Month: January 2026

सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सानपाडा प्रभाग क्रमांक १९ मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गणपत (भाऊ) दगडु भापकर, सुनिल  रामदास कुरकुटे, सौ. शैला जगदीश पाटील आणि सौ. शिल्पा राजेश ठाकूर हे विजयी झाल्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने १८ जानेवारीला सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, शासकीय योजना ज्येष्ठ नागरिकांना मिळण्यासाठी आपण सहकार्य करावे. सानपाड्याचा उत्तम विकास करावा. नगरसेवकांनी सांगितले की, आता तुम्ही आमच्याकडे येऊ नका, आम्ही तुमच्याकडे येऊ आणि आपणास सहकार्य करू. काम करणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव,  सचिव जगदीश एकावडे, खजिनदार महादेव पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे, सीमा बोराडे,  सहसचिव राजेंद्र कदम, सहखजिनदार नाना शिंदे, कार्यकारणी सदस्य जे. पी.  देसाई,  मंगला मानधने, माजी अध्यक्ष मारुती कदम, माजी उपाध्यक्ष बळवंत पाटील, माजी सहखजिनदार सुभाष बारवाल  आदी मान्यवर व सभासद उपस्थित होते.

कल्याणचा राजाचे जल्लोषात आगमन

कल्याणचा राजाचे जल्लोषात आगमन कल्याण : कल्याण पूर्वेतील तिसाई प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने “कल्याणचा राजा” श्री गणरायाची भव्य दिव्य आगमन मिरवणूक भक्तिभावात व जल्लोषात रविवारी संपन्न झाली. ढोल-ताशांच्या निनादात, हरिनामाच्या पवित्र गजरात विघ्नहर्त्याचे मंगलमय आगमन झाले. भक्तांच्या अपार श्रद्धा, आनंद आणि उत्साहाने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारून गेला. या सोहळ्याला  आमदार सुलभा गायकवाड, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, नगरसेविका मनिषा गायकवाड, तिसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव गायकवाड यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याणची अस्मिता आणि श्रद्धेचे स्थान असलेल्या “श्री तिसाई प्रतिष्ठाण” आयोजित “कल्याणचा राजा” – माघी गणेशोत्सवांचे यंदाचे वर्ष हे उत्सवाचे आणि अभूतपूर्व चैतन्याचे आहे. या वर्षापासून बाप्पाच्या “पारंपारिक आगमन सोहळ्याचे” आयोजन करण्यात आले आहे.  रविवारी कल्याण पूर्वेतील चक्की नाका, पुनालिंक रोड ते आई तिसाई देवी मंदिर, तिसगाव अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यंदाच्या माघी गणेशोत्सवाचे  विशेष आकर्षण पर्यावरणपूरक मूर्ती असून ठाणे जिल्ह्यातील सर्वात प्रथम अशी माघी गणेशोत्सवातील “टिशू पेपर” पासून (कागदी) बनवलेली भव्य श्री गणेश मूर्ती आहे. तसेच ६१ फूट उंच केदारनाथ मंदिराची नेत्रदीपक प्रतिकृती देखील याठिकाणी साकारण्यात आली आहे.

 मनसेचे गणेश लांडगे ठरले केडीएमसी निवडणुकीत जायंट किलर

मनसेचे गणेश लांडगे ठरले केडीएमसी निवडणुकीत जायंट किलर भाजपाचे माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांचा केला पराभव कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक नुकतिच पार पडली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक तथा केडीएमसीचे माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांचा देखील सहभाग आहे. मनसेचे शाखा अध्यक्ष गणेश लांडगे यांनी त्यांचा पराभव करून जायंट किलर ठरले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कल्याण मधील प्रभाग क्र. ७ ड मधून भाजपाच्या वतीने डॉ. पंकज उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पक्ष आदेशानुसार उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यानंतर भारतीय जनता पार्टीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांना भाजपा पुरस्कृत उमेदार म्हणून जाहीर केले. मात्र कोविड काळानंतर प्रभागात न फिरकल्याने मतदारांनी त्यांना नाकारत मनसेच्या गणेश लांडगे यांना पसंती दिल्याची चर्चा आहे. तर मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार आणि मनसेचे शाखा अध्यक्ष गणेश लांडगे हे गेली १० वर्षे प्रभागासः कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात सक्रीयपणे काम करत असल्याचे पाहायला मिळाले. प्रभागातील नागरिकांच्या समस्या असो कि शहरातील नागरिकांच्या संदर्भात एखादा विषय, या दोघांच्या जोडीने अनेक विषय लावून धरत नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे. त्याप्रमाणे मनसे पक्षातर्फे प्रभाग क्र.७ ड मध्ये गणेश लांडगे यांना आणि कपिल पवार यांच्या पत्नी सोनल पवार यांना प्रभाग क्र. ९ ब मधून उमेदवारी देण्यात आली. मात्र सोनल पवार यांचा यात पराभव झाला असून गणेश लांडगे यांनी भाजपाच्या संदीप गायकर यांचा पराभव करत जायंट किलर ठरले आहेत. या निकालानंतर आता कपिल पवार यांच्याकडे शहराची जवाबदारी देण्याची मागणी मनसे कार्यकर्त्यांमधून होत आहे.

