कल्याण : महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कल्याण पूर्वेतील मी कल्याणकर सामाजिक संस्थेतर्फे यावर्षी नाशिक येथील काळाराम मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. काळाराम मंदिराचा लढा हा केवळ मूर्तीच्या दर्शनासाठी नव्हता, तर तो माणसाला माणूस म्हणून मिळणाऱ्या अधिकाराचा, समानतेचा आणि स्वाभिमानाचा लढा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या सत्याग्रहातून जगाला दाखवून दिले की, ‘गुलामगिरीची जाणीव झाली की गुलाम बंड करून उठतो’. काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या स्मृतीस आणि बाबासाहेबांच्या त्या अदम्य जिद्दीस या देखाव्यातून अभिवादन केले असल्याची माहिती माजी नगरसेवक तथा मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितिन निकम यांनी दिली.
