रेल्वे कर्मचारी, अधिकारी व समाजसेवकांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

मुंबई :महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त चर्नीरोड (प. रेल्वे) स्थानकावर भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रेल्वे कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून हा जयंती महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
चर्नीरोड स्थानकावरील पश्चिम रेल्वे तिकीट घर ब्रिजवर वाणिज्य अधीक्षक जितेंद्र गजभिये यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला. मंगेश कुपवडेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती सोहळ्याची सुरुवात झाली. यानंतर अनिता सातपुते (वाणिज्य अधीक्षक, ग्रॅन्ट रोड) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उदय राणे (स्टेशन अधीक्षक) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख प्रवचनकार समाजभूषण बौद्धाचार्य सो. ना. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध वंदना व पूजापाठ संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात समाजसेवक नामदेव सरवदे, एच. एम. जाधव (सहाय्यक आयुक्त, मनपा मुंबई), उद्योगजक मयूर शहा, योगेश नंदेश्वर (प्रयोगशाळा अधीक्षक, प.रे.), शशिकांत सावंत, विठ्ठल सोनकांबळे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून अभिवादन केले.
आयोजक जितेंद्र गजभिये यांनी आभार प्रदर्शन करताना सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळेच आम्ही आज उच्च पदावर पोहोचलो आहोत. त्यांच्या कार्याची जाणीव कामगारांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करणे हे आपले कर्तव्य आहे. ही जयंती साजरी करताना आम्हाला अभिमान वाटतो.”
या जयंती महोत्सवाच्या यशस्वितेसाठी नितीन सोनावणे, अविनाश शिर्के, प्रकाश बनसोडे, अजिनाथ खरात, आरती सकपाळ, राजेश लोहानी, प्रियंका आझाद, राजकुमार शर्मा, चंदनकुमार, श्रुती मोरे, सुमन कोरी आदींनी विशेष परिश्रम घेतले. मुक्त पत्रकार समाजभूषण बौद्धाचार्य सो. ना. कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कार्यक्रम यशस्वी झाल्याची माहिती दिली.
