशा एकूण १६ जणांची स्थायी समितीत सदस्य म्हणून नियुक्ती झाली. आघाडी केल्यामुळे अपक्ष निवडून आलेल्या मुकेश शहाणे यांची लॉटरी लागली. अजित पवार गटाने आधीच भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मनसेही सत्तेत सहभागी महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने एकत्रित लढली होती. ठाकरे गटाला १५ तर मनसेला एक जागा मिळाली. निकालानंतर समीकरणे बदलली. शिवसेना शिंदे गटाने मनसेला सोबत घेऊन पालिकेत गट स्थापन केला. भाजपने मित्रपक्ष शिंदे गटाला सत्तेत बरोबर घेतले. विलास शिंदे उपमहापौर होऊन शिंदे गट सत्तेत सहभागी झाला. दुसरीकडे शिंदे गट आणि मनसेची आघाडी आहे. शिंदे गटाने या पक्षाच्या नगरसेविका मयुरी पवार यांना स्थायीत संधी दिली. या राजकीय समीकरणांनी नाशिक पालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाबरोबर एकप्रकारे मनसेचाही समावेश झाला आहे. एकत्रित निवडणूक लढणाऱ्या ठाकरे गटाने मनसे व काँग्रेसला सोबत घेऊन एकत्रित आघाडी स्थापन करण्याचा आग्रह धरला होता. परंतु, मनसेने शिंदे गटासोबत आघाडी केली. या संदर्भात वरिष्ठ नेत्यांना आधीच माहिती दिल्याचे ठाकरे गटातील पदाधिकारी सांगतात. तर मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे.

पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन संपन्न

पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन संपन्न साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन रमेश औताडे मुंबई : राजगुरुनगर येथे कुलस्वामिनी साहित्य परिषद आयोजित तिसरे विश्वसाहित्यिक, पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. ढसाळांच्या जयंतीदिनी आयोजन केले होते. ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरूवात झाली. दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, संमेलनाध्यक्ष कांताराम सोनवणे, संमेलनाचे निमंत्रक अशोकराव टाव्हरे, स्वागताध्यक्ष प्रकाश शितोळे, ज्येष्ठ साहित्यिक म.भा.चव्हाण, बाजार समिती सभापती व जि.प.सदस्य ॲड. विजयसिंह शिंदे, काव्यसंमेलनाध्यक्ष अनंत धनसरे, राजगुरुनगर सह बँकेचे मा.अध्यक्ष दिनेश ओसवाल, राजेंद्र सांडभोर, खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील थिगळे , कवयित्री ललिता सबनीस, दिलीपराव माशेरे, संतोष ताम्हाणे, बबनराव काटकर, कनेरसरच्या सरपंच सुनीताताई केदारी,प्रा.डॉ.बाळासाहेब माशेरे, सुरेश क्षीरसागर, बाळासाहेब खरपुडे, कल्याणी पवार, संदीप म्हसुडगे तसेच साहित्यिक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उद्घाटक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सतत तीन वर्षे नामदेव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन आयोजित करून कुलस्वामिनी साहित्य परिषद व निमंत्रक अशोकराव टाव्हरे यांच्या कार्याचे कौतुक केले. नामदेवराव ढसाळ यांनी विद्रोही साहित्यातून केलेली निर्मिती अलौकिक असून त्याचा वारसा जतन करून वाचनसंस्कृती जतन ठेवण्याचे कार्य उल्लेखनीय आहे असे मत व्यक्त केले. संमेलनाचे निमंत्रक अशोकराव टाव्हरे यांनी प्रास्ताविक करताना केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांनी संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या असून पुढील वर्षी साहित्य संमेलन गडकरींच्या आग्रहास्तव नागपुर येथे होणार असे जाहीर केले. तसेच वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी साहित्य संमेलन आयोजित करीत असल्याचे नमुद केले. संमेलनाध्यक्ष कांताराम सोनवणे यांनी नामदेवराव ढसाळ यांचा जीवनपट मांडला. दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, सभापती विजयसिंह शिंदे, साहित्यिक म.भा.चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. जालिंदरनगर जि.प.शाळेचे दत्तात्रय वारे गुरूजी, अंबिका देवस्थान ट्रस्ट साबळेवाडी, सोनाली पवार, नीलेश घोडके, ॲड समीर गोडसे, बाळासाहेब चौधरी, विजयकुमार दाते, महेश लोखंडे, द्वारका सेवासदन व गुरुकुल व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. विविध विषयांवरील कविता राज्यातून आलेल्या कवींनी सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर मांजरे यांनी केले. आभार कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या कार्यवाह सुरेखा टाव्हरे यांनी मानले.

 शेवग्याच्या शेंगा विक्रीतून ग्रामीण भागात रोजगार

शेवग्याच्या शेंगा विक्रीतून ग्रामीण भागात रोजगार जीवनसत्व,घटकामुळे ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी अविनाश उबाळे मुंबई : शेवग्याच्या शेंगाचे यंदा विक्रमी उत्पादन झाले आहे.हिरव्यागार शेवग्याच्या शेंगा व पानं व फुलांमध्ये प्रचंड असे…

महाविद्यालयात भाजी, फळे आणि फुलांचा महोत्सव

महाविद्यालयात भाजी, फळे आणि फुलांचा महोत्सव रमेश औताडे मुंबई : वृक्षप्रेमींच्या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने आयोजित ६३ वा वार्षिक भाजीपाला, फळे आणि फुलांचा सोहळा माटुंगा येथील डी जी रूपारेल कॉलेज च्या…

 महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीच्या माध्यमातून दिला देशभक्तीचा संदेश

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे ३५० वे शहिदी समागम शताब्दी वर्ष महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीच्या माध्यमातून दिला देशभक्तीचा संदेश ठाणे : ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक २५ तसेच शाळा क्रमांक ५४, पातलीपाडा…

 ठाणे जिल्ह्यात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

ठाणे जिल्ह्यात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची सदिच्छा भेट कल्याण : ठाणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. डोंबिवली…