डॉ. विजय पंडित यांच्या “बडे भाग मानुष तन पाव” या कथासंग्रहाचे प्रकाशन

डॉ. विजय पंडित यांच्या “बडे भाग मानुष तन पाव” या कथासंग्रहाचे प्रकाशन कल्याण : कल्याण पश्चिमेतील के.एम. अग्रवाल महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद १६-१७ जानेवारीला संपन्न झाला. देशभरातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय परिसंवादात सक्रिय आणि उत्साहाने सहभाग घेतला. परिसंवादाचे उद्घाटन सत्र महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विजय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. उद्घाटन सत्राचे अध्यक्षपद महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या माजी अध्यक्षा प्राध्यापक शितला दुबे यांनी भूषवले. मुख्य भाषण प्राध्यापक मनोज सिंह यांनी केले. ज्यांनी हिंदी साहित्यातील समकालीन प्रवचन, सामाजिक चिंता आणि वैचारिक ट्रेंडबद्दल सखोल आणि विचारप्रवर्तक अंतर्दृष्टी दिली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स, मुंबई झोनल डायरेक्टर रेणू पृथियानी उपस्थित होत्या. उद्घाटन सत्राचे विशेष आकर्षण म्हणजे चार महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशन. यामध्ये अमरकांत वरील लेखांचा संग्रह, मध्य आशियातील हिंदीवरील लेखांचा संग्रह, पंडित विद्यानिवास मिश्रावर लक्ष केंद्रित करणाऱ्या समीचिन मासिकाचा विशेष अंक आणि डॉ. विजय पंडित यांचा नवीनतम लघुकथा संग्रह, “बडे भाग मानुष तन पाव” यांचा समावेश होता. उपस्थितांनी डॉ. विजय पंडित यांच्या लघुकथा संग्रहावर आपले विचार व्यक्त केले, तो मानवी संवेदनशीलता, जीवन दृष्टिकोन आणि सामाजिक वास्तवाने ओतप्रोत एक शक्तिशाली काम असल्याचे म्हटले आणि त्याचे मनापासून कौतुक केले.

आझाद मैदानात आंदोलनास बसलेल्या नोवेल साळवे यांचा आत्मदहनाचा इशारा

आझाद मैदानात आंदोलनास बसलेल्या नोवेल साळवे यांचा आत्मदहनाचा इशारा कल्याण:  आझाद मैदान येथे धरणा आंदोलन करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी सरकार त्यांच्या आंदोलनाची दखल घेत नसल्याकारणाने साळवे यांनी आपले आंदोलन तिव्र करून आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत मला महाराष्ट्र शासन गृह विभागाचे उप सचिव यमुना जाधव यांनी साळवे यांना बोलवून अडचण ऐकून घेत ठाणे पोलीस आयुक्त यांना कार्यवाही करण्यासाठी पत्र पाठविण्यात आले. परंतु त्या पत्रावर अद्याप कुठलीच कार्यवाही झाली नसल्याने नोवेल साळवे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. काही महिन्यांपूर्वी नोवेल साळवे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यावर त्यांचे ओपन हार्ट सर्जरी झाली  होती. नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरू झालेल्या दिवसांपासून साळवे यांनी आझाद मैदानावर न्याय मिळण्यासाठी आंदोलन सुरू केले होते व त्यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी केली की त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करून दोषींना वाचविणारे उल्हासनगर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निलंबित करण्यात यावे परंतु आजपर्यंत कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार पक्ष देखील याकडे लक्ष देत नसल्याने   त्यामुळे 28 जानेवारी रोजी साळवे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

 प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा येथे आयुक्तांची भेट

अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा येथे आयुक्तांची भेट ठाणे : अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे की नाही, याचा आढावा घेण्यासाठी १६ जानेवारी रोजी आयुक्त डॉ.…

उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा

उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा ठाणे : उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत वंचितकडून  निवडून आलेले सुरेखा सोनावणे आणि विकास खरात या दोन नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच दलीत वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील कामे करण्यात यावीत यासाठी हा पाठिंबा देत असल्याचे त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले.यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि नगरसेवक योगेश जानकर, प्रवक्ते राहुल लोंढे हेदेखील यावेळी उपस्थित होते.

ठाण्यात भाजपच्या २८ नगरसेवकांमध्ये प्रतिभा मढवी ठरल्या अव्वल!

ठाण्यात भाजपच्या २८ नगरसेवकांमध्ये प्रतिभा मढवी ठरल्या अव्वल! ठाणे: ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने ३९ पैकी २८ जागा पटकावुन एकीकडे ७५ टक्के इतका स्ट्राईक रेट राखला असताना दुसरीकडे या २८ विजेत्यांमधील नौपाडा प्रभागातील प्रतिभा राजेश मढवी यांनी ७१.५६ टक्के मते घेऊन त्या भाजपमध्ये अव्वल विजेत्या ठरल्या आहेत. मतदार राजाने प्रतिभा मढवी ह्यांना विक्रमी मतदान करून डॉ.राजेश मढवी फौंडेशनच्या माध्यमातून नौपाडा प्रभागात गेली अनेक वर्ष केलेल्या समाजकारणाची पावतीच एक प्रकारे दिल्याचे दिसुन येत आहे. ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेसोबत महायुतीमध्ये असलेल्या भाजपने २८ जागांवर निर्विवाद विजय मिळवुन घवघवीत यश संपादीत केले. २०१७ मध्ये भाजपच्या २३ जागा होत्या, त्यामध्ये ५ जागांची भर पडली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनसेवक आमदार संजय केळकर, ठाणे निवडणुक प्रभारी आमदार ॲड. निरंजन डावखरे आणि भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम संघटन शक्तीच्या जोरावर ओवळा ते शिळ अशा प्रत्येक विधानसभेत भाजपने कमळ फुलवले आहे. भाजपाच्या निवडून आलेल्या ह्या २८ नगरसेवकांपैकी नौपाडा प्रभाग क्रमांक २१ ब मधील भाजप उमेदवार प्रतिभा मढवी यांनी, विजयाची पुनरावृत्ती करताना प्रभाग २१ मधून झालेल्या २५ हजार ७७ इतक्या मतदानापैकी तब्बल १७ हजार ९४५ असे ७१.५६ टक्के विक्रमी मतदान मिळवले आहे. प्रतिभा मढवी ह्या भाजपचे उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांच्या पत्नी असुन गेली अनेक वर्षे हे दांपत्य पक्षभेद विसरून प्रभागातील नागरिकांची अविरत सेवा करीत आहे. एक प्रकारे मढवी दांपत्याच्या समाजकार्याची पोचपावती मतदारांनी दिल्याचे दिसुन आले आहे. चौकट महायुतीचे वीर दौडले ‘सात’ भाजप – शिवसेना महायुतीने ठाण्यात लढवलेल्या एकुण १३१ जागांमध्ये युतीचे तब्बल सात ‘वीर’ तुफान दौडले आहेत. संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्राचा विचार केल्यास या १३१ नगरसेवकांमध्ये सर्वाधिक पसंतीचे हक्कदार शिवसेनेचे प्रभाग क्रमांक १७ ड चे योगेश जानकर ठरले असुन त्यांना ७६.४६ टक्के मतदान झाले आहे. त्याखालोखाल प्रभाग १६ अ मधील सेनेच्याच डॉ. दर्शना जानकर यांना ७२.३३ टक्के मतदान झाले. त्याखालोखाल भाजपच्या प्रतिभा मढवी यांना ७१.५६ टक्के, संजय वाघुलेंना ७०.७३, सेनेच्या मंदार केणीना ७०.७१, संध्या मोरे ७०.६१ आणि जयश्री डेव्हीड यांना ७०.५९ टक्के इतके मतदान झाल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून दिसत आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात सेलिब्रिटींच्या गावभेटी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात सेलिब्रिटींच्या गावभेटी अनिल ठाणेकर ठाणे : राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व गावपातळीवर व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद ठाणे…

शिबिर हे अनुभवाने जगता येते – डॉ.गोरखनाथ किर्दत

शिबिर हे अनुभवाने जगता येते – डॉ.गोरखनाथ किर्दत अनिल ठाणेकर सांगली, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व  नेतृत्वगुणांचा पाया राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून घातला जातो. शिबिर हे अनुभवाने जगता येते, असे प्रतिपादन जिल्हा समन्वयक डॉ. गोरखनाथ किर्दत यांनी केले. मसुचीवाडी येथे मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपा प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, “समायोजन,आपले वर्तन ,सहकार्य, समर्पणाची भावना हीच, स्वयंसेवकाची खरी ओळख आहे. समाजाची गरज काय आहे हे जाणून घेऊन समाजाच्या मदतीसाठी जाऊन आपल्याला  योगदान देता येईल व सामाजिक बांधिलकी जपता येईल.” अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर  होते. ते म्हणाले की, ग्रामीण संस्कृतीची जाण आणि समाजशीलता  शिबिरातून निर्माण होते. कृतीद्वारे घेतलेले शिक्षण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर उपयोगी पडते. आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्याकडे वेगवेगळी कौशल्य असणे गरजेचे आहे. सरपंच राधिका पाटोळे, उपसरपंच अमित कदम, ग्रामपंचायत सदस्य उज्वला फाटक, जयेश कदम, अजित गुरव ,तुकाराम सावळा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विजयकुमार माळगे ,सर्व प्राध्यापक, कर्मचारी ,ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिरात गावची स्वच्छता, नदी परिसर स्वच्छता, प्लॅस्टिक संकलन ,जलसाक्षरता, कृषीविषयक सर्व्हे ,आरोग्य तपासणी सर्वे ,शाळेच्या परिसरात परसबाग, प्रबोधनपर व्याख्याने, व्यसनाधीनतेवर पोस्टर प्रेसेंटेशन इत्यादी उपक्रम राबविले .शिबिरातील उत्कृष्ट स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला.